Showing posts with label चरित्र. Show all posts
Showing posts with label चरित्र. Show all posts

Tuesday, August 13, 2019

’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर







’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर -प्रा.हरी नरके

विश्राम बेडेकर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा मी पुणे विद्यापीठात मराठी विभागात एम.ए.करीत होतो. त्यांचा त्यानिमित्त विभागातर्फे सत्कार करावा आणि त्यांचे भाषण ठेवावे असे आम्ही ठरवले. विभागप्रमुखांची रितसर परवानगी घेऊन मी बेडेकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. कार्यक्रम निश्चित केला.
ते आले. सत्कार घेतला,पण म्हणाले, " मी भाषण करीत नाही. आपण गप्पा मारू."
मग मी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

प्रश्न- तुम्ही रणांगणसारखी श्रेष्ठ कादंबरी लिहिलीत. आणि पुढे मात्र २०-२५ वर्षे काहीच लिहिले नाही, हे कसे?

उत्तर- मी रणांगण लिहिल्यानंतर पहिली २०-२५ वर्षे ती बरी आहे असं मला कोणीही सांगितलं नाही. म्हणून मग पु्ढे मी काहीही लिहिलं नाही. २५ वर्षांनी एक समीक्षक  म्हणाले,"तुम्ही बरं लिहिलंय, मग मी पुन्हा लिहू लागलो."

प्रश्न- "तुमच्या आत्मचरित्रात { एक झाड आणि दोन पक्षी} सगळा भवताल चित्रशैलीत येतो. पण १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल तुम्ही फारसे काही लिहित नाही, असे का?"

उत्तर-" आम्ही भित्रे मध्यमवर्गीय लोक. घराची दारं-खिडक्या लावून बसलेलो होतो त्यावेळी. मी काही बघितलेच नाही मग कसे लिहिणार १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल?"
[ बेडेकरांनी "भित्रे" या शब्दाऎवजी अतिशय कडक शब्द वापरला होता. स्वत:बद्दल इतके प्रांजळ, पारदर्शक बोलायला लागणारे धाडस त्यांच्याकडे होते.]

बेडेकरांची रणांगण पहिली २०-२५ वर्षे का गाजली नाही? तर दुसर्‍या महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी लोखंडी खाटा पुरवणार्‍या एका साहित्यप्रेमी कंत्राटदाराने पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती खरेदी केल्या. प्रत्येक खाटेमागे जखमी सैनिकांना वाचायला एक प्रत भेट म्हणुन मिल्ट्री हॉस्पीटलला दिल्या. फार कमी प्रती चोखंदळ वाचक समीक्षक यांच्या हाती पडल्या. परिणामी पहिली २०-२५ वर्षे पुस्तक जाणकारांपर्यंत पोचलेच नाही.

[मुलाखतीमधून]

- प्रा.हरी नरके, १३ ऑगष्ट २०१९