Showing posts with label डॉ.बाबासाहेब आंबेडकर. Show all posts
Showing posts with label डॉ.बाबासाहेब आंबेडकर. Show all posts

Thursday, November 26, 2020

भारतीय राज्यघटना : आपण आणि संविधान साक्षरता -प्रा. हरी नरके





भारतीय संविधान किंवा राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला मंजूर करून देशाला अर्पण करण्यात आली म्हणुन आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जाने.१९५० ला ती अंमलात आली. आज ७० वर्षे उलटून गेली असली तरी देशातील सुशिक्षितांपैकी दहातल्या सुमारे नवांनी हे पुस्तक बघितलेलेही नाही, वाचण्याचा तर विषयच नाही. राज्यघटनेबद्द्ल बहुसंख्य नागरिकांमध्ये घनघोर अज्ञान आहे. या पार्श्वभुमीवर काही निरिक्षणे/वैशिष्ट्ये नमूद करायला हवीत.

१) ९ डिसेंबर १९४६ ला घटना सभेची पहिली बैठक झाली. पु्ढे तीनेक वर्षे हे काम चालले. घटना परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष कायदामंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. घटना परिषदेचे सुमारे ३०० सभासद होते. त्यातले ८२ टक्के सदस्य काँग्रेस पक्षाचे होते. सात जणांच्या मसुदा समितीने घटनेचे प्रत्यक्ष लेखन केले. मात्र अनेकविध अडचणींमुळे यातले बरेचजण गैरहजर असत, अशावेळी हे काम एकहाती बाबासाहेबांनी पार पाडले. त्यामुळे ते संविधानाचे प्रमुख शिल्पकार होत.

 २) असे जरी असले तरी राज्यघटनेचे लेखन म्हणजे एखाद्या कादंबरीचे लेखन नव्हे. बाबासाहेबांच्या मनाला येईल ते लिहिण्याचे स्वातंत्र्य त्यांना नव्हते. लिहिलेला प्रत्येक शब्द पाच स्तंभावर आधारलेला होता. त्याला दरवेळी घटना परिषदेत मतदान घेऊन मान्यता घ्यावी लागत होती. अर्थातच काँग्रेस पक्षाचे बहुमत असल्याने त्या पक्षाच्या श्रेष्ठींच्या मान्यतेनेच पुढे  जावे लागत होते. हे पक्षश्रेष्ठी पाचही जण बॅरिस्टर होते. महात्मा गांधी, पंडीत नेहरु, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आणि मौलाना आझाद. यातले गांधीजी घटना सभेचे सदस्य नसले तरी ते सर्वाधिक प्रभावशाली होते. त्यांची ३० जानेवारी  १९४८  ला हिंदुत्ववादी नथूराम गोडसेने हत्त्या केली. पण तोवर घटनेचा पहिला मसुदा लिहुन तयार झालेला होतो. जो लगेच २० व २६ फेब्रुवारी १९४८ ला गॅझेट ऑफ इंडीयात प्रकाशित करण्यात आला. तो तुम्ही वाचायला हवा. बाबासाहेब, गांधीजी आणि नेहरू नसते तर आजचे बहुसांस्कृतिक, प्रागतिक, वैश्विक मुल्यांवर आधारलेले मौलिक संविधान आपल्याला मिळाले असते का? बहुधा नाही.

३) घटनेसभेतले ३०० पैकी २० सदस्य खूपच प्रभावशाली/सक्रिय होते. त्यातले ५ याआधी नमूद केलेले आहेतच, उरलेले पुढीलप्रमाणे, अनंतशयनम अय्यंगार, गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादि कृष्णस्वामी अय्यर, शंकरराव देव, जयरामदास दौलतराम, श्रीमती दुर्गाबाई, जे.बी.कृपलानी, टी.टी.कृष्णम्माचारी, एच.सी.मुखर्जी, के.एम.मुन्शी, गोविंद वल्लभ पंत, एन.माधव राव, सत्यनारायण सिन्हा, पट्टाभि सीतारामय्या आणि सय्यद मोहम्मद सादुल्ला. घटना सभेचे मुख्य सल्लागार बी.एन.राव हे होते. 

४) घटना सभेच्या तीन वर्षांच्या प्रत्येक कामकाजाचे इतिवृत्त बारा खंडांमध्ये भारत सरकारने प्रकाशित केलेले आहे. ते कॅड ( CAD ) " कॉन्स्टीट्यूयंट असेम्ब्ली डिबेट" अतिशय मौलिक आहेत. ते वाचल्याशिवाय घटना कशी तयार झाली याचे प्राथमिक ज्ञानही होत नाही.  

५) घटना सभेने विविध उपसमित्या नेमलेल्या होत्या. त्यांचे अहवाल विचारात घेऊनच बाबासाहेबांना घटनेचा मसुदा लिहावा लागला. " द फ्रेमिंग ऑफ इंडीयाज कॉन्स्टीट्यूशन" च्या सहा खंडांमध्ये हे सगळे दस्तावेज छापलेले आहेत. जिज्ञासूंनी ते बघायला हवेत.

६) मुख्य सल्लागार बी.एन. राव यांनी एक मसुदा आधीच तयार केलेला होता. त्याची छाननी बाबासाहेबांनी केली, व त्यातले काही घेतले, काही वगळले. राव यांचे आत्मचरित्र " मेकिंग ऑफ इंडीयाज कॉन्स्टीट्यूशन" खूपच वाचनीय आहे.

७) १८५७ च्या लढाईपासून सुरू झालेला स्वातंत्र्य संग्राम ९० वर्षे चालला. या काळात जनतेने जी स्वप्नं बघितली, त्यांना जी आश्वासने दिली गेली, वायदे केले गेले, चर्चा झाल्या, मंथन झाले, त्या सगळ्यांना न्याय देणे हे सुत्र बाबासाहेबांनी मोलाचे मानून त्याला संविधानात उचित जागा दिली.

८) राणीचा जाहीरनामा, मोर्लेमिंटो सुधारणा, मॉण्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा, साऊथबरो कमिशन, सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदा यातून १९३५ चा भारत कायदा तयार झाला. तो बाबासाहेबांनी आधारभूत मानला.

 ९) घटनेचा मसुदा प्रकाशित करून जनतेकडून सुचना/अभिप्राय/ सुधारणा मागवण्यात आल्या. आलेल्या हजारो सुचना या तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य घरांमधून आलेल्या होत्या. त्यातल्या सुमारे अडीच हजार सुचना स्विकारल्या गेल्या. या अर्थाने तमाम भारतीय जनता संविधानाच्या निर्मितीत सहभागी झालेली होती हे घटनेवर बोलताना लक्षात घ्यायला हवे.

१०) हे खरे आहे की संविधान सभेत उच्च वर्णियांचेच वर्चस्व होते. सुमारे ९० टक्के सदस्य या समाजांतून आलेले होते. ओबीसी, महिला, अल्पसंख्यक अशांना तिकडे पुरेशे प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते. तरिही बाबासाहेब, गांधीजी व नेहरूजी यांच्यामुळे त्यांचाही विचार झाला. कलम ३२६ अन्वये सगळ्यांना मताधिकार मिळाला. कलम १३ अन्वये जुने कायदे,रूढी,परंपरा, श्रद्धा, समजुती, विश्वास यातले घटनाविरोधी ते सगळे रद्द करण्यात आले, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि समता या चार वैश्विक मुल्यांवर आधारलेली राज्यघटना आकाराला आली. समावेशकता हा राज्यघटनेचा मुख्य गाभा आहे. चातुर्वर्ण्य, बहिष्कृतता, लिंगभाव विषमता, वर्गीय भेदभाव आणि जातीभेद यांना नकार देण्यात आला. परंपरा आणि परिवर्तन यांचा संविधानात मेळ घालण्यात आला.शतकानुशतके वंचित, शोषित, अन्यायग्रस्त राहिलेल्या महिला, शुद्र, अतिशूद्र यांना राज्यघटनेने प्रथमच माणूसपणाचा दर्जा दिला.

११) आज केंद्रीय सत्तेत असलेल्या संघपरिवाराचा संविधानाच्या निर्मितीत कसलाही सहभाग नव्हता, त्रैवर्णिक, पुरूषसत्ताक आणि विषमतावादी, मनुवादी छावणीला काही प्रमाणात तरी जेरबंद केले गेले. म्हणूनच त्यांना हे संविधान नकोय. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना मूठभरांची वर्चस्ववादी,बहुजनांना गुलाम करणारी व्यवस्था पुन्हा आणायची आहे.

अशावेळेला  संविधान साक्षर होऊ या. संविधान जनजनात, घराघरात पोचवू या. हे संविधान वाचले तरच आपण वाचू शकू नाहीतर पुन्हा मनुवादी सत्ता अटळ असेल. तुम्ही कोणाच्या बाजूचे आहात? संघ परिवार की संविधान परिवार?

-प्रा. हरी नरके, 

२६ नोव्हेंबर २०२०

Saturday, October 31, 2020

अनुसुचित जातीजमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-प्रा.हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्या अधिकारात येतच नाही. सबब हा मुद्दा या बैठकीत आणता येणार नाही." तरिही उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या पटेलांनी डॉ. आंबेडकरांचा हा मुद्दा फेटाळून लावला. जवाहरलाल नेहरूंनी मात्र या बैठकीत मौन धारण केले. 

पटेलांनी देशभर या मागणीसाठी सनातन्यांची आंदोलने घडवून आणली. पटेलांनी हीच शिफारस घटनासभेत मांडली असता डॉ. आंबेडकरांनी घटना सभेच्या बैठकीतून सभात्याग केला व पुढील ४ दिवस ते कामकाजाला अनुपस्थित राहिले. त्यांनी घटना समितीचा राजीनामा द्यायचे ठरवले. अनु. जातीजमातींना राज्यघटना संरक्षण देणार नसेल तर अशा घटना परिषदेत मी राहणार नाही असे त्यांनी जाहीर केले.

त्यामुळे नाईलाजाने पटेलांनी माघार घेतली  व त्यामुळे अनु. जातीजमातींचे आरक्षण टिकले.


- प्रा. हरी नरके, 

३१/१०/२०२०


संदर्भासाठी पाहा-

१. डॉ. राजा शेखर वुंद्रू, (आय.ए.एस.) " आंबेडकर, गांधी आणि पटेल," ब्लूम्सबेरी प्रकाशन, नवी दिल्ली, २०२०, पृ. २३१ ते २३९


२. Constituent Assembly Debates, vol.5, pp. 259-70, vol. 8, pp. 269-72,   

३. कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, खंड ७७ वा, पृ.२५,

४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेस, खंड, १३, पृ.९२, पृ. १२७

५. बी. शिवा राव, द फ्रेमिंग ऑफ कॉन्स्टीट्यूशन, खंड ४ था, पृ. ५९९, पृ.७७२-७३, खंड २ रा, पृ. २४७,


Thursday, October 1, 2020

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - प्रा. हरी नरके

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन समकालीन, दिग्गज, राष्ट्रीय नेत्यांचे परस्परसंबंध गुंतागुंतीचे होते. अनुयायी मात्र या संबंधांचे सुलभीकरण करून ते कसे एकमेकांचे विरोधक होते, कडवे टिकाकार होते याची एकतर्फी मांडणी करीत असतात. आता त्या दोघांना जाऊन सहासात दशकं उलटून गेलेली आहेत. ते महापुरूष असले तरी मुलत: माणूस होते आणि जित्याजागत्या माणसाच्या मर्यादा त्या दोघांनाही होत्याच. ते समकालीन असल्याने एकमेकांचे राजकीय स्पर्धकही होते. त्यांच्यात जसे वैचारिक - तात्विक मतभेद होते तसेच नेतृत्वाची स्पर्धाही होती. आता आणखी किती वर्षे ही कटूता, हा विखार कायम ठेवायचा? एव्हढ्या वर्षांनी तरी गाळ खाली बसून मैत्री, करूणा, बंधुतेचं पाणी निवळणार की नाही?

ही पोस्ट वाचून काही कडवे लोक वस्सकन अंगावर येणार याची मला खात्री असूनसुद्धा लिहित आहे.

१. गांधी-आंबेडकर एकमेकांचे मित्र किंवा चाहते होते का? नाही.

२. ते एकमेकांचे शत्रू होते का? नाही.

३. त्यांनी एकमेकांवर कडक भाषेत टिका केलीय का?  हो. 

अगदी एकमेकांचे वाभाडे काढणे ह्या प्रकारची ही कठोर टिका आहे यात शंकाच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "रानडे, गांधी आणि जीना" या त्यांच्या गाजलेल्या भाषणात आणि " व्हॉट काँग्रेस अ‍ॅंड गांधी हॅव डन टू दि अनटचेबल्स" या ग्रंथात महात्मा गांधींवर टिकेचा वर्षाव केलेला आहे. गांधीजींनीही बाबासाहेबांबद्दल कठोर  प्रसंगी अनुदार लेखन केलेय. दोघांचीही टिका त्या परिस्थितीत योग्य आणि आवश्यकही होती. पण हीच कटूता त्यांच्यात कायम राहिलीय का? तर नाही.

४. "मी कधीही गांधींना महात्मा म्हटलेले नाही" असे बाबासाहेब एका भाषणात म्हणाले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काही वेळा अपार जिव्हाळा असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. [अ] महाड सत्याग्रहाच्या मंडपात फक्त एकच फोटो लावलेला होता आणि तो महात्मा गांधींचा होता असे बाबासाहेब संपादक असलेल्या बहिष्कृत भारतात नमूद केलेले आहे. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक,  महाराष्ट्र शासन, मुंबई, २००८, पृ.१६२ ]

सत्याग्रहाची संकल्पना आपण महात्मा गांधींकडून घेतली असं बाबासाहेब अग्रलेखात म्हणतात. बहिष्कृत भारतात बाबासाहेबांनी एकदाच नाही तर अनेकदा रा.रा. मोहनचंद करमचंद गांधीजींचा उल्लेख महात्मा गांधी असा केलेला आहे. [ नमुन्यादाखल पाहा- उपरोक्त, पृ, १६, १९, ६१, ७२, ९२, १२९, १३०, १३४,१४२, १५९, १६२] आपल्या जाहीर भाषणांमध्येही बाबासाहेबांनी अनेकदा महात्मा गांधीजींचा उल्लेख "महात्मा" असा केलेले आहे. एकट्या १८ व्या खंडाच्या भाग २ मध्ये गांधीजींचा उल्लेख ५२ वेळा आलेला असून त्यात अनेकदा "महात्मा" म्हटलेले आहे. [ उदा. पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२०, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२५ ]

दि. ४ जून १९२७ चा महात्मा गांधीजींचा संदेश बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतात छापलेला आहे. त्यात गांधीजी म्हणतात, " आपल्या अस्पृश्य देशबांधवांना आपण मंदिरात प्रवेश नाकारल्यामुळे देव आपल्या मंदिरांतून निघून गेलेले आहेत. अस्पृश्यांना मंदिरात आणि आपल्या अंत:करणात प्रवेश दिल्याशिवाय देव परत येणार नाहीत." [ पाहा- उपरोक्त, पृ. ६० ] अस्पृश्यता ताबडतोब नष्ट केली नाही तर हिंदू धर्म नामशेष झाल्यावाचून राहणार नाही" असेही गांधीजींचे मत असल्याचे बाबासाहेब पुढे सांगतात. [ पाहा- उपरोक्त, पृ. ६१]

५. महापुरूषांचे बोलणे शब्दश: घेण्याऎवजी त्यामागचा आशय, हेतू, आणि वैचारिक गाभा बघावा लागतो. आजकाल शब्दप्रामाण्य, पोथीनिष्ठा आणि विभुतीपूजा [ ज्या गोष्टींना बाबासाहेबांचा ठाम विरोध होता ] यांना भलताच उत आलेला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, असे नमूद करून स्वार्थासाठी त्यांचा वापर सुरू आहे. बाबासाहेब खरेच तसे म्हणाले होते का? असल्यास त्याचा संदर्भ काय होता, त्याच्यानंतर त्यांच्या त्या मतात काही बदल झाला होता का? हे बघितलेच जात नाहीये. बाबासाहेबांना देवत्व देण्याची काहींनी मोहीमच हाती घेतलेली आहे. देवत्व बहाल करण्यामागे अपहरणाचा डाव असतो, हे कधी कळणार?

यापुढे हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी आदी धर्मांच्या ग्रंथप्रामाण्यानुसार ईश्वर, अल्ला, प्रेषित यांच्या विचारांची चिकित्साच शक्य नाही. छ. शिवराय, बाबासाहेब, गांधीजी यांनाही देवत्व बहाल केले गेल्याने त्यांच्याही विचारांवर मोकळेपणाने बोलायला बंदी येताना दिसतेच आहे. छ.शिवराय आणि बाबासाहेब यांची चिकित्सा तर एव्हाना बंदच केली गेलेली आहे.

२६ ऑक्टोबर १९३८ रोजी बोलताना बाबासाहेब म्हणाले होते, "राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे." [ पाहा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२५ ] ते पुढे म्हणतात, "याच्या उलट आपल्यात एक दोष आहे, की एकदा भांडण झालं की ते पिढ्यानपिढ्या चालावं." हा अविचार आता बंद व्हायला हवा. कालानुरूप साधकबाधक मांडणी व्हायला हवी. चर्चा करण्यासाठी दहशतविरहीत मुक्त वातावरण असायला हवे. टिका करताना हेत्वारोप केलेच पाहिजेत का?

६. गांधीजी आणि बाबासाहेब दोघेही कर्तृत्ववान नेते होते. त्यांची एकमेकांशी स्पर्धाही होती. गांधीजी आधी अतिशय सनातनी होते. ते चातुर्वर्ण्य मानत असत. ते गिताभक्त होते. त्यांचा रामराज्यावर विश्वास होता. खेड्यांकडे चला हा त्यांचा नारा होता. बाबासाहेबांना हे विचार मान्य नव्हते. शहरांकडे चला असे बाबासाहेब सांगत होते. सामाजिकदृष्ट्या संकुचित असलेले गांधीजी बाबासाहेबांमुळे विस्तारत गेले. त्यांचा वैचारिक विकास होत गेला. बाबासाहेबसुद्धा फक्त दलितांचे नेते न राहता शेतकरी, महिला, बलुतेदार-अलुतेदार, कामगार यांचे नेते बनत गेले. गांधीजींशी त्यांनी केलेल्या संघर्षातून ते राष्ट्रीय नेते बनले. ते दोघेही बॅरिस्टर होते. प्रचंड लोकप्रियता हे दोघांचेही समान वैशिष्ट्य होते. गरिबांविषयी कळवळा हे दोघांचेही मुख्य गुणसुत्र होते.

त्यांच्या पक्षांचे ते सर्वेसर्वा होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निष्ठेला, शिस्तीला ते फार महत्व देत असत. दोघांचेही अनुयायी त्यांना प्रतिपरमेश्वरच मानत असत. त्यामुळे हे अनुयायी परस्पर निंदेच्या मोहीमा राबवत असत. दोघांमध्ये अनेक मुद्यांवर मतभेद होते. सायमन कमिशनवर काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब सायमनला भेटले. पहिल्या गोलमेज परिषदेवरही काँग्रेसने बहिष्कार घातला होता. बाबासाहेब परिषदेला उपस्थित होते. १९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिटीश मंत्रीमंडळात सहभागी झाले होते. त्याकाळात काँग्रेसने " चले जाव चा" नारा दिलेला होता.

७. गांधी-आंबेडकरांच्या तिन्ही भेटी गाजल्या. पहिल्या भेटीच्या वेळी गांधीजींनी मी तुम्हाला भेटायला येतो असं कळवलं. बाबासाहेब शिष्टाचार पाळणारे होते. ते स्वत: गांधीजींना भेटायला गेले. गांधीजी मात्र तेव्हा आढ्यतेनं वागले. त्यांनी मुद्दामच बाबासाहेबांचा पाणउतारा केला. हा अपमान बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. गांधीजी असं का वागले? महादेवभाई आपल्या डायरीत लिहितात, "बापू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण समजत होते. अस्पृश्यांबद्दलचा दिखाऊ कळवळा असलेले समजत होते. दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतल्यावर गांधीजी नामदार गो. कृ. गोखल्यांना भेटले. गोखल्यांनी त्यांना भारतभ्रमण करण्याचा व महत्वाच्या राजकीय नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याकाळात गांधीजी अनेकांना भेटले. त्यात केतकर, दांडेकर, जावडेकर, बावडेकर, गोळवलकर यांचा समावेश होता. तसेच आंबेडकरही ब्राह्मण असावेत त्यांचा समज झाला.

पहि्ल्या भेटीत जेव्हा बाबासाहेब म्हणाले, " गांधीजी, मला मातृभूमी नाही" तेव्हा गांधीजी चरकले. आपली चूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी भेट लंडनला झाली. तेव्हा गांधीजींनी आपला विश्वासघात केला असा बाबासाहेबांचा समज झाला. तेव्हा गांधीजी दुटप्पीपणानं वागले होते. मुस्लीमांना गांधीजी म्हणाले, "मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतो, मात्र तुम्ही अस्पृश्यांच्या मागणीला विरोध करा." ही मुत्सद्देगिरी गांधीजींना फार महाग पडली. बाबासाहेब त्यांच्यापासून आणखी दुरावले. गांधीजींवरचा बाबासाहेबांचा विश्वासच उडाला. गांधीजी हे विश्वासघातकी आहेत, त्यांच्या वागण्याने आपल्या काळजावर डागण्या दिल्या गेलेल्या होत्या असे बाबासाहेब म्हणत असत. [पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ. २२० ]

८. डॉ. आंबेडकरांचे पंख छाटण्याचा प्रयत्न गांधीजींनी केला. शेरास सव्वाशेर म्हणून काँग्रेसमध्ये फूट पाडायचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. [पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६ ] पुणे कराराच्या वेळी या दोघांमध्ये न भुतो न भविष्यती अशी कटुता निर्माण झाली. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" मधल्या पत्रव्यवहारात या दोघांमधल्या कटुतेचे पडसाद उमटलेले आहेत.

घटना परिषदेतल्या बाबासाहेबांच्या पहिल्या भाषणाने गांधीजी आणि काँग्रेस नेतृत्व चकीत झाले. बाबासाहेबांची राष्ट्रहिताची व्यापक भुमिका बघून त्यांनी बाबासाहेबांशी असलेले सगळे मतभेद विसरून सहकार्याचा हात पुढे केला. काँग्रेस व बाबासाहेब या दोघांनी घटना परिषदेत एकत्र मिळूनमिसळून काम केले. बाबासाहेब आणि गांधीजी एकत्र आले नसते तर असे द्रष्टे, पोलादी आणि सम्यक, सेक्युलर संविधान भारताला मिळालेच नसते. घटना परिषदेवर १९४६ मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा बंगालच्या ज्या मतदार संघातून निवडून आले होते तो खुलना मतदार संघ भारताच्या फाळणीमुळे पाकीस्तानात गेल्याने जुलै १९४७ ला बाबासाहेबांचे घटना परिषदेवरील सदस्यत्व रद्द झाले होते.

दरम्यान काँग्रेसचे सदस्य बॅ. एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने बाबासाहेबांना घटना परिषदेवर स्वत:च्या कोट्यातून पुन्हा बिनविरोध निवडून दिले.

ही वस्तुस्थितीनिदर्शक बाब काही हितसंबंधियांकडून मुद्दामहून दडवली गेलेली आहे. 


काँग्रेसचे नेते गांधीजींच्या शब्दाबाहेर नव्हते. गांधीजी, नेहरू, पटेल, राजेंद्रबाबू आणि मौलाना आझाद हे पाचजण काँग्रेसचे हायकमांड होते. त्यांनी आपापसात विचारविनिमय केला आणि बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बॅ. बाबासाहेब आंबेडकरांना जुलै १९४७ मध्ये मुंबईतून घटना सभेवर बिनविरोध निवडून आणले. त्यांना ऑगष्ट १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे कायदे मंत्रीपद दिले गेले. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार बनू शकले.


९. बाबासाहेबांचा मतदार संघ काँग्रेसच्या नेत्यांनी मुद्दामच पाकीस्तानात घातला, इंग्रजांनी खडसावले म्हणूनच बाबासाहेबांना घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद दिले गेले हा प्रचार निव्वळ खोटारडा तर आहेच पण जाणीवपुर्वक नथूरामी प्रवृत्तीला बळ देणारा आहे. गांधीजी आणि नथूराम गोडसे यात निवड करायची असली तर हे लोक नथूरामला पसंती देतील काय? 


१०. बाबासाहेबांचे डॉ. सविता कबिर यांच्याशी १५ एप्रिल १९४८ रोजी लग्न झाले. गांधीजींच्या हत्येची घटना ताजी असल्यामुळे असेल बहुधा आपल्या शुभेच्छापत्रात पटेलांनी तुमचे हे आंतरजातीय लग्न बापूंना फार आवडले असते असे लिहिले. गांधीहत्त्येला अडीच महिने झालेले होते. पत्राच्या उत्तरात बाबासाहेबांनी पटेलांशी सहमती व्यक्त करताना, "होय बापूंना या लग्नाचा आनंद झाला असता" असे नमूद केलेले लेखी पुरावे उपलब्ध आहेत.

नारायण देसाई सांगतात, एकेकाळी चातुर्वर्ण्य आणि जातीपाती मानणारे गांधीजी शेवटी मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच उपस्थित राहीन अशी अट घालण्याइतपत पुढे गेलेले होते. काळानुरूप गांधीजी खूप बदलले. प्रतिसादात बाबासाहेबही बदलले. घटना सभेत काँग्रेसचे ८२% पेक्षा ज्यादा बहुमत असतानाही घटनेत अस्पृश्यता निर्मुलन, आरक्षण, राष्ट्रध्वजावर धम्मचक्र यासारख्या अनेक गोष्टी बाबासाहेब आणू शकले. काँग्रेसचे सहकार्य नसते तर ह्या गोष्टी मंजूर झाल्याच नसत्या. हे दोघेही एकमेकांमुळे आणखी मोठे झाले. राष्ट्रव्यापीच नाही तर विश्वभर विस्तारले.

विरोधविकासवादाचा नमुनाच जणू. त्यांच्यातली "लव्हहेट" रिलेशनशिप मोठी गोड होती. गुंतागुंतीची नी आभाळाएव्हढी मोठी होती. मात्र तिला एकपदरी आणि द्वेषबुद्धीची बनवणारे दोन्ही बाजूंचे लोक विकृत आहेत.

११. दोघेही हाडाचे राजकारणी होते. दुसर्‍या गोलमेज परिषदेत महात्मा गांधींनी असा दावा केला की ते सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे अस्पृश्यांचा प्रतिनिधी कोण? गांधीजी की बाबासाहेब असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ते एकमेकांचे स्पर्धक बनले. गांधीजींचा अस्पृश्यांना आरक्षण द्यायला आधी विरोध होता. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांना आरक्षणाला मान्यता देणे भाग पडले.

पुणे कराराला देशहितासाठी बाबासाहेबांनी मान्यता दिली. दोघेही महापुरूष प्रतिभावंत होते. कमालीचे हट्टी आणि कर्तृत्ववान होते. दोघांनाही काही लाडक्या खोडी होत्या. तरिही मतभेदांवर मात करून देशहितासठी एकत्र काम करण्याइतपत ते लवचिक होते. आपापला इगो नियंत्रित करून, स्वभावातल्या दोषांवर मात करून सामान्य माणसाच्या भल्यासाठी त्यांनी एकत्र काम केले. राष्ट्रनेते म्हणून लोकशाहीवर ठाम विश्वास असलेले हे दोघेजण आतून मात्र शिस्त, पक्षबांधणी आणि आपापला कार्यक्रम पुढे नेण्यासाठी प्रसंगी मुत्सद्दीपणाने वागले, भांडले, त्यांनी एकमेकांवर वारही केले पण प्रसंगी एकमेकांच्या गळ्यात हारही घातले. पक्षशिस्त, शीलपालन, चारित्र्यसंवर्धन प्रामाणिकपणा आणि दुर्बलांना झुकते माप याबाबतीत हे दोघेही एकप्रकारचे हुकुमशहा होते. [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड, १८, भाग २, पृ.२२६]

गांधीजींचा जन्म १८६९ चा तर बाबासाहेबांचा जन्म १८९१ चा. या दोघांच्या वयात सुमारे २२ वर्षांचे अंतर होते. हे एका पिढीचे अंतर आहे. ही "जनरेशन गॅप" त्या दोघांमध्ये असल्याने प्राधान्यक्रम वेगवेगळा होता. बाबासाहेबांचे रक्त तरूण असल्याने ते आक्रमक होते तर गांधीजी शांत, सहनशील आणि संवादी. दाखवायला संत आतून मात्र पक्के राजकारणी. बनियाच.

त्या दोघांची सामाजिक पार्श्वभुमी, त्यांचे कौटुंबिक संस्कार आणि एकमेकांचे समकालिन असूनही वेगवेगळा असलेला काळ [ वयोगट ] यांचाही त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झालेला आहे.

दोघांच्या पहिल्या भेटीत गांधीजींनी हा वयाचा, आपल्या सिनियारिटीचा मुद्दा उपस्थितही केला होता. गांधीजी म्हणाले, "आंबेडकर, तुमचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी हरिजनांसाठी काम करतोय. "

बाबासाहेबांनी त्यावर हजरजबाबीपणे अतिशय कठोर उत्तर दिले होते. " गांधीजी, आधी जन्मलेले सगळेच लोक असा दावा करू शकतात. प्रश्न असाय की, महात्मे येतात नी जातात, त्यांच्यामुळे सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावतो की फक्त धूळ तेव्हढी ऊडते? हेही तपासले जायला हवे."

आज हे दोघे असते तर देशाची लोकशाही, संविधान, बहुसांस्कृतिकता, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुतेसाठी दोघांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन हातात हात घालून एकत्र काम केले असते.

या दोघा महामानवांना वंदन.

-प्रा. हरी नरके


Tuesday, September 8, 2020

बाबासाहेबांनी अशी वाचवली मुंबई! ■ प्रा हरी नरके ■




◆ आज पुन्हा एकदा केंद्रातील काही गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे. अशावेळेला मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी दुसऱ्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ताकदीचे संशोधन, पुराव्यांचे बळ,साधार-तर्कशुद्ध युक्तिवादच महाराष्ट्राच्या कामी येणार आहे. ◆मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारे काय दावा करीत होते, त्यांचा तो दावा बाबासाहेबांनी कसा खोडून काढला ते बघूयात.

बाबासाहेबांनी त्यांच्यासमोर नऊ प्रश्न उभे केले.

१. मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे?

२. मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता?

३. मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल?

४. काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे?

५. मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महारष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे या म्हणण्यात कितपत तथ्य आहे?

६. मुंबईचा व्यापार-उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये हा दावा किती टिकाऊ आहे?

७. मुंबईच्या कमाईवर, नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे यासाठी महाराष्ट मुंबईवर दावा करतोय हे खरे आहे काय?

८. बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्यक भाषकांना अभय असते हे बरोबर आहे काय?

९. राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको हा दावा योग्य आहे काय?

याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भुगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले.

चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऎतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही. अरबी समुद्रालगतचा भुगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही. मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मुंबई मधला काही काळ मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही.

बाबासाहेब पुढे म्हणतात, १९४१ च्या जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या ५१ टक्के होती. आहे. ब्रिटीशांचे राज्य आल्यापासून सार्‍या भारतातून लोक रोजगार,व्यापार,उदीम यासाठी मुंबईत आले. वसले. त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले हा त्यांचा गुन्हा झाला काय?

बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत तर गुजरातचे आहेत. जसे पोर्तुगिज, ब्रिटीश, फ्रेंच, डच मुंबईत स्वत:हून आले तसे गुजराती आलेले नाहीत. तर ब्रिटीशांनी त्यांना " मध्यस्थ-दलाल" म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले. ब्रिटीशांनी गुजराती व्यापार्‍याबरोबर केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला. १६७१ सालचा म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे. शिवाय महाजनसभा आणि ब्रिटीश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला. त्यानुसार, गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी, गुदाम अणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमिन देण्यात आली. व्यापारात करसवलत देण्यात आली. जहाजे आणि मालमत्तेला संरक्षण पुरवण्यात आले.

तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले. हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला.

मुंबईत जसा त्यांनी व्यापार उदीम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला केलेला आहे. शिवाय बिहारच्य खाणीतही ते मालक आहेत. म्हणून कलकत्ता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय?

मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो? गुजरात की महाराष्ट्र?

ज्या विजेवर हे व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते महाराष्ट्रातून की गुजरातमधून?

कामगार शक्ती कुठली आहे?

आणि म्हणून वीज,पाणी, कामगार शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच.

अशा रितीने सर्वच्या सर्व नऊ प्रश्नांची उत्तरे फाडफाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली. हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकांमधूनचा तुम्ही वाचायला हवा.

पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार, तर्कशुद्ध युक्तीवाद यांची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली.

मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जशी हुतात्म्यांचे, चळवळीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे, तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणार्‍या बाबासाहेबांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने जशी ठेवायला हवी तशीच ती बाबासाहेबांचीसुद्धा ठेवायला हवी.

■■■■■■■■■■■■■■■■■


Tuesday, July 14, 2020

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)









माझ्या घरात महात्मा फुले व बाबासाहेबांचे फोटो मी इयत्ता चौथीत होतो तेव्हापासून लावलेले आहेत.


मी इयत्ता सहावीत असताना काढलेला फोटो. हातातले घड्याळ फोटो स्टूडीओतले असून, अंगठा तुटलेली प्लॅस्टीकची चप्पल माझीच आहे. जुन्या बाजारातून बारा आण्याला घेतलेली.सर्वात महत्वाचे हातातले पुस्तक- माझे सर्वाधिक आवडते पुस्तक "महात्मा फुले : समग्र वाड्मय"


इथून मी सुरूवात केली. नरकेवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे येथील १९८० च्या काळातील माझं घर आणि गोठा-



मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला टेल्कोतून मंत्रालयात वि.का.अ. म्हणुन घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मी सम्पादित केलेला अंक-



नामांतर आंदोलनातल्या तुरूंगवासाबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या हस्ते सत्कार


ओबीसीत जाऊन काम करा असा मला अनाहूत सल्ला देणार्‍या "मित्रांसाठी खास", हे माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे.


जेव्हा दोनचार सरंजामदार तथाकथित डावे मला रा. स्व. संघाचा हस्तक म्हणुन हिनवत होते, वाळव्यात मला रितसर निमंत्रित करून त्यांच्याच स्टेजवर बोलू देत नव्हते, बाबरी विध्वंसनाला उत्तर म्हणुन तेव्हा मी भाई वैद्य आणि विलास वाघ यांच्यासमवेत सम्पादित केलेला ग्रंथ- धर्मनिरपेक्षता




श्री.छगन भुजबळ, प्रा.ना.स.फरांदे, श्री. मुकुंदराव ठकोजी पाटील, डी.के. माळी  आणि इतर नेत्यांसोबत १९९०



माझा जन्म निरक्षर शेतमजूर-मोलकरीण आईवडीलांच्या पोटी झोपडपट्टीत झाला. कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत पुणे मनपाच्या मुंढवा शाळेत शिकलो. माझा पहिल्या महिन्याचा पगार होता रुपये पाच. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा दरमहा पगार होता साठ रूपये. माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. त्यामुळेच इतक्या लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली.


मार्च १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफटिए म्हणून टेल्कोत शिकायला गेलो आणि फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. म्हणता म्हणता याला  ४० वर्षे कधी झाली कळलंच नाही. मी " डीकास्ट"  झालोय, जातीबाहेर पडलोय अशाच गोड समजुतीत मी होतो. सामाजिक कामात तुम्ही तुमची जात विसरून गेलात तरी काही "ज्ञानीजन" तुम्हाला तुमची जात विसरू देत नाहीत. ते तोंडाने "जातीनिर्मुलनाची" भाषा करीत पुन्हापुन्हा तुम्हाला तुमच्या जाती-धर्मात ढकलायचा प्रयत्न करीत असतात.


हे लोक मूठभरच असतात. आहेत. त्यांना आपण अपवादात्मक लोक समजू शकतो. ते सर्वच जाती-धर्मात आहेत. एकुण समाजाचा विचार केला तर असे लोक एका लाखामागे एखाददुसरासुद्धा भरणार नाहीत. उरलेला सारा समाज माझ्यावर नितांत प्रेम करतो. जिवाला जीव देतो. त्यामुळे या हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या अपवादात्मक लोकांचा राग मी समजून घेऊ शकतो. त्या माझ्या मित्रांचे तीन बारकुलेसे गट पडतात.

१. जे लोक तरूणतुर्क, अगदी नवे आहेत, ते अलिकडेच सोशल मिडीयात आलेले आहेत. त्यांनी माझे फारसे काहीच वाचलेले/ऎकलेले नाही. त्यांनी मी संपादित केलेले बाबासाहेबांचे रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचे खंड १७ ते २२ बघितलेलेही नाहीत. जे खुद्द बाबासाहेबांचेही वाचत नाहीत त्यांनी माझी इतर पुस्तकं वाचली असण्याची सुतराम शक्यता नाही. एकुण ते मला ओळखतच नाहीत.

२. ज्यांनी मला अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना बोलावलं, पण मी त्यांना एकदाही वेळ देऊ शकलो नाही म्हणून ते माझ्यावर नाराज आहेत. गेली ४० वर्षे, वर्षाकाठी मला ५५० ते ६०० निमंत्रणं येतात. त्यातली वेळेअभावी ९० टक्के निमंत्रण मी स्विकारू शकत नाही. मी वर्षाकाठी अवघी ५० ते ५२ निमंत्रणं स्विकारू शकतो. उरलेले नाराज होतात. त्याला माझा नाईलाज आहे.

३. जे लोक मला स्पर्धक समजतात, याला कार्यक्रमला बोलावू नका, आम्हाला बोलवा, असं समाजाला सांगसांगून ते दमलेत. पण समाज त्यांचं ऎकतच नाही. त्यामुळे ते समाजावर संतापून आहेत. माझ्यावर डुख धरून आहेत. असो.

ही सारी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली दु:खी माणसं आहेत. चिडखोर माणसांसारखीच ती वागतात ह्यात आश्चर्यकारक असं काहीही नाही. शिवाय कशीही वागली तरी ती सारीच माझी भावंडं असल्याने मला त्यांचा राग नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, दोस्तहो, आपण सोबत प्रवासाला सुरूवात केली होती, तुम्ही मागे पडलात हा माझा दोष नाही. तुमचे अपयश हा माझा गुन्हा नाही. तुमची म्हैस भाकड आहे म्हणून माझ्या दुभत्या म्हशीला शिव्या देऊन काय साध्य होणार? तुम्हाला परीक्षेत कधीही सेकंड क्लाससुद्धा मिळवता आला नाही म्हणून तुम्ही माझ्या सुवर्णपदकांवर जळता हे मला माहित आहे. तुमचा माझ्यावरचा जळफळाट मी अगदीच समजू शकतो. पण, मत्सराने प्रगती होत नाही, उलट मन आणि शरीर अधिक रोगट बनत जाते. मला तुमच्याबद्दल अपार कणव आहे. करूणा-मैत्रीभाव आहे. लवकर बरे व्हा भावंडांनो. Get Well Soon..


मी सम्यक सम्बुद्धांच्या मध्यम मार्गाचा प्रवासी आहे. आज जरी ते माझा रागराग करीत असले तरी उद्या तेही माझ्यावर प्रेम करतील असा मला विश्वास आहे. अनित्यता सिद्धांतावर माझा विश्वास आहे. मी माझ्याबाजूने त्यांच्यावर प्रेमच करतो.


माझं पहिलं पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक बाळ गांगल यांच्यावर होतं. त्यांच्या महात्मा फुल्यांवरील गलिच्छ टिकेचा २२५ संदर्भांसह सप्रमाण प्रतिवाद करणारं ते पुस्तक आहे. १९८९ च्या मार्चमध्ये ते पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते चंद्रपूरला प्रकाशित झालं. तेव्हा मी टेल्कोची रात्रपाळी करून विद्यापीठात एम.फिल. करीत होतो. त्यावेळी माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, नामवंत आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ, उषाताई वाघ, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पु.लं.च्या भाषणाची जादू अशी की पुस्तकाच्या ५०० प्रती या कार्यक्रमातच संपल्या. महिनाभरात तीन हजार प्रतींची आवृत्ती संपली. पुस्तकाला अनेक नामवंत पुरस्कार मिळाले. अनेक मान्यवरांनी त्या पुस्तकावर लिहिले. त्यावर्षीचे ते सर्वाधिक लोकप्रिय व विद्वतमान्य पुस्तक ठरले.


तेव्हापासून आजवर सातत्याने मी संघाचं पोलखोल करणारं सर्वाधिक लेखन केलेलं आहे. अगदी परवा १४ एप्रिल २०२० ला जेव्हा रा.स्व.संघाने बाबासाहेब आमचेच असा दावा केला तेव्हासुद्धा दि प्रिंटमध्ये मी २ लेख लिहून संघाला उत्तर दिलंय. एप्रिल ते मे २०२० मध्ये मी संघाविरूद्ध सुमारे २५ लेख लिहिलेत. आणि संघाच्या बाबतीत संपुर्ण निष्क्रीय असलेले माझे काही मित्र मी संघाचा असल्याची आवई उठवतायत. सामान्य माणसं त्यांच्यावर कसा विश्वास ठेवतील? मग त्यांचा अधिकाधिक चडफडाट, तिळपापड होतो.


मी संघाचा असतो तर वर मोदींचे आणि खाली फडण२० यांचे  सरकार असताना त्यांनी मला
" १. महात्मा फुले ग्रंथ समिती,
२. राज्य मागासवर्ग आयोग,
३. महात्मा फुले अध्यासन,
४. बालभारती,
५. मराठी भाषा सल्लागार समिती,
६. अभिजात मराठी समिती,
या सर्वच शासकीय आस्थापनांवरून काढून का टाकलं असतं?


मी त्यांचा असतो तर उलट मला प्रमोशन, पदोन्नती मिळायला हवी होती.


आणि त्यांचं सरकार असताना मी त्यांचे " दि टाइम्स ऑफ इंडीया, डि.एन.ए, लोकसत्ता, म.टा. लोकमत, सकाळ, पुढारी, बेळगाव त.भा, दिव्य मराठी, आय.बी.एन.लोकमत, ए.बी.पी.माझा, झी २४ तास, दिव्य मराठी, साम टिव्हीवर तसेच माझ्या फेसबुक, ट्विटर, ब्लॉगवर अनेकवार वाभाडे काढले असते का?
तेव्हा तुम्ही कुठे होतात राजेहो? ऎन लढाईच्या वेळी जे कायम झोपी गेलेले असतात, होते, त्यांना जनता आणि जाणते मोजत नसतात.


मी महात्मा फुले समता परिषदेचा संस्थापक सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी आहे. १९९२ पासून अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून श्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लक्षावधी ओबीसींच्या अनंत चळवळी केल्या. " ओबीसी बजेट,"  "ओबीसी जनगणना" असे प्रश्न आम्ही देशपातळीवर प्रथमच ऎरणीवर आणले. त्यावर सर्वथरात रान उठवले. ओबीसी जनगणनेवरचं माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे. माझ्या ओबीसी आरक्षण विषयक एका पुस्तकाचे प्रकाशक कॉ. गोविंद पानसरे होते, तर दुसर्‍याचे मकरंद सावे. माझी अनेक पुस्तकं मुंबईला कम्युनिस्टांच्या कॉ. भुपेश गुप्ता भवनमध्ये छापली गेलेली आहेत.


महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही ओबीसींचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेत. आजही नियमितपणे घेत असतो. मुंबई, अमरावती, नागपूर, दिल्ली, पाटना, जयपूर, गोवा, हैद्राबाद, हजारीबाग अशा कितीतरी ओबीसी मेळाव्यांना ५ - ५ लाख इतर मागासवर्गीय बांधव उपस्थित होते. ओबीसी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही गेल्या २५ वर्षात शंभराहून अधिक शिबिरं घेतलेली आहेत. माझे काही मित्र  "तुम्ही ओबीसीत का काम करीत नाही? तिकडे जा, आमच्याकडे येऊ नका." असा सल्ला मला देत असतात. त्यांच्या या मौलिक सल्ल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली तर त्यांना ओबीसींच्या प्रबोधनाशी संबंधित माझे किमान २०० लेख ब्लॉगवर दिसतील. इंग्रजी पेपर " दि हिंदू " पासून मराठी, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये माझे ओबीसीविषयक लेखन प्रकाशित होत असते. झालेले आहे. माझा ब्लॉग वाचणारांची संख्या आज आठ लाख इतकी आहे.


ओबीसींच्या प्रबोधनावर मी जितके लिहिलेय, लिहितोय, बोललोय, बोलतोय त्यापेक्षा जास्त काम या मित्रांनी केलेले असणार! असे मी समजतो. तेव्हा त्यांचा प्रत्येक सल्ला मला शिरसावंद्य मानयलाच हवा! माझ्या मित्रांनो, तुमचा हा सल्ला मी नक्कीच अंमलात आणीन.


१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.
कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. बाळकृष्ण रेणके युक्रांदमधला माझा जुना सहकारी. त्याची पथारी माझ्या दुसर्‍या बाजूला. हरी नरके नंतर रेणक्यांचा जावई झाला. ठाणे तुरूंगामध्ये हरीने सासरा आगाऊ बुक केला. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. ते या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगं आहे.


तुरूंगांत मला ३ आठवड्यात माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ/जन्माने नाही तर बाय चॉईस बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.


कोणाला हे उद्धटपणाचे वाटले तरी हरकत नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यात मी ओबीसी, भटके, विमुक्त, अनु. जाती, जमाती, बहुजनांवर जितकी भाषणं केलीत तितकी करणारा माझ्या पिढीतला दुसरा माणूस मला माहित नाही.


ज्या मूठभरांना माझ्याबद्दल तीव्र नफरत, विरोधीभक्ती आहे, माझा वर्षानुवर्षे द्वेश वाटत आलेला आहे, त्यांनी लाखो सामान्य लोक आणि तळमळीचे कार्यकर्ते माझ्यावर का जिवापाड प्रेम करतात, मला पुन्हापुन्हा भाषणाला का बोलावतात? माझी भाषणं का ऎकतात याचा शोध घ्यावा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आपोआप मिळून जातील.


ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या होत्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.
तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना/क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.
त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. इतकी वर्षे उलटली तरी आजही त्या भेटी ताज्या टवटवीत आहेत.


मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. हे भारी आहे ना?


जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला बावन्नपत्ती म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबा एव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.


दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची.


जेलच्या खूप भन्नाट आठवणी आहेत. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे  माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. आणि तसाच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे. म्हणून तर कुमार सप्तर्षी त्या दिवसांना "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा अनुभव घेणे मस्ट आहे.


१९६३ मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या, ज्यांनी ज्यांनी नामांतर आंदोलनात प्रदीर्घ तुरूंगवास भोगलेला आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपण कोणत्या जेलमध्ये होतात, त्याबद्दल लिहावे, म्हणजे त्यातून समविचारी मित्रमैत्रिणींची नवी/जुनी यादी तयार होऊ शकेल.

(भाग - २ रा समाप्त. क्रमश:)


- प्रा. हरी नरके,

१४/७/२०२०

संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२


पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी पदवीचे शिक्षण घेत असताना ३ वर्षात आंतर राज्य, आंतर विद्यापीठीय पातळीवरील १३३ वादविवाद-वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. देशाचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना-



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी रेग्युलर बी.ए. केलं. पुणे विद्यापीठात पहिला आलो. तेव्हा राज्यपाल न्या. एस. के. देसाई यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि २५ पुरस्कार स्विकारताना- (१६/१०/१९८७)


सामाजिक-सांस्कृतिक कार्याबद्दलचा राज्यव्यापी महानगर पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी यांच्या हस्ते स्विकारताना, शेजारी गो.रा.खैरनार व इतर मान्यवर


रतन टाटा यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार स्विकारताना, शेजारी जे. ई. तळौलीकर

Thursday, July 9, 2020

राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके




Rajgruha history | राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह ; इतिहासावर एक नजर- प्रा. हरी नरके

मुंबई : बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर. जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पडायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं ठरवलं. 1930 साली त्यासाठी बाबासाहेबांनी दादरला जागा विकत घेतली. पुढं बॅरिस्टरीतून कमावलेल्या पैशातून बाबासाहेबांनी घराचं काम सुरू केलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा कालखंड काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनासाठी ओळखला जातो.

1930 ला नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेलं आंदोलन जवळपास सहा वर्षं सुरू होतं. याच काळात बाबासाहेब बौद्ध धर्माकडे आकृष्ठ होत होते. एकीकडे सत्याग्रह सुरु होता तर दुसरीकडे घराचं काम. दोन्ही जेव्हा पूर्ण व्हायला आलं तेव्हा बाबासाहेब एका ठोस निर्णयापर्यंत पोहचले होते. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय. त्याची सुरुवात बाबासाहेबानी त्यांच्या नव्या घरापासून करायची ठरवलं. या नव्या घराला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह. हे राजगृह हे नाव भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळाशी नातं सांगणारं होतं.

राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार-
भारतात मगध साम्राज्य जेव्हा शिखरावर होतं तेव्हा आत्ताच्या बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं. बिंबिसार आणि अजातशत्रू या राज्यांची ही राजधानी होती. सम्राट अशोकानेही इथं भेट दिली होती. एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्ध हे देखील राजगृह या ठिकाणी राहिले होते. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या राजगृहाचं नाव बाबासाहेबांनी आपल्या नव्या घराला द्यायचं ठरवलं. अर्थात पुढं या दादरचं हे नवं राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार बनणार होतं. घराचं काम 1934 ला पूर्ण झाल्यावर बाबासाहेब रमाबाई आंबेडकरांबरोबर इथं राहायला आले. बाबासाहेबांना त्यांचे आवडते ग्रंथ व्यवस्थित ठेवता यावेत आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा उपयोग करता यावा यासाठी सोईस्कर ठरेल अशी या घराची बाबासाहेबांनी रचना करून घेतली होती.

राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह-
बाबासाहेबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक लढ्याची सूत्रं आता या राजगृहातून हलायला लागली. पण थोड्याच कालावधीत म्हणजे मे 1935 ला रमाबाई आंबेडकरांचं इथं निधन झालं. पुढं हे राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह बनलं. बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक महत्वाच्या ग्रंथांचं लेखन इथं केलं. एनिहिलेशन ऑफ कास्ट वेटींग फॉर व्हिजा हे ग्रंथ इथंच आकाराला आले. बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्याचा निर्णयही इथंच घेतला. पुढं बाबासाहेबांचं तब्ब्ल बावीस वर्ष या राजगृहात वास्तव्य राहिलं. या राजगृहातील पुस्तकांचा संग्रह हा गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या देखील उच्च दर्जाचा होता. पुढं हे राजगृह आंबेडकर कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान म्हणून ओळखलं गेलं. पण या राजगृहाची खरी ओळख ही ज्ञान आणि ऊर्जेचं केंद्र म्हणूनच इतिहासात नोंद झालीय. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यावर ओरखडाही पडणं शक्य नाही.

History of Rajgruha | राजगृहाचा इतिहास काय आहे? कोणत्या घटना राजगृहाशी निगडित आहेत? WEB EXCLUSIVE
By : एबीपी माझा वेब टीम |

अधिक माहितीसाठी : Rajgruha history of rajgriha pune dr babasaheb ambedkar hari narke  Updated : 11 Jul 2020 12:09 AM (IST)

https://marathi.abplive.com/videos/news/what-is-the-history-of-rajagriha-which-incidents-are-related-to-rajruha-web-exclusive-788330


प्रा.हरी नरके यांची मुलाखत- By: मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 09 Jul 2020 08:46 PM (IST)

राजगृह: जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र, विश्वाचे ज्ञानकेंद्र- प्रा. हरी नरके






दादर परिसरातील राजगृहाला तिहेरी महत्व आहे. मुळात तिथे पुस्तकं राहात होती आणि उरलेल्या जागेत आंबेडकर कुटूंबिय राहात होते. ते जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र/प्रेरणास्थान आणि सार्‍या विश्वाचे ज्ञानकेंद्र आहे. ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थळ हे फक्त एक घर नाही. १९३४ ते १९५६ या काळात बाबासाहेब तिथे राहात असत. त्यांनी अनेक पुस्तकं तिथं लिहिली. त्यांचे दोन मास्टरपीसेस "अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" आणि "वेटींग फॉर व्हीसा" इथेच लिहिले गेले. "स्वतंत्र मजूर पक्षाचा" जन्म इथेच झाला. २७ मे १९३५ मातोश्री रमाबाईंचे महानिर्वाण इथेच झाले. बाबासाहेब सुमारे २८ वर्षे मुंबईच्या चाळीतच राहिले. जेव्हा ते शासकीय विधी महाविद्यालयात प्रोफेसर झाले तेव्हा पोय बावडीची चाळीतली जागा पुस्तकांसाठी फारच अपुरी पडू लागल्याने दादरच्या हिंदू कॉलनीच्या परिसरात त्यांनी दोन प्लाॅट खरेदी केले. बॅंकेचे कर्ज काढून १९३१ ला राजगृहाचे बांधकाम त्यांनी सुरू केले. १९३३ च्या अखेरीस राजगृह बांधून तयार झाले. १९३४ च्या प्रारंभी बाबासाहेब, रमाबाई, यशवंतराव, लक्ष्मीबाई, मुकुंदराव हा आंबेडकर परिवार तिथे राहायला गेला.


आपल्या बंगल्याला "राजगृह" हे नाव देण्यामागे बाबासाहेबांचा एक ठाम विचार होता. बिहार मधल्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगिर किंवा राजगृहला तथागत अनेकवेळा राहिलेले होते. त्यांनी त्याठिकाणी धम्मप्रवचने दिलेली होती. राजगृह ही मगधांची पहिली राजधानी. बिंबीसार व अजातशत्रू या बौद्ध राजांची कारकिर्द या शहराने पाहीली. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली होती. इ.स.पुर्व २००० मधील बांधकामाचे अवशेष या शहरात मिळतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांचे पवित्र स्थान म्हणुन या शहराला महत्व आहे. पहिली बौद्ध धम्म संगिती इथेच झाली. "विनयपिटक" या पवित्र बौद्ध ग्रंथाची निर्मिती २२५० वर्षांपुर्वी इथेच झाली. या ग्रंथात महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख मिळतो.


 १९३३ मध्ये राजगृहाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेबांनी त्यांचे मित्र सुभेदार सवादकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात आपला धर्मांतराचा निर्णय झालेला आहे व आपला कल बौद्ध धम्माकडे आहे असे त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे. येवल्याला त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी जी धर्मांतराची  महागर्जना केली ते भाषण राजगृहातच लिहिले गेले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याची केस लढण्याची तयारी करणे, शेतकर्‍यांची आंदोलने, खोती विरोधी बिल, कुटुंब नियोजन बिल ह्या सार्‍या ऎतिहासिक गोष्टी राजगृहावरच जन्माला आल्या.



जल उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा  या महत्वाच्या असल्या तरी त्यात भारनियमन /लोडशेडींग असू शकते. पण बाबासाहेबांच्या राजगृहातून मिळणारी बौद्धिक उर्जा मात्र कोणतेही भारनियमन नसलेली.


बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी देशातला सर्वात मोठा खाजगी ग्रंथसंग्रह होता. सुरूवातीला त्यात ५० हजार ग्रंथ होते. त्यात सतत भर पडत राहिली. नंतर बाबासाहेबांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीला राहिले. त्यामुळे राजगृहावरील काही पुस्तके तिकडे हलवण्यात आली. नंतर काही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, औरंगाबादच्या ग्रंथालयांना दिली गेली.


बाबासाहेबांचा हा ग्रंथसंग्रह त्या काळात बनारस हिंदु विद्यापीठाचे मालवियजी आणि पिलानीचे बिर्ला शेट यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले असताना व बाबासाहेबांना त्याकाळात आर्थिक निकड असतानाही बाबासाहेबांनी हा ग्रंथसंग्रह विकला नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, " माझा समाज ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला शतकानुशतके ज्ञानाची उपासमार सोसावी लागली. त्यांची ही अपुरी राहिलेली तहानभुक माझ्या एकट्यामध्ये सामावलेली असल्याने मी रात्रंदिवस, प्रत्येक सेकंद वाचतच असतो."

राजगृह हे वाचन संस्कृतीचं माहेरघर आहे. ते सार्‍या जगाचे ज्ञानकेंद्र आहे. तमाम बौद्धांचे ते पवित्र तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे.

बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे व ज्ञान निर्मितीचे जागतिक प्रतिक आहेत. राजगृह हे ज्ञाननिर्मितीचे महाकेंद्र आहे.


- प्रा. हरी नरके,
हरी नरके, ९/७/२०२०



Tuesday, July 7, 2020

नामांतर आंदोलनातले वयाच्या विशीच्या आतले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध  करण्यासाठी मराठवाड्यात भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित होती. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळण्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा/देशाचा बनला. मी त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये सहभागी होऊ लागलो. लॉन्ग मार्च मध्येही मी सामील होतो. तेव्हापासून माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली.

त्यापुर्वी महाराष्ट्रात शिक्षकांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप झाला होता. तेव्हा मी " पुणे दर्शन" हा २०० पृष्ठांचा प्रबंध लिहित होतो. पुढे १९८० साली गुजरातमध्ये राखीव जागा विरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या " दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, सुनंदन, वर्षा, वंदना, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही दर्पणचं काम करायचो. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर अभिरूप न्यायालय नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही प्रत्येकजण त्या त्या शाळेत प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर वादविवाद/ चर्चा करायचो.

तेव्हा आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची.


कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. १९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्य बाजूने बोललो. आम्ही अधिक पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. जाणत्यांना ते आजही बघता येतील. मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती नामक झोपडपट्टीत राहात होतो. तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा किर्लोस्कर मासिकात लिहिलेले होते. इतक्या लहान वयात एव्हढे उद्योग आम्ही कसे करीत असू याचेच आज मला नवल वाटते.


१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने माझे बरेच तुरूंग बघून झाले.)


बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि वकीली बाण्याचे. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी २२ दिवस तुरुंगात ठेवले. हे २२ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक श्रीमंतीचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर हा मुंबईचा ग्रुप माझा दोस्त झाला.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी लेखाच्या सुरूवातीला ज्यांचा उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षि, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.


या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. होय माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. (भाग - १ ला, क्रमश:)



- प्रा. हरी नरके,
७/७/२०२०

संदर्भासाठी पाह- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१







Sunday, July 5, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर













डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था : संस्थेकडे जगातला सगळ्यात मोठा प्राचीन हस्तलिखितांचा खजिना- प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान  प्राच्यविद्या पंडीत, स्कॉलर आणि बौद्ध साहित्याचे विद्वान संशोधक असल्याने त्यांना सर रा.गो. भांडारकर यांच्याविषयी आदर होता. भांडारकर हे मुंबई विद्यापीठाचे दुसरे भारतीय कुलगुरू होते. ते संस्कृत स्कॉलर, इतिहासकार व बौद्ध साहित्याचे जाणकार होते. थोर बौद्ध विद्वान राहुलजी सांकृत्यायन, धर्मानंदजी कोसंबी यांनी जगभरातून जमवलेले प्राचीन बौद्ध ग्रंथ व हस्तलिखिते यांचा मोठा संग्रह भांडारकर संस्थेकडे आहे. बाबासाहेबांनी भांडारकर संस्थेला भेटी दिलेल्या असून त्यांच्या सह्या संस्थेच्या भेट पुस्तकात आहेत. त्यांच्या भेटीची एक आठवण,        " समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या महत्वाच्या ग्रंथात थोर आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सन्मित्र विजय सुरवाडे यांनी प्रकाशित केलेली आहे. बाबासाहेबांचे निकटवर्ती भास्करराव भोसले यांनी लिहिलेल्या या आठवणीत दोन गोष्टींची नोंद महत्वाची आहे. (१) संशोधनपर लेखनासाठी बाबासाहेब भांडारकर संस्थेच्या दस्तऎवजांचा उपयोग करीत. (२) बाबासाहेबांना या संस्थेच्या कामाबद्दल कौतुक आणि आस्था होती.

भोसले लिहितात, " (बाबासाहेबांची) मोटार भांडारकर रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये जात होती. मी लगेच तिकडे मोर्चा वळवला व मोटारीतून डॉ.साहेबांसहीत उतरलेल्या माझ्या मित्रमंडळीत सामील झालो. डॉ. साहेबांना काही जुन्या प्रती चाळावयाच्या होत्या. पैजवन नावाच्या राजाचा उल्लेख कितीवेळा व कोणकोणत्या प्रतीत कोणत्या अर्थाने आला आहे, याचा त्यांना तलास लावावयाचा होता.

ते काम झाल्यावर आम्ही बाबासाहेबांसोबत मोटारीत बसलो. डॉ.साहेब आम्हाला म्हणाले, " पहा, जगाला विसरून हे लोक विद्याव्यासंगात निमग्न आहेत. सर्व्हन्टस ऑफ इंडीया सोसायटीचे लोकही याच प्रकारचे!"


त्यांना (बाबासाहेबांना) ब्राह्मण लोकांतील चांगल्या गुणांबद्दल आदर होता. विरोधकांच्या चांगल्या गुणांबद्दल आदर असणे लोकशाही यशस्वी होण्यासाठी अत्यंत जरूरीचे आहे, असा बाबासाहेबांच्या बोलण्याचा निष्कर्ष भोसले यांनी काढलेला आहे. आमच्या काही मित्रांना भांडारकर संस्थेबद्दल काही  वाजवी कारणांनी अढी आहे. त्यामुळे तिथल्या पाली व संस्कृतमधील प्राचीन बौद्ध साहित्याबद्दल त्यांना माहिती घ्यावीशी वाटत नाही, हे विद्याव्यासंगाला घातक आहे.


रा.गो. भांडारकर हे प्रार्थना समाजाचे होते. ते पुरोगामी होते. त्यांचा जीवन आदर्श संत तुकाराम हा होता. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मध्ये तिनदा भांडारकरांचा गौरव केलेला आहे. पृ.४८, २६२ व ३३८ वर ते उल्लेख तुम्हाला वाचायला मिळतील. बाबासाहेब भांडारकरांना किती मानत होते, ही माहिती घेण्यासाठी आम्ही राज्य शासनातर्फे बाबासाहेबांचे जे साहित्य प्रकाशित केलेले आहे त्यातला " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक" हा मोठ्या आकारातील खंड अवश्य वाचा.


राज्यशासनातर्फे पाच प्रतिनिधी भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळावर नेमले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना डॉ. आ. ह. साळुंखे, मुस्लीम समाजातील संस्कृत विद्वान गुलाम दस्तगीर, डॉ. सदानंद मोरे, सुचेता धडफळे व मला शासनाने या संस्थेवर नेमले. " आंबेडकर आणि मार्क्स " या महाग्रंथाचे लेखक, सगळ्या डाव्यांचे महागुरू आणि माझे मार्गदर्शक डॉ. रावसाहेब कसबे यांनी या संस्थेच्या अधिकार मंडळावर अनेक वर्षे काम केलेले आहे.


या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना संस्थेकडुन मानधन म्हणुन कोणतीही रक्कम दिली जात नाही. मी काही वर्षे भांडारकरचा उपाध्यक्ष होतो तरी मला भांडारकरकडुन एक रुपयाही मिळालेला नाही. आपण संस्थेकडुन माहिती अधिकारात ही माहिती घेऊ शकता.


ज्यांना माझा चेहरा आवडत नाही अशा अतिडाव्या आणि अतिउजव्या दोघांनीही फक्त माझ्या एकट्याच्याच नावाने शंख केलेला आहे. उरलेल्या चार बहुजन विद्वानांच्या भांडारकर संस्थेसोबत काम करण्याबद्द्ल ( जे मलाही आदरणीय आहेत ) संपुर्ण मौन बाळगलेले आहे.


त्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्याबद्दलचा तीव्र आकस.


साळुंखेसर व  कसबेसरांनी वयाच्या सत्तरीनंतर बहुतेक सर्वच संस्थांवरून निवृत्ती स्विकारली. डॉ. सदानंद मोरे व मी आजही या संस्थेच्या नियामक मंडळावर काम करतो.


आम्हाला विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पात रस आहे. या संस्थेकडे अरबी, अवेस्ता, पाली, जैन महाराष्ट्री, संस्कृत व महाराष्ट्री प्राकृत या भाषांमधली ३० हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. एव्हढी मौलिक आणि प्राचीन हस्तलिखिते जगात दुसर्‍या कोणत्याही संस्थेकडे नाहीत. संस्थेच्या " महाभारत" व "हिंदु धर्माचा इतिहास" या खंडांना जागतिक मान्यता मिळालेली आहे.


ज्यांना धर्मशास्त्र, इतिहास, भाषा, संस्कृती यांच्या अभ्यासाचे मोल कळते ते या संस्थेबद्द्ल अतिशय आदराने बोलतात.


संभाजी महाराजांचा बुधभूषण हा ग्रंथ भांडारकरने सर्वप्रथम १९२६ मध्ये प्रकाशित केलेला आहे, हे माझ्या किती मित्रांना माहित आहे?

ज्यांच्या मनात भांडारकर संस्थेबद्दल काही वाजवी कारणांनी आक्षेप आहेत त्यांनी शांत डोक्याने संस्थेच्या प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील संशोधनपर कामांची माहिती घ्यावी व आपला गैरसमज दूर करावा असे मी नम्र आवाहन करतो... संस्थेत काम करणार्‍या काही व्यक्तींवर तुमचा राग असू शकतो. पण तिबेट, ब्रह्मदेश, भुतान, श्रीलंका, चीन, जपान अशा देशांमधून धर्मानंद कोसंबी, राहूल सांकृत्यायन यांनी प्रचंड मेहनतीने जमवलेल्या प्राचीन बौद्ध ग्रंथांवर राग ठेवू नका. माझ्या ज्या अल्पशिक्षित मित्रांना प्राचीन बौद्ध साहित्याच्या संशोधनातले फारसे कळत नाही त्यांना मी याबाबत दोष देणार नाही, त्यांचा राग मी समजू शकतो.


-प्रा. हरी नरके, ५/७/२०२०


टीप- जेम्स लेनने राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची भयंकर बदनामी केलेली असून मी त्या लेखनाचा व लेनचा तीव्र निषेध करतो.


संदर्भासाठी पाहा- १. "समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर", संपादक विजय सुरवाडे, लोकवाड्मय गृह, कॉ. भुपेश गुप्ता भवन, मुंबई, २००३, पृ. १२३/१२४

२. " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक", महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९०, पृ.४८/२६२/३३८

Saturday, June 27, 2020

हे घ्या अस्सल पुरावे- बाबासाहेबांनी चीन, कम्युनिझम आणि माऒ यांचे काढलेले वाभाडे - प्रा. हरी नरके


















माझा "बाबासाहेब आणि चीन" हा १४ एप्रिल २०२० चा लेख तुफान गाजल्याने आता अडीच महिन्यांनी या लेखामुळे अडचणीत आलेल्या काही डाव्या मित्रांनी " बाबासाहेब असे बोललेच नव्हते, हरी नरकेंनी बाबासाहेबांच्या तोंडी खोटी वाक्ये टाकली" असा धादांत खोटा प्रचार सुरू केलेला आहे.

विचारांचे विश्लेषण करताना त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मतभेद होऊ शकतात. पण मूळ कोटेशन्समध्ये बदल होऊ शकत नाही. मी गेली ४० वर्षे लेखन-संशेधनाच्या क्षेत्रात आहे. वैचारिक मतभेद असण्यात गैर काहीच नाही. पण बाबासाहेब असे म्हणालेच नव्हते असे सांगणे हा प्रकार अक्षम्य आहे. मुद्दा विश्वासार्हतेचा आहे.

खाली मी बाबासाहेबांच्या पुस्तकांमधले संबंधित उतारे दिलेले आहेत. हे मोजकेच आहेत. हा फक्त एक नमुना आहे. डाव्यांची जर इच्छाच असेल तर वर्षभर दररोज मी बाबासाहेबांच्या पुस्तकामधले "असे" उतारे टाकू शकेन.

मी बाबासाहेबांच्या चीन, कम्युनिझम, माऒ, पंचशील विषयक मताचा सारांश पुढीलप्रमाणे सांगितला होता.

साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट्र निती या विषयावर बोलत होते.

"बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे खंड १५ मधले काही उतारे आहेत तर काही खंड १८ भाग २ मधले आहेत.
"बाबासाहेबांना चीनबद्दल प्रेम होते" असा प्रचार हे फेसबुकवर करीत आहेत.

मी कम्युनिस्टांना शत्रू मानत नाही. वैचारिक मतभेद जरूर आहेत. वैचारिक टिकेचे मी स्वागत करतो, मात्र व्यक्तीगत बदनामी, टोकाची वैयक्तिक शेरेबाजी, चारित्र्यहनन कराल तर मग मला गप्प बसता येणार नाही.

निदान सध्याच्या भारतीय राजकीय वातावरणात तरी मला कम्युनिस्टांशी भांडण करायचे नव्हते, नाही. शहीद कॉ. गोविंद पानसरे हे माझे मार्गदर्शक होते. आज या चळवळीत असलेल्या इतर अनेक मान्यवरांना मी अतिशय मानतो. आमच्या छावण्या  भल्या वेगवेगळ्या असतील पण अनेक मुद्यांवर आम्ही सोबत होतो. राहू.   पण कोणी अर्धवट डावे जर माझ्यावर भांडण लादणारच असतील तर मग माझाही नाईलाज होईल... लक्षात ठेवा, " ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी." तुर्तास समजनेवालों कों इतना इशारा काफी हैं....

- प्रा. हरी नरके,
२७/६/२०२०

(संदर्भासाठी पाहा - १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड,१८ वा, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२, पृ. ५८३ ते ५८६ )