Showing posts with label महात्मा गांधी. Show all posts
Showing posts with label महात्मा गांधी. Show all posts

Thursday, October 1, 2020

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. हरी नरके

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज, राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. अनुयायी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याची एकतर्फी मांडणी करीत असतात. आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते आणि जित्याजागत्या माणसाच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते समकालीन असल्याने एकमेकांचे राजकीय स्पर्धकही होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. आता आणखी किती वर्षे ही कटूता, हा विखार कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?

ही पोस्ट वाचून काही कडवे लोक वस्सकन अंगावर येणार याची मला खात्री असूनसुद्धा लिहित आहे.

१. गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? नाही.

२. ते एकमेकांचे शत्रू होते का? नाही.

३. त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का?  हो. 

अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "रानडे, गांधी आणि जीना" या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट काँग्रेस अ‍ॅंड गांधी हॅव डन टू दि अनटचेबल्स" या ग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. गांधीजींनीही बाबासाहेबांबद्दल कठोर  प्रसंगी अनुदार लेखन केलेय. दोघांचीही टिका त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होती. पण हीच कटूता त्यांच्यात कायम राहिलीय का? तर नाही.

४. "मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा अपार जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. [अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक,  महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ]

सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब अग्रलेखात म्हणतात. बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा महात्मा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]

दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]

५. महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का? हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे. देवत्व बहाल करण्यामागे अपहरणाचा डाव असतो, हे कधी कळणार?

यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेच आहे. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंदच केली गेलेली आहे.

२६ ऑक्टोबर १९३८ रोजी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा अविचार आता बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे. टिका करताना हेत्वारोप केलेच पाहिजेत का?

६. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य गुणसुत्र होते.

त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने " चले जाव चा" नारा दिलेला होता.

७. गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण समजत होते. अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी नामदार गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले. त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर यांचा समावेश होता. तसेच आंबेडकरही ब्राह्मण असावेत त्यांचा समज झाला.

पहि्ल्या भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, " गांधीजी, मला मातृभूमी नाही" तेव्हा गांधीजी चरकले. आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. तेव्हा गांधीजी दुटप्पीपणानं वागले होते. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, "मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा." ही मुत्सद्देगिरी गांधीजींना फार महाग पडली. बाबासाहेब त्यांच्यापासून आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]

८. डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत.

घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक, सेक्युलर संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा बंगालच्या ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो खुलना मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.

दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ. एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने बाबासाहेबांना घटना परिषदेवर स्वत:च्या कोट्यातून पुन्हा बिनविरोध निवडून दिले.

ही वस्तुस्थितीनिदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे. 


काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बॅ. बाबासाहेब आंबेडकरांना जुलै १९४७ मध्ये मुंबईतून घटना सभेवर बिनविरोध निवडून आणले. त्यांना ऑगष्ट १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे कायदे मंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.


९. बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर हे लोक नथूरामला पसंती देतील काय? 


१०. बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, "होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता" असे नमूद केलेले लेखी पुरावे उपलब्ध आहेत.

नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे झाले. राष्ट्रव्यापीच नाही तर विश्वभर विस्तारले.

विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे लोक विकृत आहेत.

११. दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले.

पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. दोघांनाही काही लाडक्या खोडी होत्या. तरिही मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी एकत्र काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]

गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी. दाखवायला संत आतून मात्र पक्के राजकारणी. बनियाच.

त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.

दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "

बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे."

आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.

या दोघा महामानवांना वंदन.

-प्रा. हरी नरके


Wednesday, May 13, 2020

गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्यावर लिहिताना तथ्यांची मोडतोड नको - प्रा.हरी नरके


मी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल २०१८ च्या साधनाच्या दिवाळी अंकात विस्ताराने लिहिले होते.
काल सेलिब्रिटी वक्ते, संपादक, लेखक श्री संजय आवटे यांनी " गांधी+नेहरू+आंबेडकर= भारत! आता हे घ्या वस्तुनिष्ठ पुरावे ... " अशी पोस्ट त्यांच्या वॉलवर
लिहिलेली आहे. त्या पोस्टवरची माझी प्रतिक्रिया आपल्या अवलोकनार्थ खाली दिली आहे. संजय आवटे यांच्या पोस्टची लिंक  शेवटी दिलेली आहे.
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.


"प्रिय संजय, तुमच्या या मांडणीमागील सद्भावनांचा मी आदर करतो. देशात धर्मनिरपेक्ष शक्तींविरूद्ध विखार पेरला जात असताना, लोकशाही जीवनमुल्ये धोक्यात असताना, गांधी,नेहरू,आंबेडकर यांना मानणार्‍यांनी एकत्र असण्याची तीव्र गरज मला पटते. त्यामुळे माझा तुमच्या मांडणीमागील ध्येयवादाला विरोध नाही. तुमची मांडणी समयोचित आणि मौलिक आहे. तुमची सात विधाने वस्तुस्थितीला धरून नाहीत हे तुमच्या निदर्शनाला आणून देऊ इच्छितो.

१} " सायमन कमिशनसमोर बोलताना, बाबासाहेबांनी अल्पसंख्य समुदायांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नकोत अशी मागणी का केली?"
वस्तुस्थिती- सायमन कमिशनसमोर व गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितलेले होते. पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड २, [ डॉबाआंलेभा ] पृ.४४१,४६५,५३३,

२} " संविधान तयार करत असताना, अशा स्वरूपाची मागणी बाबासाहेबांनी का केली नाही?"
वस्तुस्थिती-  २. संविधान सभेत बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी करणारा ठराव आणलेला होता. [ पाहा- घटना सभेचा वृत्तांत, भारत सरकार, नवी दिल्ली, खंड १ ते १२]

३] " 'जातीय निवाडा' बाबासाहेबांनाही नको होता."
वस्तुस्थिती- गांधीजींच्या उपोषणामुळे देशभरातून बाबासाहेबांवर त्यांचा जीव वाचवण्यासाठी अभुतपुर्व दबाव आला, म्हणून बाबासाहेबांनी तडजोड म्हणून पुणे करार केला. पण १९३७ च्या निवडणुकीत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ते पुन्हा आपल्या मूळच्या भुमिकेवर गेले. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांचे काय केले?]

४] " गांधींनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला असला तरी दलितांना प्रतिनिधित्व मिळण्याला कधीही विरोध केला नव्हता, हेही लक्षात घेतले पाहिजे."
वस्तुस्थिती- दलितांना प्रतिनिधित्व द्यायला महात्मा गांधीजी उपोषणाच्या दिवसापर्यंत तयार नव्हते. [ पाहा- अस्पृश्यांना राखीव जागा द्यायलाही गांधीजींचा विरोध होता, दि. १९ सप्टेंबर, १९३२,  डॉ. य. दि.फडके,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मारेकरी: अरूण शौरी, मुंबई, १९९९,पृ. ७२, ९०, [ब] अलिम वकील, महात्मा आणि बोधिसत्व, संगमनेर, १९९०, पृ.१२,१३ [क] वसंत मून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली, १९९१, पृ.६२,

५] " डॉ. आंबेडकरांनीही १९३०च्या दशकात दबावतंत्र म्हणून स्वतंत्र मतदारसंघाची भूमिका घेतली, पण पुढे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत स्वतंत्र मतदारसंघाच्या भूमिकेचा आग्रह धरला नाही. राखीव जागांचा पर्याय बाबासाहेबांना मान्य होता. आणि, १९३२ पासून गांधींचीही भूमिका तीच होती."
वस्तुस्थिती-  [ डॉबाआंलेभा २ ] पाहा-पृ.४४१, ४६५, ५३३, व घटना सभेचा वृत्तांत, भारत सरकार, नवी दिल्ली, खंड १ ते १२

 ६] " त्यामुळे 'पुणे करार' झाल्यानंतर बाबासाहेबांनीही गांधींचा आदराने उल्लेख केलेला दिसतो."
वस्तुस्थिती- तुम्ही बाबासाहेबांचे गांधीजी व काँग्रेसविरुद्धचे २ ग्रंथ पुर्ण दुर्लक्षित केलेत. पुणे करारानंतर सुरुवातीचे काही दिवस काँग्रेसवाले बरे वागले, पण लवकरच त्यांनी बाबासाहेबांना अपमानित करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस संपताच बाबासाहेब काँग्रेस व गांधींजींबद्दल पुन्हा अतिशय कटवटपणे लिहू लागले. पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांचे काय केले?

७] " महिलांना मानवी अधिकार मिळावेत, या एकमेव कारणासाठी बाबासाहेबांनी आपल्या केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. "
वस्तुस्थिती- बाबासाहेबांच्या कायदा मंत्रीपदाच्या राजीनाम्याची एकुण ५ कारणे होती. पाहा- डॉबाआंलेभा,खंड १४ वा, भाग २, पृ. १३१९


-प्रा.हरी नरके, १२/५/२०२०

संजय आवटे यांच्या पोस्टची लिंक https://www.facebook.com/sunjay.awate11?epa=SEARCH_BOX

Tuesday, October 1, 2019

आधुनिक भारताचे निर्माते : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर











महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. दोघांची भक्त मंडळी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याचीच एकतर्फी मांडणी करीत असतात. या दोन्ही छावण्यांमध्ये एकमेकांबद्दल अढी आहे. आकस आहे. द्वेषही आहे.
खरंतर आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते, आणि जित्याजागत्या माणसांच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते राष्ट्रीय नेते होते. आधुनिक भारताचे निर्माते होते. द्रष्टे होते. योद्धा होते. दोघेही सेक्युलर होते. लोकशाहीवादी होते. ते एकमेकांचे स्पर्धकही होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. एक मात्र नक्की की बाबासाहेबांमुळे सनातनी गांधीजी प्रागतिक बनत गेले आणि गांधीजींमुळे बाबासाहेब केवळ अस्पृश्यांचे नेते न राहता संपुर्ण भारताचे नेते बनले.
त्यांच्यातली कटूता, विखार आता आणखी किती वर्षे कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?

गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? तर नाही.

ते एकमेकांचे शत्रू होते का? तर नक्कीच नाही.

त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का? तर हो.
अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही.
विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी " रानडे, गांधी आणि जीना " या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट गांधी अ‍ॅंड काँग्रेस हॅव डन टू दि अनटचेबल्स" या ग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. तो त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होता. गांधीजींचे चतुर, मुत्सद्दी आणि राजकीय संतपणाचे वागणेच त्याला कारणीभूत होते.
हे लेखन वाचून दोघे कट्टर वैरी होते असा भ्रम होऊ शकतो. पण जे दोघांचे समग्र साहित्य आणि जीवनचरित्र वाचतील ते मान्य करतील की त्यांच्यात कायमच कटूता होती का? तर नक्कीच नाही. मित्रभावाचे अस्तर त्यांच्या नात्याला होते. त्यांच्यातले लव्ह- हेटचे हे नाते समजायला मोठे कठीण होते.

"मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
[अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनयक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ] सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब एका अग्रलेखात म्हणतात. बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. बाबासाहेबांच्या साहित्याच्या एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]
दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]
दि. १३ फेब्रुवारी १९३३ चे बाबासाहेबांचे पत्र उपलब्ध आहे. त्याची सुरूवातच मुळी "डियर महात्माजी " अशी आहे.

महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना आणि गांधीजींना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे.
यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेय. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंद केली गेलेली आहे.
२६ आक्टोबर १९३८ ला बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा पागलपणा बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे.

गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य सुत्र होते.

त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने चले जाव चा नारा दिलेला होता.

गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. पण बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई देसाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले ब्राह्मण समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी ना. गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले. त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर तसेच आंबेडकर असा त्यांचा समज झाला." पहिल्या भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, " गांधीजी, मला मातृभूमी नाही" तेव्हा गांधीजी चरकले. आंबेडकरांना समजून घेण्यात आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. तेव्हा गांधीजी दुटप्पीपणानं वागले. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा. ही मुत्सद्देगिरी गांधीजींना पुढे फार महाग पडली. बाबासाहेब त्यांच्यापसून आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]

डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत. आरक्षण द्यायला गांधीजी आधी तयार नव्हते. मग बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघ मागितले. कम्युनल अवॉर्ड घोषित झाल्यावर गांधीजींचे डोळे उघडले. त्यांनी उपोषणाचे हत्त्यार उपसले. शेवटी पुणे करारात गांधीजींनी आरक्षण तर दिलेच पण दुप्पट जागाही दिल्या. हे जर आधीच दिले असते तर दोघांमध्ये एव्हढी कटुता आली नसती.

घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.
मात्र दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ. एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने घटना सभेवर बाबासाहेबांना पुन्हा बिनविरोध निवडून दिले.
ही वस्तुस्थिती निदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे. काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. बाबासाहेब जयकर या काँग्रेस सदस्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना घटना सभेवर बिनविरोध निवडून आणून त्यांना देशाचे कायदेमंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.

बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा बामसेफी प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर तुम्ही काय निवडाल?

बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी एप्रिल १९४८ मध्ये लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता असे नमूद केले. नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे सनातनी गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे  झाले. राष्ट्रव्यापी विस्तारले. विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे भक्त विकृत आहेत.

दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले. पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]

गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी.
त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.
दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "
बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे."

आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.
या दोघा महामानवांना वंदन. लोकशाही जीवनमुल्ये वाचवणे हीच या दोघांना खरी आदरांजली असेल.

- प्रा.हरी नरके, २ ऑक्टोबर २०१९

Tuesday, July 23, 2019

टिळक कोण होते?




आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे. १ ऑगष्ट २०१९ पासून त्यांचे स्मृतीशताब्धी वर्ष सुरू होत आहे.
लोकमान्य टिळक हे आधुनिक भारतातले देशभर पोचलेले पहिले राष्ट्रीय नेते होते. एका मराठी माणसाने हे स्थान मिळवावे ही गौरवाची बाब होय. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक वर्षे तुरूंगवास भोगला. ते फार मोठे पत्रकार-संपादक-लेखक-विचारवंत होते. सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते एक प्रवर्तक मानले जातात. त्यांची लोकप्रियता अफाट होती. त्यांना मंडालेच्या तुरूंगात पाठवण्यात आले तेव्हा मुंबईच्या गिरणी कामगारांनी बंद पाळला होता.

मात्र जहाल-मवाळ वाद, टिळक-आगरकर वाद, आधी सामाजिक की आधी राजकीय यावरचा वाद यांनी तसेच वेदोक्त व ताईमहाराज प्रकरण यातनं त्यांची प्रतिमा कट्टर सनातनी नेते अशी झाली. त्यांनीही ती आवर्जून जपली.

याविषयावरची " लोकमान्य व शाहू छत्रपती- य.दि.फडके," आणि "लोकमान्य ते महात्मा- सदानंद मोरे" ही पुस्तकं वाचनीय आहेत.

टिळक नेमके कोण होते? हा एक सार्वकालिक वादाचा विषय राहिलेला आहे. त्यांच्या मृत्यूला शतक लोटत असताना तरी दुषित पुर्वग्रह बाजूला ठेऊन त्यांच्याकडे निर्मळ मनाने बघता येईल का?

त्यांचा मुलगा श्रीधर हा सत्यशोधकांचा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मित्र होता. त्याला सनातनी टिळक अनुयायांच्यामुळे आत्महत्त्या करावी लागली.

महर्षि वि.रा.शिंदे यांनी आयोजित केलेल्या अस्पृश्यता निर्मुलन परिषदेत टिळकांनी जोरदार भाषण केले मात्र "मी माझ्या खाजगी जिवनात अस्पृश्यता पाळणार नाही" या प्रतिज्ञापत्रांवर त्यांनी सही केली नाही. त्यांचे हे अस्पृश्यता निर्मुलन परिषदेतले जहाल भाषण त्यांनी लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आणले मात्र केसरीत त्यातला एक शब्दही छापू नये अशा सुचना दिल्या.

महात्मा जोतिराव फुले आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी त्यांची मैत्री होती. टिळक-आगरकरांना पहिला तुरूंगवास झाला तेव्हा त्यांना जामिन द्यायला त्यांचा एकही सनातनी कार्यकर्ता पुढे आला नाही. अशावेळी महात्मा फुल्यांनी रातोरात रामशेट बापूशेट उरवणे ह्या सत्यशोधक समाजाच्या कोषाध्यक्षांमार्फत त्यावेळच्या दहा हजार रूपयांच्या जामिनाची व्यवस्था करवली. त्यावेळी सोन्याचा भाव एका तोळ्याला पंचवीस रूपये होता, तेव्हाचे दहा हजार रूपये म्हणजे आत्ताचे सव्वा कोटी रूपये होतात. हे रोख पैसे जोतीरावांनी रातोरात उभे केले.


ते तुरूंगातून सुटल्यावर त्यांचे जाहीर सत्कार फुल्यांनी घडवून आणले. त्यांना मानपत्रे दिली. हे सारेच टिळकांनी केसरीत ठळकपणे छापलेही, मात्र महात्मा फुले वारल्यावर त्यांच्या निधनाची एका ओळीचीही बातमी त्यांनी दिली नाही. खेदाची गोष्ट म्हणजे समाजसुधारक गोपाळराव आगरकरांनीसुद्धा आपल्या सुधारकात महात्मा फुले गेल्याची बातमी दिली नाही.

ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात ठेवली. पुढे टिळक गेल्यावर मूकनायक मध्ये बाबासाहेबांनी अवघ्या एक ओळीची बातमी दिली. पुण्याचे टिळक गेले एव्हढेच बाबासाहेबांनी छापले. सनातनी पत्रकार भडकले. त्यावर "आम्हा बहुजनांच्या जिवनात टिळकांचे जेव्हढे स्थान होते तेव्हढी बातमी दिली. टिळकांनी तर फुल्यांची एव्हढीही बातमी दिली नव्हती." असा खुलासा त्यांनी केला.

मूकनायकची जाहीरात आम्ही छापणार नाही असे केसरीने  कळवले होते. ज्याकाळात केसरीत चप्पल आणि जोड्यांच्या जाहीराती छापून येत असत त्याकाळात मूकनायकची जाहीरात छापायला आमच्या पेपरमध्ये जागा नाही असे अहंमन्य उत्तर दिले गेले.

केसरी हा भारतातला सर्वात लोकप्रिय पेपर असल्याची जाहीरात वारंवार केली जाते. केसरीचा सर्वाधिक खप जेव्हा होता तेव्हा केसरीच्या तीन हजार प्रती छापल्या जात असत.

महात्मा गांधी टिळकांना फार मानत असत. टिळक वारले तेव्हा गांधीजींना त्यांच्या पार्थिवाला खांदा द्यायचा होता.मात्र टिळकांच्या सनातनी अनुयायांनी त्यांस विरोध केला. कारण गांधीजी बनिया होते. ब्राह्मण नव्हते.

महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीचे श्रेय टिळक अनुयायांनी टिळकांना दिले. खरंतर फुल्यांनी पुण्यात शिवजयंती सर्वप्रथम सुरू केली. कामगार चळवळीचे जनक ना. मे.लोखंडे यांनी मुंबईत  ती पसरवली. त्याच्या बातम्या तेव्हाच्या दीनबंधूत अनेकदा आलेल्या आहेत. मात्र त्यानंतर अनेक वर्षांनी टिळकांनी ती आणखी मोठी केली. देशात अनेक ठिकाणी पोचवली.

टिळकांचे बहुतेक सर्व अनुयायी सनातनीच का होते? टिळकांचा बहुजनांना व स्त्रियांना शिक्षण द्यायला विरोध का होता? वेदोक्त प्रकरणात टिळक शाहूमहाराजांच्या विरोधात का वागले?

टिळकांनी आरक्षणाला का विरोध केला? टिळक जर अस्पृश्यता मानत नव्हते तर मग त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही का केली नाही? टिळकांनी आगरकर- न्या.रानडे- लोकहितवादी - गोखले या सार्‍या समाजसुधारकांना कायम विरोध केला.

सयाजीरावांनी पुण्यातला आपला गायकवाडवाडा टिळकांना दिला. मात्र पुढेमागे ब्रिटीशांचा जाच होऊ नये म्हणून खरेदीखताने तो दिल्याचे दाखवले. टिळकांच्या आत्ताच्या वंशजांनी काही वर्षांपुर्वी महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नाव पुसून त्याचा केसरीवाडा केला.


प्रश्न अनेक आहेत.

- प्रा. हरी नरके, २३ जुलै २०१९

Saturday, September 29, 2018

निमित्त- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती









निमित्त- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती - प्रा. हरी नरके

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज, राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. दोघांची भक्त मंडळी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याचीच एकतर्फी मांडणी करीत असतात. आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते, आणि जित्याजागत्या माणसाच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते एकमेकांचे स्पर्धक होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. आता आणखी किती वर्षे ही कटूता, हा विखार कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?

ही पोस्ट वाचून काही कडवे लोक वस्सकन अंगावर येणार याची मला खात्री असूनसुद्धा एका कर्तव्यभावनेपोटी हे लिहित आहे.

१. गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? तर नाही.
२. ते एकमेकांचे शत्रू होते का? तर नाही.

३. त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का? तर हो. अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही. विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "रानडे, गांधी आणि जीना" या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट गांधी अ‍ॅंड काँग्रेस हॅव डन टू दि अनटचेबल्स" या महाग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. तो त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होता. पण हीच कटूता त्यांच्यात कायम राहिलीय का? तर नक्कीच नाही.

४. "मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. [अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनयक, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ] सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब अग्रलेखात म्हणतात.

बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा महात्मा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]

दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]


५. महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे.

यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेय. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंद केली गेलेली आहे.


२६ आक्टोबर १९३८ ला बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा पागलपणा बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे.


६. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य सुत्र होते.


त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने चले जाव चा नारा दिलेला होता.


७. गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. पण बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले ब्राह्मण समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी ना. गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले.


त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर तसेच आंबेडकर असा त्यांचा समज झाला." पहिला भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, गांधीजी, मला मातृभूमी नाही तेव्हा गांधीजी चरकले. आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. गांधीजी दुटप्पीपणानं वागले. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा. ही मुत्सद्देगिरी गांधीजींना महाग पडली. बाबासाहेब आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]


८. डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत.

घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.

मात्र दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ.जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने बाबासाहेबांना पुन्हा बिनविरोध निवडून दिले.

ही वस्तुस्थिती निदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे.

काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. बाबासाहेब जयकर या काँग्रेस सदस्याने दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना घटना सभेवर बिनविरोध निवडून आणून त्यांना देशाचे कायदे मंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.

९. बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा बामसेफी प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर तुम्ही काय निवडाल?


१०. बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी एप्रिल १९४८ मध्ये लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता असे नमूद केले.


नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे  झाले. राष्ट्रव्यापी विस्तारले. विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे भक्त विकृत आहेत.


११. दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले.


पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]


गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी.
त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.


दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "
बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे." 

आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.
या दोघा महामानवांना वंदन.

-प्रा.हरी नरके, २९ सप्टेंबर, २०१८

Monday, September 17, 2018

पालीभाषा गौरव दिन-



पालीभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने तथागत, त्यांच्या परंपरेतले सगळे विद्वान, आधुनिक भारतातले आचार्य धर्मानंद कोसंबी, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अनागरिक धम्मपाल, महान पंडीत राहूल सांकृत्यायन, जगदीश कश्यप आदी मान्यवरांना वंदन.

बुद्ध, धम्म, संघ यांचा प्रचार, प्रसार आणि पालीभाषेचे संवर्धन यासाठी धर्मानंद कोसंबींनी आपले आयुष्य वेचले.

जगाचा निरोप घेताना महात्मा गांधींकडे आपली अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी १९४७ साली १ हजार रूपये गांधीजींकडे सुपुर्द केले आणि या पैशातून तरूण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन धम्म व पालीचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेला पाठवा असे सांगितले. गांधीजींनी त्यांना तसे लेखी वचनही दिले. गांधीजींनी आपल्या सहकार्‍यांना लिहिले, " उनके आश्रममें रहने से आश्रम पवित्र होता हैं." त्यांची बुद्धधम्म व पालीबाबतची इच्छा पुर्ण केली जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

४ जून १९४७ ला कोसंबींनी पवनारच्या गांधी आश्रमात जगाचा शेवटचा निरोप घेतला.
५ जून १९४७ रोजी संध्याकाळच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजी म्हणाले, " जो अपनी डोंडी पीटते -पिटवाते हैं, उन्हे तो हम बहुत चढाते हैं. पर जो मूल सेवक हैं, धर्म की सेवा करते हैं, उन्हें लोग पहचानते भी नही हैं. ऎसे एक आचार्य कोसंबीजी थे. वे हिंदुस्थान के बौद्धविचार और पाली के प्रमुख विद्वान थे. उन्होंने स्वयं फकीरी पसंद की थी. वे प्रार्थनामय थें. ईश्वर करें हम सब उनका अनुकरण करें."

कोसंबींनी ४० वर्षांपुर्वी कलकत्ता विद्यापीठातल्या आपल्या दरमहा २५० रूपये पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते १९०८ साली त्यासाठी महाराष्ट्रात आले. महाराजा सयाजीराव गायकवाड देत असलेल्या ५० रू. च्या मानधनावर त्यांनी मराठी माणसांना पाली शिकवायला सुरूवात केली. बुद्ध विचारांचा आणि पाली भाषेचा महाराष्ट्रात प्रचार - प्रसार करण्यासाठी ते पुढचे सारे आयुष्य जगले.

कोसंबींनी पालीभाषेचे शेकडो विद्वान तयार केले. हरीनाथ दे, डॉ. जेम्स एच. वूडस, प्रो. लॅनमन, प्रो.चिंतामण वैजनाथ राजवाडे, विनोदकार म्हणून ख्यातनाम असलेले पालीचे विद्वान चिं.वि.जोशी, डॉ. प.ल.वैद्य, प्रो. ना.के.भागवत, भदन्त यू.धम्मजोती, भिक्कू धर्मरक्षित, डॉ. पु.वि. बापट या त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी बुद्धीझम आणि पाली भाषेवर लिहिलेल्या ग्रंथांची संख्या २०० पेक्षा अधिक आहे.

भदन्त आनंद कौशल्यायन हे त्यांचे लाडके विद्यार्थी. त्यांनी कोसंबींच्या "भगवान बुद्ध" या चरित्र ग्रंथाचा सिंहली भाषेत अनुवाद केला. हा ग्रंथ श्रीलंकेत गाजला. त्यांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" चा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे.

महात्मा गांधीनीं १९२७ साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. तिथे पाली भाषा विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कोसंबींना निमंत्रित केले. तिथे प्राध्यापक म्हणून
काम करीत असताना त्यांनी आपल्या "हिंदी संस्कृती आणि अहिंसा," "पार्श्वनाथांचा चातुर्याम धर्म," या ग्रंथामध्ये गांधीजींच्या विचारांची कठोर चिकित्सा केली. रामराज्य, सनातन धर्म, गीता, विश्वस्त या संकल्पानांबद्दलचे आपले मतभेद नोंदवले.

तेव्हाच्या गुजरात पॅटर्नमध्ये मतभेदांचे स्वागत असायचे.


महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात कोसंबींच्या बुद्धीझमवरील ५ भाषणांचे आयोजन केले. महाराज स्वत: सभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असायचे. पुढे सयाजी ग्रंथ मालेद्वारे त्यांनी बुद्धीझमवरील असंख्य ग्रंथ प्रकाशित केले.

बडोदा संस्थानात दारूबंदी करावी असा विचार जोर धरू लागला होता. महाराजांनी मात्र तो मुद्दा फेटाळून लावला. "दारूविक्रीद्वारे मिळणारा कर महसूल कुठून आणायचा? असा त्यांनी प्रश्न विचारला. उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत सांगा, तरच मी दारूबंदी करतो" असे ते म्हणाले.

ही बाब कोसंबींना आवडली नाही. कोसंबींनी आपल्या भाषणात सम्राट अशोकाने केलेल्या संपूर्ण दारूबंदीचे उदाहरण दिले. कोसंबी म्हणाले, "सम्राट अशोक असं म्हणाला नाही, की उत्पन्न बुडते, मला पर्याय द्या, त्याने ताबडतोब दारूबंदी केली.चांगली गोष्ट करताना उत्पन्नाचा मुद्दा गौण असतो. विचार महत्वाचा असतो."
भर दरबारात सन्नाटा पसरला. सयाजीराव महाराज भर सभेतून उठून गेले. लोक घाबरले. आता कोसंबींची उचलबांगडी होणार, हाकालपट्टी होणार, पुढची भाषणं रद्द केली जाणार असं जो तो बोलू लागला.

दरबारने त्याच दिवशी महाराजांचा हुकूम प्रसिद्ध केला.

"आचार्य कोसंबी यांच्या विचारांशी महाराज सहमत आहेत. आजपासून संस्थानात संपूर्ण दारूबंदी करण्यात येत आहे."

कोसंबींची पुढची भाषणं सुरळीतपणे पार पडली. महाराज जाहीरपणे म्हणाले, " आचार्य कोसंबींचा अधिकार आम्हाला मान्य आहे. त्यांनी आमच्या कानशिलात वाजवली असली तरी त्यानंच आम्हाला जाग आलेली आहे."
महाराज कोसंबींना कायम गुरूस्थानी मानत असत.

तेव्हा गुजरातमध्ये राजधर्म पाळला जायचा. गुरुजनांचा सन्मान केला जायचा. विचारांचा आदर केला जायचा.
-प्रा.हरी नरके, १७ सप्टेंबर, २०१८

Monday, July 2, 2012

गांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण?



जागतिकीकरणाच्या आजच्या लाटेत "स्पर्धाच स्पर्धा चोहीकडे" असे वातावरण आहे.थातुरमातुर स्पर्धा आयोजित करायच्या.लोकांना एसएमएस करायला लावायचे आणि त्यातुन मजबूत कमाई करायची असा हा सापळा असतो. काही वाहीन्या आणि प्रिंटमिडीयातील मंडळींनी अलिकडॆच या लाटेत हात धुवुन घेण्याच्या उद्देशाने अशीच एक स्पर्धा घोषित केलेली आहे.महात्मा गांधींनंतरचा सर्वश्रेष्ट भारतीय कोण? हे ठरविण्यासाठीची ही मेरेथोन स्पर्धा आहे.  २६ सदस्यीय ज्युरींनी १०० नामांकनांमधुन ५० नावे निवडलेली आहेत. २५ जुनपर्यन्त वाचक आणि प्रेक्षकांनी केलेल्या मतदानातुन तसेच आजपासुन ३१ जुलैपर्यंत घेतल्या जाणा-या देशव्यापी "ओपिनियन पोल"मधुन १०जणांची नावे निवडली जातील. १५ ओगस्टला त्यातुन एका सर्वश्रेष्ट भारतीयाचे नाव घोषित केले जाईल.
या ५०जणांमध्ये डा.बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरु, सरदार पटेल, जयप्रकाश नारायण, डा.राममनोहर लोहिया,राजगोपालाचारी,विनोबा भावे,कांशीराम,इंदिरा गांधी यांच्यासह नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन आणि मदर तेरेसा यांचाही समावेश आहे.या यादीत उद्योगपती जे.आर.डी.टाटा, शास्त्रद्न्य डा.होमी भाभा,विक्रम साराभाई, ओस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक सत्यजित रे आणि ओलेंपिकमध्ये भारताला होकीची असंख्य सुवर्णपदके मिळवुन देणारे मेजर ध्यानचंद यांचीही नावे आहेत.
चित्रपट,संगित, नाटक,क्रिडा,उद्योग अश्या ग्लेमर असणा-या  आणि माध्यमप्रिय क्षेत्रातील किती लोक या यादीत असावेत? ६० टक्के! रजनीकांत,देव आनंद, दिलीप कुमार, किशोर कुमार, राजकपुर, मिल्खासिंग, कपिल देव, गावस्कर, सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद, अमिताभ बच्चन, ए.आर.रहमान, लता मंगेशकर आदिंची बाजारातील केवळ लोकप्रियता बघुनच त्यांना या यादीत घातले असावे हे स्पष्टच आहे.या मालिकेतील निम्मे लोक आज हयात असुन त्यांच्या कामाचे मुल्यमापन आत्ता लगेच करण्याची एव्हढी काय घाई होती तेच समजत नाही.बाबासाहेब, नेहरु, पटेल यांच्यासारख्या राष्ट्र्नेत्यांसोबत या हयात मंडळीची  तुलना करणे पोरकटपणाचे आहे.कोणत्याही स्पर्धेत एक संकेत पाळला जातो.स्वत: आयोजकाने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी त्यात भाग घेवु नये.पण या स्पर्धेच्या आयोजकांपैकी असणा-या  एका मोबाईल कंपनीचे मालकही या यादीत आहेत.संयोजकच स्वत: स्पर्धक असण्याची ही जगातील एकमेव स्पर्धा असावी.
या स्पर्धेवर माझे प्रामुख्याने २ आक्षेप आहेत.{१}पहिले सर्वश्रेष्ट भारतीय म्हणुन महात्मा गांधी यांची निवड कोणी,कधी आणि कोणत्या निकषांच्या आधारे केली हे जाहीर करण्यात आलेले नाही. {२}जाती,धर्म,प्रदेश,भाषा, लिंगभाव,वर्ग,वर्ण आदि भेदांचे माहेरघर असणा-या या देशातील लोकव्यवहार आणि लोकमत घडविण्याची यंत्रणा यांचे भान ठेवण्यात आलेले नाही.
या यादीत अवघ्या सहा महिलांना स्थान देण्यात आलेले आहे.या यादीतील सुमारे ६५%लोक हे भारतीय वर्णव्यवस्थेने ज्या ३ वर्णांना{ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य} "द्विज" मानले त्यातील ६५% आहेत.मुस्लीम समाजातील जातीव्यवस्था सच्चर आणि मिश्रा आयोगांनी अधोरेखित केलेली आहे.त्यामुळे धर्मांतरित द्विजांचा विचार केला तर ही संख्या ८०% वर जाते. भटके-विमुक्त आणि आदिवासींना या यादीतुन बहिष्कॄत करण्यात आलेले आहे.इतर मागास वर्ग आणि अनुसुचित जाती यांचे  प्रतिनिधित्त्व दाखविण्यापुरतेच आहे.
महात्मा गांधी हे एक महान नेते होते यात वादच नाही.देशाच्या स्वातं-यासाठी त्यांनी दिलेले योगदान अभुतपुर्व होते.असे असुनही एक खेदजनक अनुभव आपल्यासमोर मांडला पाहिजे. त्यांच्या साहित्याचे १०० खंड भारत सरकारने प्रकाशित केलेले आहेत.त्यांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हाती घेतला होता. ४० खंड प्रकाशित करुन तो बंद करण्यात आला.कारण त्या ग्रंथांची किंमत नाममात्र ठेवुनही त्याला ग्राहकच मिळेना.सरकारने  हे संच शाळा,महाविद्यालये, विद्यापिठे यांना मोफत देण्याची योजना आखली परंतु प्रतिसाद शुन्य.आजही हे खंड निर्मितीखर्चाच्या फक्त एक टक्का भावातही  घ्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे सरकारची मोठी पंचायत झालेली आहे.ही पुस्तके रद्दीत घालता येत नाहीत आणि गोडावून्स अडकुन पडलेली आहेत.
कविवर्य कुसुमाग्रजांची एक गाजलेली कविता आहे.शिवराय,फुले,बाबासाहेब,टिळक,गांधीजी यांचे पुतळे एकदा गप्पा मारत बसलेले असतात.सर्वांच्या व्यथा ऎकुन गांधीजी म्हणतात,"तुमचे तसे बरे आहे,तुमच्यामागे एकेक जात, किमान पोटजात तरी आहे.माझ्यामागे आहेत केवळ सरकारी कार्यालयांच्या भिंती." गेला महिनाभर आपण एक वाद झडताना बघत आहोत. गांधीवादी,सत्याग्रही म्हनवुन मिरवणारे काहीजण गांधीभवनाची मालकी कोणाची यावरुन एकमेकांच्या झिंज्या उपटित आहेत.
मध्यंतरी राजकुमार हिरानी यांनी "गांधीगिरी" चित्रित करणारा मुन्नाभाई पडद्यावर आणला तो सुपरहिट झाला.
डा.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधींवर अनेकदा प्रखर टिका केलेली आहे."गांधी आणि कांग्रेसने अस्प्रृश्यांचे काय केले?" रानडे,गांधी आणि जिना आदी ग्रंथांत याचे अनेक पुरावे मिळतात."अस्पृशता नष्ट व्हावी म्हणुन गांधीजी प्रयत्न करीत आहेत हे मी कधीच नाकारलेले नाही परंतु ते मुर्खांच्या साम्राज्यात विहार करणा-या तत्वद्न्यान्यापैकी एक योगभ्रष्ट विभुती दिसतात.महात्मा हे एखाद्या वावटळीसारखे असतात, त्यांच्यामुळे धुळ तेव्हढी उडते, समाजाचा स्तर मात्र उंचावत नाही".अश्या कडवट शब्दांत बाबासाहेबांनी हल्ला केलेला आहे.जातीव्यवस्थेच्या प्रश्नांच्या संदर्भात ते दोघे परस्परविरोधी छावणीत राहुनही एकमेकांमुळे विकसित होत गेले असे मानणारा अभ्यासकांचा एक वर्ग आहे.
बाबासाहेबांनी प्रतिकुल परिस्थितीतुन येवुन अपार कष्टाने जी असामान्य उंची गाठली ती बघता, "मेकर्स ओफ युनिव्हर्स" च्या मालिकेत संपुर्ण जगातील गेल्या दहा हजार वर्षातील निवडक १०० महापुरुषांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले आहे.त्यात बुद्ध,महावीर आणि अशोक हे अग्रभागी आहेत.मात्र या मालिकेत गांधीजींना स्थान देण्यात आलेले नाही.
बाबासाहेबांना मत द्या,असे सांगणारे बरेच एसएमएस मला आले.दुसरीकडे स्पर्धेत अजिबात भाग घेवु नका असेही सांगणारे काही निघाले.चळवळीतील लोकांचे फोननंबर मिळविण्याची संघाची ही खेळी आहे,सबब फोन करु नका असेही सांगणारे निघाले.
गांधीजींना परस्पर सर्वश्रेष्ट ठरवुन टाकायचे आणि आता त्यांच्यानंतर कोण ते सांगा असे विचारायचे हा रडीचा डाव नाही काय? बाबासाहेबांसमोर बाजारबुणगे वाटावेत अश्या काही अत्यंत सामान्य कुवतीच्या लोकांना या स्पर्धेत आणायचे हाही नविन प्रकारचा जातीवादच नाही काय? जातीग्रस्त मानसिकता असणारे भारतीय लोक बाबासाहेबांचे मोठेपण कबुल करण्याची दानत आतातरी दाखवतील काय?असे काही प्रश्न आहेत. जनता,ज्युरी आणि बाजार काय करतो ते १५ आगस्टला कळेलच.
ज्या भारतीय मतदारांनी १९५२ आणि १९५४ च्या लोकसभा निवडणुकीत "राज्यघटनेच्या या जनकाला" पराभुत केले होते त्यांना आपली चुक दुरुस्त करण्याची ही संधी आहे.ते आपली चुक दुरुस्त करतील काय?
.....................................................................................................................................................................
{टिप:पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असुन प्रथम क्रमांकाची मते डा.बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली आहेत.उरलेल्या ९ जणांमध्ये पं.नेहरु,इंदिरा गांधी,मदर तेरेसा,सचिन तेंडुलकर,वल्लभभाई पटेल,जे.आर.डी.टाटा,अटलबिहारी वाजपेयी,अब्दुल कलाम,लता मंगेशकर असा क्रम आहे.}





Monday, May 21, 2012

व्यंगचित्राचे राजकारण


 रविवार /२० मे२०१२
व्यंगचित्राचे राजकारण
  एका व्यंगचित्रावरून गेले काही दिवस आपले समाजजिवन ढवळून निघाले आहे.एन.सी.ई.आर.टी.या केंन्द्रीय अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करणा-या संस्थेने इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात छापलेल्या एका व्यंगचित्रावरुन गदारोळ माजला आहे.संसदेत खासदारांनी जोरदार हल्ला केल्यानंतर सरकारने हे व्यंगचित्र पुस्तकातुन काढून टाकल्याची प्रथम घोषणा केली आणि नंतर हे पुस्तकच अभ्यासक्रमातुन काढुन टाकले.त्याच्या निर्मितीची चौकशी करण्यासाठी आंबेडकरवादी डा.सुखदेव थोरात यांची समिती नेमण्यात आली आहे.या समितीचा अहवाल येईल तेव्हा ग्रंथाच्या निर्मितीमागील चित्तरकथा कळू शकेल.भारत सरकारच्या या पावलांचा निषेध नोंदविण्यासाठी ग्रंथसमितीचे डा.सुहास पळशीकर आणि डा.योगेंद्र यादव यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यांच्यावर खटले भरावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.
जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर यांनी १९४९ साली ’शंकर्स विकली’त प्रकाशित केलेले हे व्यंगचित्र आहे.स्वता डा.बाबासाहेब आंबेडकर यांनी ते पाहिलेले असणार.मात्र त्यांनी त्याला आक्षेप घेलल्याचे दिसत नाही.डा.बाबासाहेब हे अतिशय खिलाडूव्रुतीचे होते. इतरांनी केलेल्या टिकेवर  ते चिडत नसत. स्वागतच करीत. ते स्वताही अनेकांवर तुटून पडत.महात्मा गांधी,कांग्रेस,नेहरू,राम,क्रुष्ण,हिंदू धर्म यावर त्यांनी कडाडून टिका केलेली आहे.या व्यंगचित्राचे ३ अर्थ लावण्यात आलेले आहेत. भारतीय संविधान बनविण्याची प्रक्रिया सुमारे ३ वर्षे चालु होती.हया उशीर होण्याला डा. बाबासाहेब जबाबदार आहेत असे हे व्यंगचित्र सुचवते.संविधान निर्मितीची प्रक्रिया गोगलगायीच्या गतीने चालू असुन डा. बाबासाहेब आणि पंडित नेहरू हातातील आसुडाने तिला वेग देण्याचा प्रयत्न करीत असताना दिसत आहेत. {१}नेहरू हातातील चाबकाने कोणाला मारीत आहेत याबद्दल दुमत आहे. एका गटाला असे वाटते की नेहरुंनी बाबासाहेबांवर हा उगारलेला आसूड आहे.{२}दुसरा गट असे मानतो की नेहरू बाबासाहेबांच्या पाठीशी असून ते बाबासाहेबांप्रमाणेच गोगलगायीला मारीत आहेत.{३}संविधान निर्मितीत बाबासाहेबांचा वाटा सिंहाचा असून त्यातील जमेच्या सर्व गोष्टींचे श्रेय आणि विलंबाचे अपश्रेय हे दोन्ही बाबासाहेबांचेच आहे.
चाबूक दोघांच्याही हातात आहे.नेहरू बाबासाहेबांकडे बघत नसून जमिनीकडे खाली पहात आहेत.ते गोगलगायीलाच मारीत आहेत,हे स्पष्ट आहे.आपण एकाकडे बघत दुस-याला मारीत नसतो.ज्याला मारायचे त्याच्याकडेच माणूस पहातो हे कुणीही सांगू शकतो.असे असताना ह्यावर एव्हढा गदारोळ का माजवला गेला?यामागे काय राजकारण आहे? याची शांतपणे उकल केली पाहिजे.
हे पुस्तक गेली ६ वर्षे अभ्यासक्रमात शिकविले गेले आहे.मायावती सत्तेवर असताना ते उत्तरप्रदेशात शिकविले गेले.त्याला त्यांनी कधीही हरकत घेतली नाही.रामदास आठवले कांग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तेत असताना जेव्हा संसदेत या पुस्तकावर ५ वर्षांपुर्वी चर्चा झाली तेव्हा त्यांनी पुस्तकाला विरोध केला नाही.केंद्रीय मंत्री अर्जुनसिंग यांनी सरकारतर्फे तेव्हा हे पुस्तक मागे घेणार नाही असे सांगितले.आज मात्र त्याच पक्षाचे मंत्री कपिल सिब्बल यांनी ते लगेच मागे घेतले.द्रमुकचे लोकही तेव्हा गप्प होते.आज तेही विरोधात पुढे आहेत. राजकीय परिस्थिती बदलली की पुस्तकाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण बदलतो काय?
होय.संसदेत आज सरकार आरोपांच्या जाळ्यात अडकलेले आहे. मायावती,आठवले,द्रमुक हे सारेच अडचणीत आहेत. मायावती,आठवले आदींना लोकांचे लक्ष स्वता:कडे वेधून घेण्यासाठी आणि सरकार व द्रमुकला लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मुद्दा हवाच होता.तो त्यांना मिळाला.सचिन खरात यांच्या संघटनेने डा.पळशीकर यांचे पुणे विद्यापिठातील डा.बाबासाहेबांच्या पुतळ्याशेजारील डा.आंबेडकर भवनातील कार्यालय तोडले.बाबासाहेबांना अपार प्रिय असलेल्या पुस्तकांची नासधुस केली.पळशीकरांना निळी शाई फासण्याचा त्यांचा प्रयत्न होता.विद्यापिठातील काही बौध्द प्राध्यापकांनी स्वताचे कडे करून पळशीकरांचे संरक्षण केले.खरातांचे कार्यकर्ते चेनलवाल्यांना सोबत घेवुनच गेले होते.बाबासाहेबांची मानहानी झाली असे कोणाचे मत असेल तर त्यांनी वैचारिक प्रतिवाद करायला हवा होता.बाबासाहेबांच्या संविधानाच्या मार्गाने जायला हवे होते.आंबेडकरी चळवळ आता प्रगल्भ झालेली आहे.आम्ही बाळ गांगल आणि अरुण शौरींनाही वैचारिक प्रत्युत्तर दिलेले होते.यापुढेही कोणाचाही प्रतिवाद करण्याची आमची क्षमता आहे.हिंसक हल्ले ही बुद्ध-फुले-आंबेडकरांच्या मार्गाने जाण्याची रित आहे काय? ह्या हल्ल्याचा मी तिव्र निषेध करतो.ह्या हल्ल्याने बाबासाहेबांचाच अवमान झालेला आहे. आम्ही वैचारिक लढाया करायला सक्षम नाही अशी कबुली यातुन दिली गेली आहे,जी मला मान्य नाही.हा मला आंबेडकरी चळवळींचाच अपमान वाटतो.
हल्ल्याचा निषेध करायला सगळे आंबेडकरी विचारवंत पुढे यायला हवे होते.पण तसे घडले नाही.प्रकाश आंबेडकर यांनी जाहीरपणे निषेध केला हे चांगले झाले.त्यांनी पळशीकर-यादवांचा राजीनामा स्विकारला जावू नये अशीही मागणी केली.बाकी बरेच जण मुग गिळून गप्प बसले किंवा अवमानावर बोलताना पळशीकर-यादवांना प्रतिगाम्यांचे हस्तक ठरवून मोकळे झाले.हे दोन वेगळे मुद्दे आहेत. मी त्यांची गल्लत करणार नाही.व्यंगचित्रावर बोलण्याचा माझा हक्क सुरक्षित ठेवुन मी काही प्रश्न उपस्थित करु ईच्छितो.
पळशीकर-यादव हे आंबेडकरी चळवळीचे जवळचे मित्र आहेत.पुरस्कर्ते आहेत. त्यांच्यावर प्रतिगाम्यांचे हस्तक असा शिक्क्का मारणे अन्यायकारक आहे.त्यांच्याशी मतभेद होवू शकतात, नव्हे माझेही त्यांच्याशी अनेक मतभेद आहेत.राहतील. पण मी त्यांच्या हेतुंवर शंका घेणार नाही.उलट त्यांच्यासारखे प्रागतिक लोक अभ्यासक्रम ठरविण्यात होते म्हणुन पहिल्यांदाच संविधान निर्मितीचे योग्य श्रेय बाबासाहेबांना दिले गेले.त्यांना तेथुन हटविण्यासाठी उजव्या शक्ती देव पाण्यात घालून बसल्या होत्या.त्या जिंकल्या.एका व्यंगचित्राचा भावनिक "इश्यु" करुन आंबेडकरवाद्यांच्याच काठीने त्यांनी आंबेडकरवादी पुस्तक रद्द करविले.क्या बात है.याला म्हणतात,शांत डोक्याने सापळा लावा,चळवळीतील लोकांचा वापर करून घ्या आणि आंबेडकरवादाला खतपाणी घालणारा अभ्यासक्रम रद्द करवून घ्या.ते पुस्तक न वाचताच रद्द करा अशी मागणी पुढे आली, गदारोळ करण्यात आला,पुस्तक रद्द झालेही.
अभ्यासक्रम तयार करण्याची यंत्रणा आजवर कायम,हिंदुत्ववादी,मार्क्सवादी किंवा गांधीवादी यांच्या हातात राहिलेली आहे.फुले-आंबेडकरवादी तिकडे फिरकुही शकणार नाहीत याचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.म्हणुनच पळशीकर-यादव या चळवळीच्या मित्रांचे तिथे असणे गरजेचे होते.एन.सी.ई.आर.टी.चे माजी प्रमुख आणि प्रतिगामी विचारांचे हस्तक  जे.एस.रजपुत यांनी ’यादव-पळशीकर हटाव’ मोहीम हातात घेतली होती.ती मायावती,आठवले आणि महायुतीतील महानुभावांच्या मदतीने फत्ते झाली.
हे व्यंगचित्र पाठ्यपुस्तकात आज वापरण्याची खरेच गरज होती काय?हे व्यंगचित्र बाबासाहेबांचा अवमान करते काय?हे व्यंगचित्र पळशीकर-यादवांनी बाबासाहेबांच्यावरिल आकसापोटी मुद्दाम काढुन घेवुन पुस्तकात छापले आहे काय? पुस्तकात हे एकच व्यंगचित्र आहे की सगळे पुस्तकच इतर अनेक मान्यवरांवरील व्यंगचित्रांनी भरलेले आहे?पाठ्यपुस्तकात व्यंगचित्रे वापरुन तो रंजक करावा काय?त्यामुळे मुलांची अभ्यासाची भिती घालवून त्यांच्या मनातील अभ्यासाबद्दलची अढी/दहशत नष्ट करणे योग्य आहे काय? चळवळीला व्यंगचित्रांचे वावडे असावे काय? आम्ही व्यंगचित्र हे व्यंगचित्र म्हणुन पाहुच शकत नाही काय? बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या साडेपाच महिण्यात पहिला मसुदा सादर केलेला असताना विलंबाला त्यांना जबाबदार ठरविणे योग्य ठरते काय?घटना समितीत ज्यांचे ८० टक्के बहुमत होते ते सत्ताधारी पक्षाचे लोक २ वर्षे चर्चेचे गु-हाळ लावून बसले हा दोष बाबासाहेबांचा कसा?{बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले २९ आगस्ट १९४७ रोजी, आणि त्यांनी तयार केलेला घटनेचा पहिला मसुदा गेझेट आफ इंडियात प्रकाशित झाला २० फ़ेब्रुवारी १९४८ रोजी. त्यावर पुढे सुमारे २ वर्षे चर्चा होवुन घटना २६ जानेवारी १९५० ला अमलात आली.} असे अनेक प्रश्न आहेत.त्याच्या उत्तरांच्या शोधातुनच सत्त्याकडे जाता येईल.पळशीकर ब्राह्मण आणि यादव ओबीसी आहेत म्हणुन त्यांच्यावर हेत्वारोप/हल्ले होणार असतील आणि सारे आंबेडकरवादी त्यावर सोयिस्कर मौन धारण करणार असतील तर ते चळवळीचेच नुकसान करणारे ठरेल.यापुढे मित्रशक्ती बाबासाहेबांवर लिहिताना ताकही फुंकुन पितील.
आजवर इतरांची कठोर चिकित्सा करणारे आणि दुस-यांवर टिकेचे जोरदार आसुड ओढणारेच जर आज हळवे बनुन आम्ही टिका खपवुन घेणार नाही असे म्हणणार असतील तर मग या महाराष्ट्रात यापुढे छत्रपती शिवरायांप्रमाणेच बाबासाहेबांचाही देव केला जाईल ही काळ्या दगडावरची रेघ होय.म्हातारी मेल्याचे दु:ख आहेच पण काळही सोकावतोय.विचारी माणसेही भावनिक सापळ्यात कशी अडकतात त्याचा हा पुरावाच नव्हे काय?अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जनक बाबासाहेब हेच मुस्कटदाबीसाठी वापरले जात असताना आम्ही काय करणार आहोत?