Showing posts with label गौतम बुद्ध. Show all posts
Showing posts with label गौतम बुद्ध. Show all posts

Friday, July 3, 2020

मुंबई, ठाणे, कल्याण व नाशिकमध्ये गरिब वस्त्यांमध्ये कार्यरत बौद्ध भगिनींचे इमेलद्वारे आलेले पत्र-










आचरणशील " आदर्श बौध्द " म्हणजे आमचे आदरणीय नरके सर !


जयभीम, नरके सर!
              चळवळीच्या अनुषंगाने आपली भाषणे ऐकण्याचा, ग्रंथसंपदा वाचण्याचा व काही प्रसंगी भेट घेण्याचाही योग आला. पुराव्यानिशी मांडलेले तुमचे तर्कशुद्ध युक्तीवाद व प्रत्यक्ष भेटीतील पारदर्शक वागणे या गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या. खरे तर तुमचे युक्तीवाद ऐकून आम्ही अनेकांना बदलवण्याचा प्रयत्न केला. त्यात कधी यश आले तर कधी अपयश, हा भाग वेगळा.

               बौद्ध समाजातील दारु पिऊन महिलांना मारहाण करणाऱ्या पुरूषांविषयी तुम्ही २६ जून २०२० च्या फेसबुक पोस्टमध्ये योग्य तेच म्हटले आहे. महिला म्हणून हे दु:ख आम्ही वर्षानुवर्षे सहन करीत आहोत. आमच्या या दु:खाची जाणीव स्वत:ला बौद्ध म्हणविणाऱ्या काही व्यक्तींना होऊ नये, याचे खूप वाईट वाटले. जे आपल्या समाजातील महिलांच्या दु:ख- वेदनांबाबत योग्य भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही.

भले त्यांनी कितीही मोठ्याने गौतम बुद्ध, महात्मा फुले, डाॅ आंबेडकर यांच्या नावाचा गजर केला तरीही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ज्यांना दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करावेसे वाटते त्यांना स्त्रियांना भिक्खूसंघाचे दार सताड उघडे करणाऱ्या गौतम बुद्धांचे, क्रांतीज्योती सावित्रीमाईंना घडविणाऱ्या महात्मा फुलेंचे व हिंदू कोड बिलासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या डाॅ आंबेडकरांचे अंत:करण कधीच समजू शकणार नाही.
       

नरके सर, दिलगिरी व्यक्त करुन आपण आमच्या दृष्टीने आणखी मोठे झाला आहात.                     
     

शेवटी एकच सांगावेसे वाटते. जगाला व हरी नरकेंनाही फसवणे सोपे आहे. परंतु स्वत:ला फसवणे कठीण व अयोग्यदेखील असते. ही जाणीव सर्वांना होवो, अशी मंगल कामना !

    १) रजनी कांबळे.
    २) अश्विनी मून.
    ३) शीला भगत.
    ४) शर्मिला होवाळ.
   ५) शालिनी वज्रचित्त.
    ६) राजश्री कांबळे.
    ७) निवेदिता बच्छर.

Thursday, May 7, 2020

गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके








गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर - एक सहप्रवास : प्रा. हरी नरके

१* १९०८ जाने. - भीमरावांचा मॅट्रीक परीक्षा पास झाल्याबद्दल सत्कार झाला. त्यावेळी कृ. अ. केळुसकर [ कुणबी ] लिखित बुद्ध चरित्र भीमरावांना भेट मिळाले.
हे पुस्तक वाचून आपण बुद्धाकडे वळलो. प्रेरित आणि प्रभावित झालो असे बाबासाहेब " बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या प्रस्तावनेत म्हणतात. " I read this book with great interest and was greatly impressed and mooved by it.
२* २७ मे १९२४ बार्शी- नामांतर की धर्मांतर या विषयावर बाबासाहेबांचे भाषण.
३* १३ सप्टें. १९३३- बाबासाहेब लंडनवरून सुभेदार विश्राम गंगाराम सुभेदार यांना पत्र लिहितात. त्यात ते म्हणतात, " माझा कल बुद्धधर्माकडे आहे."
४* १९३४, दादर, मुंबई, बाबासाहेबांनी बांधलेल्या बंगल्याला राजगृह हे बौद्ध नाव दिले.
५* १३ ऑक्टोबर १९३५ - येवला परिषद. बाबासाहेबांची घोषणा, " मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही."


६* १२/१३ जाने. १९३६- पुणे, अहिल्याश्रम- धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
७* ३०, ३१ मे व १जून जाने. १९३६- मुंबई, दादर, धर्मांतराचा विचार करण्यासाठी परिषदेचे आयोजन
८* २४ सप्टें. १९४४ - मद्रास येथे रॅशनॅलिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या सभेत ब्रिटीश सरकारमधील केंद्रीय मंत्री म्हणून बोलताना ते म्हणाले, "बौद्ध धर्म व ब्राह्मणी धर्म " यात बुद्धीवादी बौद्ध धर्मच श्रेष्ठ आहे."
९* ८ जुलै १९४५, मुंबई, पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिला " प्रज्ञा, शील, करूणा " हे ब्रिदवाक्य दिले.

१०* २० जून १९४६-  सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना करून बुद्ध भवन व आनंदभवन अशी सभागृहाची नामकरणे केली.
११* २ मे १९५०- दिल्लीतील बुद्ध जयंती समारंभामध्ये बाबासाहेबांचे भाषण, " बुद्धधर्म हा नीतिधर्म आहे."
१२* ५ मे १९५० मुंबई, जनता पत्राला मुलाखत देताना बाबासाहेब म्हणाले, "आपण बौद्ध धर्म स्विकारणार आहोत."

१३* २६ मे १९५० - कॅण्डी, येथे पत्रकार परिषदेत आपण बौद्ध समारंभ व विधींचा अभ्यास करण्यासाठी येथे आल्याचा उल्लेख केला. जागतिक बौद्ध धम्म परिषदेत बाबासाहेबांचे भाषण.
१४* मे १९५०- महाबोधी सोसायटीच्या बुद्ध जयंती विशेषांकात बाबासाहेबांनी लेख लिहून बुद्ध धम्माचे भवितव्य उज्वल असल्याचे नमूद केले.
१५* ६ जून १९५०, कोलंबो, श्रीलंका, जागतिक प्रतिनिधींसमोर बाबासाहेबांचे " भारतातील बुद्ध धम्माचा उदय आणि र्‍हास" यावर भाषण

१६* जुलै १९५१, बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध संघाची स्थापना केली. " बौद्ध उपासना पाठ" ही पुस्तिका प्रकाशित केली.
१७* नोव्हेंबर १९५१, "बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या लेखनाला प्रारंभ केला. फेब्रुवारी १९५६ ला पुर्ण करून त्याच्या ८० प्रती विद्वानांना अभिप्रायार्थ पाठवल्या.

१८* १६ मे १९५४, बाबासाहेब रंगून, ब्रह्मदेशातील बुद्ध जयंती समारंभाला उपस्थित.
१९* २८ ऑक्टोबर १९५४ - मुंबई पुरंदरे स्टेडीयम, जाहीर सभेत बाबासाहेब म्हणाले, "बुद्ध, कबीर व महात्मा फुले हे आपले तीन गुरू आहेत."

२०* १९५४, बाबासाहेबांनी "दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडीया" ची स्थापना केली. ४ मे १९५५ ला धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली.

२१* २५ डिसेंबर १९५४, देहूरोड, बुद्ध मुर्तीची बाबासाहेबांच्या हस्ते विहारात स्थापना.
२२* १९५५, जनता पेपरचे " प्रबुद्ध भारत" असे नामकरण केले.

२३* १४ ऑक्टोबर १९५६, नागपूरला बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला. लाखो अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
२४* २० नोव्हेंबर १९५६, नेपाळ, काठमांडूला बाबासाहेबांचे जागतिक बौध्द परिषदेत भाषण.
२५* २५ नोव्हेंबर १९५६, सारनाथ, जिथे भगवान बुद्धांनी धम्म चक्र परिवर्तन सुत्त कथन केले तिथे बसून बाबासाहेबांचे आयुष्यातील शेवटचे भाषण, "चलो बुद्ध की ओर" ची जगाला हाक दिली.

-प्रा. हरी नरके, बौद्ध पौर्णिमा, ०७/०५/२०२०
.................................................