Showing posts with label प्रवास. Show all posts
Showing posts with label प्रवास. Show all posts

Sunday, July 29, 2018

भुतान आनंदी राष्ट्र कसे बनले?



भुतान, हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांतसुंदर देश आहे. शून्य प्रदुषण. देशभर कमालीची स्वच्छता, शांतता, सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे.

मानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स अशा दोन प्रकारे जगातील देशांचे मोजमाप केले जाते. आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान भारताच्या कितीतरी पुढे आहे. आपल्याकडे लोकशाही आहे तर तिकडे आजही राजेशाही आहे. समाज प्रामुख्याने स्त्रीप्रधान, मातृप्रधान आहे.

खरं तर भुतान आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. तरीही तिथला माणूस भारतापेक्षा खूप जास्त आनंदी आहे. सुखी आहे.

का ? कसं जमलं त्यांना हे?
भुतानमध्ये सर्व प्रकारचे केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत आहे.
भुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे.
भुतानमध्ये शीलाचे पालन मुख्य मानले जाते त्यामुळे चोर्‍या होत नाहीत.
समाज प्रसन्नचित्त आहे.

हिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेला.
थिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर.

शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऎकू येत नाही. ट्रॅफिक सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोक गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही.

तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तिथल्या प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध राहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे.

भुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसल्या नाहीत. कारण प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत, त्यांच्या देशातील इतरांनाही जाऊ नका म्हणून सांगतील. तेव्हा चोर्‍या करायच्या नाहीत. असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत.

हॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारशे नाहीत. प्रत्येक माणूस मेहनती आहे.
चोर्‍या बंद. शील जपा. गरजा कमी. सुख ज्यादा.

भारतीय माणसांना त्यांच्या नोटा बदलून घ्यायची गरज नाही. आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही. असेल तर ठीक. नाहीतर निवडणुक ओळखपत्रांवर भारतीयांना प्रवेश दिला जातो. खर्च अगदी माफक येतो. आपल्या पुण्या-मुंबईच्या तुलनेत बरीचशी स्वस्ताई आहे.

भारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान प्रामुख्याने बौद्ध देश आहे. तो आपला सर्वात जुना, विश्वासू आणि कायम मित्र देश आहे.

इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा असल्याचे मला तरी आढळलेले नाही.

यातनं भारतानं घ्यायचा धडा हा आहे की भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद करा. शील जपा.

माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि
कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार?

हे प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.

भारतानं भुतानकडून हे शिकायला हवं.

- प्रा. हरी नरके

Thursday, November 9, 2017

आईेनं आयुष्यभराची पुंजी चळवळीला देऊन टाकली -





माझे वडील मी खूप लहान असताना गेले. पुढचं आमचं सगळं आईनंच केलं.
आई आम्हा चिल्यापिल्यांसाठी रात्रंदिवस राबायची. मोलमजुरी करायची, ती निरक्षर होती.
कष्टाला वाघीण, तापट स्वभावाची, व्यसनांबद्दल कमालीची चिड असणारी.
एकदा मोठ्या भावानं मित्रांच्या संगतीत दोन घोट घेतले.
आईला कळल्यावर ती इतकी संतापली की तिनं सलग दहा दिवस अन्नसत्त्याग्रह केला.
परिणामी आम्हा भावंडांना आयुष्यात कसलंही व्यसन जडलं नाही.
त्या दिवसांची आठवण म्हणून पुढं दरवर्षी ती दहा दिवस उपास करायची.
निळूभाऊ फुले खलनायकाची कामं करतात म्हणून त्यांच्यावर तिचा फार राग होता. ते पहिल्यांदा आमच्या घरी आले तेव्हा ती त्यांच्यावर फार भडकली होती. त्यांना चिडून बोलली होती.
एकदा स्वत: भाऊंनीच तिला शुटींग पाहायला नेलं नी ते कसं खोटं असतं, नाटक असतं याची तिची खात्री पटवली. मग ती भाऊंची फॅन झाली.
हातपाय धट्टेकट्टे असताना आपल्याला मृत्यू यावा अशी तिची प्रबळ इच्छा होती आणि ती वयाच्या 85 व्या वर्षी गेली तीही चालताबोलतानाच.
तिला जाऊन 12 वर्षे झाली.

जाताना ती तिची शेवटची इच्छा सांगून गेली, मोलकरणीचं काम करून, मोलमजुरी करून तिनं आयुष्यभरात काही छोटेछोटे दागिने केले होते, ते मोडा, नी महाराष्ट्रातल्या 10 सामाजिक नी शैक्षणिक संस्थाना ती रक्कम भेट द्या. निळूभाऊंच्या हस्ते हा कार्यक्रम करावा अशी तिची  इच्छा होती.
निळूभाऊ त्यासाठी आमच्या गावी तळेगाव ढमढेरेला आले.
हजारो लोकांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम झाला.
आम्ही भावंडांनी तिच्या नावानं गावात एक व्याख्यानमाला सुरू केलीय. आजवर अनेक नामवंत त्या व्याख्यानमालेला आवर्जून आलेत.
त्याच कार्यालयात परवा [सोमवार, दि.13 रोजी,] या सोनाई व्याख्यानमालेत लेखक, समीक्षक नी विचारवंत संजय भास्कर जोशींचं व्याख्यान होईल.
ती गेली तेव्हा मी नेहमीप्रमाणे एका सामाजिक कार्यक्रमाला विदर्भात गेलोतो.
कळल्यावर आलो तोवर अंत्यसंस्कार झालेले होते. येताना रस्त्यात सतत डोळे भरून यायचे.
माझे अतिशय आवडते लेखक चारूता सागर यांची वाट ही कथा मला अतिशय भावलेली.
आजारी आईच्या शेवटच्या भेटीला निघालेल्या लेकीची परवड चित्रित करणारी. चटका लावणारी. डोळ्यातून पाणी काढणारी.
ते पुस्तक एका मित्रानं माझ्याकडून वाचायला नेलं नी हरवलं. त्या कथासंग्रहाचं नावच काही केल्या मला आठवत नव्हतं. जणू मेमरी इरेझ झालेली.
आईच्या अंत्यविधीला निघालो असताना प्रवासात ती कथा मला आठवली आणि अनेक वर्षे विस्मृतीत गेलेलं कथासंग्रहाचं नाव अचानक आठवलं. "नागीण"
माझा मित्र भीमराव गोपनारायण याची "सर्वा" या कवितासंग्रहातली एक दोनोळी माझ्या आईचीच भावना सांगते जणू.
"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते चार भिंतींचं घर मी एकटी चालवते."
- प्रा.हरी नरके

Friday, October 13, 2017

दिवाळी-


दिवाळीत भाताचं पिक भरात आलेलं असायचं. पाखरं तुटुन पडायची साळीवर. मालक फार खडूस होते. थोडा जरी उशीर झाला तरी दिवसाचा पगार कापायचे. त्यामुळं आई पहाटे लवकरच उठून उजाडायच्या आत राखणीला जायची. आम्ही भावंडं सकाळी उठलो की तिथं शेतावर जायचो. मोठा भाऊ पाखरं हाकलायचा गोफणीनं. आई बांधावर तीन दगडांची चूल मांडून पाणी तापवायची. दिवाळी म्हणजे मजा. अगदी चैन. आई स्वत: वर्षातले ते चारपाच दिवस आम्हाला शेताच्या बांधावर लाईफबॉय साबण लावून आंघोळ घालायची. घरात वर्षातून एकदाच लाईफबॉय साबण यायचा तो दिवाळीत.एरवी वर्षभर नदीत नाहीतर विहीरीवर आपली आपण आंघोळ करायची. साबण ना कपड्याला असायचा ना आंघोळीला. कपडे फारच मळले तर रिठ्यानं धुवायचे. शेताच्या बांधावर रिठ्याची झाडं असायची.
कथा कादंबर्‍यांत वाचायचो दिवाळीत उटणं, सुगंधी तेलं, मोती साबण असलं बरंच कायकाय भारी असायचं म्हणे लोकांकडे. फराळ हा शब्दही फक्त पुस्तकात वाचलेला. आमच्याकडं दिवाळी म्हणजे दोनचार दिवस चहासोबत शंकरपाळी. वर्षभर बिन दुधाचा कोरा चहा असायचा गुळाचा. दिवाळीत मात्र दुधाचा चहा मिळायचा. दोनचार वर्षातून कधीतरी आई करंज्याही करायची दिवाळीला. मोतीचुराचे लाडू मात्र आठ दहा वर्षात एकदाच केलेले आठवतात. लाडू चिवडा वगैरे लाड आपल्या गरिबाकरता नसतात असं आई सांगायची. ती सगळी पैसेवाल्यांची  थेरं असं ती म्हणायची. मी ज्या कबरस्थानात काम करायचो तिथं जर दिवाळीत अचानक एखादं प्रेत आलं तर मात्र खड्डा खोदायच्या मजुरीचे दोनतीन रूपये मिळायचे. मग आई त्याचा रवा विकत आणायची आणि रव्याचे लाडू करायची.
तुळशीचं लग्न झालं की संपली दिवाळी. मी खुप लहान असताना तुळशीच्या लग्नाच्या दिवशीच माझे वडील गेले. त्याआधी बरेच महिने ते आजारी होते. पण खाजगी दवाखाण्यात नेण्याजोगी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि ससूणला नेलं की तिथले डॉक्टर औषधाचा डोस देऊन मारून टाकतात अशी आईला कुणीतरी भिती घातलेली होती. त्यामुळं औषधपाण्याविनाच ते गेले.
आमच्या झोपडपट्टीतल्या पत्र्याच्या खोलीत हातानं बनवलेला आकाशकंदील मात्र दरवर्षी नवा असायचा. तो बनवण्यात दोनतीन आठवडे सहज जायचे. रंगीत कागद विकत आणून बनवलेले ते आकाशकंदील वर्षवर्ष जपून ठेवायचो. त्यात संध्याकाळी पणती लावली की इतकं भारी दिसायचं. मातीचा किल्ला आणि त्यावरचे शिपाईसुद्धा हातानं बनवायचो. किल्ले फार जोरदार बनवायचो. एकदम हुबेहुब.
अंगणात 5 पणत्या लावल्या की रोषणाईच रोषणाई.

कधी गावी गेलो की माझी चुलती म्हणायची, चल रे हरी चहाला घरी. साखरेचा करते बाबा चहा तुला.
आमची शहरात खुप मजा असते असंही ती चुलतभावांना सांगायची. आरं, यांना काय बाबा, रोज रोज वराणभात मिळतो. महिन्या दोनमहिन्याला तेलच्याबी असत्यात. यांची लईच मज्या अस्तेय बाबा शेरात. मी म्हणायचो, नाही काकू. आमच्याकडं पण मिलो अस्तोय. हुलग्याच्या घुगर्‍या, शेंगोळी आणि हुलग्याच्याच भाकरी असतात. माडगंही असतंय. सकाळ,दुपार, संध्याकाळ तिन्हीत्रिकाळ हुलगे! ती म्हणायची, हे बघ, 2 वेळचं पोटाला मिळतंय ना? मंग बास झालं.

फटाके मला कधीच आवडले नाहीत. 2 वेळचं खायला मिळतंय हीच सगळ्यात मोठी चैन होती.
फटाके उडवणं म्हणजे पैशांचा धूर करणं. एक राजा नोटा जाळून त्यावर चहा करायचा म्हणे. फटाके वाजवणं हा मला तसलाच वेडपटपणा वाटायचा.
आयुष्यात एकदाही मला फटाका वाजवावासा वाटला नाही. कधी मित्रांनी आग्रह केला तरी मी फटाक्यांना हातही लावत नाही. उलट तो घाणेरडा आवाज ऎकला की माझं डोकं उठतं. होय, मला फटाक्यांचा तिरस्कार वाटतो. फटाक्यांच्या कारखान्यात लहानचिटुकली मुलं काम करतात. मध्यंतरी कारखाण्याला आग लागून शंभरेक बालकामगार मुलं जळून मेली. तरी लोकांना फटाके हवेतच.
फटाक्यांच्या त्या आवाजामुळं दिवाळीला आजकाल शहरात राहावसंच वाटत नाही. दूर कुठंतरी जंगलात किंवा खेड्यापाड्यात निघून जावं. एकाही दिवाळीला पुण्यात थांबायचं नाही असा मी नियमच केलेला.
पण आजकाल खेड्यातसुद्धा फटाक्यांची ती घाण पोचलीय.

मला अलिकडं दिवाळी हा सणच वाटत नाही.
ते एक भयंकर संकट वाटतं. त्या आवाजानं डोकं सटकतं.
काही लोक दागिने मोडून खातात तसे काही लोक गरीबी मोडून खातात.
त्यामुळेच मला लहाणपणचे हे अनुभव लिहावेसे वाटत नाहीत.
-प्रा. हरी नरके 

Friday, September 29, 2017

त्याला कसं समजावून सांगावं आम्हाला कळतच नव्हतं-

आमच्या जवळची औषधं संपली म्हणून एका दुकानात चौकशी केली. एक फाटक्या कपड्यातली अल्पशिक्षित गरीब म्हातारीबाई ते दुकान चालवित होती. तिनं औषधं काढून दिली. त्या सगळ्यांची Expiry Date 2015 मध्येच संपलेली होती. तिला विचारलं, कधी आणलीस ही औषधं?
ती म्हणाली, गेल्याच आठवड्यात औषध कंपनीचा माणूस येऊन देऊन गेला.
तिच्याकडं बिस्कीटं मागितली तर त्यावरचीही Expiry Date एक वर्षापुर्वीची होती.
आपण शिकले-सवरलेले, चतुर शहरी लोक असं सारं Expiry Date संपलेलं जर या मागास प्रदेशातल्या सीमा भागातल्या गरिबांना पुरवत असू तर आग लागो त्या शिक्षणाला!

इकडचे लोक हिल एरिया [पर्वतीय-डोंगराळ प्रदेश] आणि प्लेन एरिया [सपाट प्रदेश] असं वर्णन करतात. उदा. मनीपूरची राजधानी इम्फाळ आणि त्रिपुराची राजधानी आगरताळा ह्या प्लेन एरियात असल्यानं एसपैस पसरलेल्या आहेत. रस्ते मोठे आहेत. उंच इमारती आहेत.
मात्र नागालॅंडची राजधानी कोहिमा आणि मिझोरामची राजधानी ऎजावल ह्या हिल एरियात असल्यानं रस्ते अतिशय अरूंद, त्यामुळे सतत ट्राफिक जाम.
या प्रदेशातली सरकारं भाजपाची असोत की काँग्रेसची रस्त्यांची पार वाट लागलेली. मात्र कम्युनिस्ट असलेल्या माणिक सरकारांनी त्रिपुरातील रस्ते अतिशय उत्तम जपलेले आहेत. हा फरक तीव्रपणे जाणवतो.
आणखी एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे अनेक राज्यात सायकल रिक्षा आहेत. सायकल चालवणारांची पोटं पार खपाटीला गेलेली असतात. हाडांचा सापळा दिसत असतो. अशा रिक्षात बसावं तर त्या सायकलवाल्याच्या कष्टांनी हृदय पिळवटून जातं. न बसावं तर त्याला रोजगार कसा मिळायचा? सर्व राज्यांमध्ये आता आपल्या बजाज रिक्षा आलेल्या आहेत. सायकल रिक्शांचा धंदा बसलाय. त्रिपुरा सरकारनं मात्र एक भली गोष्ट केलीय. सायकल रिक्षांना बॅटर्‍या बसवून त्यांचंच रूपांतर यांत्रिक सायकल रिक्षात केलंय. देशातील सर्वात साध्या राहणार्‍या आणि संपत्तीनं सर्वात गरीब असलेल्या मुख्यमंत्री कॉमरेड माणिक सरकार यांना त्यासाठी लाखलाख धन्यवाद.
तीन राज्यं ख्रिश्चन बहुल, दोन राज्यं हिंदु बहुल, एकात मोठ्या संख्येनं मुस्लीम तर दुसर्‍यात बौद्ध अशी सर्वधर्मिय प्रजा.
सिल्चर आगरताळा रस्त्यावर त्रिपुरात "हॉटेल धाबा" असं लिहिलेलं एक टपरीवजा रेस्टॉरंट दिसलं. आजवरच्या प्रवासात सापडलेलं हे एकमेव शाकाहारी हॉटेल. त्यानं उत्तम जेवन दिलं. रात्री 12 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतं असं तो म्हणाला. राज्यात सर्वत्र शांतता असल्यानं हॉटेलं, दुकानं उशीरापर्यंत चालू ठेवता येतात असंही त्यानं सांगितलं. पुढं तो अगदी सहजपणानं म्हणाला,  "इधर सब हिंदु हैं ना इसलिए कोयी गरबड नहीं हैं." तो हे आमच्या अतिशय सज्जन आणि कर्तव्यदक्ष ड्रायव्हरला सांगत होता. त्याला काय माहित हा गुणी छोकरा मुस्लीम आहे म्हणून!
आपल्याकडे गणपतीच्या वर्गणीसाठी जशी दादागिरी चालते तशा बेकार युवकांच्या झुंडीच्या झुंडी दुर्गापुजेच्या वर्गणीसाठी रस्ते अडवून उभ्या असायच्या. विशेषत: हिंदुबहुल आसाम, त्रिपुरात ही लूट सर्रास चालू होती. प्रत्येक गावाच्या बाहेर अशी ही रोजगारहमी योजना राजरोस चालू असायची. अत्यंत अरेरावीनं ते वर्गणीच्या नावावर खंडण्या वसूल करायचे. वर दमही द्यायचे. या अर्थानं सगळा भारत एकच आहे. हीच तेव्हढी राष्ट्रीय एकात्मता.
आसामात रस्त्यात कायस्थग्राम नावाचं रेल्वे स्टेशन लागलं. तिथल्या हायवे रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे आली तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला चक्क साखळ्या अडकवून रस्ता बंद केलेला. चौकशी केली तर दोन्ही फाटकं गेल्या दोन वर्षांपासून बिघडल्यानं बंद असल्याचं रेल्वे कामगारानं सांगितलं. तक्रार करून थकलो पण वरिष्ठ अधिकारी काहीच दखल घेत नाहीत असंही तो म्हणाला.
आसाम, मनीपूर, नागालॅंड, मिझोराम मधले रस्ते एव्हढे खराब का? असा प्रश्न मी तिथल्या अनेक स्थानिक लोकांना विचारला. आश्चर्यकारकरित्या सर्वांनी एकच उत्तर दिलं. इथले राजकारणी चोर आहेत. रस्त्यांचे पैसे दर 6/8 महिन्याला उचलतात.100% पैसे खातात पण रस्ता दुरूस्ती करीत नाहीत. शेकडो किलोमीटर अंतरवरच्या सर्वांचंच उत्तर एकच कसं? यालाही राष्ट्रीय एकात्मताच म्हणायची का?
इथल्या सगळ्याच राज्यात पावलापावलावर एकाच महापुरूषाच्या प्रचंड बड्याबड्या फोटोंचे प्रचंड मोठेमोठे फ्लेक्स लागलेले दिसतात. ग्रामीण महिलांना गॅस दिला, शौचालयं बनवून सन्मान दिला, याव नी तॅव.
प्रत्यक्षात सगळीकडेच चुली दिसतात. गो एनीव्हेयर ऑल वावर इज आवर असा मामला असतो. गॅस नी शौचालयांचा कुठेच पत्ता नसतो.
मिझोरामला जाताना दुपारी जेवायला एक हॉटेल बरं आहे असं संभाजीदादाला वाटलं. पण तोवर आमची गाडी बरीच पुढं आलेली होती. आता परत कुठं मागं जाता? बघू पुढंच एखादं असा विचार करून आम्ही पुढं निघालो. तर नॅशनल हायवेचा पार चुथडा झालेला. आख्खा ट्रक बुडेल असे ऎतिहासिक खड्डे पडलेले. आम्हाला गाडीतनं खाली उतरवून कडंकडंनं, रस्त्याच्या कोपर्‍यातनं सर्कस करीत ड्रायव्हरनं कशीबशी गाडी पुढे काढली तर पुढचा सगळाच रस्ता दरीत कोसळून नष्ट झालेला. आता काय करावं? ना पुढं ना मागं जाता येणार.
इतक्यात मागनं येणार्‍या गाडीवाल्यानं आम्हाला सांगितलं, मी इकडंच राहतो, एक महिन्यापुर्वी पुढचा सगळाच नॅशनल हायवे वाहून गेलाय. पायवाटही शिल्लक नाही. परत मागे फिरा. दुसर्‍या नॅशनल हायवेनं ऎजावलला जा.
परत फिरताना आमची गाडी अडकून पडली. स्थानिकांच्या मदतीनं आमची गाडी कशीबशी काढता आली.
परत बरंच मागं यावं लागलं. तर संभाजीदादाचं ते लाडकं हॉटेल दिसलं. या शाहीर माणसाची इच्छाशक्ती किती प्रबळ असावी? गेलो त्या हॉटेलात. हॉटेलच्या पुढे नॅशनल हायवे आणि मागे हजारो फूट खोल दरी. हॉटेलला मागून बांबूचे टेकू लावलेले. अफलातून निसर्ग. आपण दरीत तरंगतोय अशी अवस्था. इतकं सुंदर हॉटेल बघूनच अर्धी भूक निवली.
हॉटेलवाला म्हणाला व्हेजमध्ये फक्त भात मिळेल. अंडी होती पण त्याला ऑमलेट करता येत नव्हतं. मग काय संभाजीदादानं किचनचा ताबा घेतला. हवी तशी ऑमलेटं बनवली. कोरड्या भाताबरोबर ऑमलेटं झिंदाबाद. संभाजीला सर्वप्रकारचं नॉनव्हेज अतिप्रिय. त्यामुळं मासे, चिकन, बीफ,पोर्क अशी त्याची चंगळच चंगळ होती.
आम्ही भातवाल्यांनी विचारलं, दाल हैं क्या? हॉटेलवाला म्हणाला हैं. आम्ही खुष.
बघतो तर पठ्ठ्यानं आमच्या पुढ्यात दारू आणून ठेवलेली. हे कायय? असं विचारलं तर म्हणाला, दारू चाहियें ना? बोंबला च्यायला, आम्ही दाल म्हणतोय नी हा दारू आणून देतोय.
आमची जेवनं झाल्यावर किती पैसे झाले असं विचारलं, तर म्हणाला, द्या तुम्हाला काय द्यायचे असतील ते! म्हटलं असं कसं? तुझे दर सांग ना? तो म्हणाला, तुम्ही भली माणसं दिसताय. मी बघितलंच नाही तुम्ही कायकाय घेतलं ते! द्या समजून उमजून. आम्ही त्याला एकेका पदार्थाचे पैसे विचारत गेलो, हिशोब केला. झालेले पैसे दिले तर तो म्हणाला, हे फार जास्त आहेत. एव्ह्ढं तुम्ही खाल्लंच नाहीये. मी जास्त पैसे घेत नसतो.
आम्ही सारे प्राध्यापक, शिक्षकवर्गीय प्राणी असतानाही आता त्याला कसं समजावून सांगावं आम्हाला कळतच नव्हतं.
- प्रा.हरी नरके

Thursday, September 28, 2017

ग्रीनलॅंड- नेत्रसुखाचा सोहळा!




नॅशनल हायवे हा पायवाटेएव्हढाच कसा असतो हे अनुभवायचं असेल तर सिल्चर [आसाम] ते [एजवल] मिझोराम हा प्रवास करायला हवा. दोन नॅशनल हायवे आहेत. एक संपुर्ण उखडलेला किंवा नाहीसा झालेला आणि दुसरा पायवाटेएव्हढाच.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो फूट खोल हिरव्याकंच दर्‍या. बांबूची खाली टेकू लावलेली छोटीछोटी घरं. स्वच्छ आणि टुमटुमीत गावं.
निसर्गाच्या सहवासानं माणसं प्रेमळ आणि विनयी बनलेली असणार. हजारो लोक पाहिले. अनेकांशी बोललो. अतिशय नम्र आणि जिव्हाळ्यानं बोलणारे. मुली, महिला आधुनिक ड्रेस घातलेल्या. लिपस्टीक लावलेल्या. सगळ्याजणींनी केस मोकळे सोडलेले. शाळांमध्ये जाणारी गणवेशातील गोड बच्चेकंपनी. सगळीकडं झकास कॉन्वेंट शाळा. नागालॅंड, मिझोराम, मेघालय ही ख्रिश्चनबहुल राज्यं. आदीवासींची असूनही सर्वाधिक साक्षरता असलेली राज्यं. देशातल्या अन्य आदीवासी बांधवांमध्ये शिक्षणाचे प्रमाण सर्वात कमी असते. मिशनर्‍यांमुळे हे प्रदेश शिकू शकले. विविध प्रवाहांमधली चर्चेस सगळीकडे. तरूण मुलंमुली मात्र चर्चला जायला नाखुश असतात.
बायका अत्यंत बोल्ड आणि डेरिंगबाज. पुरूष काहीसे लाजरेबुजरे, घुमे आणि आत्ममग्न. चिमुकल्या नागालॅंड राज्यात सोळा भाषा बोलणारे आदीवासी राहतात. कोहिमा आकाशवाणी केंद्रावरून दररोज 14 स्थानिक भाषांमधून बातम्या दिल्या जातात.
यातल्या अनेक टोळ्या स्त्रीप्रधान. मातृसत्ताक. दुसर्‍या टोळीतल्या पुरूषांची मुंडकी कापून आणणार्‍या पुरूषांशी सुंदर स्त्रिया लग्न करीत. हेडहंटींगची ही प्रथा आता कायद्यानं बंद करण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणी त्याचा गौरवपुर्ण उल्लेख केलेला आढळतो. अगदी भारतीय सैन्याच्या मुख्यालयांवरही.
आज मात्र अपवादालाही अरेरावी करणारा, भांडकुदळ, दरडावणारा माणूस इकडे सापडत नाही. अतिरेकी संघटना मात्र हाताचा मळ झटकावा इतक्या सहजपणानं हत्त्यासत्रं घडवतात. अजब रसायन. गजब दुनिया.
प्रत्येक बाई, अगदी लहान मुलीही पानं खातातच. रुपयाला एक पान. रंगानं सारे गव्हाळ, किंचित सावळे किंवा लख्ख गोरे. मात्र मोजून सारे बुटके. पोट सुटलेला, धिप्पाड,गोल गरगरीत असा एकही स्त्री-पुरूष माणूस बघायला मिळाला नाही.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी नाही. खाजगी बारक्या गाड्यांमधून वाहतूक चालते. शेकडो किलोमीटर गेलं तरी पेट्रोलपंप दिसत नाहीत. सगळीकडं बाटल्यांमधून पेट्रोल,डिझेल विक्री चालू असते. खेडेगावं, तालुका, जिल्ह्यांची प्रमुख ठिकाणं सोडा, अनेक राज्यांच्या राजधान्यांना जोडणारी साधी रेल्वेही आम्ही त्यांना देऊ शकलेलो नाहीयोत. मी त्यांना म्हणलो, नसेना रेल्वे पण लेको बुलेट ट्रेनचा महोत्सव करायला काय हरकताय? ते आता थेट बुलेट फेस्टीव्हलच करतील!
शक्यतो कोरा चहा किंवा पावडरचे दूध.
भाकरी, रोटी, पराठा दुर्मिळ. भातच भात चोहीकडे.
भात भारतात सर्वत्र मिळतो. खर्‍या अर्थानं राष्ट्रीय अन्न.
सलग 100 कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर लांबीच्या डोंगरदर्‍या. वनराई. घनगर्द झाडी. उंचच उंच घनदाट वृक्षराजी. जैवविविधतेनं संपन्न, श्रीमंत प्रदेश.
या सातही राज्यांचं वर्णन करायचं तर एकाच शब्दात करता येईल "ग्रीनलॅंड." अमाप नेत्रसुखाचा नितांत सोहळा!
- प्रा.हरी नरके

Wednesday, September 27, 2017

आहसर म्हणजे अविरत उर्जास्रोत --




आजचे आघाडीचे प्रबोधनकार, महापंडीत डॉ. आ. ह. साळुंखेसर यांच्यासमवेत ईशान्य भारत दौरा करताना लक्षात आले की सरांची एक अफलातून सवय आहे. ते देशाच्या ज्या प्रांतात जातात तिथली माती सोबत घेतात. त्यांनी आपल्या घराच्या बागेत ही माती टाकलेली असून आजवर त्यांच्या बागेत 29 राज्ये आणि 7 केंद्रशाषित प्रदेशातील माती जमवलेली आहे. भारताचे प्रत्येक राज्य आणि सर्व केंद्रशाषित प्रदेश सरांनी पाहिलेले आहेत. देशातले एकही स्थळ असे नाही की जे सरांनी पाहिलेले नाही.
सर अतिशय हळवे, आर्जवी, विनयी आणि प्रकांडपंडीत आहेत. ते जिथे जातात तिथल्या सामान्य माणसांमध्ये रमतात. त्यांच्याशी अगत्यपुर्वक संवाद साधतात. निसर्गाचा आत्यंतिक
उत्कटतेनं आस्वाद घेतात. ते पानाफुलात हरवून जातात. अनेक ज्ञानी माणसं इगोईष्ट असतात. आपला मोठापणा सोबत्यांना जतवत असतात. सरांचं नेमकं उलटं आहे. अतिशय संवेदनशील आणि सतत आधी दुसर्‍यांचा विचार करणारे मन सरांनी जपलेले आहे. सर कवीमनाचे आहेत. काव्य आणि विद्वत्ता यांचा अनोखा संगम म्हणजे सर.
त्यांच्यासोबतचा प्रवास म्हणजे अफाट ज्ञानार्जन, ज्ञाननिर्मिती आणि निर्मितीशील आनंदाचा अनुभव.
आज वयाच्या पंच्याहत्तरीतही सरांचा उत्साह सोबतच्या तरूणांना लाजवेल असा असतो. पहाटे सर्वात आधी उठणार. 2 कप चहा घेतला की 15 ते 20 मिनिटांत सर तयार होतात. ठरलेल्या वेळी ते सर्वात आधी आणि मिनिटभरही उशीर न करता गाडीत येऊन बसणार. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सकाळी/पहाटे ठरलेल्या वेळी सर तयार असणारच.
शेकडो किलोमीटर प्रवासातही ते थकत नाहीत.
सतत नवनवी भौगोलिक माहिती आणि स्थानिक संदर्भ यांचा आपल्या सोबत्यांना सर पुरवठा करीत असतात. कोणालाही दुखवायचे नाही मात्र आपला मुद्दा आर्जवीपणे लावून धरायची त्यांची हातोटी.
सहकार्‍यांच्या चुकांबद्दल कधीही चिडचिड नाही की कूरकूर नाही. स्वत:च्या तब्बेतीचं रडगाणं ते कधीही ऎकवणार नाहीत.
एक अविरत उर्जास्रोत म्हणजे आहसर.
स्वत:च्याच भाग्याचा मला हेवा वाटतो की सरांसोबत अनेक दौरे करता आले. खूपखूप शिकता आलं. धमाल जगता आलं. अनेक अनमोल क्षण चिमटीत पकडता आले.
आहसर, आम्ही कृतज्ञ आहोत!
- प्रा.हरी नरके

भात खाबो-






J1 झालं का? हा अनेक प्रतिभावंत फेबुकरांचा लाडका प्रश्न असतो.
ईशान्य भारतातील अनेक राज्यात त्यांच्या भाषेत "जेवन आहे का? जेवन काय आहे? जेवन झालं का?" असं विचारायचं असलं तर म्हणतात भात खाबो. भन्नाटच कल्पना. महत्वाचच विषय. जे मांसाहारी असतील त्यांची तिकडे चंगळ असते. तिन्ही वेळेला मंडळी मांसाहारावर ताव मारतात. माश्यांचे नानाप्रकार, पोर्क, बीफ, कोंबडी, बदक, बेडूक, कुत्रा, साप ही तुफान आवडीची पक्वान्नं असतात. अंड्यांचे शेकडो पदार्थ.  उर्वरित देशभर उच्छाद मांडलेल्या तथाकथित गोरक्षकांचं नामोनिशानही या सात राज्यांमध्ये आढळत नाही. मांसाहाराला विरोध करणारांना ही मंडळी थेटच सरळ ताटात शिजवून खाऊन टाकतील. शाकाहार्‍यांना मात्र एकमेव मेनू. भात आणि फक्त भात. रानातली कोणतीही वनस्पती ओरबाडून आणतात आणि चिमुटभर मीठ टाकून उकळुन देतात. बांबू शूट्स म्हणजे बांबूच्या आतला गर अतिशय चविष्ट लागतो. भोपळ्यासारखं चिवचिवटं म्हणजे इस्कोट डोंगर उतारावर लावलेलं दिसतं. सर्वत्र मिळतं. खिरा [काकडी] मुबलक असते.
तिथली मिरची मात्र कोल्हापुरी मिरचीच्या सुमारे एक हजारपट तिखटजाळ असते. त्यामुळे तिथला ठेचा हा केवळ पदार्थ न राहता ती समोरच्याला हमखास रडवणारी प्रवृत्ती बनते.
सोनकेळी आणि पेरू मुबलक.
भाताची हजारो एकर शेती. जिकडं बघावं तिकडं भातशेती.
आपल्याकडं खेड्यात घरोघरी कोंबड्या पाळलेल्या असतात तशी तिथं घरटी डुकरं पाळलेली असतात. रस्त्यांवर भटकी कुत्री नावालाही आढळत नाहीत. कारण त्यांचं मांस हे सगळ्यात महाग असतं.
अमाप गरिबी आणि उद्योगधंदे शून्य त्यामुळं क्रयशक्ती नाही. किरकोळ टपरीवजा रेस्टॉरंटं, हॉटेलं, फारच कमी.
नागालॅंडमध्ये बोलली जाणारी नागा भाषा शांतपणे ऎकली तर मराठीच्या जवळ जाणारी ती भाषा असल्यानं नक्की समजते.
निसर्गाचं मुबलक वरदान पण अशांत प्रदेश, असुरक्षित प्रवास, आदिवासी जमाती व टोळ्यांमधली रक्तरंजित भांडणं आणि सरकार नावालाच यामुळं ही सुवर्णभुमी शापित आहे.
काश्मीरला स्वर्ग म्हणत असतीलही पण भारताच्या श्रीमंत निसर्गाची सर्वाधिक लोभस रूपं बघायची, अनुभवायची असतील तर एकदा तरी या सप्तभगिनींना भेट द्यायलाच हवी.
आसामातले चहामळे, सगळीकडची भातशेती आणि लाखो प्रकारची जैवविविधता तोडच नाही. इथं आलात की रमून जाल. स्वर्गाचा, जन्नतीचा विषयच संपला.
- प्रा.हरी नरके

ईशान्य भारतात फिरताना-




इम्फाळहून नागालॅंडची राजधानी कोहिमाला जात असताना एका खेड्यात चहाला थांबलो होतो. धोधो पाऊस पडत होता. चुलीवरचा मस्त स्पेशल चहा अवघ्या पाच रूपयाला मिळाला.
इम्फाळच्या क्लासिक हॉटेलात मचूळ चहा 59 रुपयांना मिळाला होता. [चहा 50 रुपयांचा आणि जीएसटी 9 रुपये] चुलीवरच्या चहाची चव काही औरच होती.
शेजारच्या टपरीवर रासायनिक खते न वापरता पिकवलेला लसूण विकायला ठेवलेला होता. 100 रुपये किलो. आ.ह. साळुंखेसरांनी एक कांडी घेतली. त्याचे किती पैसे द्यायचे असे विक्रेत्याला विचारले.
तो म्हणाला, "एकाचे कुठे पैसे घेत असतात काय? अहो, आमची आठवण म्हणून आणखी एक कांडी ठेवा." असं म्हणत त्यानं दुसरी कांडी सरांच्या हातात दिली. त्यानं पैसे घ्यावेत म्हणून सरांनी खूप आग्रह केला पण त्यानं पैसे घेतले नाहीत. पुढं कोहिमाच्या बाजारात आम्ही एक किलो लसूण घेतला. पण तो लसूण नसून बारका पांढरा चिंगळी कांदा असल्याचं भाषेच्या अडचणीमुळे कळलंच नाही.

मिझोरामची राजधानी ऎजवालच्या फ्लोरिया ग्लॅमर हॉटेलमधला बेचव चहा 71 रुपयांना मिळाला. [ चहाचे रुपये साठ आणि जीएसटीचे अकरा रूपये ]
आगरताळाला जाताना संध्याकाळी एका चहाच्या टपरीवर थांबलो. बाईंनी झकास ताजा स्पेशल चहा बनवून दिला. पाच रूपयाला ग्लासभरून कडक चहा.
संभाजी भगतांना तिकडची सोनकेळी आवडली म्हणुन त्यांनी खायला घेतली. चहाचे पैसे देताना केळीचेही पैसे घ्या असा आग्रह केल्यावर बाई म्हणाल्या, " एका फळाचे पैसे घेणं मला पटत नाही."

रस्त्यांवर गस्त घालणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान सतत भेटत. चौकशी केली की एखादा तरी मराठी जवान भेटायचाच. आम्हाला भेटून त्याला इतका आनंद व्हायचा की भान हरपून तो जवान आमच्याशी किती बोलू नी किती नको असं करायचा. मराठी बोलायला आणि ऎकायला कान आणि जीभ आतुर असल्याचं प्रत्येकजण सांगायचा.
भारत बांगलादेश सीमेवर आसामच्या भांगाजवळ होशियारा नदी आहे. नदीच्या एका बाजूला भारत आणि दुसर्‍या बाजूला बांगला देश.
बांगला देशाची सीमा अगदी जवळून पाहता यावी म्हणून आम्ही बीएसएफचे अधिकारी आर.के.यादव यांची रितसर परवानगी घेतली. त्यांनी आपुलकीनं आमची विचारपूस केली, चहा दिला आणि होशियारा नदीतून भारतीय हद्दीतून बोटीची सफरही घडवली. नदीच्या दुसर्‍या बाजूला बांगला देशचे कोळी मासे पकडत होते. लहान मुलं शेतात काम करीत होती. त्यातले कित्येक अंगावर सदराही नसलेले गरिब होते, ते अतिशय प्रेमाने आम्हाला हात हलवून टाटा करीत होते.
प्रा.हरी नरके

Wednesday, March 29, 2017

एस.टी.स्टॅंडसारखा एअरपोर्ट

तुम्ही कधी नेपाळमधील जनकपुरला गेलायत?
मस्त गाव आहे. रामायणातला राजा जनक याचं हे गाव असं तिथले लोक मानतात. तर तिथल्या गावाबाहेरच्या विमानतळावर आम्ही तिघे उभे होतो.
आम्हाला जायचं होतं काठमांडूला, नेपाळमध्ये. महाराष्ट्रातल्या कुठल्याही मोठ्या शहराच्या एस.टी.स्टॅंडच्या बाहेर जसे खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांचे एजंट अमूक रूपयात अमूक गावी जाणारी बस लगेच सुटणार आहे असं ओरडत उभे असतात अगदी तसंच चित्र होतं त्या विमानतळाबाहेरचं. चलो,चलो, हिमालया एअरलाईन्स, बुद्धा एअरलाईन्स, काठमांडू एअरलाईन्स, अवघ्या बाराशे रूपयात काठमांडूला नेणार म्हणून तिकडचे एजंट ओरडत होते. आम्ही तिघं आहोत म्हटल्यावर त्यानं प्रत्येकी दोनशे रूपये कन्सेशन दिलं.
आम्ही त्याच्यासोबत आत गेलो, त्यानं स्वत:च्या हातानं लिहून आम्हाला बोर्डींग पास दिले. तिथलं सिक्युरिटी चेक म्हणजे नेपाळी पोलीसवाला आपल्याला बॅगा उघडायला सांगतो. स्वत:च्या डोळ्यांनी बघतो आणि पुढे जा म्हणुन सांगतो. तो एजंट आमचं सामान घेऊन आम्हाला आत विमानजवळ घेऊन गेला. आमचं सामान त्यानं आत टाकलं. छोटं विमान होतं. जेमतेम 16 सीटर. त्यानं आम्हाला आत बसवलं आणि नविन पॅसेंजर आणायला गेला. अशाप्रकारे अर्ध्या तासात विमान फुल झालं.
त्यानं आत येऊन आम्हाला सर्वांना ज्युस दिला. सुचना दिल्या आणि तो उतरून गेला. दुसरा एक कर्मचारी आला आणि तो आत जाऊन पायलटच्या सीटवर बसला. तोच आता आमचा "कॅप्टनवा" किंवा "पायलटवा" होता.
हिमालयातला तो हवाई प्रवास मात्र अविस्मरणीय होता. अगदी हाताच्या अंतरावर एव्हरेस्ट दिसत असतो. भन्नाट.
काठमांडूला राजधानी असल्यानं जरा बरा विमानतळ आहे. बाहेर आलं की चौकाचौकात राजघराण्यातील कोणाचे तरी पुतळे असतात. पण त्यांची कोणाचीही उंची अवघी फुट दीडफुट असते.
काठमांडूमध्ये एका चौकाला संत ज्ञानेश्वरांचे नाव दिलेले दिसले. तिथल्या भाषेत, चहा,भात,चेहरा असे मराठी शब्द  ऎकताना छान वाटत होतं.
तिथले पशुपतीनाथाचे मंदिर फार फेमस. तिकडे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले, तुम्ही दुसर्‍या देशातून आलात म्हणून तुम्हाला तिकीट काढावे लागेल. दरडोई सत्तर रूपये तिकीट. मंदिरात जायला तिकीट ही कल्पनाच भारी वाटली.
तिकीट घेऊन आत गेलो तर पंडे लोकांनी चक्क घेराव घातला. अमूक रूपयात अभिषेक, अमूक रूपयात तमुक पुजा वगैरे.
आम्ही नाही म्हटलं तरी जाम सोडायला तयार नाहीत. वैताग.
मला एक आयडीयाची कल्पना सुचली. एक पंड्या फारच गळ्यात पडत होता. मी त्याच्याशी थोडं बोललो. त्याला वाटलं गिर्‍हाईक पटलं. गडी खुष.
मला म्हणाला, "साब तुम्हारा गोत्र कौनसा हैं?"
मी म्हटलं, " फुले-आंबेडकर."
तो म्हणला, "यह क्या होता हैं? तुम्हारी जाती कौनसी हैं?"
मी म्हटलं, "महादलित." तो जो 120 च्या स्पीडनं पळाला. तो परत काही फिरकला नाही. त्यानं बाकीच्यांना काय सांगितलं, माहित नाही पण त्यानंतर एकही पंडया आमच्या आसपासही फिरकला नाही. तिकडची नदी म्हणजे पुण्याचा आंबीलओढा मोठा म्हणावी अशी मरतुकडी. मुंबईच्या समुद्रात असतं तसं किंवा पुण्याच्या मुळामुठेत असतं तसं गटाराचं पाणी वाहून नेणारा ओढा जेमतेम. सगळीकडे अतिशय घाण. अस्वच्छ वातावरण. आम्ही आणखी थांबलो तर उलटी व्हायची म्हणुन तिकडनं पळालो.
बाकीचा नेपाळ दौरा मात्र एकदम झकास. हिमालयाचा काय वरदहस्त. निसर्गाची मनमुराद सोयरिक. वा.
आम्ही परत जनकपुरला आल्यावर सीतामढीला जिल्ह्याच्या ठिकाणी माझं व्याख्यान होतं. सीतामढी म्हणजे जनक राजाला शेतात जिथं सीता सापडली ते ठिकाण अशी श्रद्धा.
मैदानात खुर्च्या मांडलेल्या. सारे वयस्कर लोक खुर्चीवर मांडी घालून बसलेले. स्टेज सुमारे 20 फूट उंचीचे. त्यावर चढायला चक्क एक शिडी लावलेली. कार्यक्रम चांगला झाला.
हाटेलवर आलो तर रात्रभर एक लाऊडस्पीकर कसली कसली देवीची गाणी किंचाळत होता. मी चौकशी केली की बुवा इकडं रात्री 10 च्या पुढं लाऊडस्पीकरला बंदी नसते का? पोलीस काही कारवाई का करीत नाहीत वगैरे.
हाटेलवाला माझ्याकडं तुम्ही "येडे का खुळे" अशा नजरेनं बघायला लागला. त्यानं दिलेल्या माहितीतून समजलं ते इतकंच की आज डीवायएसपी साहेबांच्या बंगल्यावर पुजा होती आणि म्हणून तो लाऊडस्पीकर रात्रभर बोंबलत राहणार होता. तिकडे बहुतेक वेगळंच सुप्रीम कोर्ट असणार.
सीतामढी ते पाटणा कारचा प्रवास अवघा तीनचार तासांचा. पण येतानाचा अनुभव जमेला धरता आम्ही आपलं 12 तास आधीच निघालो होतो.
मुंबई ते पाटणा फ्लाईटने आलो होतो. प्रमितीचा हा पहिलाच बिहार प्रवास होता. संगिता व प्रमितीची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी माझ्या नेहमीच्या सवयींना काट देऊन चारचार वेळा पाटण्याला आम्हाला न्यायला संयोजक वेळेवर पोचतील याची खात्री करून घेतलेली होती.
संयोजक सकाळीच पाटण्याला रवाना झाल्याची मुंबईतून फोन करून पुन्हापुन्हा खातरजमा करून घेतलेली होती.
आम्ही ऎतिहासिक पाटलीपुत्र उर्फ पाटणा विमानतळावर पोचलो तर कार अद्याप आलेली नव्हती. मोबाईलवर फोन केला तर संयोजक म्हणाले, "साबजी, बस पहुंचही रहे हैं.
क्या करे जॅम लगा हुवा हैं. उसने फंसे हैं."
किती वेळ लागेल या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, जॅम निघाला तर फक्त अर्धा तास. आणि नाही सुटला तर मग मात्र कितीही तास."
मी म्हटलं, "म्हणजे किती?"
ते म्हणाले, "काहीच सांगता येणार नाही. कदाचित सहा तास, कदाचित बारा तास. कितीही."
बापरे. मी टरकलो. आता काय करायचं? ते म्हणाले, पहिलं म्हणजे शेजारच्या हाटेलात जाऊन जेवून घ्या. फेरफटका मारा. शहरातील म्युझियम बघा आणि तरिही टाईम उरला तर एखादा सिनेमा बघा.
तर अशाप्रकारे संध्याकाळी म्हणजे आम्ही एयरपोर्टवर पोचून अवघे आठ तास झालेले असताना ते आम्हाला घ्यायला पोचले.
आम्ही सीतामढीला निघालो. गंगा ओलांडली आणि संयोजक म्हणाले, "आगे खतरा है. हमारे साथ बिटीया और भाभीजी है इसलिए इतनी देर रात आगे जाना ठीक नही होगा."
आम्ही हाजीपुरला मुक्काम करायचे ठरवले. रेल्वे स्टॆशनच्या समोर असलेल्या सबसे बढीयां हाटेलात त्यांनी आम्हाला नेले. ते तिथले कायम खासदार आणि कायम केंद्रीय मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांचे होते. अत्यंत भिकार आणि गलिच्छ. पासवान महोदय गेली 30 वर्षे कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी हे मंत्री असतातच.
त्यांचे हे हाटेल म्हणजे आपल्याकडे एखाद्या किरकोळ गावात असणार्‍या चाळीपेक्षाही भिकार होते.
आमच्या खोलीत सगळी मिळून साधारणपणे आठ बाय आठ फूट जागा. स्वच्छतागृह आपल्या एस.टी.स्टॅंडवर असते त्याच्याहीपेक्षा घाण.
संगिता आणि प्रमिती जाम वैतागल्या. पण रात्र झालेली होती. कशीबशी रात्र काढली आणि पहाटेच मार्गस्थ झालो.
सीतामढी...
एक थोर शहर.
तर आता आम्ही सीतामढीहून पाटणा आणि तिकडून रेल्वेने पुणे असा परतीचा प्रवास करीत होतो. गंगेच्या पुलावर आम्ही पोचलो तेव्हाच आम्ही सुमारे सहा तास आधीच पाटण्यात पोचू असे आमच्या लक्षात आले. हरकत नाही. पाटण्यात फिरता येईल. रात्री दहाची ट्रेन होती. कोणतीही धावपळ न करता आरामात ती पकडता येईल.

गंगासागरवर पुलाच्या दुरूस्तीचे काम चालू होते. पुलावरचा रस्ता गर्दीने फुललेला होता. पण काळजीचं कारण नव्हतं कारण आमच्या हातात सहा तास होते. थोडं पुढे काय गेलो तर वाहतुक ठप्प झालेली. जॅम लगा हैं. कधी मुंगीच्या स्पीडनं तर कधी एकाच जागेवर तासतासभर प्रतिक्षा करीत आम्ही तिकडे अडकलो होतो.
वाट बघुनबघुन आम्ही थकलो. जॅम खुलनेकी कोई गुंजाइश नही थी. आम्हाला सांगण्यात आलं की अजून साडेतीन किलोमीटर पुल बाकी आहे. हा पुलच मुळी साडेपाच किलोमीटर लांबीचा आहे. एकदा पुल ओलांडला की मग काय दहा मिनिटात रेल्वे स्टेशनवर.
शेवटी रात्रीच्या नऊ वाजता आम्ही तिघे कारमधून खाली उतरलो. आमच्या बॅगा घेतल्या आणि पायी चालत अंधारात ठेचकाळत एकदाचा साडेतीन किलोमीटरचा पुल ओलांडला. पुढे मात्र रस्ता एकदम मोकळा होता.
एका रिक्षावालाल्या विचारलं. तो प्रामाणिक होता. आपणहून म्हणाला, गेले सहा तास तो बसून होता. त्यामुळे एरवी तो या अंतराला पन्नास रूपये घ्यायचा पण आज तो अडीचशे रूपये घेणार होता.
आम्ही घासाघीस करत बसलो असतो तर ट्रेन चुकली असती. मे महिना असल्यानं सार्‍या रेल्वेगाड्या फुल होत्या. कसंबसं आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं होतं. ट्रेन आम्हाला चुकवायची नव्हती.
आमच्या हातात फक्त 5 मिनिटं होती. त्यानं रिक्षा फुलस्पीडनं मारली. रस्ता पुर्ण मोकळा होता. आम्ही रेल्वेस्टेशनला पोचलो तेव्हा गाडी सुटत होती. रिक्षावाला स्वत: आमच्या दोन बॅगा घेऊन धावला. माझ्याकडे दोन बॅगा होत्या. आम्ही धावत सुटलो.
शेवटच्या डब्यात त्यानं संगिता अन प्रमितीला चढवलं. मीही आत घुसलो. त्यात पायातली एक चप्पल खाली पडली. रिक्षावाल्याला तीनशे रूपये दिले. त्याला काय वाटलं माहित नाही. तो म्हणाला, " बाबुजी, ऎसा करते हैं, मैनें आपको ढांईसौ रूपया बोला था. मगर ये गलत हैं. मैं सौ रूपये रखुंगा. बाकी यह आप ले लो. बिटीयाको मिठाई खिला देना."
...................
टीप : गेल्या सातआठ वर्षात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये रस्त्यांचं जाळं इतकं उत्तम उभारलंय की आमचा हा 2008 सालचा हा अनुभव आज काल्पनिक वाटावा. आता बिहार ओळखू येऊ नये इतका बदललाय. रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखाच चकाचक झालाय.