Showing posts with label मृत्युंजय. Show all posts
Showing posts with label मृत्युंजय. Show all posts

Friday, August 16, 2019

लोकप्रियता विरूद्ध जाणत्यांची मान्यता








राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायण हे जागतिक साहित्याचे जाणते समीक्षक होते. १९४३ साली त्यांनी केरळ विद्यापीठातून सुवर्णपदक जिंकलेले होते. इंग्रजी साहित्य हा मुख्य विषय घेऊन त्यांनी ही पदवी मिळवली होती. त्यांनी याच विषयात पुढे एम.ए.ही केले होते. भारतीय विदेश सेवेत [आय.एफ.एस.] त्यांनी उच्च पदांवर काम केलेले होते. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले नारायणनसर अतिशय नम्र आणि सौजन्यशील व्यक्तीमत्त्व होते.

आम्ही पुण्याचे काही साहित्यिक मित्र त्यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. पत्रकार-संपादक श्री अरूण खोरे हे आमच्या गटाचे नेते होते. त्यांची रितसर वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटलो. आम्हाला त्यांच्या कार्यालयाने भेटीसाठी अवघा ३ मिनिटांचा वेळ दिलेला होता. प्रत्यक्षात मात्र ही भेट ५३ मिनिटे चालली. त्यांना आमच्याशी मराठी साहित्यावर भरभरून बोलायचं होतं. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयवर ते फिदा झालेले होते. त्यावर ते कितीतरी वेळ बोलले. मृत्युंजय ही माझी अतिशय आवडती कादंबरी. मराठीतली सर्वोच्च लोकप्रियता मिळालेल्या या कलाकृतीला नुकताच ज्ञानपीठ समकक्ष असलेला मुर्तीदेवी पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने त्यांनी मृत्युंजय [इंग्रजी भाषांतर] वाचलेली होती.

या कादंबरीकडे मराठी समिक्षकांनी पाठ का फिरवली या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नव्हते. ही कादंबरी १९६० च्या दशकात का गाजली यावर आम्ही बोललो. महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला ही कादंबरी आवडलेले लोक भेटतील. पण जाणत्या समिक्षकांनी मात्र तिला नाकं मुरडली.

पुढे ते मराठी कवितेकडे वळले. ते म्हणाले, "बाबुराव बागूल हे माझे सर्वाधिक आवडते कवी आहेत. त्यांच्या अलिकडच्या कविता मला सांगा."

आमच्यातले एक साहित्यिक पटकन म्हणाले, "बागूल कवी नव्हेत. ते तर कथाकार आहेत."
तेव्हा नारायणनसर म्हणाले, " काय सांगताय? बाबुराव बागूल कवी नाहीत? मग ’वेदाआधी तू होतास’ ही कविता कोणाची आहे?"

"ती कविता बाबुराव बागूलांचीच आहे," मी उत्तरलो.

तेव्हा सर म्हणाले, " मग ते कवी नाहीत असे ह्यांनी का म्हटले?" त्यावर आमचा हा साहित्यिक मित्र निरूत्तर झाला.

नारायणन म्हणाले, "कवितांच्या संख्येवरून गुणवत्ता ठरत नाही. भले एकच कविता असेल पण ती जर श्रेष्ठ असेल तरी तो महान कवी आहे असे मी मानतो."


क्रमश:[१]

प्रा.हरी नरके, १६ ऑगष्ट २०१९