Showing posts with label विद्यापिठ. Show all posts
Showing posts with label विद्यापिठ. Show all posts

Monday, July 6, 2020

आदर्श शिक्षण पद्धती गुरूकुलाची की नालंदाची? - प्रा.हरी नरके





प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल, गुरूकुलाबद्दल, नेहमीच गौरवोद्गार काढणारे माझे मित्र खालील गोष्टींबद्दल कधी आत्मपरीक्षण करणार?


१. जी शिक्षण पद्धती आदर्श मानली जात होती, त्या गुरूकुलांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मुलांनाच प्रवेश होता. तिथे मुलींना व शूद्र-अतिशूद्रांना प्रवेश नव्हता. देशाच्या लोकसंख्येत सुमारे ८५ टक्के असलेल्या वरील समाजघटकांना शिक्षणाच्या बाबतीत बहिष्कृत मानणारी व्यवस्था आदर्श कशी काय असू शकते?


२. गुरूकुल शिक्षणात ज्ञानाच्या संदर्भातील शिक्षण असले तरी तिथे कला-कौशल्ये-शेती-उद्योगाचे शिक्षण दिले जात होते काय? नसल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी यांची गरज नसते काय?


३. गार्गी-मैत्रेयी, यादव कुळातील श्रीकृष्ण अशी मोजकी, शेलकी, अपवादात्मक उदाहरणे देऊन समर्थनपर सूर लावू नका. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मला आत्मपरीक्षणात्मक मांडणी अभिप्रेत आहे.


४. रामायण - महाभारतातील द्रोणाचार्य-एकलव्य, शंबूक-राम ही उदाहरणे प्रसिद्ध आहेत. शंबूक प्रकरण प्रक्षिप्त आहे वगैरे सांगून माझी समजूत घालण्याआधी ते प्रक्षिप्त नेमके किती वर्षांपुर्वी रामायणात समाविष्ट झाले याचे नेमके वर्ष सांगता का? ते नंतर आले असले तरी त्यालाही शतके लोटलीत. तेव्हा ते नंतरचेसुद्धा समाजमनावर परिणाम करीत होते हे कसे नाकारता येईल?


५. जुनी मूल्यव्यवस्था आणि आधुनिक मुल्यव्यवस्था यांची मला गल्लत करायची नाही. तथापि ती जुनी मूल्ये आज २०२० मध्ये आदर्श नाहीत एव्हढे तरी मान्य करणार की नाही?


६. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितलेली नव्हती. पगार मागितलेला होता. त्यांनी जर एकलव्याला शिकवण्याचे कामच केलेले नव्हते तर ते त्याच्याकडे पगार कसा काय मागू शकत होते? " काम नाही तर पगार नाही, "  हे नितीमूल्य त्यांना लागू नव्हते काय?


७. या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक, गुणत्तापुर्ण आणि ज्ञानासहीत कौशल्यांचे शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, सोमपुरा विद्यापीठे, किंवा शिक्षणाचा पॅटर्न मला तरी आदर्श वाटतो. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये अवश्य लिहा. मूल्यमापनात्मकही कमेंट करा.

-प्रा.हरी नरके, ६/७/२०२०


छायाचित्र सौजन्य- सुभाषचंद्र सोनार, शाम कांबळे

Tuesday, July 24, 2018

नामांतर शहीद विलास ढाणे - स्मृती आणि वेदना









" नमस्कार. मी शिवाजीनगर पोलीस स्टॆशनमधून बोलतोय. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर एका तरूणाने रेल्वेखाली आत्महत्त्या केलीय. त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवर नामांतर आंदोलनाला माझ्या समाजाचा असलेला विरोध कमी व्हावा यासाठी मी आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटलेले आहे. त्यात तुमचे नाव मिळाले. आत्महत्त्या करणार्‍या तरूणाचे नाव विलास ढाणे आहे." महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सोमवारच्या साप्ताहिक बैठकीत आम्ही असताना डॉ. बाबा आढावांना हा फोन आलेला होता. आम्ही सारेच सुन्न झालो. श्रद्धांजली वाहून सभेचे काम आवरते घेण्यात आले.

विलास ढाणे हा सातारा जिल्ह्यातला तरूण. सप्टेंबर 1982 मध्ये मुंबईत नामांतर सत्याग्रह झाला होता. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पहिल्याच दिवशी 16 हजार नामांतरवाद्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यात डॉ. बाबा आढाव, डॉ. अनिल अवचट, कॉं. शरद पाटील, बाबूराव बागूल, रावसाहेब कसबे, प्रा. अरूण कांबळे, डॉ. कुमार सप्तर्षी, अंकुश भालेकर, बापूराव जगताप, लक्ष्मण माने आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर आदींचा समावेश होता. आझाद मैदानावर झालेल्या सभेला शुभेच्छा द्यायला तब्बेत बरी नसूनही अण्णा, एसेम जोशी आलेले. ज्या तरूणाने त्यांना उदगीरल जोड्यांचा हार घातलेला होता, तोही उपस्थित होता. त्याने जाहीरपणे क्षमायाचना केली होती. आपल्याला गुमराह केले गेले. आपला वापर केला गेला असे तो म्हणाला. आम्हाला सर्वांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवलेलं होतं. तिथं या विलास ढाणेचा परिचय झालेला होता. मनस्वी, अत्यंत संवेदनशील तरूण.

नामांतराला विरोध करण्यासाठी भयानक हिंसाचार करण्यात आला होता. गोरगरीबांची घरं जाळण्यात आली होती. निष्पापांना ठार करण्यात आलेलं होतं. माझा समाज हिंसाचारात पुढे आहे याचा गिल्ट विलासला होता.

विलासनं शिवाजीनगर रेल्वे स्टेशनात लोकलखाली आत्महत्त्या केली.

२७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राच्या विधीमंडळात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. १४ जानेवारी १९९४ रोजी ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नाव देण्यात आले.

हे करण्यासाठी 26 वर्षे संघर्ष करावा लागला तेव्हा कुठे हे नामांतर झाले. अनेकांनी अनेक प्रकारे लढा दिला.

पुढे या आंदोलनावर काही पुस्तकं लिहिली गेली. स्मारकं उभी राहिली. पण यातल्या बहुतेकात  डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचासुद्धा उल्लेख नाही मग विलास ढाणेचा कु्ठून असेल?विकीपिडीयावर नामांतर शहीद म्हणून खालील शहीदांचा उल्लेख आहे. त्यात विलासचे नाव नाही.

नामांतर आंदोलनातील शहीद-
The martyrs of Namantar Andolan:
Pochiram Kamble पोचिराम कांबळे, Janardan Mawade जनार्दन मवाडे Gautam Waghmare (गौतम वाघमारे),
Suhasini Bansod (सुहासिनी बनसोड),Govind Bhurewar (गोविंद भुरेवार), Bhalchandra Borkar (भालचंद्र बोरकर),Roshan Borkar (रोशन बोरकर),
Avinash Dongre (अविनाश डोंगरे),Narayan Gaikwad (नारायण गायकवाड),Shabbir Ali Kajal Hussain (शब्बीर अली काजल हुसैन),Chandar Kamble (चंदर कांबळे),
Domaji Kuttarmare (डोमाजी कुत्तरमारे),Janardan Mhaske (जनार्दन मस्के),Ratan Mendhe (रतन मेंढे),Kailas Pandit (कैलास पंडित),Ratan Pardeshi (रतन परदेशी),
Dilip Ramteke (दिलीप रामटेके),Dyneshwar Sakhare (ज्ञानेश्‍वर साखरे),Abdul Sattar (अब्दुल सत्तार),Pratibha Tayade (प्रतिभा तायडे),Diwakar Thorat (दिवाकर थोरात),
Manoj Waghmare (मनोज वाघमारे),Shila Waghmare (शीला वाघमारे)
https://en.wikipedia.org/wiki/Namantar_Shahid_Smarak

नाही चिरा नाही पणती!

शेवटी संत तुकाराम म्हणतात तेच खरे!
-प्रा.हरी नरके

Monday, June 4, 2018

महर्षि कर्व्यांच्या स्मृतींना अभिवादन-




महर्षि धोंडो केशव कर्वे एक फार मोठा भला माणूस. अतिशय द्रष्टा. प्रांजळ.
3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.

18 एप्रिल 1858 चा त्यांचा जन्म. ते 104 वर्षे जगले. 29 आक्टोबर 1958 रोजी त्यांचा भारत रत्न देऊन सन्मान करण्यात आला.

मात्र पुरस्कार घ्यायला कर्वे दिल्लीला वेळेत पोचू शकले नाहीत. कारण हिंगण्याच्या तलाठ्यानं गृहचौकशी अहवालात राष्ट्रपती भवनला कळवलेलं होतं, महर्षि कर्वे नावाचा इसम या गावात आढळून आला नाही.
पुढे त्याची विभागीय चौकशी झाली तेव्हा त्यानं सरकारी उत्तर दिलं, मला श्री धोंडो केशव कर्वे माहित होते, महर्षी कर्वे हा इसम कोण ते मला माहित नव्हतं. माझ्या दप्तरात तशी नोंद नव्हती.

कर्व्यांनी शतकापुर्वी विधवांसाठी होस्टेल काढणं, महिला विद्यालय व त्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना करणं, स्वत: एका विधवेशी लग्न करणं ही सारीच क्रांतिकारक पावलं.

बोटी बंद होत्या म्हणून ते कोकणातून [मुरूड] मुंबईला शिकायला चालत गेले. केव्हढी ही ज्ञाननिष्ठा.
गावानं त्यांना तालुक्याचं भूषण म्हणून गौरवलेलं असताना कर्व्यांनी एका विधवेशी लग्न केलं म्हणून ब्राह्मण जातीनं त्यांना "जिल्हादूषण" म्हणून वाळीत टाकलं.
कर्व्यांच्या पुनर्विवाहाने नाराज झालेल्या नाशिकच्या गंगालहरी या वर्तमानपत्राने लिहिले, "कर्वे हा खर्‍या ब्राह्मण बीजाचा बच्चा नसणार." जातीबंधने व पुर्वापार चाली पाळूनच अशी लग्ने व्हावीत असे कर्वे मानत असत.
सं. शारदा हे नाटक लिहुन ज्यांनी मराठी रंगभुमीवर सुधारणवादी विचार मांडला त्या देवलांनी कर्व्यांच्या संस्थेला देणगी दिली. त्यातून बांधण्यात आलेल्या मंदिरात हिंदू अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही अशी अट लिहिलेला बोर्ड लावलेला असे.
"पण लक्षात कोण घेतो?" ही विधवांबद्दलची बंडखोर कादंबरी लिहिणार्‍या ह.ना.आपटे यांचा महिला विद्यापीठाला विरोध होता.
मुंबईत शिकवण्या करून राहताना खुप गरीबी कर्व्यांच्या वाट्याला आलेली.

पुण्यात फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक झाल्यावर त्यांनी ब्राह्मण विधवांसाठी आश्रम काढला. त्यासाठी निधी जमवण्याकरिता ते देशभर फिरले. अनेकदा अपमान सोसले. जननिंदा तर कायमचीच पदरात पडायची.

मुर्ती छोटी पण धीराची. जिद्दीची.

ज्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकलं त्यांच्याच विधवा लेकीबाळींच्या भल्यासाठी काम करणं ही साधी गोष्ट नाही.

त्यांनी 1915 साली आपले आत्मवृत्त लिहिले. 1928 साली त्याला पुरवणी जोडून त्याची सुधारित आवृत्ती काढली. 1958 मध्ये त्यांच्या शतकमहोत्सवानिमित्त 1928 ते 1958 च्या नोंदीच्या आधारे पटवर्धनांनी त्यांचे चरित्र लिहिले. वाचताना गलबलायला होते.

एखाद्यानं समाजासाठी किती सोसावं?
3 व 4 जून 1916 ला त्यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली.
वयाच्या सत्तरीत त्यांनी निराश होऊन लिहिलं, भारतीय स्त्रीयांच्या उच्च शिक्षणाला हजारो वर्षे जावी लागतील.
आज स्त्रियांनी उच्च शिक्षणात घेतलेली आघाडी बघून कदाचित आपला अंदाज चुकला याची त्यांनी प्रांजळ कबुली दिली असती.
कर्वे बुद्धीने बेताचे होते असे त्यांच्या या पुस्तकाच्या प्रस्तावनाकारांनी, रॅंग्लर परांजपे यांनी लिहून ठेवलंय. एव्हढा त्याग करणारा बंडखोर माणूस बुद्धीने बेताचा असेल असं मला तरी वाटत नाही. कर्वे यांच्या तीक्ष्ण बुद्धीचच हे काम.

मुलींना उच्च शिक्षण का द्यायचं यामागचं कर्व्यांचं म्हणणं असं, "बायकांना प्रपंच चांगला करता यायला हवा. प्रत्येक बाईला किमान 5 माणसांचा स्वयंपाक कोणाच्याही मदतीशिवाय करता यायला हवा. त्याशिवाय तिला पदवी मिळता कामा नये. गृहीणीची कर्तव्ये व जबाबदार्‍या यांचे शिक्षण पदवीला दिलेच पाहिजे. स्वच्छता, आरोग्य, नीटनेटकेपणा बाईला अत्यावश्यक."
या कामाला लोकमान्य टिळकांचा पाठींबा मिळावा म्हणून कर्वे त्यांना भेटले. स्त्रीयांना उच्च शिक्षण देता कामा नये अशी भुमिका टिळकांनी घेतली. ते म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रिया संशयवादी बनतील व आपले गृहसौख्य लयाला जाईल."

शिक्षणखात्यातले एक उच्च अधिकारी तर म्हणाले, "उच्च शिक्षणामुळे स्त्रीया स्वैराचारी बनतील आणि वाट्टेल तसले बूट आणि कपडे घालून नाचरेपणा करायला लागतील."
1927 साली अखिल भारतवर्षीय स्त्रीयांची पहिली शैक्षणिक परिषद झाली. तिने ठराव केला, "बायकांना मातृत्वाचा आदर्श आणि घर सुंदर, आकर्षक व स्वच्छ कसे ठेवावे याचे उच्च शिक्षण दिले जावे."

मुंबई विद्यापीठात स्थापनेपासून वकिलीची, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत होती. 1871 पासून विद्यापीठाने मराठी शिकायला बंदी घातली.

कर्वे म्हणतात, मराठी माणूस हा भांडखोर असणार हे ठरलेलेच आहे. त्याने मराठी भाषेची साथ सोडल्यानेच त्याच्या शिक्षणाचे नुकसान झालेले आहे.
कर्वे एम.ए. ला गणितात नापास झाले होते. आपण फार भित्रे आणि लाजाळू होतो असेही कर्वे म्हणतात.
त्यांचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले तेव्हा त्यांच्या बायकोचे वय 9 वर्षे होते. ती एका मुलाला,रघुनाथाला जन्म देऊन अकाली गेली.
कर्व्यांच्या आईची चार मुले जन्मत:च गेली म्हणून पुढे त्यांच्या आईने एका मुलाचे नाव भिकू ठेवले व कर्व्यांचे नाव धोंडा ठेवले. अशी नावे शूद्रांमध्येच ठेवली जात.

कर्व्यांनी गावी शाळा काढली तेव्हा त्या शाळेत मात्र ब्राह्मणेतरांना प्रवेश नाकारण्यात आला होता.

कर्व्यांच्या हिंगण्याच्या आश्रमात महर्षि वि.रा.शिंदे यांच्या विधवा बहिणीला, बायजाक्काला प्रवेश दिला गेला नाही. कारण संस्थेचा नियम होता फक्त ब्राह्मण विधवांनाच प्रवेश मिळेल.
पुढे विद्यापीठात मात्र तो शिथिल करण्यात आल्याने पहिल्या 25 वर्षात तिथे शिकलेल्या 201 मुलींपैकी 1 धनगर, 1 तेली, 4 वाणी, 11 मराठा व 184 ब्राह्मण होत्या.

ब्राह्मणांनी बेटीव्यवहार हा फक्त ब्राह्मणातच करावा, पंक्तीव्यवहारात पुर्वपरंपरा पाळावी असे कर्वे सांगतात.
अस्पृश्य जर स्वच्छ, संभावित आणि रितीभाती पाळणारा असेल तर त्याच्यासोबत भोजन करायला मात्र आपली हरकत नाही असेही कर्वे म्हणतात.

स्त्री शिक्षणासाठी झटलेल्या सर्व भारतीयांचा कर्वे आवर्जून ऋणनिर्देश करतात मात्र ते चुकूनही महात्मा फुल्यांचा अथवा सावित्रीबाईंचा उल्लेख करीत नाहीत.
या पुस्तकात फुले, शाहू, बाबासाहेब यांच्या नावाला जागासुद्धा नाही याने मन खंतावते.

कर्वे यांच्या महिला विद्यापीठात शिकवणारे आणि महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणारे पहिले लेखक म्हणजे प्रा. गं.बा. सरदार होत. त्यांनी आपले हे पुस्तक कर्व्यांना सप्रेम भेट दिलेले होते.

ते मला 25 वर्षांपुर्वी पुण्याच्या आप्पा बळवंत चौकातील रद्दीच्या दुकानात मिळाले.
ते आजही माझ्याकडे सुरक्षित आहे.

महर्षि कर्व्यांच्या कामाला काही व्यक्तीगत आणि काही काळाच्या मर्यादा असतीलही पण त्यांनी स्त्रीशिक्षण आणि स्त्री-पुरूष समतेच्या वाटा सुकर केल्या हे विसरता कामा नये.

102 वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी महिला विद्यापीठाची पुण्यात पायाभरणी करणार्‍या महर्षि कर्व्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

- प्रा.हरी नरके

Wednesday, March 22, 2017

डोंगर कोसळला


[ गोविंदराव तळवलकर - एक निर्भय आणि विद्वान संपादक ]
माझे मित्र ग्रंथालीचे दिनकर गांगल यांना "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन " या माझ्या पहिल्या पुस्तकाची प्रत भेट द्यायला मी मुंबईच्या टाइम्सच्या इमारतीत गेलो होतो.
ते म्हणाले, "किती प्रती आणल्यास?"
"तुम्हाला द्यायला एकच आणलीय," मी सांगितलं. ते म्हणाले, " अरे आणखी दोन हव्या होत्या. एक म.टा. ला पुस्तक परीक्षणासाठी द्यायला आणि दुसरी संपादक गोविंदरावांना द्यायला."
मी म्हटलं, "आपली त्यांची काय ओळख नाही. शिवाय माणूस फार खडूस असल्याचं सारेच सांगतात."
त्यांनी शू केलं. " अरे, इकडं म.टा. च्या कार्यालयात असं बोलू नकोस. माझी काय नोकरी घालवतोस काय?" गोविंदरावांना सारेच टरकून असायचे.
त्यांनी फारच आग्रह केला. तू ही प्रत आज गोविंदरावांना भेटून दे म्हणून. ते मात्र माझ्यासोबत यायला तयार नव्हते. तू एकटाच जा असं त्यांनी सांगितलं. प्रशांत
दीक्षित गोविंदरावांचे सेक्रेटरी होते. त्यांनी गोविंदराव कामात आहेत, भेटायचं असेल तर बसावं लागेल असं सांगितलं.
मी थांबलो.
अर्ध्या तासानं त्यांनी गोविंदरावांच्या केबीनमध्ये मला सोडलं. मी आत गेलो तेव्हा ते संगणकावर काहीतरी लिहित बसले होते. मी नमस्कार केला. माझी ओळख करून दिली. गोविंदराव माझ्याकडं बघायलासुद्धा तयार नव्हते. चेहरा एकदम कोरा. मी त्यांच्याशी बोलत असलो तरी संपुर्ण कोरा. हं नाही. की हू नाही. मला वाईट वाटलं. माणूस फारच माणुसघाणा असावा असं वाटून गेलं. आलोच आहे तर पुस्तक दिलं. त्यांनी हातानं खूण करून ते तिकडं ठेव असं सुचवलं. मी पुस्तकाबद्दल दोन वाक्यं बोललो आणि माझा धीरच खचला. आता फुटा असा त्यांच्या चेहर्‍यावर भाव होता. मी नमस्कार केला आणि बाहेर पडलो. मला फार वाईट वाटलं होतं. इतक्या खडूस माणसाकडं कशाला पाठवलं गांगलांनी आपल्याला? म्हणुन गांगलांकडं जाऊन त्यांना मी विचारलंही.
ते म्हणाले, "काय झालं, त्यांनी तुला गेट आऊट म्हटलं का?"
"नाही. ते तसं काय म्हणाले नाहीत. मुळात ते अवाक्षरही बोललेच नाहीत. माणूस फारच तुसडा दिसतोय."
गांगल म्हणाले, " हे बघ जर त्यांनी तुला गेट आऊट म्हटलं नसेल तर त्यांनी तुला खुपच सन्मानाची ट्रीटमेंट दिलीय. गैरसमज, मान अपमान मनातून काढून टाक."
मी तिथनं बाहेर पडलो. पुण्याला आलो. तो मंगळवार होता.
गुरूवारी सकाळी त्याकाळात म.टा. मध्ये पहिल्या पानावर रविवारच्या मैफील पुरवणीची मोठी जाहीरात यायची.
ती वाचली आणि उडालोच.
पहिलाच लेख असणार होता गोविंदरावांचा. "समर्पक युक्तीवाद - तरूण संशोधक हरी नरके यांनी साप्ताहिक सोबतचे बाळ गांगल यांच्या लेखनाचं समर्पक युक्तीवादांनी केलेलं वस्त्रहरण... "
मी शनिवारीच पेपर टाकणाराला सांगुन ठेवलं, " उद्याचा पेपर टाकायचं चुकवू नकोस. महत्वाचा लेख येणार आहे."
पण रविवारी पहाटेच जाग आली. पेपर आमच्याकडे सकाळी आठ वाजता यायचा. मला धीर धरवेना. सायकल काढली आणि दामटत पिंपरीला गेलो. त्याकाळात म.टा. मुंबईहून येत असल्यानं उशीरा म्हणजे सातपर्यंत यायचा. तिकडं वाट बघत थांबलो. पेपर आल्यावर बघतो तो काय मैफिलच्या पहिल्या पानावर पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा कलर फोटो आणि गोविंदरावांचा भला मोठा लेख.
गोविंदराव कोणत्याही विषयावर लिहिताना चार चांगल्या गोष्टी सांगून झाल्या की एकदोन तरी उणीवा- त्रुटी किंवा दोष दाखवणारच. हाच पायंडा होता. पण गोविंदरावांचा हा लेख त्याला अपवाद होता. त्यांनी पुस्तकाचं तोंड भरून कौतुक केलेलं होतं.
मी पेपरवाल्याकडचे म.टा.चे सगळे जादा अंक घेतले. त्याकाळात त्याच्याकडं दहा जादा अंक यायचे.
मी गोविंदराव तळवलकरांना आभाराचा फोन केला तेव्हा मात्र ते अतिशय जिव्हाळ्यानं बोलले. त्यांनी मला मुंबईला भेटायला बोलावलं.
भेटीत त्यांनी चक्क चहा दिला. घरची, मी कायकाय करतो या सगळ्यांची आपुलकीनं चौकशी केली.
त्या दिवशीचे गोविंदराव आणि आजचे गोविंदराव एकदम वेगळे होते. किती फरक.
भेटत जा. म.टा.साठी लिहा म्हणाले. त्यांनी माझं पुस्तक टाइम्सचे संपादक दिलीप पाडगावकर यांना वाचायला दिलं. त्यांनीही टाइम्समध्ये पुस्तकावर लिहिलं.
आठवडाभरात एका कार्यक्रमात पुन्हा तळवलकरांची भेट झाली. सौम्य हसले. हो, ते कधीतरी माफक हसायचेसुद्धा!
मी त्यांना टेल्कोच्या संपाबद्दल बोललो. आमच्या कंपनीत तेव्हा राजन नायर नावाच्या नेत्यानं फार उतमात चालवला होता. त्याला कामगारांची साथ होती. नायरबद्दल त्याचे अंडरवर्ल्डबरोबर संबंध असल्याचं खाजगीत बोललं जायचं. त्यानं अनेक अधिकार्‍यांवर हल्ले केलेले होते. ते ऎकून गोविंदराव काळजीत पडले. मला म्हणाले, "हे सारं जरी खरं असलं तरी मी नायर आणि कामगारांविरूद्ध फारसं लिहू शकणार नाही. या सगळ्यांच्या मागं राज्याचे सीएम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं. त्यांना भेटा आणि हे मिटवा अन्यथा हे आणखी वाढू शकतं असा निरोप तुमच्या वरिष्ठांना द्या, असं म्हणाले. गोविंदरावांसारखा दणकट संपादकसुद्धा सीएमसमोर आपण हतबल असल्याचं सांगतो हे मला नवं होतं. धक्कादायक होतं.
मी म्हटलं, " पण सीएम तर आम्हाला सहानुभुती दाखवतात."
ते म्हणाले, " सीएमचा राग टाटांवर नाही. तुमची मिडल मॅनेजमेंट त्यांना आणि त्यांच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना फारसा भाव देत नसल्यानं मिडल मॅनेजमेंटला चांगला धडा शिकवण्यासाठी आणि कामगार नेते दत्ता सामंत यांना पुणे, पिंपरी, चिंचवडमध्ये शिरकाव मिळू नये यासाठी सीएम राजन नायरला मोठा करीत आहेत."
एसेम जोशी यांच्या अंत्ययात्रेला गोविंदराव पुण्याला आले होते तेव्हा भेट झाली. बोलले. मला म्हणाले, "तुम्ही काय भाषणं वगैरे देता म्हणे?"
मी चपापलो. हो म्हणालो. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. वक्त्यांविषयीचा तिटकारा स्पष्ट दिसत होता. मला म्हणाले," भाषणं तात्काळ बंद करा. लिहा. भाषणं वार्‍यावर उडून जातात. लेखन टिकतं. व्यक्त होण्याची उर्जा बोलून संपते आणि मग हातून फारसं लेखन होत नाही. तुम्ही तरूण आहात. तुमच्या गुरूजींचं अनुकरण करा."
ते म्हणत होते ते खरंच होतं. पण मी त्यांचं ऎकू शकलो नाही.
व्याख्यानांची सतत निमंत्रणं यायची. कितीही नाकारली तरी काही घ्यावीच लागायची. त्याच्या बातम्या छापून आलेल्या बघितल्या की गोविंदराव चिडायचे. बोलायचे.
गोविंदराव लेखक, संपादक म्हणून अव्वल दर्जाचे होते. पण त्यांचं वक्तृत्व सामान्य होतं. त्यांना फारसं बोलता यायचं नाही. त्यामुळं असेल पण त्यांना वक्त्यांबद्दल नफरत होती किमान अढी तरी होतीच. शिवाजीराव भोसले हे वक्ते त्या काळात तुफान लोकप्रिय होते. पण गोविंदराव संधी मिळेल तिथे त्यांना ठोकायचे. फारच वाभाडे काढायचे. इथपर्यंत ठीकच होतं. पण माझे आवडते वक्ते आणि लेखक, विचारवंत नरहर कुरूंदकर यांच्यावरही गोविंदराव घसरायचे. त्याचं कारण बहुधा त्यांना एकुणच वक्त्यांविषयी घृणा असावी असा माझा कयास आहे. त्यांची मतं एकदम ठाम असत. त्यात बदलाची सुतराम शक्यता नसे. एखादा माणुस नाही आवडला तर ते त्याच्याशी कायम तिटकार्‍यानंच वागायचे. आकसानं म्हटलं तरी चालेल.
माझी भाषणं थांबत नाहीत म्हटल्यावर त्यांनी फडकेसरांना सांगितलं. सर पण माझ्यामागं हरी भाषणं कमी कर अशी भूणभूण लावायला लागले आणि एकदा दोनदा तर गोविंदरावांनी म.टा.त माझ्याविरूद्ध प्रखर लिहायला लावलं अशोक जैन आणि शशिकांत सावंतांना. यामागं त्यांची सद्भावनाच होती. पण माझाही नाईलाज होता. पुढच्यास ठेच मागचा शहाणा हे खरं नाही. स्वत:ला ठेच लागल्याशिवाय शहाणपण येतच नाही.
शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावर त्यांचे निहायत प्रेम होते. त्यांना सर्व गुन्हे माफ. या समकालीन दोन राजकीय नेत्यांच्या बाबतीत ते अतिव मवाळ होते. तसं ते जाहीरपणे मान्यही करायचे. अर्थात तरीही पवारांनी यशवंतरावांना सोडल्यानंतर गोविंदरावांनी त्यांच्यावर प्रचंड झोड उठवली होती.
पुण्याच्या मॅजेस्टीक गप्पांमध्ये त्यांची मुलाखत प्रा.ग.प्र.प्रधान यांनी घेतली होती. "प्रॅक्टीकल सोशँलिझम" या नवाकाळच्या निळकंठ खाडीलकर यांच्या पुस्तकावर तुमचं मत काय आहे या प्रश्नावर ते फटकळपणे म्हणाले, "मी बाल वांड्मय वाचत नसतो."
गोविंदराव विद्वान संपादक होते. त्यांची विद्वत्ता प्रकांड आणि अभिरूचि तालेवार होती. त्यांचा व्यासंग दांडगा होता. दरदिवशी काहीतरी लिहावं आणि वाचावं हा त्यांचा परिपाठ होता.मराठी पत्रकारितेत आणि राजकारणी मंडळींमध्ये त्यांचा दरारा फार मोठा होता. 
त्यांची सगळी पुस्तकं हा त्यांच्या दर्जेदार लेखनाचा धडधडीत पुरावाच आहेत. दमदार लिहायचे गोविंदराव. त्यामागे संशोधन आणि स्वतंत्र चिंतन असायचे.
यदिसरांच्या मुलाच्या लग्नाला ते आले होते. माधव साठेंनी त्यांना छेडलं. "काय गोविंदराव आज तुमचा चेला [अशोक जैन] तुमच्यासोबत दिसत नाही."
ते म्हणाले, तो माधव गडकर्‍यांची जागा भरून काढायला गेलाय. [माधवराव उत्तम वक्ते असल्यानं गोविंदराव त्यांच्यावर संतापून असायचे. अशोक जैन 
कुठंतरी भाषणाला गेले होते, त्याचा राग ] माझ्याकडं बघत म्हणाले, "काय तुमचे भिकेचे डोहाळे आत्ता तरी कमी झाले की नाहीत? लिहा. अहो, त्या बोलण्याचा काडीमात्र फायदा नसतो. सारं वार्‍यावर उडून जातं. नंतर पश्चाताप करीत बसाल. फार तरूण वयात तुम्हाला अभ्यासाची शिस्त मिळालीय ती अशी वाया घालवू नका."
एक प्र.के.अत्रे सोडले तर बाकी सार्‍या वक्त्यांवर त्यांची खुन्नसच होती. अत्रे गेले तेव्हा मात्र त्यांनी अग्रलेखाला शीर्षक दिलं होतं, "कडा कोसळला."
खरंच आज गोविदरावांचं जाणं म्हणजे एक डोंगर कोसळणंच आहे .......

Wednesday, March 8, 2017

मैत्रिण--

विद्यापिठात शिकत असताना वर्गात एक हुशार मुलगी होती. गरिब घरातली होती. तिची आई एकल पालक असल्याने व वडीलांनी आईला घट:स्फोट दिलेला नसल्याने अनेक कायदेशीर अडचणींना तिला सामोरं जावं लागे. उदा. फी माफी मिळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागायचा. कार्यालय वडीलांच्या नावे दाखला हवा म्हणुन तिची अडवणूक करायचे. तिने एकदा तिची समस्या मला सांगितली. मी तातडीने अधिकार्‍यांना भेटून तिची अडचण सांगितली. त्यांनी सुचवलेल्या तोडग्यानुसार स्थानिक नगरसेवक व आमदार यांची प्रमाणपत्रे जोडून तिला दाखला मिळवून दिला.
तिला येण्याजाण्याच्या प्रवासासाठी बस व रेल्वेचा खर्च परवडायचा नाही. खुपदा मी तिला माझ्या स्कूटरवरून सोडायचो.
तिला घरात मदत करायला लागायची.शिवाय काही घरगुती कामे करून ती घरखर्चाला आईला मदत करायची.त्यामुळे तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचे. मग माझ्या नोट्स ती वापरायची.
तिला एक धाकटा भाऊ होता. तोही गुणी होता. त्याचाही मी अभ्यास घ्यायचो. आधीमधी त्याला सिनेमा दाखवायचो. इतर कामात त्यांच्या आईला मदत करायचो.
छान दोस्तीचे नाते होते.
सतत आम्हाला एकत्र बघून वर्गातले काही मित्र चिडवायचे, पण त्यात काही तथ्य नव्हते.
ती नेहमी तुझी खूप मदत होते, वगैरे बोलून दाखवायची.
पुढे तिला लेक्चररची नोकरी मिळवून देण्यासाठीही माझ्या ओळखीचा उपयोग झाला. तिला नोकरी मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला बरे दिवस आले.
एक दिवशी ती रेल्वेत अचानक भेटली. तिचे लग्न चांगल्या घरी जमले म्हणून सांगू लागली. मी तिचे अभिनंदन केले आणि मुलगा काय करतो? लग्न कधी आहे? असे विचारले.
तिने तारीख सांगिेतली. त्याकाळात माझे खूप व्याख्यान दौरे असायचे, विसरायला नको म्हणुन मी डायरीत तारीख लिहून घेऊ लागलो. ती म्हणाली,काय करतोस?
म्हटलं, लग्नाची तारीख विसरायला नको म्हणून लिहून ठेवतोय.
ती तुटकपणे म्हणाली, "तू येऊ नकोस. त्याचे कायय की मी फक्त आमच्या समाजातील मंडळींनाच माझ्या लग्नाला बोलावलेय."
खरं म्हणजे तिनं कोणाला बोलवावं आणि कोणाला बोलवू नये हा संपुर्णपणे तिचा प्रश्न आणि अधिकार होता. पण तरीही एव्हढ्या वर्षांची कौटुंबिक मैत्री असल्यामुळे आणि तिच्या कुटुंबातल्या प्रत्येक अडचणीत ती मला मदतीची हाक देत असल्याने बहुधा मी तिच्या लग्नाला यावे असे तिला वाटत असणार असे मी समजलो होतो. खरंतर ही माझी चुकच होती.
मी ठिकाय म्हणालो आणि तिचा निरोप घेतला.
दरम्यान माझे लग्न ठरले. मी तिला बोलावले होते. ती आणि तिचा भाऊ दोघेही आले होते.
एकदा तिची आई एका कार्यक्रमात भेटली. संगिता काय करते असे त्यांनी विचारले? ती पुढे शिकतेय असं मी सांगितल्यावर त्या पटकन म्हणाल्या," अरे, तुम्हा लोकांना काय करायचेय पुढचे शिक्षण?"
मला वाईट वाटले. पण मी गप्प बसलो. शक्य झालं असतं तर मला त्यांना तीव्र उत्तर द्यायला आवडलं असतं. मैत्रिणीची आई असल्याने मी सहन केलं.
पुढे तिचा घटस्फोट झाला. तिची नोकरीही काही अडचणींमुळे गेली. तेव्हा तिने मला फोन केला. तिचे वडील आणि जवळचे नातेवाईक तिला मदत करीत नसल्याचे ती म्हणाली.
तिचा जिकडे नविन महाविद्यालयात इंटरव्ह्यू होता ते संस्थाचालक नेमके माझ्या ओळखीचे असल्याचे तिला समजले होते, तिला माझी चिठ्ठी हवी होती.
मी तिला चिठ्ठी दिली. त्या संस्थाचालकांना शिफारस करणारा फोनही केला. तिचे काम झाले.
त्यानंतर लवकरच तिचे दुसरे लग्नही जमले.
तेव्हा मात्र तिने तुम्हाला लग्नाला यावेच लागेल असे मला व संगिताला आग्रहाने सांगितले.
आम्ही लग्नाला गेलो, तेव्हा ती म्हणाली, "आधीचा मुलगा नात्यातलाच होता, पण त्याला वाईट सवयी होत्या. तेव्हा आता मी जातपात न बघता मला मदत करणार्‍या सर्वांना लग्नाला बोलावलेय. तसे लग्न मी जातीतच करतेय, पण तसेही जातीपातीत काय ठेवलेय नाही का? माझा आता जातीपातीवरचा विश्वासच उडालाय!

Friday, July 11, 2014

जगातील पहिल्या २०० विद्यापिठांचे निकष काय?


जगातील पहिल्या २०० विद्यापिठात एकही भारतीय विद्यापिठ नसावे आणि ५०० मध्ये आय.आय.टी, पवई आणि बंगलुरूची सायन्स इन्स्टीट्यूट या दोनच संस्था आहेत असे सांगितले जाते. त्याची भारतीयांना खंतही वाटते. प्रश्न हा आहे की, जागतिक क्रमवारी लावते कोण? त्यांचे निकष काय असतात?
 इंग्रजी भाषेतून अध्यापन करणे, संस्थेत जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थी असणे, आरक्षणाला विरोध, चकचकीत इमारती,भपका आणि डामडौल हवा, यासारखे निकष लावले जात असतील तर ते आपल्यासारख्या बहुविविधता असलेल्या गरिब देशासाठी अन्यायकारक नाहीत काय?
असे असेल तर मग गरिब कष्टकरी बहुजन, दलित-आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, महिला, इतर मागास वर्ग अशांना शिक्षण देणार्‍या आपल्या संस्था भले जगातील पहिल्या २०० किंवा ५०० मध्ये नसल्या तरी काही बिघडत नाही, कारण शिक्षणातून सामाजिक न्याय प्रस्थापित करणे महत्वाचे आहे, असे म्हणायचे की नाही? तुम्हाला काय वाटते?