Showing posts with label शिक्षण. Show all posts
Showing posts with label शिक्षण. Show all posts

Monday, July 6, 2020

आदर्श शिक्षण पद्धती गुरूकुलाची की नालंदाची? - प्रा.हरी नरके





प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल, गुरूकुलाबद्दल, नेहमीच गौरवोद्गार काढणारे माझे मित्र खालील गोष्टींबद्दल कधी आत्मपरीक्षण करणार?


१. जी शिक्षण पद्धती आदर्श मानली जात होती, त्या गुरूकुलांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मुलांनाच प्रवेश होता. तिथे मुलींना व शूद्र-अतिशूद्रांना प्रवेश नव्हता. देशाच्या लोकसंख्येत सुमारे ८५ टक्के असलेल्या वरील समाजघटकांना शिक्षणाच्या बाबतीत बहिष्कृत मानणारी व्यवस्था आदर्श कशी काय असू शकते?


२. गुरूकुल शिक्षणात ज्ञानाच्या संदर्भातील शिक्षण असले तरी तिथे कला-कौशल्ये-शेती-उद्योगाचे शिक्षण दिले जात होते काय? नसल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी यांची गरज नसते काय?


३. गार्गी-मैत्रेयी, यादव कुळातील श्रीकृष्ण अशी मोजकी, शेलकी, अपवादात्मक उदाहरणे देऊन समर्थनपर सूर लावू नका. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मला आत्मपरीक्षणात्मक मांडणी अभिप्रेत आहे.


४. रामायण - महाभारतातील द्रोणाचार्य-एकलव्य, शंबूक-राम ही उदाहरणे प्रसिद्ध आहेत. शंबूक प्रकरण प्रक्षिप्त आहे वगैरे सांगून माझी समजूत घालण्याआधी ते प्रक्षिप्त नेमके किती वर्षांपुर्वी रामायणात समाविष्ट झाले याचे नेमके वर्ष सांगता का? ते नंतर आले असले तरी त्यालाही शतके लोटलीत. तेव्हा ते नंतरचेसुद्धा समाजमनावर परिणाम करीत होते हे कसे नाकारता येईल?


५. जुनी मूल्यव्यवस्था आणि आधुनिक मुल्यव्यवस्था यांची मला गल्लत करायची नाही. तथापि ती जुनी मूल्ये आज २०२० मध्ये आदर्श नाहीत एव्हढे तरी मान्य करणार की नाही?


६. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितलेली नव्हती. पगार मागितलेला होता. त्यांनी जर एकलव्याला शिकवण्याचे कामच केलेले नव्हते तर ते त्याच्याकडे पगार कसा काय मागू शकत होते? " काम नाही तर पगार नाही, "  हे नितीमूल्य त्यांना लागू नव्हते काय?


७. या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक, गुणत्तापुर्ण आणि ज्ञानासहीत कौशल्यांचे शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, सोमपुरा विद्यापीठे, किंवा शिक्षणाचा पॅटर्न मला तरी आदर्श वाटतो. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये अवश्य लिहा. मूल्यमापनात्मकही कमेंट करा.

-प्रा.हरी नरके, ६/७/२०२०


छायाचित्र सौजन्य- सुभाषचंद्र सोनार, शाम कांबळे

Tuesday, May 19, 2020

ओपन कॅटेगरीमध्ये क्रिमी लेयर लावणे का अत्यावश्यक आहे?- प्रा. हरी नरके


क्रिम म्हणजे दुधावरची साय किंवा मलई. क्रिमी लेयर म्हणजे दुधातला संपन्न, स्निग्ध घटक. ज्यापासून लोणी, तूप बनवले जाते. प्रत्येक समाजातही काही लोक प्रगत असतात, पुढारलेले असतात, श्रीमंत संपन्न झालेले असतात. त्यांना सरकारी सवलतीचा फायदा न देता फक्त नॉन क्रिमी लेयरला म्हणजेच गरिबांना फायदा देणे होय. याला म्हणतात क्रिमी लेयरचे तत्व लागू करणे.


ओबीसी, व्हीजेएनटीला क्रिमी लेयर तत्व लावले गेलेले आहे. अनु. जाती, जमातींना ते लावण्याची मागणी तथाकथित उच्चवर्णीय वारंवार करीत आहेत. त्यामुळे सरकार आणि न्यायालयांनी त्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केलेली आहे. तेव्हा माझी मागणी अशीय की ज्या जागा खुल्या असतात, म्हणजे ज्या जागा ओपन कॅटेगिरीत येतात तिथेही क्रिमी लेयर तत्व लावले गेले पाहिजे. 


ओपनच्या जागांवर सर्वांचाच हक्क असतो. होय ओपनच्या जागा म्हणजे फक्त तथाकथित उच्चवर्णियांचे राखीव कुरण नव्हे. त्या जागांवर सर्वच समाजातील गुणवंतांचा अधिकार असतो.


तर त्या जागा सुयोग्य, गरिब, होतकरू आणि गरजू यांनाच मिळाव्यात असे म्हणण्यात वावगे काय आहे? आमच्या दोनतीन पिढ्या शिकल्या तर ज्यांच्या डोळ्यावर येते त्यांना मला विचारायचेय, १. शिक्षण हे पवित्र काम आहे, असे तुम्ही म्हणता ना? २. शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही असे संस्कार तुम्ही तुमच्या पोराबाळांवर करता ना? ३. प्रसंगी पोटाला चिमटा काढून तुम्ही मुलामुलींना शिकवता ना? मग असे हे पवित्र शिक्षण तुमच्या बापजाद्यांनी पिढ्यानुपिढ्या (सुमारे २५०० वर्षे) स्त्रिया, तथाकथित शुद्र आणि अतिशूद्र यांना बंद केले होते हा त्यांचा गुन्हा नाही काय? त्याचे अंशत: परिमार्जन म्हणून काही जागा या शिक्षण वंचितंसाठी काही काळ राखीव ठेवल्या तर तुमचा एव्हढा संताप-संताप का होतोय?

स्वत:ला विश्वगुरू म्हणवणारे, जे भारताबाहेर राहून उंटावरून शेळ्या हाकाव्यात तसे भारताबद्दल लिहितायत ते, म्हणतात, " आरक्षण हे वंचित आणि पिढ्यानपिढ्या मागास असलेल्या समूहांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये भागीदारी मिळावे यासाठी सुरु केले होते. आरक्षणाच्या जागा या ओपनमधून काढून राखीव केलेल्या आहेत. ओपन जागांवर सर्वांचाच अधिकार आहे. जेव्हां या जागा बाजूला काढून एका विशिष्ट उद्देशासाठी राखीव ठेवल्या जातात, तेव्हां त्या जागा कशा भरल्या जातात, त्यामुळे सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट खरोखर साध्य होते का या बाबी तपासण्याचा अधिकार सर्वांना आहे. जर आरक्षित जागांचा लाभ सुस्थितीत असलेल्या परिवारातील दुसरी तिसरी पिढी घेत असेल आणि गरीब गरजू लोकांना याचा फायदा मिळत नसताना दिसत असेल तर हा मुद्दा उठणारच. त्यामुळे एवढे भेदरून का जाता? हा पण सामाजिक न्यायाचाच एक भाग आहे. आता राहिला प्रश्न ओपन मधील गरिबांचा. सरकारने मागच्या वर्षी जाहीर केलेला १० टक्के कोटा यांच्यासाठीच आहे. ओपन मधल्या काही जागा गरीब घटकांसाठी राखून ठेवण्यास कोणाचाही विरोध नाही. यात सवर्ण, मुस्लिम, पारशी, ख्रिस्ती वगैरेसारखे बरेच समूह समाविष्ट आहेत."

मुदलात ज्यांना स्वत:च्या घरातसुद्धा कोणी हिंग लावून विचारीत नाहीत ते विश्वगुरू कसले? तुम्ही देश सोडला ना? मग आता या देशाचं काय करायचं ते आम्हाला ठरवू द्याना. तुम्ही कशाला नसत्या उठाठेवी करताय? तुम्ही भारतात नाक खुपसू नका. आम्हाला अनाहूत सल्ले देऊ नका. जस्ट शट अप. आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही तिकडे त्या ट्रंपतात्याला फुकटचे सल्ले द्या देशपांडेमहाशय.

अहो, आमची तर आत्ताशी दुसरी तिसरी पिढी लाभ घेतेय, तरिही तुम्हाला इसाळ येतो, तुमच्या तर शंभर पिढ्या लाभ घेतायत आता तरी सोडा की फुकटचं खाणं!
माझे मुद्दे थेट आहेत. ताकाला जाऊन भांडं लपवाच का?

१. बहुतेक सर्व शिक्षण संस्था सरकारी अनुदानावर चालतात. विनाअनुदानित किंवा संपुर्ण खाजगी संस्थांनासुद्धा सरकारी मदत या ना त्या स्वरूपात मिळते. तेव्हा ज्या संस्थांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शासकीय लाभ, मदत, फायदे, अनुदान मिळते तिथल्या खुल्या जागांना ( ओपन कॅटेगिरीला ) क्रिमी लेयर तत्व लावले जावे.
२. ज्या संस्थांना अनुदान मिळते तिथल्या शिक्षक-प्राध्यापकांचा पगार सरकार देते.

३. ज्या संस्थांना अनुदान मिळत नाही त्यांनाही शिक्षण संस्था या नावाखाली पाणी, वीज सवलतीच्या दरात मिळते. या संस्था विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रूपयांची फी उकळतात. भारतातल्या काही शाळांची व महाविद्यालयांची फी जर वर्षाला १५ ते २५ लाख रूपये असेल तर त्यांनी बाजारभावाने पाणी व वीज का घेऊ नये? त्यांना जमीन, मैदानं सरकारनं सवलतीत का द्यावीत? 
४. सर्वच शिक्षण संस्थांना मनपा करात, मिळकत कर ( प्रॉपर्टी टॅक्स ) मध्ये संपुर्ण सूट किंवा अंशत: सवलत मिळते. ज्या दराने उद्योग, व्यापार, व्यवसाय करणारे प्रॉपर्टी टॅक्स भरतात त्याच दराने यांनीही भरावा ना? यांना का अंशत: सवलत वा संपुर्ण सूट मिळावी?

५. सर्वच शिक्षण संस्थांना मिळणार्‍या देणग्यांना आयकरात सवलत असते. जे लाखो-कोट्यावधींनी फी उकळतात त्यांच्या देणग्यांना आयकरात सवलत कशासाठी?
६. अंबानींनी स्वत:ची शाळा का सुरू केली. कारण तो प्रॉफेट मेकींग बिजनेस आहे. शिवाय त्यांच्या सर्व कंपन्यांना सी.एस.आर फंड द्यावा लागतो. तो फंड इतर शाळांना द्यायच्या ऎवजी स्वत:च्या शाळांना देता यावा. म्हणजे शाळांच्या नावावर अंबानी सी.एस.आर फंड स्वत:च्याच खिशात घालणार. हे लोक जर लाखो रूपयांच्या फिया घेतात तर या खाजगी शिक्षण संस्थांना कशाला हवा सी.एस.आर फंड?

७. परीक्षा घेण्याच्या यंत्रणेवर सरकारी पैसा खर्च होतो. अभ्यासक्रम बनवण्यावर खर्च होतो. शिक्षण संस्थांना मान्यता देणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे यावरच्या यंत्रणेवर सरकारी खर्च होते.
८. याशिवाय अनेक ज्ञात-अज्ञात मार्गांनी सरकारी मदत या शिक्षण संस्थांना मिळते. ती जर बंद केली तर तेव्हढा पैसा सरकारकडे जमा होइल. ती संपत्ती देशाच्या विकासाच्या कामी येईल. पण कोणतेही सरकार असे करणार नाही. कारण ते उद्योगपतींचे मिंधे असते.

 ९. म्हणुन या शिक्षण संस्थांमध्ये क्रिमीलेयर लागू केल्यास त्या जागा सर्वच समाजातील गरिब गुणवंतांना मिळतील. त्या जागा सुयोग्य, खरे गरिब, होतकरू आणि गरजू यांनाच मिळाव्यात असे आमचे म्हणणे आहे.
१०. या शाळा-महाविद्यालयांमधून जेव्हा फक्त श्रीमंतांचीच मुले शिकतात तेव्हा त्यांचा ९० ते ९५ टक्के खर्च अशारितीने वाचतो. कोट्याधिश अब्जाधिशांच्या मुलामुलींच्या शिक्षणावर सरकारने हा पैसा का खर्च करावा? ते संपुर्ण फी भरून शिकू शकतात. त्यांनी अंशत: फुकटे का असावे? म्हणून सरकारी मदत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपाने मिळणार्‍या सर्व ठिकाणी खुल्या जागांनाही क्रिमी लेयर लावणे न्यायाचे आहे.

 ११. तिथे क्रिमी लेयर लावल्यास गरिब गुणवंतांना मोफत किंवा कमी फीमध्ये शिकता येईल व उरलेल्या जागा संपुर्ण फी भरून श्रीमंतही मिळवू शकतील.
१२. ज्या अर्थी ओपनमधील गरजूंसाठी १०% आरक्षणाला यांचा विरोध नाही त्याअर्थी यांचा खुल्या जागांना क्रिमी लेयर लावायला विरोध असता कामा नये. नाहीतर यांना ढोंगी, दांभिक व आप्पलपोटे फुकटे म्हणावे लागेल.

१३. खुल्या जागावाले जे १० टक्के आरक्षण घेतायत ते जर फुकटे नसतील तर मग अनु.जाती, जमाती, ओबीसी, व्हीजे एनटी, महिला आरक्षणातले फुकटे कशा? असा दुटप्पीपणा चालणार नाही. द्यायचे माप वेगळे आणि घ्यायचे माप वेगळे असे असत नसते. माप एकच हवे. निदान मापात तरी पाप करू नका.

माझी भुमिका अतिशय तर्कसंगत आहे. या भूमिकेत कोणाहीविरुद्ध आकस किंवा द्वेश नाही. आहे तो फक्त खुल्या गटातल्या, ओपन कॅटेगरीतल्या गरिबांबद्दलचा शुद्ध कळवळा.
संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1vgYbhdmoJffFsUt3Z404in6AYndGPorTRwMtBx-Qh2Qdn1bmVZey9E1Q


-प्रा. हरी नरके, १९/५/२०२०
अधिक माहितीसाठी माझी या आधीची,  " मागासांमध्ये फूट पाडण्यासाठीच क्रिमी लेयर - प्रा. हरी नरके" https://harinarke.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B0

Saturday, May 16, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान - प्रा. हरी नरके














डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान - प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते. 

तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात.


१] " अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदन, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्‍या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात आलेले आहे. त्यातल्या काहींवर तर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आलेला आहे. या आपल्याच बांधवांना जनावरासारखे वागवताना हिंदुंना त्याची लाजसुद्धा वाटत नाही. असे उदाहरण जगात दुसरे सापडणार नाही. कोट्यावधी आदिवासींना शिक्षण, आरोग्य, आधुनिक रोजगार, इतर नागरी सुविधांपासून वंचित ठेवणारी ही जातीव्यवस्था भयंकर आहे. कसल्या संस्कृतीच्या आणि उच्चत्वाच्या गप्पा मारतात हे वैदीक लोक? या फक्त बढाया आहेत. यांना थोडीजरी लाजशरम असेल तर या बांधवांना ते जवळ करतील. लाजिरवाण्या मागास अवस्थेतून त्यांना बाहेर काढून सन्मानजनक जीवन मिळावे यासाठी झटतील. त्यांच्यात जाऊन राहा. त्यांना आपले म्हणून स्विकारा. ही आपुलकीची भावनाच त्यांना मागासपणातून, रानटी आयुष्यातून बाहेर काढायला उपयोगी पडेल. पण जातीग्रस्त हिंदू तसे करीत नाहीत. प्रत्येक उच्चजातीय हिंदू माणूस आपली जात जपण्यासाठी राबणारा चिंतातूर जंतुच बनलेला असतो. या पतित मानव्याबद्दल वैदीकांना ना शरम ना लाज. वैदीकांची मानसिकता अत्यंत गलिच्छ आहे. देशबांधवांप्रती कर्तव्यभावना नसलेले हे निर्लज्ज वैदीक.

उद्या जर अहिंदूंनी, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी त्यांना जवळ केले, त्यांच्यात सुधारणा घडवल्या, धर्मांतर करवले तर अहिंदुंच्या संख्येत मोठी भर पडेल आणि याची संपुर्ण जबाबदारी वैदीक आणि त्यांची घृणास्पद जातीव्यवस्था यावर असेल." ***

२] आदिवासी बांधवांच्या दु:खावर प्रकाश टाकणारा बाबासाहेबांचा हा मजकूर इतका बोलका आहे की त्यावर कोणतेही अधिक भाष्य करायची गरजच नाही. मला सांगा, आदिवासी भावंडांबद्द्ल कळवळा असल्याशिवाय असे घनाघाती आणि वैदीकांच्या थोबाडीत चपराक मारणारे लेखन शक्य आहे काय? लक्षात ठेवा हे लेखन ८४ वर्षांपुर्वीचे आहे. तोपर्यंत एकाही हिंदूने वा वैदीकाने आदिवासींबद्दल असे लेखन केलेले नव्हते. म्हणे बाबासाहेब आदिवासींना विसरले. बुद्धीभेद करणारे हे **वे दुसरे काय करु शकतात?

३] १९२७ साली बाबासाहेब मुंबई प्रांताचे आमदार झाले. त्यांनी ताबडतोब अनु. जाती, अनु. जमाती व ओबीसी यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी सरकारला कमिशन नेमायला लावले. स्वत: गावोगाव फिरून,पाड्या - झोपड्यांवर जाऊन सर्व्हेक्षण केले. तीन वर्षे [१९२८ ते १९३०] धांडोळा घेऊन या ओ. बी. एच. स्टार्ट कमिशनचा रिपोर्ट बाबासाहेबांनी तयार केला. त्यात आदिवासी बांधवांना घटनात्मक संरक्षण आणि शिक्षण, आरोग्य, रोजगाराची व्यवस्था व नागरी सुविधा-सवलती सरकारने द्याव्यात अशी मागणी पहिल्यांदा केली. ती शिफारस ब्रिटीश सरकारला मान्य करायला लावली. 

४] त्यामुळेच महाराष्ट्र राज्यात [मुंबई प्रांत] प्रथमच समाज कल्याण बोर्ड व स्वतंत्र समाज कल्याण खाते सुरू झाले. आदिवासींसाठी वसतीगृहे, आश्रमशाळा, शिष्यवृत्त्या सुरू झाल्या. आज जे पहिल्या-दुसर्‍या पिढीतले आदिवासी नेते दिसताहेत हे त्यातनं तयार झालेले आहेत. आणि म्हणे बाबासाहेब आदिवासींना विसरले. कृतघ्न वैदीक.

५] १९३५ च्या इंडीया अ‍ॅक्टमध्ये आदिवासींना फारसे हक्क दिले गेले नाहीत. पण हा कायदा बाबासाहेबांनी तयार केलेला नाही. तो ब्रिटीशांनी केला. त्यावेळी ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व होते, ते त्यात
कमी पडले. मग पावती बाबासाहेबांच्या नावावर का फाडताय?

६] राज्यघटना लिहिताना बाबासाहेबांनी देशातील आदिवासींसाठी सर्वाधिक घटनात्मक संरक्षण पुरवले जाईल अश्या तरतुदी केल्या. भारतीय संविधानाचे कलम १३ ते ५१ आणि कलम ३३० ते ३४२ व ३७१ बघा म्हणजे तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल.

७] शैक्षणिक आरक्षण, सरकारी नोकर्‍यातील राखीव जागा, ग्रामपंचायत ते संसदेतले आरक्षण, ट्रायबल एरियासाठी स्वतंत्र तरतुदी, बजेटमध्ये राखीव निधी, आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, तिच्यातील योग्य गोष्टींचे जतन करण्यासाठी संस्थात्मक काम एव्हढे सारे करूनही जर वैदीक बाबासाहेबांबद्दल अपप्रचार करीत असतील तर विधायक-सकारात्मक प्रपोगंडा करण्यात आम्ही आंबेडकरवादी कमी पडलोय. 

आमचं कसंय ना, आमचे झाले थोडे नी व्याह्याने धाडले घोडे. आमचेच प्रश्न डोंगराएव्हढे. तेच सोडवता सोडवता आमचं कंबरडं मोडलेलं. काय सांगावं? आधीच्या पिढ्यांना दोष तरी कसा द्यावा.

तेज्याबाला, फेसबुक्यांचं बरंय, उठसूठ कुणावर तरी पावती फाडून मोकळं व्हायचं. नुसते हे करा, नी ते करा असे फुकटचोट सल्ले देत राहायचं. बस्स झालं, हे उंटावरून शेळ्या हाकणं, प्रत्यक्ष कामात उतरा नी मग शहाजोग सल्ले द्या.

निदान आतातरी डोळे उघडा, " आमचे बाबासाहेब, आमचे बाबासाहेब" असं करीत बाबासाहेबांच्या पायाला लटकण्याऎवजी ते   "आपले बाबासाहेब"  "सर्वांचे बाबासाहेब " कसे होतील यासाठी काम करा. "भारतभाग्यविधाता" असलेल्या बाबासाहेबांच्या कार्याचे चांगल्या अर्थाने मार्केटींग करा नाहीतर ही हलकट विरोधी अफवा गॅंग आज आदिवासी, उद्या ओबीसी, परवा भटके विमुक्त, आणखी कुणीतरी यांचे कान खोट्या प्रचाराने भरतील आणि बघता बघता या समुहांना बाबासाहेबांच्या विचारांपासून तोडतील. उशीर व्हायच्या आत जागे व्हा मित्रांनो. आता चर्चा पुरे झाल्या. कामाला लागू या.
- प्रा. हरी नरके, १६/५/२०२०


*** संदर्भासाठी पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड १ ला, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८९, पृ. ५२/५३

Friday, May 15, 2020

तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा

"महात्मा जोतीराव फुले यांना मी आपला गुरू मानतो. माळी समाजात त्यांचा जन्म झाला. पुष्कळ मराठे त्यांचे शिष्य होते. परंतु आजची परिस्थिती मोठी चमत्कारिक झालेली आहे. जोतीरावांचे नाव आज कोणीच घेत नाही. आम्ही घेतो. घेणारच. आम्ही चळवळ करतो म्हणून इतर लोक आमच्याकडे खुनशीपणाने पाहात आहेत.

शिकलेली माणसे नुसती पोटभरू असून भागणार नाही. "

"तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजच होय आरसा." शिक्षणाचा उपयोग असा झाला पाहिजे. आपण आपले मन पवित्र केले पाहिजे. आपला सद्गुणांकडे ओढा असला पाहिजे. शिक्षणाबरोबर माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.

" कबीर कहे कुछ उद्द्यम किजे, आप खाये और औरनको दिजे," या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा. आपण खा, दुसर्‍यांनाही द्या. स्वत:चे घर प्रथम सांभाळा, मात्र समाज कार्यालाही मदत करा. ज्ञान हे काही केवळ रोजगाराचे साधन होऊ शकत नाही. ज्ञान जीवनाच्या समग्र उन्नतीचे हत्त्यार आहे.

नाशिक सत्याग्रहाचा अनुभव तुम्हाला सांगतो. प्रथम माझ्यासोबत भाऊराव गायकवाड व अवघे पाचसहाजणच होते. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळपर्यंत एकही गडी सत्याग्रहाला आला नाही. सकाळी आम्ही पाच-सहा जणांनी मिरवणूक काढली. आमच्यावर दगडफेक झाली. नंतर आम्हाला १५ ते २० सत्याग्रही मिळाले. नंतर लोक वाढत गेले. इतके वाढले की आम्ही पाच वर्षे सत्याग्रह करू शकलो....

लहाणपणी मला माझी आई सांगायची मोठ्या माणसांना मामा म्हणत जा. मी पोस्टमनला मामा म्हणायचो. [ हशा आणि टाळ्या ] ...

प्रत्येकाने आपल्या घरात बुद्धाचा फोटो लावला पाहिजे. बुद्ध मार्गदाता आहे."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३ जून १९५३, मुंबई, रावळी कॅंप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड १८/३, पृ. ३५७/५८

Wednesday, April 22, 2020

धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र ब्राह्मणांना तरी परवडेल काय?-प्रा. हरी नरके, रा.स्व.संघ 5







स्मृतीच्या आधारे पतित ठरणार्‍या या तमाम ब्राह्मणांना शूद्र-अतिशूद्रांच्या पंक्तीला बसवणे भाग आहे.

परधर्मियांविषयी सतत द्वेशपुर्ण अफवा पसरवून हिंदुराष्ट्राची सोनेरी स्वप्नं बहुजनांच्या मनावर कोरली जातात. हे मनाचे श्लोक वाचून आणि ऎकून मूळ धर्मग्रंथ न वाचलेली बहुजन खिल्लारं चेकाळतात. बहुजानांना धर्मशास्त्रात काडीचाही अधिकार नाही. ते फक्त गुलाम आहेत. तरिही सर्व जातीतील हिंदू स्त्रिया, अनु. जाती, जमाती, भटके, विमुक्त आणि ओबीसी यांना हिंदूराष्ट्राचा अतोनात गर्व असतो. या हिंदूराष्ट्रात त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त वेठबिगारीच येईल. बहुजनांचे अज्ञान हेच आंबाभुर्जीतील रेशीमकिड्यांचे भांडवल असते. माता भगिनी आणि बहुजनहो, तुम्ही मूळ ग्रंथ वाचू लागाल त्याक्षणी परधर्मद्वेशावर म्हणजे शेणाच्या पोहावर उभारलेला हा हिंदूराष्ट्राच्या पत्त्यांचा बंगला ढासळेल. पण तुर्तास ते राहू द्या.

सांप्रत काळी आपण हे तथाकथित हिंदुराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडणार आहे काय याचा थोडा धांडोळा घेऊ.

धर्मशास्त्र सांगते, " वेदाध्ययन न करणारे किंवा अग्निहोत्र न ठेवणारे ब्राह्मण शूद्रासमान होत. वेद न जाणणारा, व्यापारावर उपजीविका करणारा, नटाचा धंदा करणारा, दुसर्‍याच्या वित्ताचे चोराप्रमाणे हरण करणारा अथवा वैद्यकीचा [ म्हणजे आजच्या भाषेत डॉक्टर चा ] धंदा करून उदरनिर्वाह करणारा ब्राह्मण हा " ब्राह्मण" ह्या संज्ञेस अपात्र आहे." असे वसिष्ठऋषींचे वचन आहे. वसिष्ठऋषी हे तर श्रीरामांचे गुरू. आधुनिक रामराज्यात त्यांची आज्ञा मानावीच लागणार नाही का? वसिष्ठऋषी पुढे म्हणतात, " व्याजबट्ट्याचा धंदा करणे हा ब्रह्महत्येपेक्षाही मोठा गुन्हा आहे. "


गौतमऋषींच्या मते अशा प्रकारच्या पतितांशी व्यवहार करणारे तेही पतितच होतात. अर्थात वरिल सर्व नियम पाळायचे झाले तर पतित नसलेले किती ब्राह्मण सापडतील?


अहो, सगळे डॉक्टर, अभिनेते, [ नटश्रेष्ठ शरद पोंक्षे, सौरभ गोखले, केतकी चितळे, इ. इ. ] गायक, व्यापार करणारे [ चितळे बंधूंसारखे सगळेच ] व्याज घेणारे म्हणजे बॅंकींग उद्योगातले सगळे, हे "पतित" ठरणार. ते "ब्राह्मण" राहणार नाहीत. पतिताचं वर्तन करणं म्हणजे ब्रह्महत्येचं पातक की हो डोक्यावर! आता मला सांगा हे सगळे पतित वगळले की केवळ वेदाध्ययन करणारे महाराष्ट्रासारख्या टिळक-आगरकर-राजवाडे-केतकरांच्या राज्यात दहावीस तरी उरतील काहो? म्हणजे उरलेल्यांमध्ये [ पतितांमध्ये ] खुद्द आपला जन्मदाता पिता जरी असला तरी खर्‍या धार्मिक माणसाने त्याचाही त्याग केला पाहिजे असे असे गौतम स्मृती सांगते. बौधायनाने आर्यावर्ताबाहेर जाणारांना कठोर प्रायश्चित सांगितले आहे. अगदी बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये जाणारांनाही हाच नियम लागू होतो. शूद्रांना शिकवणारे सारे ब्राह्मण दुषित होत. पतित होत असे धर्मशास्त्र सांगते.


ज्या धर्मशास्त्राच्या आधारे चांडाल जातीचे अस्तित्व सिद्ध होते त्याच स्मृतीच्या आधारे पतित ठरणार्‍या या तमाम ब्राह्मणांना शूद्र-अतिशूद्रांच्या पंक्तीला बसवणे भाग आहे.


असे सनातन धर्मशास्त्रावर आधारलेले हिंदूराष्ट्र देवप्रिय ब्राह्मणांना तरी परवडेल काय?

संदर्भ- विविध वृत, २२ जानेवारी, १९३३


प्रा.हरी नरके, २२/०४/२०२०

{लेखक भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. लेखातील मतं वैयक्तिक आहेत.}



तोंड ओळख करून घेण्यासाठी पाहा-

गौतम धर्मसूत्र अब तक उपलब्ध धर्मसूत्रों में प्राचीनतम है। https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0
https://en.wikipedia.org/wiki/Gautama_Dharmasutra


https://en.wikipedia.org/wiki/Vasishtha
Vashishtha (Sanskrit: वशिष्ठ, IAST: vaśiṣṭha) is one of the oldest and most revered Vedic rishis
https://en.wikipedia.org/wiki/Baudhayana_sutras
The Baudhāyana sūtras are a group of Vedic Sanskrit texts which cover dharma, daily ritual, mathematics, etc. They belong to the Taittiriya branch


बौधायन के सूत्र वैदिक संस्कृत में हैं तथा धर्म, दैनिक कर्मकाण्ड, गणित आदि से सम्बन्धित हैं। वे कृष्ण यजुर्वेद के तैत्तिरीय शाखा से सम्बन्धित हैं। सूत्र ग्रन्थों में सम्भवतः ये प्राचीनतम ग्रन्थ हैं। इनकी रचना सम्भवतः ८वीं-७वीं शताब्दी ईसापूर्व हुई थी।

https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8


अधिक संदर्भांसाठी वाचा- भारतरत्न म.म. पां.वा काणे लिखित, धर्मशास्त्राचा इतिहास, एकुण ५ खंड, आठ भाग, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, पुणे, १९३०-६२

The History of Dharmaśāstra, with subtitle Ancient and Medieval Religious and Civil Law in India, is a monumental five-volume work consisting of around 6,500 pages. It was written by Bharat Ratna Pandurang Vaman Kane, an Indologist. The first volume of the work was published in 1930 and the last one in 1962.

Sunday, March 8, 2020

अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार-

#Vaibhav_Chhaya - या मित्राचा मालिका आणि दूरदर्शन याबद्दलची साक्षरता वाढवणारा हा महत्वाचा लेख अवश्य वाचा- अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार- वैभव छाया सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार.पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. बीएआरसी बार्क ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हीजन मेजरमेंट सायंस इंडस्ट्री बॉडी म्हणून लौकिक मिळवून आहे. आपण जे कार्यक्रम टिव्हीवर पाहतो त्याचं रेटिंग सांगणारी ही संस्था आहे. कोणता कार्यक्रम, किती व कोणत्या लोकांनी, किती वेळ पाहीला. कार्यक्रमादरम्यान किती लोकांनी पूर्ण पाहीला, जाहीराती किती टक्के लोकांनी पाहील्या, एकुण किती मिनिटे वा सेकंद किती टक्के प्रेक्षक टिव्हीसमोर होते याची इत्थंभूत माहीती बीएआरसी देत असते. यासाठी ऑडिओ वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ज्यातून टीव्ही चॅनेल्सची व्हिवरशीप मोजता येते. यासाठी बीआयओ न्यूज ही सर्विस न्यूज चॅनेलचे रेटिंग मोजते. तर बीआयओ एडव्हिजन जाहीरातींच्या व्हिवरशीप मोजते. टीव्ही प्लस ओओएच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या टेलिव्हिजन सेट्सवरील रेटिंग काऊंट करते. असे अनेक प्रोडक्ट आणि सर्विस बीएआरसी पुरवत असते. ही मोजणी करताना दोन प्रकारांत शहरांची विभागणी केली जाते. ज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद ही पाच प्रमुख शहरे आहेत. जी पहिल्या श्रेणीत मोडतात तर ऊर्वरीत शहरे दुसऱ्या श्रेणीत येतात. जसे पिंपरी, नांदेड, कोल्हापूर, सांगली इत्यादी. जाहीरातदारांच्या दृष्टीने पहिल्या श्रेणीतील पाच शहरे महत्त्वाची असतात. कारण ती शहरेच त्यांच्या मुख्य बाजारपेठा आहेत. तिथे राहणारा वर्ग हा त्यांचा मुख्य खरेदीदार आहे. इतर शहरांत त्या तुलनेने लोकल ब्रँड्स जास्त पॉप्युलर असतात. ही आकडेवारी ठरवण्यासाठी जे सँपलिंग तयार केलं जातं त्याचे वयोगट पुढीलप्रमाणे असतात. लहान मुले 4 ते 8 वर्षे, 9 ते 14 वर्षे वयातील शाळकरी मुले, 15 ते 21 मधील तरूण, 22 ते 30 मधील युवक, 31 ते 40 हा प्रौढ गट, 41 ते 50 पूर्ण प्रौढ, 51 ते 60 प्रगल्भ गट, 61 च्या पुढे ज्येष्ठ नागरिक. यांचे मॅपिंग न्यू कंस्यूमर क्लासिफिकेशन सिस्टीम द्वारे केले जाते. ज्यास NCCS असे म्हटले जाते. बीएआरसी च्या आधी ही कामे TAM द्वारे केली जात होती. TAM मध्ये सोशिओ इकॉनॉमिक क्लासिफिकेशनचा वापर व्हायचा. ज्यास SEC म्हटले जायचे. एसईसी मध्ये घरातील कमावत्या व्यक्तीचे शिक्षण आणि उत्पन्न यांच्या आधारावर कंटेटची टेस्ट, चॉईस आणि प्लेसमेंट ठरवली जायची. परंतू NCCS मध्ये शिक्षण, उत्पन्न, वीज, उपलब्धता, शेतजमीन पासून अकरा विविध पॅरामीटर्सवर जोखूनच रेटिंग आणि त्याचे एनालिसिस केले जाते. आता येऊयात मुख्य मुद्द्यावर. जसे वर म्हटलेय तसे.. आताच्या घडीला बीएआरसी मुळे टिव्हिवर कोण कोणतं कंटेट किती वेळासाठी पाहतंय हे कळतं पण त्यासोबत कोणता वर्ग तो सामुहिक पद्धतीने पाहतोय हे देखील नीट कळू लागलं आहे. साहजिक आहे. बाजारपेठा त्याच हिशोबाने वर्कआऊट होणार. मराठी इंडस्ट्रीत झी, तेव्हाची अल्फा ही पायोनिअर कंपनी होती. पहिल्या पाच शहरांची चौकट लक्षात ठेवताना त्या शहरात राहणाऱ्या लोकांना जे कंटेट आवडेल तेच कंटेट टिव्हीवर आलं. तोच कित्ता इतर चॅनेल्सने गिरवला. भारतीय कलाक्षेत्र असंही रेसिस्ट आणि कास्टिस्ट आहेच. त्यात वाद नाही. गोऱ्या रंगापलीकडे रंग असलेल्यांना अभिनय येत असला तरी कलाकार म्हणायचं नाही याचे नीट आखीव रेखीव ठोकताळे रचून काम करणाऱ्या इंडस्ट्रीत ठराविक वर्गालाच प्रतिनिधित्व मिळेल याची सोय करून ठेवलेली होती. सिनेमा हे माध्यम सोपं नाही. सिनेमासारखं सिरिअलचं ही माध्यम निश्चित सोपे नाही. ते शिकावं लागतं. शिकण्यासाठी भली मोठी गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणूकीला आपल्या आजूबाजूच्या जगाने स्विकारार्हयता दाखवणेही तितकेच गरजेचे असते. मागासवर्गीय मुलामुलींना अभिनय शिकणं ही एकतर न परवडणारी गोष्ट असते. त्यात तंत्र शिकण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागते त्याची वानवा असते. सवर्ण जातीतींल मुलांना लहानपणापासून अभिनय आणि तंत्र शिक्षणाचे जे प्रिविलेजेस मिळतात ते वाड्या वस्त्यांतील शाळांमध्ये किंवा वातावरणात कुठेच मिळत नाहीत. अभिनय, नृत्य प्रशिक्षण शाळा, शिबिरे, वर्कशॉप आयोजित होण्याचं किंवा कुणीतरी पुढे येऊन शिकवण्याचं कल्चर अजून डेवलप व्हायला वेळ लागणार आहे. पिढ्या न पिढ्यांचा बॅकलॉग आहे हा. असे कितीतरी मुद्दे आहेत जे सांगता येतील. पण ही काही प्रमुख कारणे आहेत मागासवर्गीय कलाकारांचा टक्का कमी दिसण्यामागे. मराठीने मागासवर्गीय कलाकारांना कायम साईड रोल किंवा कॉमेडिअन म्हणूनच स्विकारलेलं आहे. इंडस्ट्री सुद्धा त्यांच्यात म्हणावी तशी गुंतवणूक करत नाही. आणि हे कलाकार सुद्धा स्वतःचा सेफ झोन सांभाळून कोणतीही भूमिका न घेता कातडीबचाव वागत राहतात. आता मुद्दा दुसरा... सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार. पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. यासाठी दोन उदाहरणे.. उत्कर्ष व आदर्श शिंदे सारखा गायकांनी त्याचं मार्केटमधील स्थान आणि डिमांड अतिशय शिताफीने प्रेझेंट केली. मार्केटला झक मारून दखल घ्यावी लागली. दुसरं उदाहरण, महामानवाची गौरवगाथा, सावित्रीजोती सिरीयल. दोन्ही सिरीयलच्या निर्मात्यांनी रिस्क घेतली. का, तर त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. त्यांना इंडस्ट्रीच्या ठोकताळ्यांना कसं बदलायचं हे ठाऊक होतं. त्यांनी इंडस्ट्री आणि रेटिंगच्या पटलावर नसलेल्या मागास जातींना अधोरेखित केलं. पण असा निर्माता एकच आहे हे ही वेगळं सांगायला नको. हे मागास समुह सुद्धा तुमचे ग्राहक आहेत हे वाढणाऱ्या रेटिंग वरून आपोआप स्वच्छ दिसू लागलं. हळूहळू जाहीरातींनी ठेवलेला अप्रत्यक्ष अस्पृश्यपणा सोडायला सुरूवात केली. आपल्याला ही कंटेटची भाषा आणि पॉलिटिक्स नीट समजून घेऊन काम करावं लागेल. नव्या गोष्टी, नव्या मंचांची निर्मिती करावी लागेल. स्वतःच्या रक्तकिंमतीवर ते मंच, गोष्टी, कलाप्रकार, कलाकार पोसावे लागतील. आणि हो सोबतीला ठासून बोलावं ही लागेल. उघड विरोध करावाच लागेल. नुसतं कलेतून बोला कलेतून बोला सारखं गांडू धोरण स्विकारून चालणार नाही. बाकी आपण सूज्ञ आहात. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. आणि म्हणूनच.. सुजय डहाकेच्या वक्तव्याचे मी पूर्ण समर्थन करतो आहे. टीपः कंटेटचा बिजनेस शिकणं, त्याचं कमर्शिअल आत्मसात केल्याशिवाय कंटेटला कुणी पाहणार सुद्धा नाही. BARC (Broadcast Audience Research Council) - स्थापना 2010, कार्यरत- 2015 पासून. Indian Broadcasters Foundation (IBF), Advertisers (ISA) and Advertising & Media Agencies (AAAI).

Wednesday, January 1, 2020

शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा













शहीद सावित्रीबाई : नेतृत्व, सेवाभाव आणि शौर्यगाथा  - प्रा. हरी नरके

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा उद्या १९० वा जन्मदिवस. अस्पृश्य मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत सावित्रीबाई दवाखान्यात पोचल्या. त्यातच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

राजकीय ऋषी नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांनी सयाजीराव गायकवाडांना लिहिलेल्या पत्रात सावित्रीबाईंबद्दल म्हटले आहे की, ‘जोतिरावांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’ (३१ जुलै १८९०)

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’
शिक्षण, स्त्रीपुरूष समता, सामाजिक न्याय या विषयांची "सावित्री- जोती" यांनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. त्यांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून येतं. त्यामुळेच त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल समाजाच्या सर्व स्थरात विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.

राज्य शासनाने प्रकाशित केलेले सावित्रीबाई फुले :समग्र वाड्मय आणि सावित्रीबाई फुले : गौरवग्रंथ यांना प्रचंड मागणी आहे. प्रस्तुत लेखकाने लिहिलेले सावित्रीबाईंचे इंग्रजी चरित्र दिल्लीच्या एन.सी.ई.आर.टी. ने प्रकाशित केलेले असून त्याचा मराठी अनुवाद इस्लामपूरच्या नाग नालंदा प्रकाशनाने छापलेला आहे. या पुस्तकाचे अनुवाद अनेक भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत.

मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे. त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्रग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. पं. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निाफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित आहे.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या १० व्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

सावित्रीबाईंच्या जन्मस्थळाची अतिशय दुरावस्था होती. त्याची मुळाबरहुकुम पुनरउभारणी करणे, या गावाचा संपुर्ण कायापालट घडवणे, गावात शिल्पसृष्टी उभारणे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही खेड्यात नसलेल्या असंख्य सुविधा या गावात उपलब्ध करून देणे यासाठी माझी २० वर्षे सत्कर्मी लागली याचा मला अभिमान आहे.

पुण्यातल्या महात्मा फुलेवाड्याचा समग्र विकास, दिल्लीच्या संसद भवनात महात्मा फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे आणि पुणे विद्यापीठाचा नामविस्तार अशा असंख्य कामांमध्ये पुढाकार आणि यशप्राप्ती यांचा आनंद मला आयुष्यभरासाठी पुरणारा आहे. फुलेवाडा व नायगावला श्री. छगन भुजबळ यांना २८ वर्षांपुर्वी सर्वप्रथम घेऊन जाणे, त्यांच्याकडे व शासनाकडे या व इतर असंख्य कामांसाठी आग्रही राहणे, पाठपुरावा करून स्वत: राबून ही कामे करवून घेणे यातच माझ्या आयुष्याचे सार्थक आहे असे मी मानतो.


लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं. हीच देशाची खरी ज्ञानज्योती होय.

शेण नाही, ही तर फुलं आहेत
सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता  येताना सनातनी गुंड, टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत २ साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्ती केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणार्‍यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वपर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह
१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’ जोतीराव तापट तर सावित्रीबाई स्मितभाषी. जोतीराव आयुष्यात एकदाही सावित्रीबाईवर रागावल्याचे उदाहरण नाही.

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई उत्तर आयुष्यात तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता
मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकेचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला पुरात वाहून गेल्यानं निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता. पुढे त्याने दुसरा विवाह केला. त्याला एक मुलगी झाली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोचे व मुलीचे फार हाल झाले. या मुलीली एका सापत्य बिजवराशी लग्न करावे लागले. त्याच्य पत्नीला बेवारस स्थितीत फूटपाथवर मृत्यू आला. तिच्या मदतीला तिची पोटची पोरही आली नाही. या मुलीचे आजचे वारसदार आपण सावित्री-जोतीचे जैविक वारस असल्याचा डांगोरा पिटीत असतात. अर्थात त्यांनाही आपण जैविक वारस आहोत ही माहिती प्रस्तुत लेखकाच्या पुस्तकातून मिळालेली आहे.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड
१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी डॉ. यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसर-महंमदवाडीला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी डॉ. यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेरच्या महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन पायी ८ किलोमीटर धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. आपल्या दत्तक पुत्राला पाठीवर घेऊन स्वत:च्या गादीसाठी-संस्थानासाठी लढणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ गौरवाने सांगितल्या जातात. तथापि आजारी अपृश्य मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या आणि स्वत: शहीद होणार्‍या या शौर्यांगणेची कहाणी मात्र पाठ्यपुस्तकांत येत नाही. समाजधुरीणांकडून त्यावर मौनाचा कट केला जातो.

ज्ञानज्योती सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला. बालहत्त्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह, दुष्काळात १००० गरिब मुलांचे संगोपन करणे आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवणे या ४ कामांत सावित्रीने आपले नेतृत्व केले अशी कबुली दस्तुरखुद्द जोतीराव देतात, यातनं सावित्रीबाईंचं ऎतिहासिक योगदान अधोरेखित होतं.

- प्रा. हरी नरके, २ जानेवारी २०२०

Tuesday, October 22, 2019

मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?

मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?- प्रा.हरी नरके
आज बहुजन समाज शिकून सवरून महत्वाच्या पदांवर पोचलाय. काहींचे पगार इतके मुबलक आहेत की त्या पैशांचं काय करावं असा त्यांना प्रश्न पडतो.

शिक्षक, प्राध्यापक, सरकारी अधिकारी, खाजगी क्षेत्रातील पगारदार अशा बहुजनांची राज्यातली संख्या किमान १ कोटी असावी.

हा समाज शिकला सवरला पण पुस्तकांकडे वळला नाही. यातल्या ९९% लोकांच्या घरी एकही पुस्तक आढळणार नाही. ही माणसं मॉलमध्ये जाऊन भरमसाठ खरेदी करतील पण एकही दिवाळी अंक विकत घेणार नाहीत.

उथळ, भंपक, कंगालीकरण आणि सुमारीकरण असलेल्या हिन्दी मराठी टिव्ही कार्यक्रमात संपुर्ण बुडालेला हा समाज नाटकं बघायला मात्र कधीही फिरकत नाही.
बहुजनांचा ज्ञाननिर्मितीशी असा उभा दावा का?

सत्ताधारी झाले, श्रीमंत झाले, शिक्षण संस्थांचे मालक झाले, अधिकारी बनले पण हे बहुजन वाचनाकडे का वळले नसावेत?

व्हॉटसॲपवर २४ तास रमणारा हा स्त्रीपुरूष जमाव झुंडीत लवकर शिरतो, मग त्याला ग्रंथसंग्रहाचे वावडे का?
१% पेक्षा जास्त बहुजन वाचन-लेखन, संशोधन, ओपनियन मेकींग यांच्या फंदात पडत नाहीत. बहुजन प्राध्यापक,शिक्षक, अधिकारी,पत्रकार वाचन, वैचारिक चर्चा,व्यासंग, सर्जन/निर्मितीच्या क्षेत्रात दिसतात असा आरोप मी करणार नाही.

कुठे चुकले? काय चुकले?

हे असे का?

कोणी सांगेल ?

प्रा.हरी नरके, २२/१०/२०१९

Friday, October 18, 2019

सरकारने शिवरायांचा इतिहास का वगळला?- प्रा.हरी नरके






इयत्ता ४ थीचे बालभारतीचे पुस्तक छ. शिवरायांच्या इतिहासाचे असून ते अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय झाल्याची सध्या सर्व माध्यमांमध्ये चर्चा आहे. त्यावर कडाडून टिका झाल्यावर इ. ६ वीच्या पुस्तकात शिवराय असतील असा साळसुद खुलासा करण्यात आला. मग हे आधीच का केले नाही? सहावीचे पुस्तक आल्यावर मग इ. ४ थीचे पुस्तक रद्द का केले नाही? आता ही पश्चातबुद्धी का? दुसरीकडे हे नवे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे असल्याचे व त्याचा बालभारतीशी संबंध नसल्याचे सांगितले जातेय. खरेखोटे एक ते "विनोदविरच" जाणोत. शिक्षणात चातुर्वर्ण्य आणण्याचा हा सांघिक कट असल्याचा आरोप राज्य शासनावर होत आहे.


प्रत्यक्षात यामागे असलेले जातीय वर्चस्वाचे राजकारण वेगळेच आहे.

मागे १५ वर्षांपुर्वी जेम्स लेन ह्या अमेरिकन लेखकाने छ. शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांची बदनामी करणारा मजकूर असलेले पुस्तक लिहिले होते. त्याचा सर्वदूर झालेला धिक्कार योग्य, आवश्यक आणि इतिहासाचे विकृतीकरण करणारांना चपराक देणारा होता.
पुढे लालमहालातील दादोजी कोंडदेव यांच्या शिल्पाचा वाद गाजला.
ते शिल्प रातोरात कापूनही काढण्यात आले.

२००७ ची गोष्टय.

प्रा.वसंत पुरके हे तेव्हा आघाडी सरकारचे शिक्षणमंत्री होते. ३१ जुलै २००७ रोजी पुण्यात एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली. ते म्हणले, " छ. शिवराय-दादोजी" यांच्याबद्दल एक तज्ञ समिती नेमण्याचा सरकारने निर्णय घेतलाय. नरकेसर, तुम्ही त्या समितीचे अध्यक्षपद स्विकारावे."

मी त्यांचे आभार मानून नम्रपणे नकार दिला. मी त्यांना म्हणालो, " प्रा. जयसिंगराव पवार, प्रमोद मांडे, गजानन भास्कर मेहेंदळे, निनाद बेडेकर, आ. ह. साळुंखे, सदानंद मोरे, राजा दिक्षित, गणेश राऊत, संजय सोनवणी अशा ज्येष्ठ इतिहासकारांना आपण समितीवर घ्या. यातल्या ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्षपद द्या."
ते म्हणाले, " तुम्हाला या समितीचे किमान सदस्य तरी व्हावेच लागेल."

यथावकाश समिती स्थापनेचा शासनादेश आला. मला धक्काच बसला. कारण मी सुचवलेली काही मान्यवरांची नावं त्यात होती पण समितीची रचना चक्क जातीय निकषावर केलेली होती. छ. शिवरायांच्या जातीचे अध्यक्ष आणि ७० टक्के सदस्य व दादोजींच्या जातीचे ३० टक्के सदस्य. या शासकीय समितीवर सरकारने इतिहासतज्ञ म्हणून चक्क एका आक्रमक आणि वादग्रस्त संघटनेचे कार्यकर्ते घेतलेले होते.

झाले, त्यानुसार समितीचा निर्णयही आला.

समितीच्या बैठकीची कार्यवृत्ते वाचल्यावर समजले की दादोजींच्या जातवाल्यांनी समितीवर बहिष्कार घातलेला होता.

आलेल्या निर्णयाबद्दल त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले.

पुढे त्याप्रमाणे ४ थीचे इतिहासाचे पुस्तक बदलण्यात आले.

मात्र आता त्यात पुढे कधीही बदल करायचा नाही असाही विधीमंडळाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
पुढे काही वर्षांनी बालभारतीच्या इतिहास समितीवर काम करताना प्रा. सदानंद मोरे, आ.ह. साळुखे, संभाजी भगत, गोविंद पानसरे यांना या इतिहासात सकारात्मक भर घालायची होती, पण त्यावर सरकारची बंदी असल्याचे सांगण्यात आले.

आणि ज्या ४ थीच्या पुस्तकाला अजिबात हात लावायचा नाही असे सांगण्यात येत होते ते संपुर्ण पुस्तकच युती सरकारने आता रद्द केल्याचे माध्यमांतून समजतेय.

इतिहासाचे संशोधनाच्या नव्या प्रकाशात फेरलेखन करायलाच हवे. मात्र ते पुराव्यांवर आधारित असावे. तटस्थ आणि सत्यप्रिय भुमिकेतून ते व्हायला हवे. असत्यलेखन आणि सत्यापलाप यासाठी प्रसिद्ध असणारी संघटना आणि त्यांची भक्तमंडळी इतिहासाचं काय करतात ते आपण बघतच आलो आहोत.

आघाडी सरकारने इतिहास लेखनाला जातीय वळण दिले. युतीचे सरकार त्याच्या पुढचे पाऊल उचलित आहे.
नंबर एकवर कोण या दोन जातींच्या वर्चस्ववादी लढाईत इतिहासाचे काय होणार ते स्पष्टच आहे.

इतिहासाचा हत्त्यार म्हणून वापर करणारी आणि सोयीचा इतिहास तेव्हढाच सांगणारी, स्वकियांचे,विषमतेचे सदैव गौरवीकरण, उदात्तीकरण करणारी मात्र विरोधी विचारांचे विकृतीकरण करणारी आणि वर्चस्ववादी, जातवर्णवादी मंडळी आता ह्या इतिहासाचे काय वाटोळे करतील ते दिसतेच आहे.

-प्रा.हरी नरके, १८ ऑक्टोबर २०१९


Wednesday, September 11, 2019

पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७४ वर्षांपुर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. [ १३ सप्टेंबर १९४५] { काही पुस्तकांमध्ये ही स्थापना ८ जुलै १९४५ ला झाल्याचीही नोंद आहे} हे संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष. या संस्थेने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले. अनेक मान्यवरांना संस्थेकडून खूप काही मिळाले.

विशेषत: औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून दलित [आंबेडकरी] साहित्याचे शिल्पकार म्हणता येतील अशा दिग्गजांची जडणघडण झाली. संस्थेच्या नव्या शाखा निघाल्या. संस्थेचे आकारमान वाढले. विद्यार्थी तसे प्राध्यापकांची संख्या वाढली. उपक्रम वाढले. इमारती वाढल्या.


डॉ. बाबासाहेबांनी ते एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असतानाच आपण शिक्षण संस्था काढायची, तिचे महाविद्यालय गुणवंत-नामवंत असेल अशी उभारणी करायची असे मनाशी ठरवले होते. बी.ए.च्या परिक्षेत त्यांच्या वर्गात पहिल्या आलेल्या गजेंद्रगडकरांनाच त्यांनी पुढे आपल्या महाविद्यालयात पहिले प्राचार्य म्हणून नियुक्त केले. समाजातील खूप नामवंत आणि गुणवंत असलेल्या व्यक्तींना आपल्या संस्थेत आवर्जून बोलावून घेतले. प्राचार्य म.भि.चिटणीस, प्राचार्य म.ना.वानखडे, मधू दंडवते, भालचंद्र फडके, रा.ग.जाधव, वा.ल.कुलकर्णी, मे.पु.रेगे, शां.शं.रेगे, स.गं.मालशे आदींची निवड करताना त्यांनी निवडलेली माणसं किती भली होती याची खात्री पटते.


२० जुलै १९४२ रोजी डॉ. बाबासाहेब व्हॉईसरायच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे दहा मोठया खात्यांचा कार्यभार होता. त्यांनी अनुसुचित जातींसाठी केंद्रीय नोकर्‍यांमध्ये ८.३३ टक्के आरक्षणाची तरतूद करून घेतली. मात्र लवकरच त्यांच्या लक्षात आले की, शिक्षणाअभावी अनुसुचित जातींमधून पात्र उमेदवार मिळायला अडचण येते. त्यांनी तातडीने शिक्षण संस्था उभारणीला सुरूवात केली. मंत्रालयासमोरच्या शासकीय बराकींमध्ये संस्थेचे वर्ग भरत असत. मुंबईत तेव्हा नोकरी करून शिकणार्‍या गरिब, होतकरू मुलांमुलींसाठी सकाळचे एकही महाविद्यालय नव्हते. ती उणीव बाबासाहेबांनी भरून काढली.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि विनोदी लेखक बाळ गाडगीळ हे गरिब ब्राह्मण कुटुबांतले. गाडगीळ नोकरी करून शिकले ते बाबासाहेबांच्या या महाविद्यालयामुळे. यांनी आपले आत्मचरित्र बाबासाहेबांना अर्पण केलेले आहे.

अशा असंख्य ज्ञात अज्ञातांच्या वाटचालीत पीपल्स एज्युकेशनने शिक्षणाची सावली दिली.
बाबासाहेबांनी आपला अफाट ग्रंथसंग्रह पीपल्सच्या ग्रंथालयांना दिला. पालीभाषा, बौद्ध संस्कृती, आधुनिक ज्ञानविज्ञान या बाबतीत ही संस्था अग्रेसर राहावी असे त्यांचे स्वप्न होते. " शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा" हा मूलमंत्र बाबासाहेबांनी या संस्थेला दिला. पहिल्या दोनांवर जेव्हढा भर दिला गेला तितके लक्ष तिसर्‍याकडे दिले गेले काय?

संस्थेचे आजवरचे योगदान मोठेच आहे, तथापि बाबासाहेबांना जे अभिप्रेत होते ते संशोधन आणि ज्ञाननिर्मितीचे कार्य इथे घडले काय? अपेक्षित उंची, गुणवत्ता संस्था निर्माण करु शकली काय? याचेही आत्मपरीक्षण यानिमित्ताने व्हायला हवे. इतर संस्थांच्या तुलनेत पीपल्स एज्युकेशन सोसायटी नेमकी कुठे कमी पडली? मुंबई, पुणे, औरंगाबाद, महाड, नांदेड, कोल्हापूर, दापोली, पंढरपूर, बंगलोर आणि बुद्धगया यापलिकडे संस्थेच्या शाखा किती निघाल्या? संस्था उभारणे, त्या सुरळीतपणे चालवणे, त्यांचा विकास करणे आणि संस्थेचा नावलौकिक-गुणवत्ता यात सातत्याने वाढ करणे यात बहुजन का कमी पडतात, ज्ञानी माणसं जोडणं, माणसं सांभाळणं हे आम्हाला का जमत नाही? यावरही प्रकाश टाकला जायला हवा.



- प्रा. हरी नरके, ११ सप्टेंबर २०१९






Thursday, September 5, 2019

राधाकृष्णन भांडारकरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते






५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता.
आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.

त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे.विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राढाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.


ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा मात्र त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती या पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याचाच नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय?

-प्रा. हरी नरके, ५ सप्टेंबर २०१९

Thursday, July 11, 2019

महाराष्ट्रात मराठीत बोलणे हा गुन्हा होऊ शकतो?



तमीळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गांना ती ती राज्यभाषा शिकवणे कायद्याने सक्तीचे करून आता जमाना उलटला आहे. ह्या कायद्यांना आजवर कोणीही न्यायालयात आव्हान दिलेले नाही. त्यांची काटेकोर अंमलबजावणी चालू आहे. मग महाराष्ट्रातच असा कायदा का नको?

महाराष्ट्रात २००९ साली मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करणारा शासनादेश काढला गेला. गुजराती, इंग्रजी, हिंदी वगैरे भाषक मंडळींनी त्या शासनादेशाला केराची टोपली दाखवली. काही मंडळी त्या शासनादेशाविरूद्ध न्यायालयात गेली. पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला. मात्र सर्व न्यायालयांमध्ये ते हरले. मा.सर्वोच्च न्यायालयाने मराठीची अशी सक्ती करणे हे योग्यच असल्याचा निकाल दिला.

तरिही काही बोर्डांच्या व काही माध्यमांच्या शाळांचा मराठी द्वेष चालूच राहिला.

माजुर्डेपणाचा कळस म्हणजे काही शाळांनी तर शाळेच्या मैदानावर दोन मराठी विद्यार्थी आपसात खाजगीत मराठीत बोलल्याबद्दल त्यांना अमाणूष शिक्षा केल्या. त्यात काहींचे जीवही गेले. महाराष्ट्रात मराठीत बोलणे हा गुन्हा कसा काय होऊ शकतो? पण अनेक शाळांनी तसे नियम केलेले आहेत. मराठी बोलणाराला तुच्छ लेखले जाते, त्यांचा द्वेश केला जातो, त्यांना शिक्षा आणि दंड केला जातो, हे तुम्हाला योग्य आहे असे वाटते काय ?

आम्ही सर्वच भाषांचा आदर करतो. ज्यांना कोणाला इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, सिंधी, उर्दू,बंगाली अशा कोणत्याही भाषेच्या माध्यमातून कोणत्याही बोर्डाच्या शाळेतून शिकायचे वा बोलायचे /लिहायचे असेल त्यांना आम्ही अडवत नाही.

कारण आमचा इतर कोणत्याही भाषेला विरोध नाही.

इंग्रजी ही आज संपर्काची, रोजीरोटीची, प्रतिष्ठेची भाषा बनलेली आहे, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच आम्ही २० वर्षांपुर्वी मराठी माध्यमाच्या सर्व शाळांना इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याची व्यवस्था केली.
ज्यांना कोणाला आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचे असेल त्यांना आम्ही विरोध करीत नाही.
मात्र महाराष्ट्रातच मराठीवर बंदी घातलेली आम्ही खपवून घेणार नाही. सर्व शाळांनी हव्या त्या भाषा शिकवाव्यात, मात्र या राज्याची संपर्कभाषा मुलामुलींना आली पाहिजे म्हणून एक विषय म्हणून मराठी भाषाही शिकवावी एव्हढेच आमचे म्हणणे आहे.

जर शासकीय आदेश पाळला जाणार नसेल तर त्यांना दंड करण्याची /त्यांच्या शाळांची मान्यता काढून घेण्याची तरतूद करणारा कायदा हा मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी आवश्यक आहे.

तुमचे मत कॉमेंटमध्ये अवश्य लिहा. त्याची दखल घेऊन या कायद्याच्या मसुद्यात आवश्यकता भासल्यास तशी दुरूस्ती केली जाईल.

-प्रा.हरी नरके, ११जुलै २०१९

मराठीची सक्ती का?

Monday, June 10, 2019

तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण?




तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? -प्रा.हरी नरके
"आमची घरची खूप गरिबी होती. जगन्नाथ शंकरशेट यांच्या शाळेत माझ्या मोफत शिक्षणाची सोय झाली होती. या शाळेत केशवराव नावाचे एक शिक्षक होते. ते ब्राह्मण होते. मला मोफत शिक्षण मिळत असे याचे त्यांना वैशम्य वाटे. " मोफत शिक्षण फक्त ब्राह्मण मुलांनाच मिळावे, इतरांना नाही" असे ते म्हणत असत. मी आजारी पडल्याने माझा पहिल्या पाचातला नंबर खाली गेला. तेव्हा ते म्हणाले, " फी भर नाही तर शाळा सोड."
दुसर्‍या दिवशी माझे वडील त्यांना भेटले. खुप गयावया करून ते म्हणाले, " माझा मुलगा हुशार आहे, त्याला पुढे शिकू द्या,मी तुमच्या पाया पडतो."
केशवराव फार कठोर होते. ते म्हणाले, "जमणार नाही. तुम्हा कुणबटांना कशाला हवे शिक्षण? चालते व्हा. कसलातरी धंदा शिका."
माझ्या वडीलांच्या डोळ्यात आसवे आली. पण केशवराव नरम झाले नाहीत.
वडील मला घेऊन हेडमास्तरांना भेटले. ते थोर मनाचे होते. त्यांनी केशवरावांना बोलवून घेतले आणि सांगितले, " मी या मुलाच्या वर्गावर अनेकदा गेलो आहे. वर्गातला तो सर्वात हुशार मुलगा आहे. आजारपणामुळे तो या महिन्यात मागे पडला. त्याला वर्गात बसू द्या. शिकू द्या.हा माझा आदेश आहे." तेव्हा त्यांचा निरूपाय झाला.
ते थोर मनाचे मुख्याध्यापक म्हणजे कृष्णशास्त्री गोडबोले.."
-गुरुवर्य कृष्णराव अर्जून केळूसकर, आत्मचरित्र आणि चरित्र, [ लेखनकाळ- १९३४] संपादक, धनंजय कीर, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती, १९६१, दुसरी आवृत्ती २०१४, पृ. २८/२९
-प्रा.हरी नरके, १० जून २०१९

Saturday, June 1, 2019

भुरटे सरकारी इतिहासकार, राष्ट्रमातेची बदनामी आणि सतिप्रथा











भुरट्या सरकारी इतिहासकार श्रीमती श्यामा घोणसे यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची बदनामी करणारी वक्तव्ये केली.

खरंतर ज्या बाईंचा इतिहासाचा काडीमात्र अभ्यास नाही त्या श्यामा घोणसे यांना विद्यापीठाने गरळ ओकणार्‍या भाषणासाठी बोलावलेच कसे? हे विद्यापीठ आहे की समरसतेचा अड्डा?

शिक्षणमंत्री विनोद तावडॆंनी तर या महामातेला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख नेमलेले आहे.

त्यांची मुक्ताफळे अशी की " अहिल्यामातेच्या कुटुंबातील सर्व पुरूष व्यसनी होते, सतीची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी नाही तर समर्थ रामदास यांनी बंद केली."

माझा त्यांना सवाल आहे की काय महायोद्धा मल्हारराव होळकर व्यसनी होते?

संत रामदासांनी जर सती प्रथा बंद केली होती तर त्यांच्यासमोर छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतळाबाई सती कश्या काय गेल्या होत्या?

थोरले माधवराव पेशवे [माधवराव बाळाजी भट पेशवे] यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी रमाबाई कशा काय सती गेल्या होत्या?

संपुर्ण भारतातल्या १८ व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक असणार्‍या अहिल्यामातेला त्यांनी आज दुषणे लावलीत.

उद्या ह्या बाई म्हणतील मुलींची पहिली शाळा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी सुरू केली नसून ती भलत्याच कुणीतरी सुरू केलेली होती.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या या समरतेच्या भुरट्या सरकारी इतिहासकारांना त्यांची जागा आत्ताच दाखवली नाही तर हे लोक सगळाच इतिहास बदलून टाकतील.

ही प्रवृत्ती घातक आहे.

-प्रा.हरी नरके, १ जून २०१९

Tuesday, January 1, 2019

भिडेवाडा दुर्लक्षित का?







स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक कोसळण्याच्या स्थितीत - प्रा.हरी नरके

शनिवारवाडा, लालमहाल, विश्रामबागवाडा अशा ऎतिहासिक स्थळांचा विकास झाला, स्मारके झाली, मग स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे प्रतिक असलेल्या भिडेवाड्याकडे दुर्लक्ष का? हा वाडा कोणत्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीत आहे. गेल्या १३ वर्षात स्मारकाच्या घोषणा अनेकदा झाल्या. बैठका, चर्चा रंगल्या. मोर्चे झाले.तरिही वाड्याचे जतन का होत नाहीये?
हे स्मारक कोणाला नकोय?
वाड्यातले भाडेकरू, दुकानदार, बॅंक,स्थानिक लोकप्रतिनिधी, पुण्याचे आजीमाजी कारभारी यांना हा वाडा नष्ट करण्यात रस का आहे?
पुणे महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत २१ फेब्रुवारी २००६ ला भिडेवाड्याचे स्मारक करण्याचा एकमताने ठराव झाला.

वाडा शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया ५ जून २००८ ला सुरू झाली. स्मारकाला विरोध असलेले भाडेकरू, दुकानदार, बॅंक ८ डिसेंबर २०१० ला मुंबई उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने भूसंपादनाच्या कामाला स्थगिती दिली. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी व पुण्याचे आजीमाजी कारभारी यांचे आर्थिक हितसंबंध ह्या वाड्यात गुंतलेले असल्याने मनपा आणि राज्य सरकारचे वकील,न्यायालयात अनेकदा गैरहजर राहिले. मनपा अधिकार्‍यांना बिल्डरने खिश्यात घातल्याने ते इथे सावित्रीबाईंची मुलींची पहिली शाळा नव्हतीच अशी पोपटपंची करु लागले. आर्थिक प्रलोभन, राजकीय संगनमत आणि जनतेची उदासिनता यामुळे गेली ८ वर्षे एकही पाऊल पुढे सरकलेले नाही.
शाळेचे समकालीन दस्तावेजांमधील असंख्य पुरावे सादर करूनही ते वारंवार गहाळ केले जातात.
शाळा नसल्याचेच ढोल सगळे मिळून वाजऊ लागतात.

जोतीराव,सावित्रीबाई, भिडे,चिपळूणकर, गोवंडे, जोशी, भवाळकर,म्हस्के, शिंदे,लहुजी वस्ताद,राणबा महार,धुराजी चांभार, गणू मांग,फातिमा आणि उस्मान शेख असे उच्च वर्णीय, बहुजन,दलित, अल्पसंख्यांक एकत्र येऊन १७० वर्षांपुर्वी
एक ऎतिहासिक काम सुरू करतात. देशातली मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू होते. स्त्रीशिक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि आधुनिकतेचे संस्कारकेंद्र उभे राहते.ज्ञानार्जनाचे, ज्ञाननिर्मितीचे उर्जाकेंद्र साकारले जाते.

आज पुणे हे देशातले सर्वात मोठे आणि प्रगत शैक्षणिक शहर आहे.इथे शेकडो महाविद्यालये व डझनांनी विद्यापिठे आहेत.
स्त्री,बहुजन,दलित चळवळीचे हे शहर म्हणजे मोहळ आहे. मग तरिही लिप सर्व्हीस वगळता काहीच का घडत नाही?
कोणाच कारभार्‍याला हा वाडा टिकवावा असे का वाटत नाही?
-प्रा.हरी नरके, १ जानेवारी २०१९