Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

Wednesday, March 11, 2020

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता-






कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता- टीम कोलाज

सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.

सावित्रीबाई फुले आद्य भारतीय शिक्षिका आहेत. जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून परिवर्तनाची चळवळ त्यांनी चालवली. देशातली मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. त्यांनीच देशातलं पहिलं साक्षरता अभियान चालवलं. फसवल्या गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. सत्यशोधक समाजाची चळवळ चालवली. स्वतःच्या घरातला हौद अस्पृश्यांसाठी खुला करून जातिनिर्मूलनाच्या कार्यक्रमाला सुरवात केली. बालविवाहांना विरोध केला. विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला. एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवलं. शिवाय त्याचं आंतरजातीय लग्न करून दिलं.

जोतिबांच्या नंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. प्लेगच्या साथीत आजाऱ्यांची सेवा केली. त्यातच त्यांचं निधन झालं. हे सारं आपल्याला माहीत असतं. पण सावित्रीबाई स्वतः उत्तम कवयित्री होत्या. त्यांनी संपादनं करून चांगलं डॉक्युमेंटेशनही करून ठेवलीय. त्यांनी एकूण पाच पुस्तकं लिहिलीत. ती अशी,

‘काव्यफुले’ या १८५४ साली प्रकाशित झालेल्या सावित्रीबाईंच्या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. सावित्रीबाईंनी त्यात निसर्गविषयक, सामाजिक, बोधपर आणि ऐतिहासिक अशा कविता आहेत.
‘जोतिबांची भाषणे’ हे पुस्तक सावित्रीबाईंनी संपादित केवंय. त्याचं संपादन चार्लस जोशी यांनी केलंय. हे पुस्तक २५ डिसेंबर १८५६ ला प्रसिध्द करण्यात आलं. त्यात जोतीरावांची चार भाषणं आहेत.

‘सावित्रीबाईंनी जोतीरावांना लिहिलेली पत्रे’ नावाचंही पुस्तक सावित्रीबाईंच्या नावाने प्रसिद्ध झालं. यात त्यांनी एकूण तीन पत्रे असून ती नायगाय आणि ओतूरहून लिहिलेली आहेत.

‘मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे’ हे पुस्तक १९८२ मधे आलं. या पुस्तकात उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने, कर्ज या विषयांवरील भाषणं आहेत. याचं संपादन शास्त्री नारो बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी केलंय. बडोद्याच्या वत्सल प्रेसने हे पुस्तक प्रकाशित केलंय.

‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या कवितासंग्रहात सावित्रीबाईंनी देशाचा इतिहास काव्यरुपाने सांगितलाय. जोतीरावांच्या कार्याचं चित्रणही त्यात केलंय. यामधे ५२ रचना आहेत. हे काव्य जोतीरावांच्या मृत्यूनंतर १८९१ मधे प्रसिद्ध झालं. १८९२ मधे ते पुस्तकरुपाने आलं.

सावित्रीबाईंचं समग्र साहित्य आज उपलब्ध आहे. त्याची नवी आवृत्ती आजच प्रसिद्ध झालीय. त्यात कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या या पाच कविता,

पेशवाई

पुढे पेशवाई तिचे राज्य आले
अनाचार देखी अती शूद्र भ्याले
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते
खुणा नाश या ढुंगणी झाप होते
स्वराज्यी स्वधर्मी परी व्याघ्र दाढी
असंतोष त्यांचा कुणाही न काढी
प्रजेला एकसारखे वागवीती
तरी शूद्र सारे स्वधर्मी रहाती
तुला बोलवी रावबाजी धनी ग
स्वपत्नीस धाडी निर्लाजा पती ग
छळे ब्राम्हणाला अशी स्रैणशाही
मुखा बोलती ही जळो पेशवाई
पहा शंकराचे लुटी पूज्य क्षेत्र
अशी माजली पेशवाई विचित्र
पुढे जाहली मूर्खसत्ता विनाश
नसे दु:ख कोणा नसे सुख आस
छळी स्त्रीस शूद्रा बहू पेशवाई
अशा कारणे इंग्रजी राज्य होई
ध्वजा इंग्रजी लाविता बाळ नातू
तया निंदता रोरवातील जंतू
मिळे इंग्रजी फूस शूद्रादिकांना
लढाई कराया जमे जाति नाना
पराभूत हो पेशवाई करुनी
तिथे आणती शूद्र आंग्लाई शहाणी

इंग्रजी माऊली
पेशवाई गेली

इंग्रजी माऊली आली
निराशेचा गर्द अंधार
नरक स्वर्गाचे भय अनिवार
न्यूनगंडाचे मनी विचार
अशा या काळी, इंग्रजी माऊली आली
दूर फेकुनि रुढी द्यारे
परंपरेची मोडून दारे
लिहीणे वाचणे शिकूण घ्यारे
छान वेळ आली.... इंग्रजी माऊली आली
भटधर्मांच्या क्लृप्त्या नाना
अज्ञानामुळे शूद्रजनांना
पिळती छळती बहु तयांना
पेशवाई मेली.... इंग्रजी माऊली आली
भटशाहीचे राज्य जळाले
शहाणे इंग्रज विजयी झाले
शूद्र जनांना हित हे ठरले
मनूस्मृती मेली.... इंग्रजी माऊली आली
शूद्र जनांना ज्ञान सावली
अतिशूद्रांची पालनवाली
इंग्रज सत्ता सुखकर झाली
भयानकता गेली.... इंग्रजी माऊली आली
देश इंडिया नाही कुणाचा
इराणी बहान यवन हुणांचा
असा खरा तो इंडिया रक्ताचा
ठोक रे आरोळी.... इंग्रजी माऊली आली

शूद्रांचे दुखणे (अनुष्टुभ)

दोन हजार वर्षांचे शूद्रा दुखणे लागले
ब्रम्हविहित सेवेचे भू-देवांनी पछाडले
अवस्था पाहुनि त्यांची होय शब्दी मन उठे
सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुध्दी अटे
शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व पशूत्व हाटते पहा

मानव आणि सृष्टी

पाऊस पडला शिवारात या निर्मल झाली सृष्टी
फळाफुलांना कडधान्यांना पोषक देई पुष्टी
झिमझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी
फळाफुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी
कोकीळ गाते कहुकहुनी मोर डोलुनी नाचे
फुलाभोवती आनंदाने फीरती भुंगे चांचे
सुंदर सृष्टी मानव सुंदर जीवन सारे
सद्भावाच्या पर्जन्याने बहरुनी टाकू 'वा'रे

       मानवी जीवन विकसूया

       भय चिंता सारी सोडुनि या
       इतरा जगवू स्वत: जगूया
मानवप्राणी निसर्गसृष्टी द्वय शिक्क्याचे
एकच असे ते म्हणुनि सृष्टीला शोभवु मानव लेणे

हेही वाचाः

आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?
शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

http://kolaj.in/published_article.php?v=Poet-Savitribai-PhuleQV7940538&fbclid=IwAR1b0-W_Mc-zct_aWIJ3x3wQM709Sd_gIs7rgEN0WrFIC7YCXWh07Dstqjo

Friday, August 16, 2019

लोकप्रियता विरूद्ध जाणत्यांची मान्यता








राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायण हे जागतिक साहित्याचे जाणते समीक्षक होते. १९४३ साली त्यांनी केरळ विद्यापीठातून सुवर्णपदक जिंकलेले होते. इंग्रजी साहित्य हा मुख्य विषय घेऊन त्यांनी ही पदवी मिळवली होती. त्यांनी याच विषयात पुढे एम.ए.ही केले होते. भारतीय विदेश सेवेत [आय.एफ.एस.] त्यांनी उच्च पदांवर काम केलेले होते. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले नारायणनसर अतिशय नम्र आणि सौजन्यशील व्यक्तीमत्त्व होते.

आम्ही पुण्याचे काही साहित्यिक मित्र त्यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. पत्रकार-संपादक श्री अरूण खोरे हे आमच्या गटाचे नेते होते. त्यांची रितसर वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटलो. आम्हाला त्यांच्या कार्यालयाने भेटीसाठी अवघा ३ मिनिटांचा वेळ दिलेला होता. प्रत्यक्षात मात्र ही भेट ५३ मिनिटे चालली. त्यांना आमच्याशी मराठी साहित्यावर भरभरून बोलायचं होतं. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयवर ते फिदा झालेले होते. त्यावर ते कितीतरी वेळ बोलले. मृत्युंजय ही माझी अतिशय आवडती कादंबरी. मराठीतली सर्वोच्च लोकप्रियता मिळालेल्या या कलाकृतीला नुकताच ज्ञानपीठ समकक्ष असलेला मुर्तीदेवी पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने त्यांनी मृत्युंजय [इंग्रजी भाषांतर] वाचलेली होती.

या कादंबरीकडे मराठी समिक्षकांनी पाठ का फिरवली या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नव्हते. ही कादंबरी १९६० च्या दशकात का गाजली यावर आम्ही बोललो. महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला ही कादंबरी आवडलेले लोक भेटतील. पण जाणत्या समिक्षकांनी मात्र तिला नाकं मुरडली.

पुढे ते मराठी कवितेकडे वळले. ते म्हणाले, "बाबुराव बागूल हे माझे सर्वाधिक आवडते कवी आहेत. त्यांच्या अलिकडच्या कविता मला सांगा."

आमच्यातले एक साहित्यिक पटकन म्हणाले, "बागूल कवी नव्हेत. ते तर कथाकार आहेत."
तेव्हा नारायणनसर म्हणाले, " काय सांगताय? बाबुराव बागूल कवी नाहीत? मग ’वेदाआधी तू होतास’ ही कविता कोणाची आहे?"

"ती कविता बाबुराव बागूलांचीच आहे," मी उत्तरलो.

तेव्हा सर म्हणाले, " मग ते कवी नाहीत असे ह्यांनी का म्हटले?" त्यावर आमचा हा साहित्यिक मित्र निरूत्तर झाला.

नारायणन म्हणाले, "कवितांच्या संख्येवरून गुणवत्ता ठरत नाही. भले एकच कविता असेल पण ती जर श्रेष्ठ असेल तरी तो महान कवी आहे असे मी मानतो."


क्रमश:[१]

प्रा.हरी नरके, १६ ऑगष्ट २०१९

Monday, October 8, 2018

कविंची थोरवी-



१. रवी एकदा आजारी पडला. त्याचे मोठे ऑपरेशन करावे लागले. ते फसले. रवीची प्रकृती वेगाने ढासळू लागली. डॉक्टरांनी रवीच्या पत्नीला बोलावून घेतले. म्हणाले, मनाची तयारी करा. नातेवाईकांना बोलाऊन घ्या. तुमच्या हातात फक्त चार तास आहेत.
बाई म्हणाल्या, आमचा मुलगा अमेरिकेत असतो. तो वडलांना भेटायला निघालाय पण त्याला इथे पोचायला किमान आठदहा तास तरी लागतील. तुम्ही काहीही करा, पण यांना किमान आठदहा तास तरी जगवा. मुलाची शेवटची भेट घेऊ द्या.
डॉक्टर म्हणाले, ते शक्य नाही.
तिथे रवीचा एक मित्र उभा होता. तो मोठा कवी होता. तो म्हणाला, वहिनी, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी करतो काहीतरी आयडीया.
तो रवीकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलेले वास्तव त्याने त्याला सांगून टाकले. वर म्हणाला, मित्रा, तू आता जाणार. मग तुझ्या कविता आम्हाला कोण ऎकवणार?  असं करू या. तू कविता म्हणत म्हणत जा. ही घे तुझी कवितेची वही.
रविला कविता म्हणत म्हणत जगाचा निरोप घेण्याची कल्पना फारच आवडली.
तो कविता म्हणू लागला. कवीमित्र कविता ऎकत, दाद देऊ लागला.
मुलगा धावत धावत दवाखाण्यात पोचला.
आई म्हणाली, बेटा, घाई कर. बाबांशी शेवटचे दोन शब्द बोलून घे. तुझ्या वडीलांकडे वेळ फार कमी आहे.

मुलगा १२० च्या स्पीडने वडीलांच्या रूममध्ये घुसला. बघतो तर काय वडील कविता म्हणत होते. ऎकणारा त्यांचा कविमित्र मात्र मरून पडला होता.
[हरी शंकर परसाई यांची कथा]

२. एका कविसंमेलनाला केंद्रीय मंत्री श्री अंबादास राठवले या स्वत:ला कवी समजणार्‍या नेत्यांना बोलावलेले होते. ते नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे उशीरा पोचले. बघतात तो काय, थिएटर हाऊसफुल्ल. स्टेजवर कवी मात्र एकच.
त्यांनी संयोजकांना विचारले, असे कसे झाले?
एकच कवी? नाही, मी आहे म्हणा. पण, ...
संयोजक म्हणाले, असं नाहीये. आम्ही बैठक व्यवस्थेत थोडा बदल केलाय.
श्रोत्याला स्टेजवर बसवलय.
थिएटरमध्ये बसलेले सगळे कवी आहेत. ते म्हणतात, मंत्रीमहोदय जर कवी असतील तर आम्ही महाकवी आहोत.

३. रस्त्यावर एकजण ओरडत होता. पकडा, पकडा.
पुढे पळणार्‍या एकाला गर्दीने शिताफीनं पकडलं.
तोवर धापा टाकत टाकत मागचा तिथं पोचला.
लोकांनी त्याला विचारलं, काय चोरलं या भामट्याने?
तो म्हण्ला लेकाच्याने स्वत:ची कविता मला ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता.

४. नोएंट्रीतून जाणार्‍या एकाला ट्रॅफिक हवालदारानं पकडलं.
दंडाची पावती फाडली.
तो म्हणाला, मी दंड भरणार नाही. मला या जगाचे नियम लागू होत नाहीत. मी कवी आहे.
आणि शिवाय नोएंट्रीचा बोर्ड मला दिसला नाही.
हवालदार म्हणाला, बोर्डची गरजच काय? जे न देखे रवी ते देखे कवी. कविवर्य,  काढा पाचशे रूपये!

[ ऎकलेले- वाचलेले- सुचलेले- फॉरवर्ड आलेले ]
-प्रा. हरी नरके, ७ आक्टोबर २०१८

Wednesday, October 3, 2018

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पहिली बाजू आणि दुसरी बाजू









पहिली बाजू- श्रेष्ठ कवी दिनकर मनवरांची वादग्रस्त कविता आणि 'दृश्य नसलेल्या दृश्यात' हा कवितासंग्रह दर्जेदार आहे. हा कवितासंग्रह अभ्यासक्रमात असल्यामुळे समकालीन समृद्ध वाड्मयीन आकलनाला बळ मिळते. सदर कवितासंग्रह अभ्यासक्रमातून काढा, त्यांच्या या कवितासंग्रहावर बंदी घाला अशी मागणी गैर आहे. मनवर यांच्या या संग्रहातली ती एकच ओळ मूळ कवितेतून तोडून काढून त्यावर हल्ला करणं साहित्य संस्कृतीच्या निकोप वाढीला घातक आहे. समाजाच्या भावना दुखावल्या ही तक्रार मला निव्वळ राजकीय वाटते. हे अस्मितांचे राजकारण आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल.

मुंबई विद्यापीठाच्या ज्या अभ्यास मंडळाने हे पुस्तक अभ्यासक्रमाला लावले होते त्यांनीच एकमताने निमूटपणे त्यातली ही कविता अभ्यासक्रमातून रद्दही केली.
ही कविता असलेला हा संग्रह विद्यापिठीय पाठ्यपुस्तक म्हणून टीवायबीएच्या अभ्यासक्रमाला लावण्याला श्रमजिवी संघटना आणि आदीवासींच्या अनेक संघटनांनी विरोध केला होता.

दुसरी बाजू- ही कविता वर्गात शिकवणारी प्राध्यापिका एक तरूण आदीवासी स्त्री असेल तर तिला ही कविता वर्गातील १०० युवकयुवतींपुढे वाचून दाखवताना काय वाटेल?
त्या वर्गात असलेल्या कोवळ्या वयाच्या तरूण आदीवासी मुलींना काय वाटेल? त्यांच्या शेजारी वर्गात बसणार्‍या इतर मित्रमैत्रिणींना काय वाटेल? याचा विचार अभ्यास मंडळाने केला होता काय? शेरे-ताशेरेंने भरलेले बुणगे हा विचार कुठून करणार म्हणा?

अगदी शिकणार्‍या, शिकवणारात कोणीही आदीवासी नसले तरी कोणत्याही समाजाच्या स्त्री प्राध्यापकांना ही कविता मोकळेपणाने भर वर्गात वाचता येईल काय? शिकवता येईल काय?
वर्गात त्यांना ही कविता शिकताना, शिकवताना लज्जा वाटणार नाही एव्हढा आपला समाज प्रगल्भ झालाय काय? आपला समाज खुला, निरामय नाही. लिंगभावाची ही निकोपता आपल्यात नसल्याने एखाद्या पुरूष प्राध्यापकाने वर्गात कवितेची ही ओळ वाचताना माझ्याकडे सहेतूक बघितले अशी तक्रार दाखल झाली तर त्या पुरूष प्राध्यापकावर काय बिलामत ओढवेल हेही समजून घ्या.

स्त्री ही कोणत्याही समाजाची असली तरी ती माणूस म्हणून आदरणीयच आहे. इथे कोणत्या समाजाची स्त्री आहे हा मुद्दा महत्वाचा नाही. स्त्री आहे हा मुद्दा महत्वाचा आहे.

या आदीवासी शब्दाच्या जागी समजा मराठा, ब्राह्मण, माळी, बौद्ध किंवा अन्य कोणत्याही समाजाचा उल्लेख असता तरीही शिकवताना अडचण आलीच असती.

टीवायबीएचा वर्ग म्हणजे वयोगट २० वर्षाचा. या तरूण वयात शारिरिक कुतूहल जागृत होऊन मुलंमुली नाजूक स्थितीतून जात असतात. या गोंधळलेल्या वयात भर वर्गात स्त्रीच्या खाजगी अवयवाचा हा उल्लेख करणे मस्ट आहे?

कवीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे.
लोकशाहीत वयोगट, अभ्यासक्रम, क्लासरूम आणि स्त्रीसुलभभावना हे सारे पुस्तक अभ्यासक्रमाला लावताना विचारात घेतले असते तर अभ्यास मंडळावर ही नामुष्की ऒढवली नसती. ही असली भुरटी आणि बिनकण्याची अभ्यास मंडळे काय कामाची?
-प्रा.हरी नरके, ३ आक्टोबर २०१८

Thursday, August 23, 2018

महाकवी आणि माणूस विंदा करंदीकर






ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित कवी विंदा करंदीकरांच्या जन्मशताब्दीची आज सांगता होत आहे.
भाऊंना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे हा अतिशय बहारदार अनुभव असायचा. श्रेष्ठ कवी आणि कोकणी माणूस म्हणून ते भारीच होते.

एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, "हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी मी बोललोय तो येतो म्हणालाय. तुही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना?"
मी होकार दिला.
कार्यक्रम झकास झाला.

भाऊंनी संयोजकांना स्टेजवर बोलावले, म्हणाले," चला, व्यवहाराचे उरकून टाका."

संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हाला तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात 700 रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, "मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते."

आम्हाला दोघांना भाऊ म्हणाले, "अरे तुमचीही पाकीटे उघडून बघा."

पण दयाकाका म्हणाले, "भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?"

संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले,"माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली."

आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली. दयाकाकांच्या पाकीटात 200 रूपये होते आणि माझ्या शंभर.

भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. आत्ताच्या आत्ता पुर्तता करा आणि हो, टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला."

भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, "तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा."


दुसर्‍या दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भुकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये. त्यांना सी.एम.ना भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.

मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बसने आले. आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकार चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, " धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अंत्यंत मचूळ असतो. माझी चव मला बिघडवून घ्यायची नाही. आता मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका."

अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती.

आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, "भाऊ, इथला चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?"

भाऊ म्हणाले, "असं म्हणतोस. चल घेऊया. मलाही तल्लफ आलीय. पण एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो."

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग.

त्या तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्याकाळात फार गाजत होता.
कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा एका साखर कारखान्याचे निमंत्रण आले.
स्वत: एम.डी. आले होते निमंत्रण घेऊन.

त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्यांनी त्यांच्या हातात 27 अटींचा कागद सोपवला. पुढच्या वेळी येताना फोन करून वेळ घेऊनच यायला बजावले.
लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम.डी. आले.
परत कविवर्यांनी त्यांना दारातूनच कटवले.

एम.डीं.नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन नामांकित तथा बेरकी राजकारणी होते. त्यांनी 27 नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. स्टेशनवर घ्यायला ए.सी. मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली. राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली.
कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपुर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम.डी. आणि चेयरमन दोघेच.
कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन  म्हणाले, "तुमच्या 27 अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील."

स्वत:ची चूक व्यवस्थापक कविवर्यांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला ते तयार नव्हते.

भाऊ चेअरमनना म्हणाले, "मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो."
चेअरमन म्हणाले, "अहो, आमचा माणूस 400 किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणुसघाणेपणा?"

व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चुक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.

चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, "मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज."

5 मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापणाची जबाबदारी मात्र भाऊंनी स्वत:कडे घेतली.
Reposted
-प्रा.हरी नरके

Monday, April 3, 2017

4 भिंतींचं घर मी एकटी चालवते

"असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती
माझी आई म्हणते, 4 भिंतींचं घर मी एकटी चालवते!"
-- भीमराव गोपनारायण
माझे कविमित्र भीमराव गोपनारायण यांचा "सर्वा" हा कवितासंग्रह गाजलेला आहे. हे विदर्भातल्या अकोल्याकडचे कवी राज्य परिवहन [एस.टी.] मध्ये वाहक [ कंडक्टर ]म्हणुन काम करतात आणि अतिशय दमदार कविता करतात.
मराठीतलं कवितेचं दालन अतिशय समृद्ध आहे. हाल, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम ते केशवसुत, मर्ढेकर, कोलटकर, चित्रे, ढसाळ,महानोर,
आणि इतर अनेक ही मराठी कवितेच्या सह्याद्रीची उत्तुंग शिखरं आहेत.
मराठीला चार ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. त्यातले कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे हे तीन कवी. खांडेकरांनी कविता लिहिली की नाही ते मला माहित नाही, मात्र त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितासंग्रहाला उत्तम प्रस्तावना लिहिलीय.
नारायण सुर्वेंना कालिदास सन्मान मिळालाय. बालकवी, मुक्तीबोध, माधव ज्युलियन, यशवंत, रेगे, बी, अनिल, राय किणीकर, बहिणाबाई, बी.रघुनाथ, ना.वा.टिळक, बा.भ. बोरकर, इंदिरा संत, शांताबाई, मेश्राम, भट, मनोहर, डहाके, तुलसी परब, अरूण काळे, भुजंग मेश्राम, लोकनाथ यशवंत,आरती प्रभू, [चिं. त्र्यं. खानोलकर] यांचे असंख्य चाहते आहेत. पाडगावकर, बापट आणि विंदांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम तुफान लोकप्रिय होते. माडगूळकरांच्या गीतरामायणानं असंख्य लोकांची मनं जिंकली होती. आजही अशोक नायगावकर, अजिम नावाज राही, प्रकाश होळकर,संजय चौधरी, कल्पना दुधाळ, नारायण सुमंत, भरत दौंडकर, व्रजेश सोळंकी, उत्तम कोळगावकर, आसावरी काकडे, संतोष पवार, प्रकाश घोडके, अरूण म्हात्रे, सौमित्र, नीरजा, अनुराधा पाटील, फ.मु., फुटाणे, प्रभा गणोरकर, विठ्ठल वाघ, इंद्रजित भालेराव, संदीप खरे, चंद्रशेखर गोखले, अजय कांडर, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, हेमंत दिवटे, श्रीधर तिळवे आदी कवी लोकप्रिय आहेत.
सकस कविता मोठ्या प्रमाणात लिहिली जात असली तरी फुटकळ आणि टाकावू कवितेचं पिकही जोरदार असतं. महाराष्ट्रात बाकी कशाचाही दुष्काळ पडेल पण कवितेचा? छे. केवळ अशक्य.12 कोटी मराठी माणसांमध्ये किमान सव्वाएक कोटी तरी कवी असतीलच.
राज्यात एव्हढे सव्वाएक कोटी कवी तरी कवितासंग्रह म्हणे खपत नाहीत. याचा अर्थ हे कवी आपल्याला ऎकवतात पण इतरांचं विकत घेऊन वाचत नसणार !
कवितासंग्रह आग्रह करूकरू विकत घ्यायला लावणारा कविताप्रेमी एकच माणूस संजय भास्कर जोशी.
तर कवीकुळामध्ये बाबा आदमच्या काळापासून लोकप्रिय असलेल्या या काही वर्ल्डफेमस दंतकथा --
*1.एकदा रस्त्यात पकडा,पकडा असा जोरदार आरडाओरडा झाला. एक जण जीव खाऊन पळत होता, रस्त्यातल्या लोकांनी त्याला पकडलं. " काय रे, चोर्‍या करणं शोभतं का? काय चोरलंस बोल?"
तो म्हणाला, "अहो, मी काहीही चोरलेलं नाही."
"मग तो मागचा दाढीवाला का पकडा पकडा असं जीवखाऊन बोंबलतोय?"
इतक्यात धापा टाकत टाकत दाढीवालेच पोचले. ते म्हणाले, " मी सुप्रसिद्ध कवी महेश केळुस्कर, आकाशवाणीवरून मी माझ्या कविता ऎकवतो. त्या इतक्या मौलिक असतात की ट्रान्झीस्टर, झालंच तर घरातले मोठे रेडीओ अशा सर्वांवरून त्या ऎकता येतात. आज अख्ख्या होल इंडीयात रामदास आठवले सोडले तर माझ्या तोडीचा दुसरा कवी आढळणार नाही. माझ्या कविता संग्रहावर महासवलत योजना चालूय. एक घेतला तर नऊ मोफत.
कविता आवडल्या तर पैसे परत. मला काव्यवाचनाला बोलावणारांना हापूस आंब्याच्या पाच पेट्या भेट देणार शिवाय कौल या चित्रपटाचे दहा पासेस फ्री. कोणालाही आकाशवाणीत बोलावताना माझ्या कविता ऎकण्याची मी अटच घालतो. याला तसाच गळाला लावला होता. मी काय उगीच असिस्टंट डायरेक्टर आहे आकाशवाणीत?
यानं माझं काही चोरलं नाही. पण स्वत:ची कविता ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता !
पकडलेला म्हणाला, " यांची थुकरट कविता ऎकण्यापेक्षा मला पोलीसात द्या, तुरूंगात गेलेलं परवडलं !"
*2. बालगंधर्व नाट्यमंदीरात एक कवीसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. मंत्री कार्यक्रमाला उशीरा पोचले, बघतात तो काय स्टेजवर अवघा एकच कवी. खाली थिएटर हाऊसफुल्ल. ते संयोजकांना म्हणाले, "काय चुकलं, एकच कवी कसा आलाय? इतर का आले नाहीत?"
संयोजक म्हणाले, "सर आलेत ना सगळे. त्याचं कायय की कार्यक्रमाची बातमी वाचून कवीमंडळींनी एव्हढी गर्दी केली की मग आम्हाला आसन व्यवस्थेत बदल करावा लागला. कवींना सभागृहात बसवलंय. वर बसलाय तो रसिक श्रोता आहे."
*3. अलका सिनेमागृहाजवळ लकडी पुल आहे. तिकडे एक महिला पुलावरून नदीत उडी मारीत होती. तिला जिव देताना पोलीसांनी व जागृक पुणेकर नागरिकांनी वाचवलं.
"बाई, का जीव देताय," असं विचारलं, ती म्हणाली, "काय करू? नवरा कवी आहे. मुडदा मला सिनेमा दाखवायला म्हणुन घेऊन आला आणि सिनेमा सुटल्याबरोबर त्याच्या कविता ऎकवायला लागला. मला सांगा सलमान खानचा सिनेमा बघितल्यानंतर असल्या भिकार कविता ऎकण्यापेक्षा जीव दिलेला काय वाईट?"
नवरा म्हणाला, "माझ्या कविता ऎकायला नाही म्हणते म्हणजे ही देशद्रोही नाही का? जिथं माझ्या कवितांची नक्कल थेट आकाशवाणीत महेश केळुस्कर आणि रामदास आठवले मारतात, त्या कवितांना वाईट म्हटलेलं मी कसं चालवून घेईन? ती उडी मारीत होती म्हणून बरं नाही तर मीच ढकलली असती. आता देवेन भाऊंना सांगून मी गोवंशाबरोबरच कवीवंशाच्या रक्षणाचा कायदाच करून घेणार आहे."
*4.एकदा एक कवी हार्ट अ‍ॅटॅक आल्यानं आय.सी.यु.मध्ये अ‍ॅडमिट होते. तब्येत अतिशय सिरियस होती. डाक्टरांनी कवीच्या पत्नीला बोलावलं, म्हणाले, "सर्व नातेवाईकांना बोलावून घ्या. मनाची तयारी करा. जास्तीतजास्त दोन ते तीन तास आहेत तुमच्या हातात."
पत्नी म्हणाली, "डाक्टर काहीही करा,पण यांना किमान 12 तास जगवा. आमचा मुलगा यु.एस.ला असतो. तो निघालाय. 12 तासात दवाखान्यात पोचेल. निदान शेवटची भेट व्हायला हवी."
डाक्टर म्हणाले, "शक्य नाही. कितीही प्रयत्न केले तरी 12 तास शक्यच नाही."
कवीचा मित्र शेजारी उभा होता. तो म्हणाला, " वहीनी, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्याकडं मस्त आयडीया आहे. मी करतो 12 तासांची व्यवस्था."
मित्र कवीकडं गेला. म्हणाला, "दोस्ता, डाक्टरांनी सगळी आवराअवर करायला सांगितलीय. अरे तू जाणार आता. तू गेल्यावर तुझ्या कविता कोण ऎकविल आम्हाला? हे बघ, कवी जर कविता म्हणता म्हणता गेला तर त्याच्याएव्हढं भारी दुसरं काहीच नाही. ही घे तुझी वही, कर सुरू."
कवी कविता म्हणु लागला...कवी कविता सादर करीत राहिला... कवी कविता...
मुलगा विमानतळावरून धावत धावत दवाखान्यात पोचला. आई त्याला वडीलांच्या खोलीत घेऊन गेली. मुलानं बघितलं, वडील कविता म्हणत होते, कविता ऎकताऎकता त्यांचा मित्र मात्र मरून पडला होता.
*5. रेल्वेनं प्रवास करणारे शेजारी बसलेले 2 प्रवासी एकमेकांची ओळख करून घेत होते. पहिला म्हणाला, "मी कवी आहे."
तेव्हा दुसरा म्हणाला, " मी ठार बहिरा आहे."