Showing posts with label सामाजिक चळवळी. Show all posts
Showing posts with label सामाजिक चळवळी. Show all posts

Tuesday, July 7, 2020

नामांतर आंदोलनातले वयाच्या विशीच्या आतले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध  करण्यासाठी मराठवाड्यात भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित होती. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळण्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा/देशाचा बनला. मी त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये सहभागी होऊ लागलो. लॉन्ग मार्च मध्येही मी सामील होतो. तेव्हापासून माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली.

त्यापुर्वी महाराष्ट्रात शिक्षकांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप झाला होता. तेव्हा मी " पुणे दर्शन" हा २०० पृष्ठांचा प्रबंध लिहित होतो. पुढे १९८० साली गुजरातमध्ये राखीव जागा विरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या " दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, सुनंदन, वर्षा, वंदना, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही दर्पणचं काम करायचो. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर अभिरूप न्यायालय नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही प्रत्येकजण त्या त्या शाळेत प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर वादविवाद/ चर्चा करायचो.

तेव्हा आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची.


कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. १९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्य बाजूने बोललो. आम्ही अधिक पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. जाणत्यांना ते आजही बघता येतील. मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती नामक झोपडपट्टीत राहात होतो. तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा किर्लोस्कर मासिकात लिहिलेले होते. इतक्या लहान वयात एव्हढे उद्योग आम्ही कसे करीत असू याचेच आज मला नवल वाटते.


१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने माझे बरेच तुरूंग बघून झाले.)


बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि वकीली बाण्याचे. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी २२ दिवस तुरुंगात ठेवले. हे २२ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक श्रीमंतीचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर हा मुंबईचा ग्रुप माझा दोस्त झाला.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी लेखाच्या सुरूवातीला ज्यांचा उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षि, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.


या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. होय माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. (भाग - १ ला, क्रमश:)



- प्रा. हरी नरके,
७/७/२०२०

संदर्भासाठी पाह- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१







Monday, March 9, 2020

१२४ वा स्मृतीदिन - शहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा - प्रा. हरी नरके






१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे...........




जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्शक शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला अपघाती निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड

१८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. मुंबईत यावर्षी झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शांतता प्रस्थापनेचे काम केले. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.

* २५ डिसेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले.

* १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली.
त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले.

* १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. जगवली. स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेऊखाऊ घातलं.

* ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपन, मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला.

जोतिरावांच्या मृत्यूनंतर स्वत: सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आधुनिक भारताच्या इतिहासातली अशी ही बहुधा पहिलीच घटना असावी.

सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री आणि शिक्षणतज्ञही होत्या. त्यांचा काव्यफुले हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. त्यात पर्यावरण जागृती, शिक्षणाचे महत्व,
निसर्ग आणि माणसाचे नाते, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्त्रीपुरूष समता अशा विषयांवरच्या मौलिक कविता आहेत.

त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणारे कृतीशील शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणातला गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय सुचवले व ते अंमलात आणले.

स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, संवाद, वादविवाद, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. आधुनिक भारताचा स्त्रीपुरूष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात त्यांनी केली.
आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना उर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते.

- प्रा. हरी नरके, १ मार्च, २०२०

संदर्भ-
प्रा. हरी नरके, सावित्रीबाई फुले चरित्र, नागानालंदा प्रकाशन, इस्लामपूर, २००५
प्रा.हरी नरके, [ संपा.] सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले गौरवग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८



[लेखक सावित्रीबाईंचे चरित्रकार असून त्यांनी महात्मा फुले समग्र वाड्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय यांचे संपादन केलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख व प्राध्यापक राहिले असून त्यांनी राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ समितीचे सचिव म्हणून [१९९० ते २०१८] काम केलेले आहे.]







Thursday, April 11, 2019

बहुजन समाज कृतघ्न आहे काय?




महात्मा जोतीराव फुले शेतकरी, व्यापारी, ग्रंथप्रकाशक, ग्रंथविक्रेते, आयुक्त आणि एका मोठ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. सचोटीने, अपार मेहनतीने आणि रात्रंदिन काम करून त्यांनी संपत्तीची निर्मिती केली. ती सगळी संपत्ती त्यांनी वंचित, दलित, बहुजन आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी खर्चून टाकली. त्यांना पक्षाघाताचा [ पॅरलिसिस ] आजार झाला तेव्हा त्यांच्याकडे औषधपाण्यालाही पैसे नव्हते. डॉ. विश्राम रामजी घोले आणि भवाळकर या मित्रांनी त्यांना थोडीफार मदत केली. मामा परमानंद यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना वैद्यकीय मदतीसाठी आवाहन केले. महाराज परदेशात असल्याने मदत यायला उशीर झाला, तोवर औषधपाण्याविना २८ नोव्हेंबर १८९० ला जोतीरावांचे निधन झालेले होते.

त्यांनी ब्राह्मण विधवेच्या दत्तक घेतलेल्या मुलाला डॉक्टर केलेले होते.

त्याने पुढे सैन्यात देशविदेशात नोकरी केली. १८९७ च्या प्लेगच्या साथीत रूग्णांना मदत करीत असताना प्लेग होऊन सावित्रीबाई  १० मार्च १८९७ ला गेल्या. डॉ. यशवंतही १९०५ सालच्या प्लेगच्या साथीत काम करताना गेला.

त्याच्या मुलीकडे आणि पत्नीकडे उदरनिर्वाहासाठी काहीही नसल्याने त्यांनी जोतीराव- सावित्रीबाईंची पुस्तके रद्दीत विकली. दागिने आणि भांडीकुंडी विकून संपली. शेवटी त्यांनी जोतीराव- सावित्रीबाईं घर शंभर रूपयांना विकले. दोघीजणी खडकमाळ आळीच्या फूटपाथवर राहू लागल्या. पुढे मुलीचे एका सापत्य विधूराशी लग्न झाले. सून मात्र रामेश्वराच्या दारात भिक मागुन जगत होती. १९३३ मध्ये ती गेली तेव्हा पुणे नगरपालिकेने तिचा बेवारस म्हणून अंत्यविधी केला.

त्याकाळात सत्यशोधक चळवळ जेधे जवळकरांच्या ताब्यात होती. केशवराव जेधे कोट्याधिश होते. त्यांच्या जेधे मॅन्शन या भव्य वाड्यापासून हाकेच्या अंतरावर जोतीराव- सावित्रीबाईंची सून भिक मागून जगली आणि फूटपाथवर बेवारस म्हणून मेली तेव्हा कोणीही मदतीला आले नाही. त्यावेळी अनेक बहुजन श्रीमंत होते पण त्यांच्याकडे दानत नव्हती. तशी ती आजही नाही. निवडणुकीवर आणि धार्मिक कार्यांवर कोट्यावधी रूपये सहज उधळणारे बहुजन लोक सामाजिक कामासाठी दमडीही खर्चायला पुढे येत नाहीत.


जोतीराव फुले "पुणा कमर्शियल ॲण्ड कॉट्रक्टींग कंपनी"चे मॅनेजिंग डायरेक्टर होते. कंपनीने बोगदे, पूल, इमारती, राजवाडे, धरणं, कॅनाल, रस्ते बांधले. बांधकामांसाठी वाळू, खडी, चुना पुरवला. पुस्तकप्रकाशन व विक्री केली. भाजीपाला पुण्याहून मुंबईला पाठवून विकला. सोन्याचे दागिने बनवण्याच्या मुशी [मोल्ड्स] विकल्या. अनंत व्यवसाय यशस्वीपणे केले. मुबलक संपत्ती कमावली. पण ती सगळीच मुलींच्या शाळा, वसतीगृहे, विधवांसाठीचे बालहत्त्या प्रतिबंधक गृह, शेतकरी, दलित-वंचित-बहुजनांवर खर्च केली.

स्वत:साठी पैसुद्धा शिल्लक ठेवली नाही.

ज्यांच्यासाठी ते आयुष्यभर झटले, राबले त्या बहुजनसमाजाला जोतीरावांना औषधोपचारांसाठी मदत करावी असे का बरे वाटले नाही? त्यांच्या सुनेला मदत करायची दानत जेधे-जवळकरांमध्ये का नव्हती? बहुजन समाजाला कृतघ्नतेचा शाप आहे काय? वंचित बहुजन समाज कृतज्ञता बुद्धीला पारखा झालेला आहे काय?

-प्रा.हरी नरके, ११ एप्रिल २०१९

Sunday, November 11, 2018

प्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचे विद्यमान सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस अचानक नी अकाली गेले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी आत्ताच एका मित्राने दिली. खूप सारी वेदना आणि हळहळ वाटली. एक मस्त दोस्त असा मधेच निघून गेला.
अविनाश हा हसतमुख, सौजन्यशील आणि जगमित्र माणूस होता. त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली म्हणुन अलिकडेच मित्रमंडळीने त्यांचा एक गौरवग्रंथ प्रकाशित केला होता. नुकतेच भेटलो तेव्हा त्यांनी जेवायचा खूप आग्रह केला. माझे जेवन झालेले होते. तरीही केवळ अविनाशच्या अतिव आग्रहापोटी त्याच्याच ताटात मी परत थोडं जेवलो. आमचे दोघांचे कार्यालय एकच असल्याने आम्ही नियमितपणे भेटत असू. मनमुराद गप्पांची मैफिल सजत असे. आंबेडकरी चळवळीत आयुष्य गेलेला अविनाश तसा अनाग्रही आणि सौम्य प्रकृतीचा होता. ३० वर्षांपुर्वी माझे महात्मा फुल्यांवरचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा अविनाशचे पत्र आले. औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलेलो असताना अविनाश येऊन भेटला. त्याच्या स्कूटरवर मागे बसवून त्याच्या महाविद्यालयात मला घेऊन गेला. त्याने तिथे माझे भाषण आयोजित केलेले. त्यानंतर मला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याचा पाहुणचार, अगत्य आणि दोस्ताना कायमचा होऊन गेला. अनेकदा भेटीगाठी होत. मालेगावच्या मित्रांनी एकदा आम्हा दोघांची एकत्रित भाषणे ठेवली होती. खूप गर्दी होती. एका शाळेच्या मैदानावर कार्यक्रम होता. तो वहिनींना घेऊन आला होता. खूप मनापासून बोलला तो. त्याचे भाषण ऎन रंगात आलेले असताना संयोजकांनी भाषण आवरते घ्या अशी त्याला चिठ्ठी दिली. अविनाश तसा कधीही न रागावणारा पण त्या चिठ्ठीने तो भडकला. संयोजकांचीही चूकच झालेली होती. त्यात त्यांचा आगाऊपणा म्हणजे " फार वेळ झालाय, आम्हाला अजून हरी नरकेंचे भाषण ऎकायचेय" असे म्हणे त्यांनी चिठ्ठीत लिहिलेले. " मग मला कशाला बोलावले?" असे अविनाशने त्यांना झापले. गेली आठ नऊ वर्षे अविनाश डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीचा सदस्य सचिव म्हणून काम बघत होता. प्रा.दत्ता भगत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर अविनाशला नेमावे यासाठी मी सचिवांकडे शिफारस केली.आग्रह धरून पाठपुरावा केला. आमचे अधिकारी मित्र शुद्धोधन आहेर यांनी शासनादेश काढण्यासाठी खूप मदत केली. तेव्हा आमचे कार्यालय मंत्रालयासमोरच्या बॅरॅक्समध्ये होते. कार्यालयाचे नूतनीकरण चालू असताना अविनाशने त्याच्या केबिनसाठी दुप्पटीहून जास्त जागा घेतली. माझ्या केबिनमध्ये जेमतेम दोन खुर्च्या बसतील एव्हढीच जागा ठेवली. मी त्याला विचारायला गेलो तर अविनाश असा पठठ्या की मला म्हणाला, "अरे तो इंजिनियर मूर्ख होता. त्याला मी बोललो होतो की माझी [ म्हणजे अविनाशची ] केबिन आणखी मोठी कर. माझ्याकडे कार्यकर्ते येतात. तर त्या गाढवाने तुझीच केबिन मोठी करून ठेवली." मी रागवायचे विसरलो आणि हसू लागलो. अविनाश श्री. प्रकाश आंबेडकरांचा विश्वासू सहकारी होता. मा. बाळासाहेबांचा तो निस्सिम भक्त होता. तेव्हढा विषय आला की त्याचे विचार करायचे इंद्रीय तो बंद करायचा आणि निष्ठावंत अनुयायी या भुमिकेत जायचा. तो बाळसाहेबांच्या प्रत्येकच कृतीचे समर्थन करायचा. एरवी चिकित्सक असलेला अविनाश बाळासाहेबांच्या बाबतीत मात्र फक्त "भक्त" असायचा. दत्ता भगतसर, शुद्धोधन, संजू हिंगे आणि मी २०१० साली बाबासाहेबांचा फोटो आल्बम प्रकाशित केला. तो सिंगापूरहून छापून आणलेला होता. त्याच्या दहा हजार प्रती एका आठवड्यात संपल्या. खूप कौतुक झाले. अर्थात नेहमीप्रमाणे काही विघ्नसंतोषी लोकांनी चढ्या सूरात थातूरमातूर मुद्दे काढून विरोधी कोल्हेकुई केलीच. ही खेकडावृत्तीच चळवळीची कायम हानी करीत आलीय. अविनाशने या खंडाची अलिकडेच सुधारित आवृत्ती काढली. संशोधनाची शिस्त धाब्यावर बसवून त्याने पहिल्या आवृत्तीच्या आम्हा सर्वांचीच नावे गाळून टाकली. वाईट वाटले. चळवळीतही टोकाचा अविश्वास, असूया आणि जातीयवाद आहे. अविनाश कधीही तसा नव्हता. पण त्याच्यावर त्याच्या सहकार्‍यांचा, नेत्यांचा दबाव असेल. मी त्यानंतर अनेकदा भेटलो,पण त्याने तो विषय टाळला. मीही स्वत:हून त्या अप्रिय विषयावर बोलणे टाळले. बाकी आमच्या गप्पा होत राहिल्या. आमच्या दोस्तान्यात अंतर पडले नाही. आणि आज अविनाश असा तडकाफडकी निघून गेला. अविनाश, मित्रा असे अचानक नी अकाली जाणे हे मात्र तुझे चुकलेच. प्रा. हरी नरके, ११ नोव्हेंबर २०१८

Friday, July 27, 2018

पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण-





या देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी जी विषयपत्रिका ठरवतात, ती सामान्य माणसांच्या गळी उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. कितीही वेळा ते पराभूत झाले तरी चिवटपणाने लढत राहतात. थोडीशी फट दिसली की लगेच आपला अजेंडा [मुद्दा] पुढे सरकवतात. आता पुन्हा आले दिल्लीकरांच्या मना आणि सुत्रांच्या नावे एक पिल्लू सोडण्यात आले. लगेच पुन्हा एकदा आर्थिक निकषांवरील आरक्षणाचे दळण माध्यमांनी सुरू केले.
आधी त्याबाबतची वस्तुस्थिती तरी समजावून घेऊया.

1. आधुनिक चाणक्य पं.प्र. नरसिंहराव यांच्या सरकारने मंडल आयोगाविरूद्ध पेटविण्यात आलेला दंगा आटोक्यात आणण्यासाठी एक खेळी केली. 25 सप्टेंबर 1991 रोजी त्यांनी आर्थिक निकषांवर 10% आरक्षण घोषित केले. सवर्ण समाजातील सर्व गरिबांना ते मिळणार होते.

मात्र 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते. [इंद्र साहनी वि. भारत सरकार, म्हणजेच मंडल आयोगाची केस.]

2. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे केस लॉ असतो.  तो रद्द करण्यासाठी घटना दुरूस्तीच करावी लागते. आता तो पर्याय सुचवला जातो आहे.

मात्र अशी घटना दुरुस्ती केली तर ती ही घटनाबाह्य ठरेल व ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे त्या बेंचमध्ये असलेले न्या.पी.बी.सावंत यांनी लिहिले आहे.
[ पाहा- प्रा. अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर, 2009, प्रस्तावना, पृ. 10 ते 12]

न्या.सावंत म्हणतात, "विद्यमान आरक्षण हे जात, जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची आहे म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे. व्यक्ती म्हणून दिलेला नाही. त्या गटाची सदस्य म्हणून दिलेला आहे.

आर्थिक आधारावरचे आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत होणारे असल्याने तेथे समतेच्या तत्वाचा भंग होणार आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करूनही आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही."

3. राज्यघटनेत आरक्षणाला जात, जमात, वर्ग हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. [पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत, खंड 1 ते 12, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली]

आपल्या घटनेत अनु.जाती, अनु.जमाती आणि इतर मागास वर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे. ओबीसीमध्ये एखादी जात समाविष्ट करायची असेल तर त्याची 23 गुणांची एक सुची असते. त्यातले 12 गुण सामाजिक मागासलेपणाला, 8 गुण शैक्षणिक मागासलेपणाला व 3 गुण आर्थिक मागासपणाला दिलेले असतात. यात 23 पैकी किमान 12 गुण मिळाले तरच ती जात ओबीसीत समाविष्ट केली जाते.

आर्थिक निकष अव्यवहार्य-

4. आरक्षणामुळे शिक्षण व नोकरी मिळते त्यामुळे जरी आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही.
मात्र सध्या सर्वत्र आरक्षण म्हणजे गरिबी निर्मुलन असे समीकरण बनवण्यात आलेले आहे. देशातील बुद्धीजिवी, माध्यमकर्मी, ओपिनियन मेकर्स आणि थिंक टॅंकमधील श्रेष्ठी यांचा कल आर्थिक निकष लावून आरक्षण द्यावे याकडे झुकलेला आहे.

5. गरिबी हटावसाठीही घटनेने कलम 38, 39, 41 व 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यातूनच बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील गरिबांसाठी] पिवळे रेशनकार्ड, स्वस्त धान्य, आरोग्य, शिक्षण योजना आल्यात. बीपीएलमध्ये नसणारांसाठी केसरी रेशनकार्ड व इतर उपाययोजना आहेत. त्यात वाढ करायला हवी. गरिबांना न्याय मिळायलाच हवा.
देशातील सर्व गरीबांसाठी भरीव आणि कार्यक्षम कृतीकार्यक्रम आखणे अत्यावश्यक आहे याबद्दल दुमत नाही.

6. मुलत: सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून आलेली समाजरचना ज्यांना शिक्षण, प्रगती, उन्नती यांची संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर अनेकवेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरलेले आहे.

7. आपल्या समाजव्यवस्थेत जातनिहाय व्यवसाय ठरवून दिलेले होते. ही व्यवस्था किमान 2800 वर्षे या देशात होती. व्यवसाया हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे गरीब -श्रीमंत कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योगधंदे हे स्त्रिया, दलित, आदिवासी, ओबीसीच करतात.

याउलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले, बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे उच्च वर्णांचे लोक करतात. जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आधार जातच राहाणार.

8. समजा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट व आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल.

9. आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, [जमीन, हवा, पाणी, उर्जा, संपत्ती यांची ] मालकी ही त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का? मालकीचे वाटप बदलले का? आजही देशातले 99%+ विवाह जातीतल्या जातीत होतात. लग्नं जातीत, संघटना जातीच्या, धर्मशाळा, कितीतरी बॅंका आणि आणखी काय जातीचे पण आरक्षण मात्र आर्थिक निकषांवर हवे हा दुटप्पीपणा नाही?
आजही सर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एका विशिष्ट वर्णाच्या हाती,
राजसत्ता दुसर्‍या वर्णाच्या हाती तर अर्थसत्ता [ शेयरमार्केट, कारखाने, व्यापार ] तिसर्‍या वर्णांच्या हाती आहे.
याला कोणाचाच आक्षेप नाही. हे मनूने दिलेले आरक्षणच आहे. ते आजही चालते.

धर्माधिकारी नेमताना त्यांची गुणवता तपासणारी विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेला सर्व हिंदूंना स्त्री-पुरूषांना बसू द्या अशी मागणी बाबासाहेबांनी 100 वर्षांपुर्वी केली होती. ती आजही मान्य झालेली नाही. ती नियुक्ती जातीवर का?

10. जाती/लिंगावर आधारित आरक्षण नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना स्थान मिळाले असते का?

11.आर्थिक आधारावर आरक्षण देणे याचा अर्थ आयकर भरणारे 3-4 कोटी लोक सोडले तर उरलेल्या 125 कोटी भारतीयांना आरक्षण देणे होय.

12. पैसा/गरिबी/श्रीमंती ही कधीही बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे. वय 18 पर्यंत मुलं अज्ञान [मायनर] मानली जातात. सुमारे 25 वर्षे वयापर्यंत ती शिकत असताना त्यांचे स्वत:चे काहीच उत्पन्न नसते.
त्यांच्या पालकांचे उत्पन्न असते. पण ती मुलं जर वेगळी [स्वतंत्र ] राहात असतील तर तीही गरिबच ठरणार.
उद्या अगदी अंबानी, अदानी, प्रेमजी, बिर्ला, हिंदुजा, गोदरेज, सर्वपक्षीय राजकीय नेते,  .... यांची मुलं आम्ही वेगळे राहतो, आमचे उत्पन्न शून्य आहे,  सबब आम्हाला आर्थिक आधारावरील आरक्षण मिळायला हवे असा दावा करतील तर तो  कायद्याच्या परिभाषेत मान्यच करावा लागेल.

13. एका शासकीय पाहणीनुसार देशाच्या 130 कोटी लोकांपैकी 40 कोटी लोक आर्थिकदृष्ट्या इतके सक्षम आहेत की त्यांनी आयकर भरायला पाहिजे.
परंतु त्यातले फक्त 10% म्हणजे सुमारे 4 कोटी लोकच आयकर भरतात. उर्वरित 90% म्हणजे 36 कोटी लोक आयकर चोरतात. त्या देशात आर्थिक आधारावर आरक्षण देणे ही फसवणूक होय.

14. राजकीय आरक्षण, [ निवडणुकीतले आरक्षण ] आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा जाणते लोक करतील काय?

15. ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील [ग्राम पंचायत, पंचायत समिती, जि.प. न.प. मनपा यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर तत्व लावलेले नाही हे किती लोकांना माहित आहे?

16. ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ती जात ओबीसी ठरल्यावर त्यातल्या खर्‍या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे.

हा विषय अतिशय ज्वलंत, स्फोटक, वादग्रस्त असल्याने फक्त आर्थिक निकष एव्हढा एकच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे.
बुद्धीभेद करण्यासाठी इतर मुद्दे पुढे करू नयेत.

ज्यांना याबाबतचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आजवरचे निकाल, घटनात्मक तरतुदी यांची माहिती नसेल त्यांनी कृपया ती आधी करून घ्यावी.

- प्रा.हरी नरके

Wednesday, July 18, 2018

निमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे-


निमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हा मराठीचा मौलिक ठेवा-प्रा.हरी नरके

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 49 वी पुण्यतिथी. आपल्या सकस लेखणीद्वारे व शाहीरीद्वारे ज्यांनी उच्च दर्जाचे प्रबोधन केले असा हा महान कलावंत-साहित्यिक.
अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम. अण्णा हे त्यांचे टोपण नाव.

१ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे जन्म झाला. १८ जुलै १९६९ रोजी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी ते गेले. त्यांचे वडील भाऊराव साठे यांची घरची अतिशय गरिबी होती. अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते. प्रतिभेचा झरा होता मूळचाच खरा. त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे १५ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 11 नाटकं व लोकनाट्यं लिहिली. त्यांचे प्रवास वर्णन, रशियातील भ्रमंती, खूप गाजले. त्यांच्या १२ चित्रपटांच्या पटकथा पडद्यावर आल्या. त्यांनी शेकडो पोवाडे व गाणी लिहिली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळालेला होता. तिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे.
त्यांच्या साहित्याचा अनुवाद तीसेक भाषांमध्ये झालेला आहे.

"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव!
गुलामगिरीच्या या चिखलात रूतून बसला का ऎरावत,
अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव,
धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले,
मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव,
ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुनी अंकित,
जिणे लादूनी वर अवमानित, निर्मुन हा भेदभाव,
एकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊनी चल बा पुढती,
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती,करी प्रगट निज नांव!"

हे एकच गीत जरी त्यांनी लिहिले असते तरी त्यांचे नाव अजरामर झाले असते. त्यांनी तर शेकडो गितं लिहिली.
रवि आला लावुनि तुरा, माझी मैना गावावर राहिली, मुंबईची लावणी यांनी महाराष्ट्राला वेड लावले.

"पानापानात नाचे हा वारा, भूप रागाच्या छेडीत तारा, हासे कोकीळ मनी, मोर नाचे वणी, सप्तरंगाचा फुलवून पिसारा!" अशी देखणी शब्दशिल्पं त्यांनी कोरली.
वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या लेखणाचा गाभा होता. त्यांनी कम्युनिष्ट पार्टीसाठी अनेक वर्षे काम केले.
गिरणी कामगार आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यासाठी ते लढले.

तिकीटाला पैसे नाहीत म्हणून लहाणपणी ते कासेगाव ते मुंबई हे अंतर पायी चालत गेले. त्यांची ही वणवण मात्र आयुष्यभर चालूच राहिली.
" दलित कंगाल दिसला, एका झाडाखाली तीन दगडाच्या चुलीवर त्याचा संसार असला तरी संसार करण्याची त्याची इच्छा पवित्र आहे. काव्यमय शब्दात सांगायचे तर, हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलिताच्या तळहातावर तरलेली आहे," हे त्यांचे उद्गार कसे विसरता येतील?
अण्णाभाऊ मुंबईच्या झोपडपट्टीत राहत.

ते 18 जुलैला गेले तेव्हा तीनचार दिवसांचे कुपोषण त्यांना झालेले होते. त्या अठवड्यात ते मंत्रालयातल्या एका उपसचिवाला जाऊन भेटले. म्हणाले, तुम्ही मला लेखक-कलावंत म्हणून मानधन देता पण ते महिना अखेरीला मिळते. तुम्ही ते मला दर आठवड्याला देऊ शकणार नाही का? माझी चूल गेले चार दिवस पेटलेली नाही." उपसचिवने त्यांच्याकडून तसा अर्ज घेतला, पुढे पाठवला. पण सरकारी निर्णय व्हायच्या आत कुपोषणाने अण्णाभाऊंचा बळी घेतलेला होता.

ते गेल्याची बातमी तत्कालीन समाज कल्याण मंत्री बाबूराव भारस्करांना कळताच ते अण्णाभाऊंच्या झोपडीकडे धावले. अंत्यविधीचे सामान आणायला पैसे नव्हते.
भारस्करांनी दोघा कार्यकर्त्यांना बोलावले, पाचशे रूपये दिले. सामान लवकर घेऊन या असे त्यांना सांगितले.
ते कार्यकर्ते पैसे घेऊन जे गेले ते परत आलेच नाहीत!

अण्णाभाऊंच्या अंत्ययात्रेची परवड झाली. या अंत्ययात्रेला फार कमी लोक उपस्थित होते. आज त्यांचे असंख्य पुतळे उभे राहात आहेत, पण त्यांच्या विचारांचे काय? ते कोण पेरणार? जपणार? संवर्धित करणार? आपण ते काम करूयात.

प्रेमचंदांची कफन ही कथा तुम्हाला आठवतेय का?

अण्णाभाऊंसारख्या प्रतिभावंताला कुपोषणात जगवणारी, पोसणारी यंत्रणा चळवळीकडे ४९ वर्षांपुर्वी नव्हती. आज तरी आहे का?
- प्रा. हरी नरके


Monday, July 16, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुचा गौरव केला होता हा भिडे यांचा दावा निराधार


मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं-प्रा.हरी नरके

मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण भारतीय संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते असा दावा श्री. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केला. आय.बी.एन. लोकमत वाहिनीवर बेधडक कार्यक्रमात आज डॉ. उदय निरगुडकरांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते बोलत होते. श्री. भिडे यांचा हा दावा खरा नाही.

ते म्हणाले, राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे.

प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने श्री.भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव श्री. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत.
त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही.

उलट भारतीय संविधानाच्या मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मनुस्मृती नाकारलेली आहे.
मनुस्मृतीसारख्या घटनेतील मुलभूत अधिकारांशी विसंगत असलेल्या सर्व
ऎतिहासिक कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे.

तेव्हा श्री.भिडे यांच्या वरिल दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत.
...............
टीप-
राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा आहे असं श्री. भिडे म्हणाले होते. तिथे मनुचा पुतळा नाही.

भिडेसमर्थक आता विषयांतर करून राजस्थान उच्च न्यायलयाच्या प्रांगणात मनुचा पुतळा आहे असे सांगत आहेत.

राजस्थान उच्च न्यायलयाच्या प्रांगणातला मनुचा पुतळा 28 जून 1989 ला बसवण्यात आलाय.

तो पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतला नसल्याने त्याच्या अनावरणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण त्याच्या खूप आधीच 6 डिसेंबर 1956 रोजी झालेले होते.
-प्रा.हरी नरके

Tuesday, July 3, 2018

मीटर नेहमी चालू राहायला पाहिजे

किडन्या काढण्यासाठी लहान मुलं पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा ग्रामस्थांनी पाच जणांना ठार केलं. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे हे लोक ज्योतिष सांगून गावोगाव भटकत जगत होते. जगाचं भविष्य सांगणारांना आपलं स्वत:चं मात्र भविष्य काही कळलं नसणार! अन्यथा असा अकाली आणि भीषण हिंसक मृत्य़ू वाट्याला न येता. गावकर्‍यांमध्ये एव्हढं क्रौर्य कुठून येतं? हा शुद्ध रानटीपणाय. माणसं मारण्याचा, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.

आता चार दिवस सहानुभुतीचा धुरळा ऊठेल. त्यांचे नेते प्रकाशझोताने आणखी मोठे होतील. लाचार भटके मात्र भिक मागत पुन्हा येरे माझ्या मागल्या करीत भटकतच राहतील.

हे भटक्या जमातींचे लोक आपापल्या परिसरातील शेतांमध्ये किंवा जवळपासच्या कारखाण्यांमध्ये मजुरी का करीत नाहीत? असे गावोगावी भटकत जगण्यात नेमके काय सुख असते?

भटक्यांचे राष्ट्रीय नेते गेली 50 वर्षे नेमकी कसली चळवळ करताहेत? ते त्यांना व्यवसाय परिवर्तन करायला का शिकवित नाहीत? सन्मानाने जगायला का सांगत नाहीत? लाचारी, व्यसनं सोडायचा संस्कार का करीत नाहीत? त्यांचं कायमचं पुनर्वसन का करीत नाहीत?

मुंबईतल्या प्रत्येक मंदिरासमोर, फोर्टमधल्या हरेक फूटपाथवर अनेक बायका गाई घेऊन बसलेल्या असतात. त्यांच्याकडे हिरवा चारा असतो. कणकेचे लाडू असतात. भाविक ते विकत घेतात आणि श्रद्धेने गाईला खाऊ घालतात. चाराही त्याच बाईचा, गायही तिचीच आणि तरीही भाविक खिशातले पैसे खर्चून त्या गाईला खाऊ घालण्यासाठी आतुर असतात हे काय गौडबंगाल असते?

मुंबईच्या चेंबूरजवळ असलेल्या पांजरापोळ भागात दोनेक हजार झोपड्यांमध्ये डवरी गोसावी राहतात. या बायका भल्या पहाटे ऊठतात, तबेल्यात जातात, दूध काढलेली गाय भाड्याने घेतात. हिरवा चारा आधल्या दिवशीच विकत घेतलेला असतो. या बायका या भाडोत्री गाया घेऊन आपापल्या वतनात जातात. यांच्या बसण्याच्या ह्या जागा वर्षानुवर्षे ठरलेल्या असतात. फिक्स असतात. त्याचंही भाडं स्थानिक दादांना द्यावं लागतं.

मंदिरात दर्शनाला येणारे भाविक खिशातले पैसे खर्चून चारा किंवा लाडू विकत घेतात, गाईला खायला घालतात, नमस्कार करतात. त्यातून पापांपासून त्यांना मुक्ती मिळते. लाभणार्‍या पुण्यातून परत नवी पापं करायला ते नव्या दमानं कामाला लागतात. पुण्यं कमावण्याचा शॉर्टकट मार्ग.

सगळेच पापी असतात असंही नाही. अनेक भाबडे असतात. देवभोळे गोभक्त असतात.

दिवसभराचा बिजनेस झाला की ती बाई तबेल्यात गाय नेऊन जमा करते. गवळ्याला गायीमागे दरडोयी 200 ते 300 रूपये भाडं देते. गवळ्याचा चार्‍याचा खर्च वाचतो. गाय सांभाळायचीही कटकट वाचते. बसल्या जागी गायीमागे 200 ते 300 रुपये त्याला मिळतात. दुधाचा पैसा मिळतो तो वेगळाच.

त्या बाईला 100 पासून 500 पर्यंत कमाई उरते. या बहुतेक सगळ्या बायका नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या असतात. त्या दिवसरात्र गोभक्ती करतात तेव्हा संध्याकाळी त्यांची चूल पेटते.

त्यांचे नवरे काय करतात?

बहुसंख्य नवरे दिवसभर हातभट्टीची मारून टूण्ण झालेले असतात. बायको घरी आली की तिला मारझोड करून तिने कमावलेले अर्धे पैसे हिसकावून घेतात, पुन्हा हातभट्टीवर नाहीतर देशी दारूच्या दुकानावर जातात नी दारू ढोसतात. राष्ट्रीय कार्यक्रम. शॉर्टकटनं, मेहनत न करता जगण्याचा परंपरागत मार्ग.

बापानं दररोजची आईला दारू पिऊन केलेली ही मारहाण बघून मुलगेही यात पटाईत होतात. शाळेत जा, शिका, अभ्यास करा, या भानगडीपेक्षा शॉर्टकटने पैसे कमावण्याच्या धंद्यातले तेही "तज्ञ" बनतात. एक्स्पर्ट बनतात. येरे माझ्या मागल्या--- अशा रितीने आपली उज्वल परंपरा अबाधित ठेवतात.

मध्यंतरी मुंबई मनपाने या बायकांना गाया घेऊन बसायला बंदी केली. चुली पेटेनाशा झाल्या. बायका पोरं उपाशी मरू लागले.

काही तळमळीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब आमच्या निदर्शनाला आणली. काही विवेकी संपादक मित्रांनी यावर लेख लिहिले. ओळखीतनं वाहिन्यांनी बातम्या दिल्या. आवाज उठवला.
मी एका ओळखीच्या मंत्री महोदयांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहिले, फोन केला.
बंदी उठली. प्रश्न सुटला.

भटक्यांचे एक राष्ट्रीय नेते माझ्यावर नाराज झाले. म्हणाले, " एक मोठे वकील होते. त्यांचा मुलगाही वकील झाला. त्याने 20-25 वर्षे प्रलंबित असलेली केस जिंकली. कौतुकानं बातमी पित्याला सांगितली. पिताश्री म्हणाले, "तू मुर्ख आहेस. अरे तुझं सगळं शिक्षण मी याच तर केसच्या फिमधून केलं होतं. तुझ्या मुलाचं शिक्षण कसं होणार?"

कथेचा अर्थ मला समजला नाही.

राष्ट्रीय नेते म्हणाले, "गेली 50 वर्षे मी भटक्यांचा राष्ट्रीय नेता कशामुळे आहे? माझ्या पुढच्या पिढीचीही मौजमजा कोणाच्या पैशावर चालूय? आम्ही काहीही कामधंदा न करता राजेशाहीत जगायचं असेल तर या वंचितांना असंच ठेवलं पाहिजे. त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटले तर आम्ही मेलोच. माझ्या अनेक पिढ्यांची रोजगार हमी योजना संपवायला निघालायस काय? प्रश्न कायम राहिले तरच आमचे नेतृत्व टिकणार ना? तरच आम्ही लेख लिहिणार. वाहिन्यांवर पोपटपंची करणार. तरच आम्हाला पुरस्कारबिरस्कार मिळणार. आम्ही मेनबत्ती मोर्चे काढणार. मृतांच्या नातेवाईकांना भरपाई मिळवून देण्याच्या बहाण्याने आमचीही व्यवस्था भागवणार! मीटर नेहमी चालू राहायला पाहिजे. टाकी कायम फुल राहिली पाहिजे."

नेते दर वर्षा दोन वर्षाला मेळावे, परिषदा, शिबिरं घेतात. त्यासाठी दरडोई पट्टी [ वर्गणी ] जमा करतात. डोळ्यातून हुकमी आसवं काढतात. भाषणातून तळमळीची गाणी गातात. गयावया करतात. बातम्या, लेखमाला छापून येतात. पुरस्कार नेत्यांचे घर चालत येतात. बाय द वे हे राष्ट्रीय नेते डवरी गोसावी नाहीत बरं का! जागृतीच्य नावावर अंधार पेरण्याचा यांचा पिढीजात धंदा आहे. आतातर त्यांची पुढची पिढीही यात वाकबगार झालीय.

उपेक्षित, वंचितांच्या समस्या कायम आहेत म्हणून तर हे नेते मजेत जगताहेत. नी वंचित असे कुत्र्याच्या मौतीनं मरताहेत.

ते यांना गावोगाव फिरण्याऎवजी शिकण्याचा, भिक न मागता स्वाभिमानानं जगण्याचा, दारू सोडण्याचा, बायकांना मारहाण न करण्याचा, छोट्यामोठ्या चोर्‍यामार्‍या न करण्याचा, लाचारीनं न जगण्याचा, व्यवसाय परिवर्तनाचा मार्ग का सांगत नाहीत?

आयतं खाण्यात, लाचारीनं जगण्यात जी मजा आहे ती कष्टात कशी असणार भाऊ? कष्ट, मेहनत, घाम गाळणं हे तर मुर्खांचे उद्योग.
मेहनत न करता जगण्याचा, शॉर्टकटनं पैसे कमावन्याचा हा परंपरागत मार्गच महत्वाचा.

बदल घडतच नाही असं मात्र नाही. पण त्याचा वेग अतिमंद आहे. या गतीनं आणखी शेदीडशे वर्षं हे लोक असेच भटकत राहणार. लाचारीनं मरण जगत राहणार.

राष्ट्रीय नेत्यांच्या वीसेक पिढ्या सराईतपणे खोटं बोलून, नक्राश्रू ढाळीत त्यांना आणि संवेदनशील मध्यमवर्गीयांना लुटत राहणार. अशा घटना तर नेत्यांसाठी महापर्वच!
-प्रा. हरी नरके

Saturday, April 7, 2018

आणि महात्मा फुले जयंती रूजू लागली-



[महात्मा जोतीराव फुले यांचे अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र.]

थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेतल्यावर मला एक खजिना सापडला.
.....................

आपल्या देशात एखादी चांगली गोष्टही रुजायला किती काळ जावा लागतो. त्यासाठी धडपडणारी व्यक्ती अगदी थकून जाते. नाउमेद होते. 25/30 वर्षांपुर्वी तुमच्यापैकी कोणाला महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम झाल्याचे आठवतेय?
नाही ना?
अहो, होतच नव्हती तर आठवणार कुठून?

फुले जयंती ही अगदी ताजी घटनाय, प्रथाय. एक स्फुर्तीदायक उपक्रमाय.
पण त्यासाठी किती रक्त आटवावं लागलं माहितीय?

महात्मा जोतीराव फुले यांच्या महत्वाच्या चरित्रकारांपैकी म्हणजे, पंढरीनाथ सीतराम पाटील, धनंजय कीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा.गं.बा.सरदार, प्रा.भा.ल.भोळे, प्रा.य.दि.फडके, प्रा.मा.गो.माळी, बा.ग.पवार, प्रा.गजमल माळी यातल्या कोणाच्याही पुस्तकात महात्मा फुलेंची जन्मतारीख दिलेली नाही. त्यांचं 1827 हे जन्मवर्ष फक्त माहित होतं. तारीख सपाडतच नव्हती.

महात्मा फुले यांची जन्मतारीख माहितच नसल्यानं देणार तरी कशी आणि कुठून?
या महात्म्याचं महापरिनिर्वाण 28 नोव्हेंबरला झाल्यामुळे त्यांची पुण्यतिथी किंवा त्यांचा स्मृतीदिन 28 नोव्हेंबरला गंभीरपणे पाळला जायचा. जिभेला/लेखणीला वळण पडल्यामुळे पत्रकार मित्र स्मृतीदिवस साजरा झाला असं लिहीतात/ म्हणतात, जे चुकीचं आहे.

1969 साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रथामावृत्तीच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि प्रा. स.गं.मालसे यांनी फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1828 ला झाला असावा अशी एक शक्यता वर्तवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चाही केलेली होती.

तथापि यात एक अडचण होती. फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले जन्मवर्ष 1827 दिलेले असल्यानं 1828 ची ही नोंद सदोष वाटत होती.पटत नव्हती.
माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक 1989 ला प्रकाशित झालं. त्यातून कमलताई विचारे यांचा माझा परिचय झाला. थोर सत्यशोधक केशवराव विचारे गुरूजी यांच्या त्या सुनबाई. त्यांच्याकडच्या दुर्मिळ पुस्तकांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेताना मला एक खजिना सापडला.

1891 साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे चरित्र मला त्यात मिळालं.
स्मृतीशेष कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र. ते अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
त्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. ते आपलं नाव भलं मोठं लांबलचक लिहित असत. महाधट नारायण बाबाजी पानसरे पाटील."

या चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची जन्मतारीख 11 एप्रिल 1827 ही दिलेली सापडली.

महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण माझ्यासाठी अक्षरश: युरेका ! युरेका! चा क्षण होता.

गुरूवर्य डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर,प्रा.गो.पु.देशपांडे या सार्‍यांशी त्याबाबत बोललो. खात्री करून झाल्यावर त्यांचा पाठींबा मिळवला आणि मगच तत्कालीन मुख्यमंत्री श्री.शरद पवार यांना मी पत्र लिहिलं. सातत्यानं त्याचा पाठपुरावा करावा लागला.खातरजमा करण्यात बराच वेळ गेला.

फुले जन्मतारखेबाबत मी म.टा., तरूण भारत आणि इतर अनेक वर्तमानपत्रात लेख लिहिले.
या जन्मतारखेबाबत शासकीय समितीच्या मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली.
तेव्हा कुठे मान्यता मिळाली.

मग तातडीनं सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही तारीख नोंदवली.
मुख्य म्हणजे विधानभवनातील महात्मा फुले पुतळ्याखाली ही नोंद करून घेतली.

महात्मा फुले यांची शासनस्तरावर तोपर्यंत झळकलेली रंगीत तैलचित्रं चुकीची होती.
गोपीनाथराव पालकर, डॅा. बाबा आढाव आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांच्या काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो विकसित करण्यात आम्हाला यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं.

28 नोव्हेंबर 1992 ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली.
सदर फोटो हजारोपट मोठा करून फुलेवाड्यात बसवला.

सातत्याने गेली 25/30 वर्षे चिकाटीनं पाठपुरावा आणि धडपड, प्रयत्न केल्यानंतर आता कुठं महात्मा फुले जयंती साजरी होऊ लागलेली आहे.
कालच देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी या वर्षीपासून महात्मा फुले जयंती देशभर करणार असल्याचं जाहीर केलं.
या वर्षीपासून ही जयंती अनेक ठिकाणी होईल असं चित्र आहे.

अर्थात ती नाचगाणी, फ्लेक्स, डि.जे. उन्मादी जल्लोश, नाच तमाशे असल्या ओंगळवाण्या पद्धतीनं होऊ नये. शिक्षण, प्रबोधन, संवाद,जनजागरण, साहित्य,कला यांच्या माध्यमातून ही जयंती संस्मरणीय व्हायला हवी.
एकुण काय?

एखादं चांगलं काम रुजायलाही खुप काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो.
पण सत्य आणि कळकळ असेल तर यश मिळतंच.
-प्रा. हरी नरके
............................................

Thursday, February 22, 2018

'पवारांचं आरक्षणाविषयीचं विधान म्हणजे मतांसाठीची फरपट'


पवारांच्या या विधानानंतर आर्थिक निकषांवरच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दलित साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. हरि नरके यांनी याविषयी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ती मोठ्या प्रमाणावर शेअर झाली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण घटनाबाह्य आणि भ्रामक कल्पना असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.
............................
राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची जाहीर मुलाखत आरक्षणाच्या मुद्द्यावरून दुसऱ्या दिवशीही गाजते आहे. आरक्षणासारख्या विषयावर सावधपणे बोलताना पवारांनी जातीपेक्षा आर्थिक निकषच मोठा असल्याची भूमिका घेतली. त्यांच्या विधानाचा राजकीय अर्थ काय? मराठा आरक्षणाच्या विरोधातलं हे वक्तव्य आहे का? की हे मतांसाठीचं राजकारण आहे?
या मुलाखतीदरम्यान राज यांनी विचारलेल्या आरक्षणासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "हा सेन्सिटिव्ह विषय आहे. पण माझं याविषयीचं स्पष्ट मत आहे की, कुठल्याही जातीच्या आर्थिक दृष्ट्या दुबळ्या व्यक्तीला आरक्षण दिलं पाहिजे."

पवारांच्या या विधानानंतर आर्थिक निकषांवरच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दलित साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. हरि नरके यांनी याविषयी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. ती मोठ्या प्रमाणावर शेअर झाली आहे. आर्थिक निकषावर आरक्षण घटनाबाह्य आणि भ्रामक कल्पना असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.

प्रा. नरके लिहितात, "नरसिंहराव सरकारनं 25 सप्टेंबर 1991 रोजी आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं होते. ते 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं घटनाबाह्य ठरवून रद्द केलं. या खंडपीठातल्या न्या. पी. बी. सावंत यांनी यासाठीचा घटनादुरुस्तीचा पर्यायही न्यायालयात टिकणार नाही, असं नोंदवलं होतं."
"आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिलं जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट आणि आर्थिक आधार असं दुहेरी आरक्षण द्यावं लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल," असं प्रा. नरके नोंदवतात.

"राजकीय आरक्षण आर्थिक आधारावर कसं द्यायचं याचा खुलासा जाणते लोक करतील काय?" असा सवालही त्यांनी केला आहे. यावरून जातीधारित आरक्षणावर पवारांनी केलेलं हे भाष्य आहे की, याचा काही राजकीय अर्थ निघू शकतो याची चर्चा होत आहे.

राजकीय पत्रकार प्रताप आसबे म्हणाले, "अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाबद्दल कुणाला आक्षेप नाही. ते असायला हवं, असं शरद पवार यांनी पहिल्याच वाक्यात स्पष्ट केलं आहे. इतर समाजाच्या आरक्षणासाठी आर्थिक निकषच असायला हवा, हे यापूर्वीही पवारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे यात इतर काही राजकीय अर्थ असेल असं वाटत नाही. पहिल्यापासून पवार यांची भूमिका हीच आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या वेळेचा अपवाद वगळता त्यांनी आरक्षणाविषयी हीच भूमिका मांडलेली आहे."
लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी आरक्षणाच्या विषयासंदर्भातली पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
ते म्हणाले, "शरद पवार यांचा ओबीसी आरक्षणाला विरोध आहे, असा त्यांच्या विधानाचा अर्थ निघत नाही. मंडल आयोगाची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असतानाच झाली होती. इतर राज्य सावध भूमिका घेत असताना पवार यांनी धडाडीनं मंडल आयोगाची अंमलबजावणी केली होती."
"मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षं अनिर्णित अवस्थेत पडला आहे. ही घटनात्मक कोंडी फुटावी यासाठी चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने पवार यांनी हे वक्तव्य केलं असावं. पक्षाच्या राजकारणाला घट्ट धरून ठेवत असतानाच या विषयाला हात घालण्याचा यामागे उद्देश असावा", असं कांबळे म्हणाले.
घटनेच्या 16 (4) कलमानुसार आरक्षणासाठी पात्र ठरण्यासाठी त्या जातीचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करावं लागेल. त्याच मुद्द्यावर मराठा, जाट, पटेल, गुर्जर यांच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे, याची आठवणही कांबळे यांनी करून दिली.
महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार समर खडस म्हणाले, "महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे शरद पवारच होते. त्यांना घटनेतल्या तरतुदींची चांगलीच माहिती आहे. पवारांच्या वक्तव्याचा अर्थ ते ओबीसींच्या आरक्षणाविरोधात आहे, असा काढणं चूक आहे."
"मुळात आरक्षणाची संकल्पना अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी असल्यानं ती जातीव्यवस्थेशी संबंधित आहे. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास किंवा इतर मागास वर्ग आहे. यात वैदिक धर्मानं शूद्र ठरविलेल्या अनेक जाती येतात, वैदिक धर्मानुसार ब्राह्मण व क्षत्रिय या दोनच जाती द्विज आहेत, बाकी सगळे शूद्र. मराठा ही जात द्विज नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांना वाईच्या ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला व तुकोबांच्या गाथा बुडवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत विविध स्तरांवर चर्चा आहेत. मात्र मराठा समाज हा सहा दशके राज्यातील सत्तेच्या जवळ असल्यानं त्यांच्याविषयी ते आहेरे वर्गातले असल्याची भावना काही शोषितांमध्ये आहे", असं ते सांगतात.
आरक्षणाची गरज का निर्माण झाली याविषयी बोलताना खडस म्हणाले, "मराठा समाज कायमच दोन स्तरांवर होता. कारण यात बहुतांश शेतकरी होते. इंग्रजांच्या खानेसुमारीतून आलेल्या रचनेत ही जात निर्माण झाली. त्यामुळे मराठा समाजात शेतकरी आणि सरंजामदार दोघांचाही समावेश होता. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत गेल्यानं आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे."
"केंद्र सरकारचं चुकीचं धोरण याला कारणीभूत आहे. शेतकऱ्यांचीच ही आरक्षणाची मागणी आहे. पण आपण जातीय परिभाषेत बोलत असल्यानं मराठा, जाट, पटेल या सगळ्यांचीच आरक्षणाची मागणी होते आहे. मराठ्यांना थेट सरसकट आरक्षण देऊ नये, असा काहींचा टोन दिसतो. इतर जातींचा याला आक्षेप आहे. पवारांची भूमिका याच दृष्टिकोनातून वेगळी दिसते", असं समर खडस यांनी सांगितलं.

बीबीसी मराठीनं यासंदर्भात प्रा. हरि नरके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "शरद पवारांसारखा ज्येष्ठ आणि मुरब्बी राजकारणी असं विधान करतो तेव्हा त्यांचा हेतू स्पष्ट असतो. एक अभ्यासक म्हणून मला ही मतांसाठीची अगतिकता आहे, फरपट आहे असं वाटतं. 2019च्या निवडणुकीत दोन आव्हानं पवारांसमोर आहेत. मराठा वोट बँक विखुरलेली आहे. ती जोडायचा त्यांचा प्रयत्न दिसतो. आरक्षणाबाबतचा निर्णय कोर्टात आहे. त्याचा निर्णय नकारात्मक लागला तर सरकारला दोषी ठरवून आर्थिक निकषावर आरक्षण का नाही मागितलं असा प्रतिवाद करता येईल आणि चुकून आरक्षण मिळालंच तरीही श्रेय घेता येईल."
"मराठा, जाट आणि गुर्जर अशा सगळ्या समाजांना आरक्षण देण्यामागे व्होटबँकेची गणितं सगळ्याच राजकारण्यांची असतात. आरक्षणाला विरोध केला तर त्याचा फटका निवडणुकांत होऊ शकतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका गटाचा एकूणच आरक्षणाला विरोध आहे. पवारांनी हा मार्ग निवडलेला दिसतो. एवढ्या मोठ्या पदावरचे ज्येष्ठ नेते जेव्हा विपरीत/विसंगत बोलू लागत तेव्हा जनतेच्या मनातला संभ्रम आणखी वाढतो."
..................................
https://www.bbc.com/marathi/india-43151798
'पवारांचं आरक्षणाविषयीचं विधान म्हणजे मतांसाठीची फरपट'
अरुंधती रानडे-जोशी, बीबीसी मराठी,22 फेब्रुवारी 2018

आर्थिक निकषांवर आरक्षण-काही प्रश्न


 - प्रा.हरी नरके
1. नरसिंहराव सरकारने 25 सप्टेंबर 1991 रोजी आर्थिक निकषांवर आरक्षण दिले होते. ते 16 नोव्हेंबर 1992 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधिशांच्या बेंचने घटनाबाह्य ठरवून रद्द केले होते.
2. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द करण्यासाठी घटना दुरूस्तीचा पर्याय सुचवला जातो.
मात्र अशी घटना दुरुस्तीही घटनाबाह्य ठरेल व ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे त्या बेंचमध्ये असलेले न्या.पी.बी.सावंत यांनी लिहिले आहे.
[ पाहा- प्रा.अशोक बुद्धीवंत, मराठा ओबीसीकरण, श्रमिक प्रतिष्ठान,कोल्हापूर, 2009, प्रस्तावना, पृ. 10 ते 12] न्या.सावंत म्हणतात, "विद्यमान आरक्षण हे जात,जमात व गट केंद्रीत आहे. व्यक्ती विशिष्ट गटाची म्हणून तिच्यावर आजपर्यंत अन्याय झालेला आहे व आजही होत आहे म्हणुन त्या व्यक्तीला आरक्षणाचा फायदा दिलेला आहे.व्यक्ती म्हणून नाही. आर्थिक आधारावरचे आरक्षण हे व्यक्तीकेंद्रीत होणारे असल्याने तेथे समतेच्या तत्वाचा भंग होणार आहे. त्यामुळे घटनादुरूस्ती करूनही आर्थिक निकषांवर आरक्षण देता येणार नाही."
3. राज्यघटनेत आरक्षणाला जात हा निकष लावताना त्याबाबत सविस्तर उहापोह झालेला आहे. [पाहा- CAD भारतीय संविधान परिषद वृत्तांत, खंड 1 ते 12, लोकसभा सचिवालय, भारत सरकार, नवी दिल्ली]
आपल्या घटनेत अनु.जाती, अनु.जमाती आणि इतर मागासवर्ग यांनाच आरक्षण देण्याची तरतूद आहे. इ.मा.व ची व्याख्या करताना त्यात आर्थिक निकष लावलेला नाही. तो विचारपुर्वक गाळलेला आहे. त्यात फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा निर्देश आहे.
4. आर्थिक निकष का नको? तर आरक्षणामुळे आर्थिक उन्नती होत असली तरी तो प्रतिनिधित्व देण्याचा कार्यक्रम आहे. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही.
5. गरिबी हटावसाठीही घटनेने कलम 38,39,41 व 46 मध्ये तरतूद केलेली आहे. त्यातूनच बीपीएल [दारिद्र्य रेषेखालील गरिबांसाठी] पिवळे रेशनकार्ड, स्वस्त धान्य, आरोग्य, शिक्षण योजना आल्यात. बीपीएलमध्ये नसणारांसाठी केसरी रेशनकार्ड व इतर उपाययोजना आहेत. त्यात वाढ करायला हवी. गरिबांना न्याय मिळायलाच हवा.
6. मुलत: सामाजिक अन्याय, शोषण आणि पक्षपात व भेदभाव यातून आलेली समाजरचना ज्यांना संधी नाकारते त्यांना विशेष संधी देणे, अन्यायाची भरपाई करणे, परिमार्जन करणे हा उद्देश आरक्षणामागे असल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने आजवर हजारोवेळा जातीवर आधारित आरक्षण उचलून धरले आहे.
7. जातींनी व्यवसाय ठरवून दिले होते. व्यवसाया हाच उत्पन्नाचा स्त्रोत असतो. परिणामी जातीव्यवस्थेनेच कामाच्या वाटपाद्वारे गरीब -श्रीमंत कोण राहणार याची व्यवस्था केलेली होती. आजही देशातील सगळे हलके, कष्टाचे आणि निकृष्ठ व्यवसाय व उद्योगधंदे हे दलित, आदिवासी, ओबीसीच करतात. उलट कमी श्रमाचे, सामाजिक प्रतिष्ठा असलेले,बुद्धी व ज्ञानावर आधारित कामधंदे उच्च वर्णांचे लोक करतात. जोवर कामावरून जात ओळखता येते तोवर आधार जातच राहाणार.
8. समजा जर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर ते सर्व जाती-धर्मांच्या लोकांना दिले जाईल. म्हणजेच एससी, एसटी, ओबीसींना गट व आर्थिक आधार असे दुहेरी आरक्षण द्यावे लागेल आणि तेही घटनाविरोधी ठरेल.
9. आजही देशातल्या बहुतेक सर्व संसाधनांची, [जमीन.हवा,पाणी,उर्जा,संपत्ती]मालकी ही त्र्यैवर्णिकांचीच आहे. मनुस्मृती गेली पण मनुस्मृतीची मानसिकता गेली का? मालकीचे वाटप
बदलले का?
सर्व शंकराचार्य, सर्व धर्मसत्ता एका विशिष्ट वर्णाच्या हाती, राजसत्ता दुसर्‍या वर्णाच्या हाती तर अर्थसत्ता [शेयरमार्केट, कारखाने, व्यापार] तिसर्‍या वर्णांच्या हाती असे का आहे?
10. जाती/लिंगावर आधारित आरक्षण नसते तर राजसत्ता, अर्थसत्ता, प्रशासन सत्ता, न्यायसत्ता, ज्ञानसत्ता, माध्यमसत्ता, मतं घडवणारे- ओपिनियन मेकर आदींमध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसींना स्थान मिळाले असते का?
11.आर्थिक आधारावर आरक्षण देणे याचा अर्थ आयकर भरणारे 3-4 कोटी लोक सोडले तर उरलेल्या 125 कोटी भारतीयांना आरक्षण देणे होय.
12. पैसा/गरिबी/श्रीमंती ही कधीही बदलणारी बाब आहे. आज आहे, उद्या नाही. कमी उत्पन्नाचा दाखला मिळवणे ही ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच सर्वात सोपी गोष्ट आहे.
13. ज्या देशात फक्त 10% पैसेवाले आयकर भरतात व 90 टक्के पैसेवाले तो चोरतात त्या देशात आर्थिक आधारावर आरक्षण देणे ही भ्रामक गोष्ट आहे.
14. बाय द वे राजकीय आरक्षण, [निवडणुकीतले आरक्षण] आर्थिक आधारावर कसे द्यायचे याचा खुलासा जाणते लोक करतील काय?
15. ओबीसींना शिक्षण व नोकरीतील आरक्षणासाठी क्रिमी लेयर असते. मात्र पंचायत राज्यातील आरक्षणसाठी क्रिमी लेयर नाही हे किती लोकांना माहित आहे?
16. ओबीसी ठरवताना सामाजिक व शैक्षणिक आधार आणि एकदा ठरल्यावर त्यातल्या खर्‍या गरजू व होतकरूंना आरक्षण मिळावे म्हणून त्यानंतर क्रिमीलेयरचे तत्व सर्वोच्च न्यायालयाने लावलेले आहे.
.........................
[ एक विनंती- हा विषय अतिशय ज्वलंत, स्फोटक, वादग्रस्त असल्याने फक्त आर्थिक निकष एव्हढाच मुद्दा चर्चेला घेतलेला आहे. खुसपट म्हणून इतर मुद्दे पुढे करू नयेत. ज्यांना याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, घटनात्मक तरतुदी यांची माहिती नसेल त्यांनी कृपया शाळकरी, पोरकट आणि दांभिक मुद्दे उपस्थित करून बुद्धीभेद करू नये.] 
................
- प्रा.हरी नरके

Tuesday, February 6, 2018

महात्मा जोतीराव फुले यांनी बांधला बंडगार्डनचा पूल--


बंडगार्डनला आणि येरवड्याला जोडणारा मुळामुठेवरचा पूल ब्रिटीशकाळात 1867 साली बांधण्यात आला. त्याचे आयुष्य 100 वर्षांचे होते. प्रत्यक्षात तो 140 वर्षे वापरात होता.
आजही तो भक्कमच आहे. फक्त सुरक्षिततेसाठी सध्या तो रहदारीला बंद करण्यात आलाय. तिथे पुणे महानगर पालिकेच्या हेरिटेज विभागाने एक भव्य आर्ट प्लाझा उभारला आहे. त्याला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव द्यावे असा प्रस्ताव पुण्याचे उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी मंजूर करवून घेतला आहे.
हा पूल बांधण्याचे काम ज्या Pune commercial & contracting Company ने केले तिचे महात्मा जोतीराव फुले हे कार्यकारी संचालक होते.
सामाजिक कार्यकर्ता, नेता आणि यशस्वी उद्योगपती असा संगम फार विरळाच असतो. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि व्यापारी म्हणून महात्मा जोतीराव फुले यांचा राज्यभर नावलौकिक होता.
ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी' Pune commercial & contracting Company चे कार्यकारी संचालक होते. पूल, धरणे, कालवे, बोगदे आणि रस्ते व सुंदर इमारती यांसारखी अनेक दर्जेदार बांधकामं त्यांनी केली.
जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. त्यातून मिळविलेला नफा सामाजिक कामांसाठी त्यांनी मुक्तहस्ते खर्चून टाकला. ही स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून जोतीरावांनी सगळं समाजकार्य केलं. ते स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते, लोकवर्गणीवर समाजकार्य करणारे नव्हते. ते आयुष्यभर झोकून देऊन विनावेतन आणि विनामानधन सामाजिक कार्य करीत राहिले.
जोतीरावांच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, शेअर मार्केटविषयक लेखन करणारे अर्थतज्ज्ञ या पैलूंकडे अभ्यासकांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही.

‘बिल्डर’ हा शब्द सध्या वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना भिती वाटते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते.

त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत.
मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे या सत्यशोधकांनी केलेली आहेत.
राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या.
हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे आधी भागीदार होते. त्यांनी नंतर आपल्या स्वत:च्या कंपन्या स्थापन केल्या. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे.
जोतीरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचंही काम केलं जाई.  बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या वज्रसूची या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिलं. जोतीरावांनी ते ‘जातीभेद विवेकसार’ प्रकाशित केलं. या कंपनीचं पुण्यात पुस्तकविक्री केंद्र होतं.
सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची संपुर्ण मुंबई प्रांताची होलसेल एजन्सी जोतीरावांकडे होती.
ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे.
कितीतरी मोठी कामं या कंपनीमार्फत त्यांनी केल्याच्या कागदोपत्री नोंदी मिळालेल्या आहेत. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात.
-प्रा.हरी नरके
......................

Monday, January 22, 2018

मधू दंडवते एक भला माणूस-

मधू दंडवते राजकारणाच्या घाणीत राहूनही अतिशय भला माणूस. निळू फुले, डॉ.श्रीराम लागू,सदाशिव अमरापूरकर, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत मी त्यांच्या निवडणुक प्रचाराला त्यांच्या मतदार संघात कोकणात गेलेलो होतो. तिकडे नारायण राणेंची प्रचंड दहशत होती. त्या निवडणुकीत दंडवते पराभूत झाल्याचे खूप वाईट वाटले होते. एकदा नानांचा [मधू दंडवते]
फोन आला. नाथ पैंच्या नावानं आपण महोत्सव घेतोय. तू अवश्य ये.
मी होकार दिला.
रेल्वेचं तिकीट पोस्टानं घरी आलं.
त्यात माझं वय 65 वर्षे लिहिलेलं होतं.तेव्हा मी अवघा तिशीत होतो. मी नानांना फोन केला, तर ते म्हणाले, अरे आपल्या चळवळीत माणसाचं नाव व्हायला वयाची किमान पन्नाशी ओलांडावी लागते. तुझं नाव मी किमान पंधरा वर्षे ऎकतोय. मला वाटलं तू 65 वर्षांचा नक्कीच असशील.
रेल्वेत तिकीट चेकरनं मला वयाबाबत विचारलं. मी माझं ओळखपत्र दाखवलं आणि मधू दंडवतेसायबांची ही चूक असल्याचं त्याला सांगितलं. तो हसला, म्हणाला, असू द्या. त्यांच्यामुळेच ही कोकण रेल्वे झालीय. दुसरा कोणी असता तर मी नियमाप्रमाणं तुम्हाला फाईन मारला असता पण मधुभाई एकदम जंटलमॅन माणूसाय. बिनधास्त राव्हा.
कार्यक्रमाला माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मधुकरराव चौधरी, नलिनी पंडीत, मेधा पाटकर असे अनेकजण आलेले.
कार्यक्रम छानच झाला. परतताना नलिनीबाईंच्या घरी एक दिवस मुक्काम केला.
एकदा निवडणुक प्रचाराला नाना पुण्याला आलेले. मी सोबत होतो. घोरपडीच्या सभेत मीही बोललो. माझी ओळख सांगताना माझ्या महात्मा फुल्यांवरील पुस्तकांचा सुत्रसंचालकानं उल्लेख केलेला होता.
कार्यक्रम संपल्यावर एक गरीब म्हातारा मला भेटला.म्हणाला, महात्मा फुले तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांना सांगा माझे घेतलेले 500 रूपये परत करा.
मी हादरलो. महात्मा फुल्यांना जाऊन 100 वर्षे होऊन गेलेली.
म्हातार्‍याला चहा पाजला. शांतपणे नीट विचारपूस केली तेव्हा खरा मामला कळला. राज्य शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडे म्हातार्‍यनं अर्ज केलेला होता. तिथल्या एका कर्मचार्‍यानं 500 रूपये लाच घेऊनही त्या म्हातार्‍याचं काम केलेलं नव्हतं. त्या कर्मचार्‍यालाच म्हातारा महात्मा फुले समजत होता. म्हातार्‍याला महामंडळाच्या कार्यालयात घेऊन गेलो. म्हातार्‍यानं लाचखोराला बरोबर ओळखलं.
महामंडळाचे प्रमुख अधिकारी दैठणकरसाहेब यांच्या मदतीनं त्या कर्मचार्‍याकडून 500 रूपये म्हातार्‍याला परत करायला लावले. शिवाय दैठणकरसाहेबांकडून म्हातार्‍याचं कर्ज प्रकरणही मंजूर करवून मार्गी लावलं.
देवेगौडा पंतप्रधान असताना नाना केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. ते सेवा दलाच्या एका कार्यक्रमाला पुण्यात पुनम हॉटेलात आलेले होते. मीही एक वक्ता होतो. नानांशी छान गप्पा झाल्या. केंद्रीय नियोजन आयोगाने भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली तरच त्यांचे शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि घरकुलाचे प्रश्न सुटतील हे मी नानांना बोललो. ते म्हणाले, तू दिल्लीला ये. आपण तरतूद करू.
मी नानांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली. स्वत: नानांच्या हाताने माझे नाव लिहिलेलं व त्यांच्या सहीचं अपॉंईंटमेंट दिल्याचं पत्र आलं.
आम्ही दिल्लीला जाऊन नियोजन भवनात नानांना भेटलो.
त्या दिवशी नानांचा मूड बिनसलेला होता. दुसर्‍या कुठल्यातरी कारणानं ते वैतागलेले होते. मला बघताच म्हणाले, मला तुझा मुद्दा पटलेला आहे. आय एम कन्विन्स्ड. तू पंतप्रधान देवेगौडांना भेट. त्यांच्याकडून आदेश घेऊन ये. मी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करतो.
नाना, प्लीज तुम्हीच आम्हाला मदत करा. पीएमओत आमची ओळख नाही. असं मी त्यांना म्हणताच ते उखडले. मला ते जमणार नाही असं म्हणून त्यांनी आम्हाला निराश केलं.
त्यावेळी म.टा.चे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी नितीन वैद्य आणि श्री सुरेंद्र मोहन व विरोधी पक्षाच्या एका खासदारानं आम्हाला पंतप्रधानांची वेळ मिळवायला मदत केली.
पंतप्रधान देवेगौडा बथ्थड होते. त्यांना भटकेविमुक्त, त्यांचे प्रश्न यांचे काडीचेही ज्ञान नव्हते. त्या दिल्ली भेटीत फारसं भरीव असं काहीच हाताला लागलं नाही. तिकीटाचे पैसे फुकट खर्च झाले. मी संतापून नानांना तसं पत्रं लिहिलं. नानांनी पत्राची पोचही दिली नाही.
नाना का चिडले? त्यांना शक्य असूनही त्यांनी दुबळ्या भटक्या विमुक्तांसाठी आपले अधिकार का वापरले नाहीत? आणि शक्य नव्हतं तर आम्हाला दिल्लीचा हेलपाटा आणि खर्च का करायला लावला?
याची उत्तरं कधीच मिळाली नाहीत.
मात्र त्यानंतर मी नानांच्या प्रचाराला कधीही गेलो नाही.
काहीही असो. पण नाना एक भला माणूस होते यात शंकाच नाही!
-प्रा.हरी नरके

Thursday, April 20, 2017

मौनाचा कट?

समाजाच्या संवेदना आरपार बधीर झाल्यात काय?
शीतल वायळनं बापाकडं हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्त्या केली. प्रसार माध्यमांनी थोडी चर्चा केली. नवे विषय पुढे येताच हा विषय मागे पडला.
मध्यंतरी म्हैसाळच्या घटनेत मुलींची गर्भातच अवैध हत्त्या करण्याचा विषय पुढे आला, थोडी चर्चा झाली, मग तोही मागे पडला.
खरा प्रश्नाय तो हा की अशावेळी लोकमानस का हलत नाही? का ढवळत नाही?
स्त्रीप्रश्न, [लिंगभाव] वर्ग, जात, पर्यावरण, कुटुंबनियोजन अशा अनेक बाबतीत समाजमन बधीर का?
या मुद्द्यांवर प्रमुख राजकारणी, जाणते नेते, त्यांचे चेलेचपाटे साधी प्रतिक्रियासुद्धा देत नाहीत. राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर असे विषय नसतातच. यावर काम करणारांना कसलीही राजकीय प्रतिष्ठा नाही असं परवा डॉ. नीलम गोर्‍हे या शिवसेनेच्या प्रवक्त्या एका वाहिनीवर जाहीरपणे म्हणाल्या.
कोपर्डीची घटना निषेधार्ह आणि संतापजनक होती. धिक्कारार्हच होती. त्याबाबत समाजमन चवताळून उठलं, हे योग्यच झालं, पण मग सोनई, खर्डा, निमखेडी, मलकापूर, बुलडाणा, मनिषा हिंगणे अशी हत्त्याकांडं नी शीतल वायाळ आत्महत्त्या झाली तेव्हा समाज का संतापत नाही?
कुटुंब नियोजन, आर्थिक विषमता, हुंडा, सोकॉल्ड ऑनर किलींग, पर्यावरणाचे प्रश्न यावर बहुजन मौन बाळगतात आणि जात, लिंगभाव, वर्गीय विषमता यात बुद्धीवाद्यांना रस नाही.
अशा प्रश्नांवर बोलायचीही त्यांची तयारी नसेल तर अवघड आहे. हा आप्पलपोटेपणाय की सोयिस्कर स्विकारलेला शहामृगी पवित्राय?
अवघा समाज एव्हढा बथ्थड का बरं झाला असावा?
@ प्रा. हरी नरके

Wednesday, April 12, 2017

बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब

तथागत गौतम बुद्ध यांचं कृ.अ. केळुसकर लिखित चरित्र बाबासाहेबांना मॅट्रीकच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल 1908 साली भेट देण्यात आलं. त्याच्या वाचनानं बाबासाहेब प्रभावित झाले, प्रेरित झाले आणि बुद्धाकडं वळले. पुढची 48 वर्षे डॉ. बाबासाहेब सातत्यानं बुद्ध विचार, कार्य आणि सामाजिक परिवर्तन याबाबत अभ्यास,संशोधन आणि लेखन करीत होते.
1924 साली बार्शीला केलेल्या भाषणात पहिल्यांदा त्यांनी धर्मांतराचा उल्लेख केला.
1933 साली सुभेदार सवादकर यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपण धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला असून आपला कल बुद्धाकडं असल्याचं कळवलं. [ही पत्रं सुभेदार सवादकर यांच्या नात लंडनच्या प्रेरणा तांबे Prerna Tambay यांनी मला उपलब्ध करून दिली.]

13 ऑक्टोबर 1935 ला येवल्याच्या परिषदेत त्यांनी धर्मांतराची ती सुप्रसिद्ध घोषणा केली.
त्यानंतर ते याबाबतीतला समाजमनाचा कल आणि कानोसा जाणून घेण्यासाठी विविध जातींच्या परिषदा आयोजित करू लागले. देशविदेशातील बौद्ध परिषदांना उपस्थित राहून
हा विषय मांडू लागले. जनतेला या विषयाकडं घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी करू लागले.
1950च्या दशकात त्यांनी बुद्धावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
"बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या 180 प्रती छापून घेऊन अभिप्रायार्थ त्यांनी जागतिक पातळीवरील तज्ञांकडं त्या पाठवल्या. या पुस्तकाची छपाई अशी करण्यात आली होती की त्याच्या पृष्ठाच्या एका बाजुला मजकूर छापलेला होता आणि त्याची मागची बाजू तज्ञांना टिपणं, नोंदी, अभिप्राय लिहिता यावा यासाठी कोरी ठेवण्यात आली होती.
या ग्रंथाच्या छ्पाईसाठी डॉ. बाबासाहेबांकडे निधी नसल्यानं त्यांनी पंतप्रधान नेहरू यांना एक पत्र लिहिलं. 1956 साली बुद्धांच्या 2500 वर्षांच्या निमित्तानं केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं या पुस्तकाच्या काही प्रती आगावू नोंदणी करून घ्याव्यात आणि त्याची रक्कम आगावू द्यावी अशी योजना बाबासाहेबांनी सुचवली होती. नेहरूंनी पुस्तकाची आगावू नोंदणी करून घेऊन त्यापोटी निधी द्यायला किंवा अनुदान द्यायला केंद्र सरकारकडं पैसे नाहीत असं कळवत नकार दिला. मात्र तुम्ही पुस्तक अवश्य काढा, विक्रीला ठेवा, लोक नक्की खरेदी करतील असाही अनाहूत सल्ला दिला.
डॉ. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला लक्षावधी अनुयायांना धम्म दिक्षा दिली.
त्यांनी आलेल्या सुचना विचारात घेऊन या पुस्तकाचं फेरलेखणाचं काम पुर्ण केलं. प्रस्तावना लिहून पुर्ण केली. या प्रस्तावनेत त्यांनी आपली पत्नी डा. सविता यांनी आजरपणात आपल्याला जपल्यानंच हे पुस्तक आपण लिहून पुर्ण करु शकलो अस नमूद केलं. त्यांचं 6 डिसेंबर 1956 ला महापरीनिर्वाण झालं. पीपल्स एज्युकेशन सोसायटीनं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकात मात्र ही प्रस्तावना छापली नाही.
अनेक वर्षांनी समता सैनिक दलानं प्रकाशित केलेल्या मराठी अनुवादात ती प्रस्तावना प्रथमच छापली.
बाबासाहेबांचं शेवटचं भाषण काठमांडूच्या जागतिक परिषदेतलं 20 नोव्हेंबर 1956 चं मानलं जायचं. आम्ही त्यांच्या भाषणांची तीन पुस्तकं [खंड18] छापली आहेत त्यात आम्ही त्यांचं 25 नोव्हेंबर 1956 चं त्यांनी सारनाथला दिलेलं शेवटचं भाषण छापलेलं आहे.
ज्या जागेवर बसून तथागतांनी धम्मचक्र प्रवर्तनाचं पहिलं भाषण दिलं त्या जागेवर सम्राट आशोकांनी धम्मैक स्तूप बांधला. त्या स्तूपाच्या सावलीत बसून "चलो बुद्ध की ओर" अशी आर्त हाक बाबासाहेबांनी त्यांच्या या शेवटच्या भाषणात दिलेली होती.
- प्रा.हरी नरके

Sunday, April 9, 2017

आणि महात्मा फुले यांची जन्मतारीख सापडली -



महात्मा फुले यांची जन्मतारीख माहित नसल्यानं अनेक वर्षे त्यांची फक्त पुण्यतिथी [ 28 नोव्हेंबर ] केली जायची.
1969 साली महात्मा फुले समग्र वाड्मयाच्या प्रस्तावनेत संपादक धनंजय कीर आणि स.गं.मालसे यांनी फुल्यांच्या जन्माची एक आठवण नमूद केलेली होती. शनिवारवाड्याला लागलेली आग या घटनेच्या आधारे त्यांनी फुले यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1828 ला झाला असावा अशी एक शक्यता नोंदवून ठेवली होती. त्याबाबत मी त्या दोघांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केलेली होती.
तथापि फुल्यांच्या सर्वच चरित्रकारांनी फुले जन्मवर्ष 1827 दिलेले असल्यानं ही नोंद सदोष वाटत होती.
माझं "महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक 1989 ला प्रकाशित झालं. त्यातून कमलताई विचारे यांचा माझा परिचय झाला. सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या त्या सुनबाई. त्यांच्याकडच्या दुर्मिळ कागदपत्रांमध्ये सातत्यानं शोध घेताना 1891 साली सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रकाशित झालेलं "महात्मा फुले यांचे अमर जीवन" हे चरित्र मिळालं.
कॉ. गोविंद पानसरे यांचे पणजोबा नारायण बाबाजी पानसरे यांनी लिहिलेले हे चरित्र अतिशय मौलिक आणि विश्वासार्ह आहे.
त्यांच्या हस्ताक्षरातील काही पत्रंही मिळाली. 
या चरित्रात पानसरेंनी महात्मा फुले यांची 11 एप्रिल 1827 ही जन्मतारीख दिलेली सापडली.
महात्मा फुले यांच्या जन्माची नेमकी तारीख मिळाली तो क्षण युरेका ! युरेका! चा क्षण होता.
डॅा. य. दि. फडकेसर, डॅा. बाबा आढाव, डॅा. भा. ल. भोळेसर या सार्‍यांशी बोललो. खात्री करून झाल्यावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं.
फुले जन्मतारखेबाबत म.टा. आणि इतर वर्तमानपत्रात लेख लिहिले. शासकीय समितीची मान्यतेची सर्व प्रक्रिया पुर्ण करून घेतली.
सर्व शासकीय पुस्तकं आणि दस्तावेजात ही तारीख नोंदवली. मुख्य म्हणजे विधानभवनातील फुले पुतळ्याखालीही ही नोंद करून घेतली.
म. फुले यांची तोवर सर्वत्र झळकलेली रंगीत तैलचित्रं अतिशय बटबटीत होती. गोपीनाथराव पालकर आणि विजय व सरोजा परूळकर यांच्या सहकार्यानं महात्मा फुले यांच्या काचेच्या अस्सल निगेटिव्हवरून त्यांचा अस्सल कृष्णधवल फोटो विकसित करण्यात यश आलं. त्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळालं. 28 नोव्हेंबर 1992 ला शासनातर्फे या अस्सल कृष्णधवल छायाचित्राचे प्रकाशन करून त्यावर ही तारीख नोंदवली. सदर फोटो मोठा करून फुलेवाड्यात लावला.
सातत्याने गेली 25 वर्षे प्रयत्न केल्यानंतर आता कुठं म.फुले जयंती साजरी होऊ लागलेली आहे.
एखादं चांगलं काम रुजायला किती काळ लोटावा लागतो. खुप पाठपुरावा करावा लागतो. पण सत्य आणि कळकळ असेल तर यश मिळतं.
-प्रा. हरी नरके
महात्मा जोतीराव फुले यांचे अस्सल निगेटिव्हवरून विकसित केलेले कृष्णधवल छायाचित्र.

Monday, April 3, 2017

अंगारवाटा, शोध शरद जोशींचा

अंगारवाटा, शोध शरद जोशींचा - संदर्भमुल्य असलेला चरित्रग्रंथ
काळे भानू हे मराठीतले महत्वाचे लेखक आणि साक्षेपी संपादक आहेत. त्यांनी चार महिन्यांपुर्वी "अंगारवाटा, शोध शरद जोशींचा," हा महत्वपुर्ण चरित्रगंथ लिहून प्रकाशित केलेला आहे. भानू काळे यांनी या चरित्र लेखनासाठी खूप मोठी मेहनत केलेली आहे. स्वत: शरद जोशींचे सहकार्य त्यांना याकामी मिळाले. जोशींचे देशविदेशातील असंख्य सहकारी, मित्र आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन, बोलून, पत्रव्यवहार, लिखित पुरावे, वृत्तपत्रे, ग्रंथ, नियतकालिके यातील पुराव्यांचा वापर करून हे पुस्तक लिहिलेलं असल्यानं त्याला संदर्भमुल्य प्राप्त झालेले आहे.
धनंजय कीर,सुमती देवस्थळी,वीणा गवाणकर यांनी लिहिलेली मराठी चरित्रे लोकप्रिय व विद्वतमान्य ठरलेली आहेत.
अशा मोजक्या चरित्र लेखकांच्या तोडीचं काम काळेंनी केलेलं आहे.
या पुस्तकात त्यांनी शेती आणि शेतकरी यांच्याबाबत दिलेली काही माहिती हादरवून टाकणारी आहे.
केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व्ही.टी.कृष्णम्माचारी यांनी 28 एप्रिल 1956 रोजी तयार केलेल्या मसुद्यात "शेतीमालाचे उत्पादन 40 टक्क्यांनी वाढवावे व शेतीमालाची किंमत 20 टक्क्यांनी कमी करावी अशी शिफारस केलेली होती."
चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यात "सारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतीमालाचा भाव ठरवला जाऊ नये" असे मार्गदर्शक तत्वच होते.
1965 साली कृषि मुल्य आयोगाची स्थापना करण्यात आली.
त्याच्या 1971 सालच्या अहवालात असे नमूद करण्यात आलेले आहे की, "शेतकर्‍यांना त्यांचा संपुर्ण उत्पादन खर्च भरून निघेल अशा किमती देणे अव्यवहार्य होईल. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील."
शेतकर्‍याची लूट करणे हेच आपल्या देशाचे अधिकृत धोरण होते, आहे, हे वाचून लाज वाटली.
[अंगारवाटा, शोध शरद जोशींचा, भानू काळे, उर्मी प्रकाशन,पुणे,डिसेंबर 2016, पृष्ठे 510+24 आर्टप्लेट, किंमत रू.500 ]

केशवराव विचारे यांच्या भाषणांतून

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वैचारिक स्कूल्स आहेत. नानाविध विचारधारा आहेत.
विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी ही अशीच दोन स्कूल्स.
त्यांच्यात कायम वाद व्हायचे.
एकदा विश्वामित्र म्हणाले, " ज्ञान ही अशी प्रभावी शक्ती आहे की ती कोणीही कायमची दाबून ठेवू शकत नाही. हे चंद्र चांदण्यांनी भरलेलं उघडं आभाळसुद्धा ज्ञानार्जनाचं कितीतरी मोठं माध्यम आहे. आता हे कोणाला झाकता येईल का?"
वसिष्ठ म्हणाले, "सोप्पंय. त्या प्रत्येक ग्रहतार्‍याला देवादिकांची नावं द्यायची. त्यांच्या नित्यपुजा, व्रतवैक्ल्यं यात सगळ्यांना गुंतवून टाकायचं, कोणाची बिशाद आहे विचार वगैरे तापदायक गोष्टींकडे जाण्याची?"
केशवराव विचारे यांच्या भाषणांतून--

सनातनी केशवराव विचारे

तरूणपणी केशवराव विचारे कमालीचे सनातनी होते. तासंतास देवपुजा, व्रतवैकल्यं आणि नवससायास यात बुडून जायचे.
सत्यशोधक भास्करराव जाधव हे गावोगाव, शिक्षणाचं महत्व सांगणारी भाषणं करायचे.
ते अंधश्रद्धांवर टिका करायचे. अडाणीपणा, लाचखोरीवर तुटून पडायचे.
जुन्या विचारांची काही मंडळी त्यांच्यावर चिडून असायची. भास्करराव आपल्या देवाधर्माला शिव्या देतात, त्यांना कायमचा धडा शिकवा, त्यांचा आवाज बंद पाडा, असा अपप्रचार त्यांनी चालवला होता. भास्कररावांची सभा उधळून लावायची, त्यांना मारहाण करायची आणि तरिही नाहीच ऎकलं तर त्यांना ठारच मारायचं असा प्लॅन केशवराव विचारे व त्यांच्या मित्रांनी आखला.
केशवराव व त्यांचे पंधरावीस पहिलवान मित्र तयारीनिशी भास्कररावांच्या कार्यक्रमाला गेले.
भास्कररावांनी त्यांच्या भाषणात देवाधर्माला पहिली शिवी दिली की त्यांच्यावर हल्ला करायचा असं केशवरावांनी सर्वांना सांगून ठेवलं होतं.
भास्करराव अतिशय विद्वान होते. संपुर्ण मुंबई राज्यात ते मॅट्रीकच्या व पदवी परीक्षेत पहिले आलेले होते.
त्यांचं भाषण अतिशय रंगलं. भाषण संपलं.
केशवराव त्यांना भेटायला गेले. म्हणाले, " तुम्ही तर आमच्या देवाधर्माला शिवीगाळ करता असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आज काय विसरलात काय शिव्या द्यायला?"
भास्करराव म्हणाले, " मी आजवर कधीच शिवीगाळ केलेली नाही. करणार नाही. ज्यांच्याकडं विचार नसतात, ते शिवीगाळ करतात. मला काय गरज शिवीगाळीची?"
केशवराव विचारे त्या दिवसापासून सत्यशोधक झाले.

कुर्‍हाडीचा दांडा, गोतास काळ

केंद्रात ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय कशला? - पंतप्रधान नरेंद्र मोदी
1. जो ओबीसी आयोग स्थापन करण्याचे आदेश मा. सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर, 1992 ला दिले आणि ज्याची स्वतंत्र कायद्याद्वारे स्थापना 1993 साली नरसिंहराव सरकारने केली तो आपणच स्थापन केल्याचा नरेंद्र मोदींचा दावा.
2. गुजरातमध्ये मोदींनी स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात स्वत:ची घांची [ आपल्याकडची तेली ] ही जात ओबीसीत घालायला लावली, हे तेल बनवणारे तेली नाहीत तर ते तेल विकणारे व्यापारी आहेत.
3. ज्यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात "आयुष" नावाचे नवे मंत्रालय स्थापन केले तेच म्हणताहेत मंत्रालये आधीच जास्त आहेत, आता नविन कशाला?
4. ज्या परिवाराचा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीला विरोध होता त्यांचाच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला विरोध.
5. अनु.जाती, अनु.जमाती नंतर ज्या ओबीसी या तिसर्‍या घटकाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली त्यांच्यासाठी वेगळे मंत्रालय ही 1992 पासूनची मागणी आहे.
6. आपण ओबीसी आहोत याचे निवडणुकीत भांडवल करणारेच स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला विरोध करतात! ही तर केवळ कळसुत्री बाहुली!