Showing posts with label राजगृह. Show all posts
Showing posts with label राजगृह. Show all posts

Thursday, July 9, 2020

राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके




Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके

मुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर. जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पडायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं ठरवलं. 1930 साली त्यासाठी बाबासाहेबांनी दादरला जागा विकत घेतली. पुढं बॅरिस्टरीतून कमावलेल्या पैशातून बाबासाहेबांनी घराचं काम सुरू केलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा कालखंड काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनासाठी ओळखला जातो.

1930 ला नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेलं आंदोलन जवळपास सहा वर्षं सुरू होतं. याच काळात बाबासाहेब बौद्ध धर्माकडे आकृष्ठ होत होते. एकीकडे सत्याग्रह सुरु होता तर दुसरीकडे घराचं काम. दोन्ही जेव्हा पूर्ण व्हायला आलं तेव्हा बाबासाहेब एका ठोस निर्णयापर्यंत पोहचले होते. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय. त्याची सुरुवात बाबासाहेबानी त्यांच्या नव्या घरापासून करायची ठरवलं. या नव्या घराला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह. हे राजगृह हे नाव भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळाशी नातं सांगणारं होतं.

राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार-
भारतात मगध साम्राज्य जेव्हा शिखरावर होतं तेव्हा आत्ताच्या बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं. बिंबिसार आणि अजातशत्रू या राज्यांची ही राजधानी होती. सम्राट अशोकानेही इथं भेट दिली होती. एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्ध हे देखील राजगृह या ठिकाणी राहिले होते. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या राजगृहाचं नाव बाबासाहेबांनी आपल्या नव्या घराला द्यायचं ठरवलं. अर्थात पुढं या दादरचं हे नवं राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार बनणार होतं. घराचं काम 1934 ला पूर्ण झाल्यावर बाबासाहेब रमाबाई आंबेडकरांबरोबर इथं राहायला आले. बाबासाहेबांना त्यांचे आवडते ग्रंथ व्यवस्थित ठेवता यावेत आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा उपयोग करता यावा यासाठी सोईस्कर ठरेल अशी या घराची बाबासाहेबांनी रचना करून घेतली होती.

राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह-
बाबासाहेबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक लढ्याची सूत्रं आता या राजगृहातून हलायला लागली. पण थोड्याच कालावधीत म्हणजे मे 1935 ला रमाबाई आंबेडकरांचं इथं निधन झालं. पुढं हे राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह बनलं. बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक महत्वाच्या ग्रंथांचं लेखन इथं केलं. एनिहिलेशन ऑफ कास्ट वेटींग फॉर व्हिजा हे ग्रंथ इथंच आकाराला आले. बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्याचा निर्णयही इथंच घेतला. पुढं बाबासाहेबांचं तब्ब्ल बावीस वर्ष या राजगृहात वास्तव्य राहिलं. या राजगृहातील पुस्तकांचा संग्रह हा गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या देखील उच्च दर्जाचा होता. पुढं हे राजगृह आंबेडकर कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान म्हणून ओळखलं गेलं. पण या राजगृहाची खरी ओळख ही ज्ञान आणि ऊर्जेचं केंद्र म्हणूनच इतिहासात नोंद झालीय. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यावर ओरखडाही पडणं शक्य नाही.

History of Rajgruha | राजगृहाचा इतिहास काय आहे? कोणत्या घटना राजगृहाशी निगडित आहेत? WEB EXCLUSIVE
By : एबीपी माझा वेब टीम |

अधिक माहितीसाठी : Rajgruha history of rajgriha pune dr babasaheb ambedkar hari narke  Updated : 11 Jul 2020 12:09 AM (IST)

https://marathi.abplive.com/videos/news/what-is-the-history-of-rajagriha-which-incidents-are-related-to-rajruha-web-exclusive-788330


प्रा.हरी नरके यांची मुलाखत- By: मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 09 Jul 2020 08:46 PM (IST)

राजगृह: जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र, विश्वाचे ज्ञानकेंद्र- प्रा. हरी नरके






दादर परिसरातील राजगृहाला तिहेरी महत्व आहे. मुळात तिथे पुस्तकं राहात होती आणि उरलेल्या जागेत आंबेडकर कुटूंबिय राहात होते. ते जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र/प्रेरणास्थान आणि सार्‍या विश्वाचे ज्ञानकेंद्र आहे. ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थळ हे फक्त एक घर नाही. १९३४ ते १९५६ या काळात बाबासाहेब तिथे राहात असत. त्यांनी अनेक पुस्तकं तिथं लिहिली. त्यांचे दोन मास्टरपीसेस "अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" आणि "वेटींग फॉर व्हीसा" इथेच लिहिले गेले. "स्वतंत्र मजूर पक्षाचा" जन्म इथेच झाला. २७ मे १९३५ मातोश्री रमाबाईंचे महानिर्वाण इथेच झाले. बाबासाहेब सुमारे २८ वर्षे मुंबईच्या चाळीतच राहिले. जेव्हा ते शासकीय विधी महाविद्यालयात प्रोफेसर झाले तेव्हा पोय बावडीची चाळीतली जागा पुस्तकांसाठी फारच अपुरी पडू लागल्याने दादरच्या हिंदू कॉलनीच्या परिसरात त्यांनी दोन प्लाॅट खरेदी केले. बॅंकेचे कर्ज काढून १९३१ ला राजगृहाचे बांधकाम त्यांनी सुरू केले. १९३३ च्या अखेरीस राजगृह बांधून तयार झाले. १९३४ च्या प्रारंभी बाबासाहेब, रमाबाई, यशवंतराव, लक्ष्मीबाई, मुकुंदराव हा आंबेडकर परिवार तिथे राहायला गेला.


आपल्या बंगल्याला "राजगृह" हे नाव देण्यामागे बाबासाहेबांचा एक ठाम विचार होता. बिहार मधल्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगिर किंवा राजगृहला तथागत अनेकवेळा राहिलेले होते. त्यांनी त्याठिकाणी धम्मप्रवचने दिलेली होती. राजगृह ही मगधांची पहिली राजधानी. बिंबीसार व अजातशत्रू या बौद्ध राजांची कारकिर्द या शहराने पाहीली. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली होती. इ.स.पुर्व २००० मधील बांधकामाचे अवशेष या शहरात मिळतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांचे पवित्र स्थान म्हणुन या शहराला महत्व आहे. पहिली बौद्ध धम्म संगिती इथेच झाली. "विनयपिटक" या पवित्र बौद्ध ग्रंथाची निर्मिती २२५० वर्षांपुर्वी इथेच झाली. या ग्रंथात महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख मिळतो.


 १९३३ मध्ये राजगृहाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेबांनी त्यांचे मित्र सुभेदार सवादकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात आपला धर्मांतराचा निर्णय झालेला आहे व आपला कल बौद्ध धम्माकडे आहे असे त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे. येवल्याला त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी जी धर्मांतराची  महागर्जना केली ते भाषण राजगृहातच लिहिले गेले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याची केस लढण्याची तयारी करणे, शेतकर्‍यांची आंदोलने, खोती विरोधी बिल, कुटुंब नियोजन बिल ह्या सार्‍या ऎतिहासिक गोष्टी राजगृहावरच जन्माला आल्या.



जल उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा  या महत्वाच्या असल्या तरी त्यात भारनियमन /लोडशेडींग असू शकते. पण बाबासाहेबांच्या राजगृहातून मिळणारी बौद्धिक उर्जा मात्र कोणतेही भारनियमन नसलेली.


बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी देशातला सर्वात मोठा खाजगी ग्रंथसंग्रह होता. सुरूवातीला त्यात ५० हजार ग्रंथ होते. त्यात सतत भर पडत राहिली. नंतर बाबासाहेबांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीला राहिले. त्यामुळे राजगृहावरील काही पुस्तके तिकडे हलवण्यात आली. नंतर काही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, औरंगाबादच्या ग्रंथालयांना दिली गेली.


बाबासाहेबांचा हा ग्रंथसंग्रह त्या काळात बनारस हिंदु विद्यापीठाचे मालवियजी आणि पिलानीचे बिर्ला शेट यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले असताना व बाबासाहेबांना त्याकाळात आर्थिक निकड असतानाही बाबासाहेबांनी हा ग्रंथसंग्रह विकला नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, " माझा समाज ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला शतकानुशतके ज्ञानाची उपासमार सोसावी लागली. त्यांची ही अपुरी राहिलेली तहानभुक माझ्या एकट्यामध्ये सामावलेली असल्याने मी रात्रंदिवस, प्रत्येक सेकंद वाचतच असतो."

राजगृह हे वाचन संस्कृतीचं माहेरघर आहे. ते सार्‍या जगाचे ज्ञानकेंद्र आहे. तमाम बौद्धांचे ते पवित्र तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे.

बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे व ज्ञान निर्मितीचे जागतिक प्रतिक आहेत. राजगृह हे ज्ञाननिर्मितीचे महाकेंद्र आहे.


- प्रा. हरी नरके,
हरी नरके, ९/७/२०२०