Showing posts with label हिंदु-मुस्लीम. Show all posts
Showing posts with label हिंदु-मुस्लीम. Show all posts

Wednesday, May 6, 2020

रा.स्व.संघ २२/ " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : शिवाजी महाराज








शिवाजी महाराज म्हणतात, " ब्राह्मण म्हणून मुलाहिजा केला जाणार नाही" : प्रा.हरी नरके
"जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." छ. शिवराय

संघवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रेशीमबागेच्या रंगात पुरते बुडवून टाकलेले आहे. त्यांचे पार ब्राह्मणीकरण करून टाकलेले आहे. ही महाराजांची बदनमी आहे. महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या अफजलखानाच्या ब्राह्मण वकीलाची हत्त्या कशी केली? महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर जिवाजी विनायक सुभेदार या ब्राह्मण कारकुनाला गद्दारीबद्दल महाराजांनी शिक्षा कशी केली? ब्राहमण म्हणून कोणतीही गय केली जाणार नाही, सवलत मिळणार नाही असे त्याला ठणकावणारे महाराजांचे हे अस्सल पत्र संघवाले का दडवून ठेवतात?

ब्राह्मणाची गय केली जाणार नाही-

पत्र १८ जानेवारी १६७५ चे आहे. अतिशय जळजळीत आणि कठोर आहे. महाराज या ब्राह्मण कारकुनाला नादान म्हणतात. "गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे" या ब्राह्मणाला "हरामखोर" अशी चक्क शिवी देतात. लाचखोरही म्हणतात. तुमच्यासारख्या लाच खाणारांना "ठिकेठाक" केले जाईल असा सज्जड दम भरतात. महाराज या पत्रात म्हणतात, " ऎशा चाकरास ठीकेठाक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो?.. याउपरी बोभाटा आलिया तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनीम जालेस, ऎसे जाणून बरा नतिजा तुम्हास पावेल. ताकीद असे." महाराज जर गोब्राहमण प्रतिपालक असते तर म्हणाले असते, " ब्राहमणदेवता, आपण शत्रूचे पैसे खाल्लेत, आमच्याशी गद्दारी केलीत, हरकत नाही, आम्ही आपले धर्माचे चाकर आहोत. आपण आमचे मालक. तेव्हा आपले उत्तम चालूय. असेच पुढे चालू द्या."

ब्राह्मण असलात तरी गर्दन मारली जाईल- 

पण महाराज तर या ब्राह्मणाला चक्क धमकी देतात. बघून घेऊ म्हणतात. ब्राह्मणाला आपला चाकरही म्हणतात, हे कसे काय? बरे इथे ठीकेठाक केले जाईल म्हणजे गर्दन मारली जाईल असे महाराज सांगताहेत! धर्मशास्त्रानुसार ब्रह्महत्त्या वर्ज्य असतानाही महाराज चक्क ब्रह्महत्त्येची धमकी कशी काय देतात? त्याकाळातले काही ब्राह्मण लाचखोर होते, स्वराज्याशी गद्दारी करणारे होते याचे हे पत्र हा खणखणीत पुरावाच आहे. म्हणून तर दडवादडवी चाललेली नाही ना?

एक श्लेष काढायचा तर असे म्हणता येईल की समाजात तोवर ब्राह्मणांना विशेषाधिकार असल्याने ब्राह्मणांच्या लाचखोरीकडे, गद्दारीकडे कानाडोळा केला जात असेल. तसा मुलाहिजा [तशी सवलत ] यापुढे बंद करण्यात आलेली आहे असे महाराज या पत्रांद्वारे सुनावताहेत. मग महाराज जर गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांनी ब्राह्मणांची ही पुर्वापार चालत आलेली ही सवलत तडकाफडकी बंद कशी काय केली बुवा? दया, कुछ तो गडबड है!

" धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगणे म्हणजे ईश्वरी आज्ञेचा भंग करणे होय." - छ. शिवराय 

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. 




"हिंदवी स्वराज्य"वाली पत्रे बनावट-

महान इतिहासकार द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर आणि ग. ह. खरे यांच्या मते, ज्या पत्रांमध्ये "हिंदवी स्वराज्य" हे शिवाजीराजांचे ध्येय होते असे म्हटलेले आहे ती पत्रे विश्वासार्ह नाहीत. [ पगडी, २६] याचाच अर्थ ती पत्रे बनावट आहेत.

राज्य आणि स्वराज्य या शब्दांचे जे अर्थ आज घेतले जातात, त्याकाळात ते शब्द खूप संकुचित अर्थाने वापरले जात असत. १७ जुलै १६५७ ला चाकणच्या पुजार्‍याला दिलेल्या इनामपत्रात शिवाजीराजे आपल्या जहागिरीला राज्य म्हणतात. १६६० पर्यंत त्यांच्या ताब्यातील प्रदेश म्हणजे " मोकासा " म्हणजे देणगी मिळालेली जहागिर असाच होता.[ पगडी, २७]


जहाल धर्मांध आणि वंशवादी औरंगजेब- तो हिंदुमुस्लीम अशा सर्व भारतीयांचा द्वेश करी-

याचा अर्थ आजच्या अर्थाने राजे धर्मनिरपेक्ष होते असेही नाही. ते धर्माने हिंदू होते. हिंदू जीवनपद्धतीत वाढलेले होते. धर्मांध औरंगजेबाची वर्तणूक त्यांना अमान्य होती. औरंगजेब वंशवादी होता.

त्याला त्याच्या तुरेनियन वंशाचा गर्व होता. त्याच्या नजरेत सर्वच हिंदुस्थानी म्हणजे हिंदू आ्णि मुस्लमान दोघेही तिरस्करणीय होते. तो त्यांचा द्वेश करीत असे. याच्या उलट शिवराय धर्मवेडे नव्हते. ते धर्माचे पालन करणारे, धर्माने सांगितलेले पुजाविधी करणारे राजे होते. त्यांचा संघर्ष राजकीय होता. त्यामुळे धार्मिक अवडंबरापासून राजे दूर राहिले.

दुर्दैवाने त्यांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांचा हा संघर्ष धर्मवादी नजरेने पाहिला. पक्षपाती पद्धतीने रेखाटला. परमानंदाने तर त्यांना परमेश्वराचा अवतारच बनवून टाकले. अर्थातच राजांच्या विरोधकांचे चित्रण त्याने राक्षस असे केले. या परमानंदाचे आजचे सगळे संघीय वारसदार महाराजांचा संघर्ष हा हिंदुमुस्लीम धर्माचा संघर्ष म्हणून रंगवतात. त्यात सगळ्या मुस्लीमांच्या वागण्याला ते अतिरंजित स्वरूपात अत्याचार म्हणून पेश करतात.

बाबा याकुत यांच्या आशिर्वादासाठी राजांची धडपड -

पण ते विसरतात की, राजे सहिष्णू होते. विविध धर्म आणि पंथांबद्दल त्यांना मनापासून आदर होता. इस्लामी धर्मग्रंथ आणि मशिदी, पिरांची ठाणी यांच्याशी ते सन्मानाने वागत. बाबा याकुत यांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी राजे सदैव धडपड करीत. [पगडी, ३२]

छ. शिवराय औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "जो कोणी धर्मवेडेपणा आणि धर्मद्वेश बाळगतो तो ईश्वरी आज्ञेच्या विरूद्ध वागतो." [ पगडी, १२ ]

कुठलाच उपलब्ध दस्तऎवज अशा निष्कर्षास येत नाही की शिवाजी राजांचा संघर्ष धर्मासाठी होता असे ते मानत होते. [ पगडी, ११ ]

असहिष्णुतेमुळे विनाश -

कितीही मोठी असली तरी माणसं आणि संस्था यांचा असहिष्णुतेमुळे विनाश होतो असेही शिवाजीराजे औरंगजेबाला लिहितात. विभिन्न जाती आणि धर्म यांच्याबद्दल सहिष्णुता अवलंबिली तरच मनुष्य जातीला शांतता आणि सुबत्ता लाभेल अशीही ताकीद शिवराय औरंगजेबाला देतात. [ पगडी, १२ ] अशा शिवरायांना स्वार्थासाठी संघाने कडवे हिंदुत्ववादी बनवून टाकलेय.

कवी परमानंद संघाला सोयीचे-

शिवरायांच्या समकालीन लेखकांमध्ये संस्कृत कवी परमानंद, जयराम, हिंदी कवी भूषण, मराठी बखरकार सभासद यांनी शिवाजी राजे हिंदुंचे कैवारी असल्याचे चित्र रंगवले त्याचे कारण त्यांच्यावर [ या चरित्रकारांवर ] असलेला पौराणिक कथांचा पगडा होय.

समकालीन पर्शियन बखरकार मुहम्मद कासीम आणि मुस्तेखान तसेच दखनी लेखक नुसरती यांनी महाराजांचे वर्णन नेमके उलटे केलेय.

युरोपियन लेखक आधी महाराजांना बंडखोर ठरवतात, मात्र त्यांची सरशी होऊ लागताच त्यांचे वर्णन उमदा युवराज असे करतात.

शिवराय हिंदूंचे कैवारी होते नी ते मुस्लीमवर्चस्वाविरूद्ध लढत होते ही मांडणी टोकाची, अतिरेकी असल्याचे सेतुमाधवराव पगडी आपल्या ग्रंथात पुराव्यानिशी दाखवून देतात. [ पगडी, १३] पगडी जरी संघाचे नाव घेत नसले तरी त्यांना संघच अभिप्रेत आहे हे स्पष्ट दिसते.

संघपरिवाराचा सततचा आंधळा आणि रक्ताळलेल्या असहिष्णुतेचा त्वेष त्यांनी मुत्सद्दी राजकारणी असलेल्या शिवरायांवर शेंदरासारखा लेपून टाकलाय. हा शेंदूर खरवडायला हवा. तेव्हाच महाराजांचे खरे रूप दिसू शकेल. हे काम धर्माचे चष्मे नसलेल्या सत्यशोधकांनाच करावे लागेल.
क्रमश:....

प्रा. हरी नरके, ७/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: १. सेतुमाधवराव पगडी, छत्रपती शिवाजी, काँन्टीनेंटल प्रकाशन, पुणे, २०१९, पृ. ११, १२, १३, २६, २७,
२. दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २६४/६५

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR3iGVCMJEhRtiAUu2-k_xFSJAUkHd_IcieJC_nmxlHjCCU3KBdfHUl67dU

रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?








रा.स्व.संघ २१/ संघाचे छ.शिवराय गोब्राह्मण प्रतिपालक आणि मुस्लीमद्वेष्टेच का?- प्रा. हरी नरके

बहुजनांचे महापुरूष पळवायचे, त्यांचे दैवतीकरण करायचे आणि त्यांना स्वत:च्या कब्ज्यात ठेवायचे, आपल्या फायद्यासाठी हत्त्यार म्हणून वापरायचे ही रा. स्व. संघाची कपटनिती आहे. महाराजांचा जन्म १६३० चा. शिवराय १६८० ला गेले. त्यांचा जीवनकाळ ५० वर्षांचा होता. या ३९० वर्षातली २६० वर्षे या मंडळींना शिवरायांची साधी आठवणसुद्धा का आली नाही? या मंडळींचे शिवरायांबद्दलचे प्रेम पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे अचानकच का उद्भवले? गेल्या ५०/६० वर्षातच ते उतू का जाऊ लागले? संघाचे छ. शिवराय "गोब्राह्मण प्रतिपालक" का? "कुळवाडीभूषण" का नाहीत? ते मुस्लीमद्वेष्टेच का? संघाने महाराजांना अवतारी पुरूष का बनवलेय? संघाचे मनोहर भिडे त्यांचा उल्लेख "शिवप्रभू" असा का करतात? ३२ मण सोन्याचे सिंहासन, खडा पहारा या नावाखाली हजार बाराशे कोटी रूपयांचा " एमबी [मनोहर भिडे] केयर्स फंड" त्यांना का जमवायचा आहे? रायगडावर त्यांना कब्जा का मिळवायचा आहे? यामागे मराठा तरूणांना संमोहित करण्याचा कोणता कट, कोणती कपटनिती आहे?

देवाचे पेटंट भटजीचे- ही तर रोजगार हमी-
यांचे एक वचन आहे. " देव मंत्राधीन आहेत. म्हणजे आधी दगडाची किंवा शाडूची साधी मुर्ती असते. तिच्यात मंत्राद्वारे भटजी प्राण निर्माण करतो. विसर्जनाआधी ते पुन्हा काढून घेतो. मंत्र भटजीच्या ताब्यात असतात. अंतिमत: देवांवर मालकी कोणाची असते तर भटजीची." म्हणून प्रत्येक महापुरूषाचा यांना देव करायचा असतो. त्याचा देव झाला की त्याचे पेटंट यांच्या नावे जमा होते. त्याची रॉयल्टी पिढ्यानुपिढ्या यांना मिळते. म्हणजे मानवनिर्मित देव ही यांची हजारो वर्षांची रोजगार हमी योजना आहे तर!

जातपात नाही मानत मग दलित शंकराचार्य का नाही? दलित सरसंघचालक का नाही?

एरवी बहुजनांच्या आरक्षणाला प्राणपणाने विरोध करणारे हे लोक भटजीची नियुक्ती मात्र जन्माच्या आरक्षणाद्वारे करण्याबद्दल आग्रही असतात. तिथे का गुणवत्तेवर नियुक्त्या नको असतात? या एकाच जातीला दिलेल्या १०० टक्के आरक्षणाबद्दल सगळेच गप्प कसे असतात? तिथे का सगळ्या हिंदुंना प्रवेश नाही? आजपर्यंत एकही ब्राह्मणेतर शंकराचार्य का झाला नाही? संघ जातपात मानत नाही तर आजपर्यंत किती सरसंघचालक अनुसुचित जातींचे झालेत? किमान एक तरी शूद्र या पदावर का बसला नाही? आजही संघाच्या पहिल्या श्रेणीच्या श्रेष्ठींमध्ये एकही शूद्र किंवा अतिशूद्र का नाही?

भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा, म्हणून मुस्लीमद्वेश-
हिंदु संघटन करायचे तर भिती दाखवण्यासाठी शत्रू हवा. यांनी मुस्लीमांना शत्रू ठरवले. सतत मुस्लिम समाजाचा द्वेश करीत बोलायचे. लिहायचे. वागायचे. मुस्लीमद्वेश वगळला तर संघ संपला.
यांचे शिवराय कट्टर मुस्लीमद्वेष्टेच का? याचे उत्तर यात आहे. भारतीय संस्कृती ही मुलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे गंगा आणि यमुना या दोघींच्या एकत्रित पाण्यावर पोसलेली. या देशात हिंदु राजे महाराजे व मुस्लीम नबाब, सुलतान यात संघर्ष झाले, हे खरे आहे. पण ते धर्माचे नव्हे तर सत्तेचे संघर्ष होते. इथली सामान्य हिंदुमुस्लीम जनता गुण्यागोविंदाने नांदत होती. गावोगावी हिंदुलोक मुस्लीम पिरांच्या यात्रा करीत होते. पिराच्या पुजा करीत होते. कोकणात मुस्लीम लिगची स्थापना झाली तर ती गावच्या मारूतीला नारळ फोडून. [ संदर्भ- हमीद दलवाई]

सत्तेसाठी झालेल्या लढाया या धार्मिक लढाया नव्हत्या. म्हणून इंग्रजी राज्य यायच्याआधी या देशात कधीही हिंदुमुस्लीम जातीय दंगली झाल्या नाहीत. १८५७ चे स्वातंत्र्यसमर ते दोघे एकत्रितपणे लढले. इंग्रजांनी त्यांच्यात पद्धतशीरपणे फूट पाडली म्हणून आठशे वर्षांच्या इतिहासात ११ ऑगष्ट १८९३ ला भारतातली पहिली हिंदुमुस्लीम दंगल झाली. पुढे मुस्लीम लिगने घडवलेल्या दंगली व पाकीस्तानची निर्मिती यातनं कटुता वाढत गेली. पाकच्या कारवायांनी तर आता ही कटुता, द्वेशभावना, आकसभावना गु्णाकाराच्या वेगाने वाढते आहे.

गंगाजमुना तहजीब-

इथले संगित, खाणेपिणे, कपडेलत्ते, भाषा, साहित्य, कला, विद्या या सार्‍यांमध्ये सरमिसळ आहे. अगदी रक्तातसुद्धा. भांडारकर नावाच्या शास्त्रज्ञांनी १०० वर्षांपुर्वीच हे सिद्ध केलेले आहे की शुद्ध रक्त नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. हजारो, लाखो वर्षांच्या मानवी प्रवासात सगळ्यांचे रक्त एकमेकात मिसळलेले आहे. शुद्ध रक्ताच्या निव्वळ थापा आहेत.

एक हिंदू व दोन मुस्लीम सत्ता मिळून मुघलांशी का लढत होते?
आज महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांचे सरकार अस्तित्वात येण्यामागे ज्या पत्राचे सुत्र आहे, तिकडे आपले लक्ष वेधतो. पत्र शिवाजी राजांचे आहे. मार्च १६७७ मधले आहे. राज्याभिषेकानंतरच्या राजकारणावरचे आहे. मालोजीराजे घोरपडे यांना लिहिलेले आहे. महाराज पत्रात म्हणतात, "संप्रती राजकारण वर्तमान म्हणजे, दक्षिणेचे पातशहा तीन.निजामशाह, आदिलशहा, कुतुबशाहा. त्यातली निजामशाही बुडाली... पठाण [दिल्लीकर मुघल] बळावला म्हणजे एका उपरी एक दक्षिणीयांची घरे बुडविल. कोणास तगो देणार नाही. ऎसे आम्ही समजोन कुतुबशहा यांसी पहिलेपासून रूजुवात राखिली होती... आम्ही त्यांच्या भेटीस गेलो. या भेटीत असे ठरले की, "आपली पादशाही जितकी वाढवू तितकी वाढवणे. पठाणाची नेस्तनाबूत करणे. दक्षिणेची पादशाही आम्हा दक्षिणीयांच्या हाती राहे ते करावे."

शिवाजी महाराजांचे हे पत्र हा सज्जड पुरावा आहे की लढाई हिंदुमुस्लीम अशी नव्हती. १ हिंदू आणि २ मुस्लीम सत्ताधिश एकत्र मिळून मुस्लीम असलेल्या मोगलांशी लढत होते. कारण लढाई धर्माची नाही तर सत्तेची होती.
क्रमश:....

प्रा.हरी नरके, ६/५/२०२०

संदर्भासाठी पाहा: दि. वि. काळे, छत्रपति शिवाजी महाराज, पुणे विद्यापीठ, पुणे, १९७१, पृ. २७१

संपुर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.  https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR1wyrOJM-Z-vA7dsV47JiWtcD0MoB4SNG4ykT0bG9U1akS6hQtPCgm-Ybg

Friday, April 17, 2020

हिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा-, भीमजयंती 20/6









भाग ४. हिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा- @Prof Hari Narke- प्रा. हरी नरके

       केवळ एक व्यक्ती एक मत यापेक्षा एक व्यक्ती एक मुल्य यावर बाबासाहेबांचा भर होता. सामाजिक लोकशाहीची मुल्ये त्यांनी राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केली.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक असावे ही ४५ व्या कलमातील तरतूद त्यांना मुलभूत अधिकारात आणायची होती. ती त्यांना आणता आली नाही. मात्र त्यासाठी त्यांनी १० वर्षांची त्याला मुदत घातली होती. पुढे १ एप्रिल २०१० ला शिक्षण हक्क कायदा आणून सर्व शिक्षण मोहिमेद्वारे आपण जे केले ते त्यांना तेव्हाच हवे होते, यावरून त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गियांना आरक्षण देण्याची तरतूद केली. आरक्षणामागे " समान संधीसाठी विशेष संधी" असे समतेचे तत्वज्ञान असून राजकीय आरक्षण १० वर्षांऎवजी जास्त काळ द्यावे लागेल असे भाकीत त्यांनी केले होते.

Indian first, Indian last and nothing else but Indians-

४ एप्रिल १९३८ रोजी मुंबई प्रांताच्या विधीमंडळात तळमळीने आणि राष्ट्रभावनेने बोलताना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, "I do not like what some people say, that we are Indian first and Hindus afterwards or Muslims afterwards. I am not satisfied with that, I frankly say that I am not satisfied with that. I do not want that our loyalty as Indians should be in the slightest way affected by any competitive loyalty whether that loyalty arises out of our religion, out of our culture or out of our language. I want all people to be Indian first, Indian last and nothing else but Indians." सर्व देशवासियांनी आपली ओळख फक्त भारतीय म्हणून सांगण्याचा हा दिवस अजुनही उगवलेला नसल्याने डॉ. बाबासाहेबांचे हे स्वप्न अजूनही अधुरे आहे.

हिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती-

" If Hindu Raj does become a fact,it will, no doubt, be the greatest calamity for this country.No matter what the Hindus say, Hinduism is a menace to Liberty, Equality, and Fraternity. On that account it is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost." [ Pakistan or The Partition of India,1946, pp.358, Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.8, 1990, pp.358]

बाबासाहेब हिंदुत्वाचे समर्थक होते असा भ्रम आजकाल पसरवला जात आहे. " हिंदु राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराज्य घडू देता कामा नये." [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८ ] या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आजच्या नासक्या आंब्यातील रेशीमकिड्यांना अजिबात परवडणारे नाहीत. पण तरिही हे विकृत लोक संदर्भापासून तोडलेल्या अर्धवट विधानांच्या आधारे बुद्धीभेद करण्याचे आणि अफवांच्या अभियानाद्वारे बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्यांचा यशस्वीपणे प्रतिकार करायचा असेल तर एकटादुकटा समाज तो करू शकणार नाही. त्यासाठी तमाम बहुजन आणि पुरोगामी छावणीतले सर्वजण एकत्र यायला हवेत.
   
जातीय बहुमत नको तर विचारांचे बहुमत हवे-

     शोषित, वंचित समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते हे ओळखून दलित उपेक्षितांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मुक्तीसाठी ते राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या हेतूने निवडणुकांच्या राजकारणाकडे बघतात. निवडणुकीतील पराभव हे खेळातील पराभवासारखे असतात, त्याने नाउमेद न होता पुन्हा नव्या जोमाने खेळायचे असते असे ते म्हणतात. दलितांनी व मागासवर्गियांनी आपली करारपात्रता { Bargaining Power } वाढविल्याशिवाय त्यांना समान वाटा मिळणार नाही असे ते स्पष्ट सांगतात. आंबेडकरांची सत्तासंकल्पना संघर्षातून नव्हे तर समन्वयातून साकार होणारी आहे. त्यांच्या राजकारणाचा संपूर्ण रोख समाजबदलावर होता. बळकट विरोधी पक्ष, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे जतन आणि निवडणुकांद्वारेशांततामय मार्गाने सत्तांतर यावर त्यांचा सारा भर होता.

विरोधी पक्षाचा वचक नसेल तर तो सत्तेचा गैरवापर करील या भुमिकेतून ते द्विपक्षीय पद्धतीचा पुरस्कार करतात. तुल्यबळ दोन पक्ष असतील तेव्हा मागास वर्गियांनी तराजूतील " पासंगा"चे राजकारण करावे असे ते सांगतात. संघटित शक्तीच्या बळावरच सत्ता आणि भौतिक लाभ त्यांना मिळवता येईल असा आशावाद ते व्यक्त करतात. आपल्याला जातीय बहुमत नको तर विचारांचे बहुमत हवे असे ते म्हणतात. वरिष्ठवर्णियांच्या दयाबुद्धीवर विसंबण्यापेक्षा राजकीय बहुमताच्या आधारे वाटचाल करा असा सल्ला ते देतात. धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना त्यांनी स्विकारली होती. धर्मांतरामागे त्यांची प्रेरणा अध्यात्मिक असण्याऎवजी महान लोकशाहीवादी बुद्धाचा स्विकार ही होती.

माणसाकडे पुनर्विचाराचे व विचार बदलण्याचे धाडस हवे-

        आपण जर एकाच विषयावर दोनदा किंवा अधिकवेळा बोललो अथवा लिहिले असेल आणि त्यात विसंगती असेल तर त्यातील कालानुक्रमे शेवटी आलेले मत प्रमाण मानावे असे सांगून ते म्हणतात, "जबाबदार माणसाकडे पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धाडस असलेच पाहिजे."  डॉ. बाबासाहेब ‘भाषावार प्रांतरचनेवरील विचार’ या विषयावरील लेखनात इमर्सनला उद्धृत करुन म्हणाले होते, “ द्वेषबुद्धीने माझ्यावर टिका करणार्‍या आणि माझ्या विसंगतीचेच भांडवल करू पाहणार्‍या माझ्या टिकाकाराला मी सरळ उत्तर देत आहे.

विचारातील सातत्य, सुसंगती, तोचतोचपणा  हा गाढवाचा सद्गुण आहे असे इमर्सनने म्हटले आहे. सुसंगती राखून मला गाढव व्हायचे नाही. सुसंगतीच्या नावाखाली एकेकाळी व्यक्त केलेल्या मताला कोणताही विचार करणारा माणूस स्वत:ला जखडून घेणार नाही. सुसंगतीपेक्षाही जबाबदारी जास्त महत्वाची असते. जबाबदार माणसाकडे एकदा शिकलेले विसरून जाण्याचे, पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धैर्य असले पाहिजे. अर्थात तसे करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेशी आणि सबळ कारणे असली पाहिजेत. कारण विचारविश्वात अंतिम असे, शेवटचा शब्द म्हणून काही नसते.” यावरून आंबेडकरवाद हा परिवर्तनशील राजकीय विचार होता हे स्पष्ट होते.

आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार -

डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा लक्षात घेऊनच दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी आणि नेपाळने आपली राज्यघटना बनवताना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला होता.
आज डॉ. बाबासाहेब हे सामाजिक न्याय, ज्ञाननिर्मिती आणि लोकशाही विचारधारेचे प्रतिक बनले असून डॉ. रामचंद्र गुहा यांच्यासारख्या थोर इतिहासकाराने तसेच नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला आहे.

परिवर्तनासाठी बौद्धांनी जाणीवपुर्वक बॅकसीट घ्यावी-

अशा सर्वव्यापक राष्ट्रनेत्याचा दलितांचा उद्धारकर्ता असा मर्यादित उल्लेख करणे अन्यायकारक आहे. हे चित्र बदलणे शक्य आहे. भारतीय जनसंघ-भाजपाची प्रतिमा " भटाब्राह्मणांचा" पक्ष अशी होती. तेव्हा ती बदलायचे ठरवून वसंतराव भागवत यांनी "माधव" सुत्रानुसार गोपीनाथ मुंढे, ना.स.फरांदे व अण्णा डांगे यांचे नेतृत्व तयार केले. त्यातून त्यांनी काही वर्षातच पक्षाची प्रतिमा बदलली.

यापुढे बौद्ध, आंबेडकरवादी नेत्यांनी जाणीवपुर्वक बॅकसीट घेऊन बाबासाहेब हे ओबीसी, बलुतेदार- अलुतेदारांचे, महिलांचे, शेतकर्‍यांचे नेते होते ही प्रतिमा रूजवण्यासाठी त्या त्या समुहातील अभ्यासक, नेते, प्रचारक, प्रसारक यांना बळ द्यायला हवे, त्यांना समाजात पुढे करायला हवे.

काही वर्षात " भारतभाग्यविधाता बाबासाहेब" ही प्रतिमा निर्माण करणं शक्य आहे. तर आणि तरच हा जातीयवाद्यांचा बुलढोझर रोखता येईल. नाहीतर अवघड आहे. आज त्यांनी मुस्लीमांना एकटे पाडले आहे. दुसरा नंबर बौद्धांचा, आंबेडकरवाद्यांचा असेल, हे लक्षात घेता जलदी करायला हवी. नाहीतर एका महासुर्याला एका समाजगटापुरते कायमचे सिमित केले जाईल व प्रतिक्रांतीचे राजकारण देशावर लादले जाईल. बहुजनांना भवितव्य लोकशाहीतच आहे, हिंदुराष्ट्रात म्हणजे उत्तर पेशवाईत नाही ह्याचा विसर पडू देता कामा नये.

{ भाग ४ था }
- भीमजयंती २०२० लेखमाला समाप्त -

- @Prof Hari Narke- प्रा. हरी नरके - १७/४/२०२०

[लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.]
उरलेला लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/ या लिंकवर क्लीक करा.

Friday, April 3, 2020

मौनाचा धुर्तपणा थोरच-आकस फारच सकस

समाजमाध्यमांवर व्यक्त होणारे जे काही ओपिनियन मेकर्स आहेत त्यात बहुसंख्यांक पुरोगामी हे उच्चवर्णीय समाजवादी वा मार्क्सवादी छावणीतले आहेत. ते हिंदुत्ववाद्यांवर तोंडसुख घेतात ते ठिकच आहे. मात्र मुस्लीम समाजातील सनातनी, जात्यंध, धर्मांध शक्तींबद्दल बोलायचे झाले की यातले ९९% हे मौनात जातात. हा हिंदु पुरोगाम्यांचा सनातन बोटचेपेपणा आहे. नरहर कुरूंदकर आणि हमीद दलवाई हे याला अपवाद होते.

त्यामुळे ते हिंदुत्ववादाविरोधी असण्यापेक्षा हिंदुविरोधी असल्याचा प्रभावी प्रचार करणे हिंदु सनातनी शक्तीला सोयीचे जाते.

सामान्य हिंदू माणसाला ते पटतेही. त्यामुळेच हिंदु समाजामध्ये यांना काडीमात्र प्रतिष्ठा नाही.


ह्या बोटचेपेपणाची सुरूवात फार जुनी आहे. देशाच्या तत्कालीन श्रेष्ठ नेत्यांना हिंदुमुस्लीम प्रश्न जितका जिव्हाळ्याचा वाटला तितका एस.सी.एस.टी. ओबीसींचा प्रश्न कधीही महत्वाचा वाटला नाही.

मुस्लीम समाजातला ९९ टक्के वर्ग हा हिंदुंमधून धर्मांतरीत झालेला आहे. त्यातले जे उच्चवर्णांमधून तिकडे गेले ते तिकडे अश्रफ म्हणून ओळखले जातात. ह्यांची संख्या मूठभर असली तरी संपुर्ण सनातनी मुस्लीम छावणीचे नेतृत्व या अश्रफांकडे आहे.

जे घटक हिंदु ओबीसी आणि एस.सी.एस.टी.मधून धर्मांतरित झाले ते तिकडे अजलफ आणि अर्जल मानले जातात. त्यांच्या हातात नेतृत्व नाही. हा वर्ग गरिब, अल्पशिक्षित, कष्टकरी आणि कारागिर आहे. अश्रफ यांच्याशी बेटीव्यवहार करीत नाहीत.

हिंदु सनातनी छावणीचे नेतृत्व आणि मुस्लीम सनातनी छावणीचे नेतृत्व दोन्हीही उच्चवर्णियांच्याच हाती असल्याने यांचे नेतृत्वाचे हितसंबंध आहेत. त्यांची मूस एकच असल्याने विरोधीभक्ती, मिलीभगत आणि वर्ग वर्ण जाणीव यांच्यात सामंजस्य आहे. कमालीचा आप्पलपोटेपणा, दांभिकपणा, सामान्य माणसाविषयीची तुच्छता आणि अहंभाव ही यांची खास वैशिष्ट्ये. यांचा सामान्य वर्गातून आलेल्या बुद्धीमंतांबद्दलचा आकस फारच सकस असतो. त्यांना कॉर्नर करणे, त्यांची मुस्कटदाबी करणे, त्यांच्याविषयी बदनामीकारक, तुच्छतावादी अफवा पसरवणे यासाठी ते एकवटतात. अशांना बहिष्कृत करण्यासाठी ते जीवाचे रान करतात. बहुजन राज्यकर्तेही यांच्याच ओंजळीने पाणी पिणारे. मांडलिक. त्यामुळे प्रशासन, न्यायव्यवस्था, माध्यमं हे लोकशाहीचे चारही खांब यांच्याच हातात.


बाजूचे आणि विरोधी असे सगळेच चर्चाविश्व व्यापून टाकण्याचा हा गेम फार मजेदार असतो. हे हिंदु पुरोगामी ज्ञानी लोक जगातील प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होतात मात्र ते ओबीसी, एस.सी. एस.टी. यांच्या प्रश्नांवर कायम मिठाची गुळणी धरून बसतात. हा मौनाचा धुर्तपणा थोरच असतो.

-प्रा.हरी नरके,
०३/०४/२०२०

Wednesday, April 1, 2020

या सापळ्यात आपण अडकता कामा नये- प्रा. हरी नरके






अ, ब, क, ड या जात-जमातवादी, जात्यंध, धर्मांध संघटना असल्या व त्या एकमेकांवर आग ओकत असल्या तरी त्या मागून हातमिळवणी असलेल्या संघटना आहेत. विरोधीभक्ती हे यांचे जगण्याचे सूत्र असते. या संघटनांचा बरीच वर्षे व सखोल अभ्यास केल्यानंतर माझे झालेले हे मत आहे. आपल्याला एकमेकांच्या अंगावर सोडण्यासाठी, वादात गुंतवून टाकण्यासाठीच हे भांडणाचे नाटक असते. अ, चे चुकले की ब चे या वादात आप का पडायचे? आपण आपसात का झुंजायचे? हे सारे एकाच माळेचे मणी आहेत.
हे सगळे एकत्र बसून स्ट्रॅटेजी ठरवतात आणि त्यावर आपल्यासारख्या सामान्यांना नाचवतात. यांनी एक फुसकी सोडली की लागले सगळे कामाला. आपले डोळे कधी उघडणार? ही सगळीच बांडगुळे आहेत, सामान्य माणसाचे रक्त शोषन करणारी. आपसात लढू देत त्यांना. मरू देत त्यांना. मुळात ती लढाई नसतेच. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखे कर अशी ही रणनिती असते. या डावपेचांना आपण बळी पडता कामा नये.
प्रा.हरी नरके, १ एप्रिल, २०२०

Friday, September 28, 2018

मंटो







सआदत हसन मंटो हा काळाच्या खूपखूप पुढचा लेखक होता. तो अकाली गेला. ११ मे १९१२ ला जन्मलेला हा गुणी लेखक वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी १८ जानेवारी १९५५ ला गेला. तो बंडखोर आणि सामाजिक वास्तवाचं प्रखर चित्रण करणारा कथाकार असल्यानं त्याच्यावर अश्लिल लेखणाबद्दल ब्रिटीश भारतात ३ आणि नवनिर्मित पाकीस्तानात ३ असे सहा खटले भरले गेले. आज त्याच्या या कथा वाचताना त्यात चिमूटभरही काही आक्षेपार्ह असल्याचं दिसत नाही. मात्र सनातन्यांनी ह्या प्रतिभावंत लेखकाला कोर्ट कचेर्‍यांमध्ये अडकवून टाकलं. मनस्ताप दिला.


मंटोसारखा बेडर, निर्भय माणूस फाळणीतील रक्तपात, धार्मिक कत्तली बघून घाबरला आणि आयुष्यातली सर्वात मोठी चूक करून बसला. तो मुंबईतील आगीतून उठून लाहोरच्या फुपाट्यात जाऊन पडला. स्वातंत्र्यानंतर त्याचं पाकीस्तानला निघून जाणं त्याला संपवणारं ठरलं. धर्मांध मुल्लामौलवींचं वर्चस्व असलेल्या पाकीस्तानला मंटोचं मोठेपण कळणं केवळ अशक्य होतं. पाकीस्तान म्हणजे सनातनी आणि पागल अशा धर्मांध लोकांचं महागटार.

मंटोला बहुधा डेथ विश असावी. तो मृत्यूसाठी आतूर असावा. भसाभसा सिगारेटी फुंकणं, रात्रंदिवस दारू ढोसणं याच त्याच्या जीवनशैलीमुळं तो फार लवकर गेला. त्याच्या हयातीत तर त्याचं मोठेपण त्याच्या देशाला कळलंच नाही. जेव्हा पाश्चात्य जगानं मंटोला डोक्यावर घेतलं तेव्हा कुठे  ५७ वर्षांनी २०१२ साली पाकीस्तान सरकारनं त्याला पहिला मरणोत्तर गुणवत्ता सन्मान प्रदान केला. त्याच्यावर पोस्ट स्टॅंप काढला.


मंटोचं लेखक म्हणून आयुष्य अवघं २१ वर्षे होतं. त्याच्या हयातीत त्याची २६ पुस्तकं प्रकाशित झाली होती. हा वेग मोठा असण्याचं कारण त्यानं दुसरा कामधंदा न करता निव्वळ लेखणावर उदरनिर्वाह करायचं ठरवलं होतं. जे आजही अवघड आहे, तेव्हातर होतंच आणि पाकीस्तानात तर अशक्यच. त्यासाठी सुमार असंही त्यानं बरंच खरडलं. त्याच्या स्वभावातले आणखी २ विरोधाभास म्हणजे तो दुसर्‍यांच्या लेखणावर कडवट आणि अवास्तव टिका करायचा पण त्याच्या लेखणावर कुणी टिका केली तर ती त्याला सहन व्हायची नाही. जिव्हारी लागायची. तो भडकायचा. दुसरं म्हणजे मुलंबाळं उपाशी आहेत, मुलगी आजारी आहे आणि औषध आणायला पैसे नाहीत यानं परेशान असलेला मंटो करतो काय तर दारू ढोसत बसतो. त्याचंही तत्वज्ञान ऎकवतो. समर्थन करतो. ही बुझदिलीच होती त्याची.


असला पलायनवादी माणूस लेखक म्हणून मात्र तगडा होता. बंडखोर होता. वेश्या, वेडे, फाळणीत पोळलेले लोक यांच्यावरच्या त्याच्या कथा दाहक आहेत. प्रचंड अस्वस्थ करणार्‍या आहेत. मानवी जीवनातली विसंगती, दांभिकता आणि अनिश्चितता यावरचं मंटोचं भाष्य आरपार भिडणारं आहे. "टोबा टेक सिंग" ही एका वेड्याच्या जीवनावरची त्याची कथा सुन्न करणारी आणि डोळ्यातून पाणी काढणारी आहे. "खोल दो" सारख्या कथेतनं त्यानं पुरूषांच्या हैवानियतवर केलेलं सुचक भाष्य झिणझिण्या आणणारं आहे.
समाजशास्त्रीय दस्तावेज म्हणून निग्रो आणि दलित साहित्यानं जी श्रेष्ठ वैश्विक कामगिरी केली त्यातला मंटो हा आघाडीचा लेखक मानला जायला हवा.

"मोगले आझम" सारखा भारतीय चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झालेला अव्वल दर्जाचा चित्रपट काढणार्‍या लेखक -दिग्दर्शक के. असिफ यांच्या एका स्क्रिप्टवर आपला अभिप्राय देताना मंटो त्यांना सांगतो, मी अभिप्राय देण्याचेही पैसे घेतो. असिफ त्याला पैसे देतात तेव्हा ते घेऊन हा गडी त्यांना काय सांगतो तर तुमची स्क्रीप्ट तद्दन बकवास आहे.

"थंडा गोस्त" ह्या मंटोच्या तगड्या कथेवर पाकीस्तानात अश्लिलतेचा खटला भरला जातो. आपल्या साक्षीच्या दरम्यान प्रख्यात कवी फैज अहमद फैज कोर्टाला सांगतात की मंटोची ही कथा अश्लिल नाही. मात्र वाड्मयीन गुणवत्ता पाहता ही कथा सामान्य दर्जाची आहे. तर मंटो त्यांच्यावर भडकतो.

मंटोनं अठरा महिने ऑल इंडीया रेडीओवर उर्दू विभागात नोकरी केली. त्याकाळात त्यानं सादर केलेल्या कलाकृतींचे पाच खंड प्रकाशित झालेत. अर्थातच मनस्वी स्वभावाच्या मंटोचं वरिष्ठांशी पटणं शक्य नव्हतं. आधी तो सिनेसृष्टीत काम करीत होता. तिथेच तो परततो. एका बॅरिस्टर घराण्यातला हा उच्चशिक्षित युवक डाव्या विचारांनी प्रभावित होतो आणि प्रागतिक प्रवाहात येतो. त्याचे वडील न्यायाधिश होते. मंटोचा जन्म लुधियानाचा आणि त्याचा मृत्यू झाला लाहोरला. त्याचं करियर बहरलं ते मुंबईत. श्याम, अशोक कुमार, जद्दन बाई, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर, नौशाद हे त्याचे समकालीन. सखे सोबती.

अशा या रसरशीत, बंडखोर आणि हाडामासाच्या चक्रम लेखकावर, मनस्वी कलावंतावर, प्रचंड मेहनत करून नंदीता दास या गुणी अभिनेत्रीनं "मंटो" हा चरित्रपट निर्माण केलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने गांधी, आंबेडकर, भाग मिल्खा भाग, दंगल, असे काही दर्जेदार बायोपिक दिलेले आहेत. त्याचा आलेख आणखी उंचावणारा हा एक महान चित्रपट आहे.


मंटो हा चित्रपट कलात्मक असूनही अजिबात दुर्बोध नाही. २ तास हा सिनेमा आपल्यावर असं गारूड करतो की आपण मंटोला कडकडून भेटतोय असं वाटत राहातं. मंटोला आदर्श किंवा लार्जर दॅन लाईफ न बनवता नंदीताने जसा होता तसा पेश केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेला मंटो हा त्याच्या आजवरच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ठ रोल आहे. कदाचित ऑल टाईम बेस्ट भुमिका. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन नंदीताचं आहे. नंदीता ही सत्यजित रे यांच्या मालिकेतली जागतिक गुणवत्तेची प्रतिभावंत दिग्दर्शक आहे हे या चित्रपटातून सिद्ध होतं. भारतीय चित्रपटानं जागतिक उंची गाठल्याचा हा अनुभव केवळ अविस्मरणीय आहे.

भारतीय संहिता, अभिनय, छायाचित्रण, पार्श्वसंगित, दिग्दर्शन, चित्रभाषा किती उत्कृष्ठ असू शकते हे पाहण्यासाठी तरी हा सिनेमा प्रत्येक सिनेरसिकाने पहायला हवा. विशेषत: सामान्य प्रेक्षक, दर्जेदार काही पाहणारे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि दलित, ग्रामीण साहित्यप्रेमी यांनी तरी एक अजरामर भारतीय कलाकृती म्हणून हा सिनेमा नक्कीच बघायला हवा.


असे चित्रपट वारंवार बनत नसतात. ते पंचवीसतीस वर्षातून एखादाच अप्रतिम चित्रपट या कॅटॅगिरीतले असतात. सलाम मंटो. सलाम नंदीता. सलाम नवाजुद्दीन.

-प्रा. हरी नरके, २८ सप्टेंबर २०१८
......................................

मंटोची काही पुस्तकं मुंबईच्या अक्षर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेली आहेत.
त्याचा एक निवडक कथांचा खंड नागपूरच्या विजय प्रकाशनाने काढलेला आहे.
त्याने लिहिलेल्या व्यक्तीचित्रांचे पुस्तक मुंबईच्या लोकवाड्मय गृह ने प्रसिद्ध केलेले आहे. त्याची कादंबरी पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनानं छापलेली आहे.
ही सर्व पुस्तकं, पुस्तक पेठ कोथरूड,पुणे, किंवा अक्षरधारामध्ये मिळतील.

विकीपिडीयात मंटोच्या उर्दू, हिंदी, इंग्रजी पुस्तकांची माहिती दिलेली आहे. त्याची ११ पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत.



Tuesday, September 25, 2018

गणपती आणि इस्लाम खतरे में -










भारतीय संस्कृती ही मूलत: गंगाजमुना तहजीब आहे. म्हणजे संमिश्र आणि सहिष्णू संस्कृती आहे. तिच्यावर कोणत्याही धर्मातील सनातन्यांनी हल्ला केला तर त्याचा निषेध व्हायलाच हवा. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शिख, पारशी, ज्यू, जैन, बौद्ध या सर्वच धर्मांमध्ये जसा प्रागतिक विचार मानणारे आधुनिक लोक असतात तसेच कट्टरपंथी, अधू मानसिकतेचे आणि सनातनी वृत्तीचे लोकही आहेत. त्या त्या धर्मातल्या प्रागतिकांनी त्याविरुद्ध आवाज टाकायला हवा. लढायला हवे. संघर्ष करायला हवा.

एमआयएमचे आमदार श्री. वारिस  पठाण त्यांच्या मतदार संघातील गणपती मंडळाला भेट द्यायला गेलेले असताना तिथे भाषणात गणपतीबद्दल बोलले, गणपती बाप्पा मोरया म्हणाले तर मुस्लीम सनातन्यांनी त्यावर गहजब माजवला आणि मग आमदारांनी जाहीरपणे माफी मागितली. हे अनुचित घडत असताना जर प्रागतिक मुस्लीम गप्प बसणार असतील तर ते दुर्दैवी आहे. यातनं मुस्लीम समाजाला ब्रॅंड करणार्‍यांनाच बळ मिळेल. मुस्लीम समाजाची स्पेस आणखी कमी होईल. चार्वाक ते चोखामेळा, नामदेव, ज्ञानेश्वर ते तुकाराम, फुले-शाहू- आंबेडकर,रानडे ते गांधी अशांनी झुंज केली, बंडखोरी केली म्हणूनच हिंदू समाजातला प्रागतिक प्रवाह मोठा झाला. टिकला. त्याला खिळ घालण्याचे प्रयत्न चालू असताना तुम्हाला तुमच्या समाजातल्या असहिष्णूतेबद्दल बोलावे लागेल. अहो, मौलाना अबूल कलाम आझाद उपनिषदांच्या योगदानावर लिहित होते. शेवटी भारत हा एकधर्मिय नाहीये. तो बहुसांस्कृतिक आहे.

इस्लाममध्ये जे जे सांगितलेय ते पवित्र आहेच, त्याबद्दल वादच नाही. प्रश्न आपल्या शेजारी राहणार्‍या इतर धर्माच्या लोकांच्या भावनांना आपण काही किंमत द्यायची की नाही हा आहे? देशाचा परिसर, माती, निसर्ग, सहजीवन, कला, शिक्षण, संगित, व्यवहार आणि कालानुरूपता या गोष्टी समजून घ्यायच्या की नाही?


१. श्री. हमीद दलवाई यांनी त्यांच्या पुस्तकात एक आठवण लिहिलेली आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात कोकणातल्या मुस्लीमांनी "मुस्लीम लिग" या पक्षाच्या शाखेची स्थापना करायचा निर्णय घेतला. ते सगळे दलवाईंच्या वडीलांना भेटले. त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी सर्वांनी त्यांना गळ घातली. मुस्लीम लिगच्या कोकण शाखेचे उद्घाटन चिपळूणच्या मारूतीला नारळ फोडून झाले.

२. अल्लाशिवाय मी कोणालाही मानणार नाही हे विधान तारतम्याने घ्यायचे की ते सतत ताणत बसायचे? बरं मग, अजमेर दर्गा, दिल्ली निजामुद्दीन, हाजी अली, मंगळूर पीर दर्गा, खेड शिवापूर दर्गा अशा शेकडो ठिकाणी असलेल्या पीराला सगळे मुसलमान भजतात, हे बंद केले गेलेय का? मुळात करायचे का? सुफी योगदान नाकारायचे का? कबीर, साई हे सारेच बाद करायचे काय?

३. संत शेख महमद, जैतून बी हे वारकरी परंपरा मानणारे, मग त्यांना मुस्लीम समाजातून बहिष्कृत करायचे काय?

४. इस्लाममध्ये व्याज घेणे हराम असताना मुस्लीम को ऑपरेटिव्ह बॅंका कशा चालतात हो?

५. दारू प्यायला मनाई असताना दारू पिणारे कसे चालतात हो?

६. इस्लाम म्हणजे शांती, मग अतिरेकी, तालीबानी, अंडर वर्ल्डच्या टोळ्यांना, गुन्हेगारांना कसा काय थारा मिळतो हो?

७. सम्राट अकबराच्या नाण्यांवर रामसीतेचे चित्र असायचे तर गुलाम हैदरच्या [टिपूचे वडील] शंकर पार्वतीचे ही आपली मिलिजुली विरासत आहे.

यादी खूप मोठी करता येईल.
हिंदूंची सर्वात लोकप्रिय भजनं मुस्लीम गीतकारांनी लिहिलीयत, संगीतबद्ध केलीयत नी गायलीही आहेत. आणि उलटेही झालेले आहे. मोहरम, पीराचा उरूस यात हिंदूही पुढाकार घेतात. हे टिकवायला हवे. संवाद बंद झाला तर अंतर वाढेल. धार्मिक सलोखा लयाला जाईल.

व्यवहार म्हणून गैर गोष्टी खपवून घेतल्या जातात, मग शेजारधर्म म्हणून इतर धर्मियांच्या बाबतीत सहिष्णू राहायचे की नाही? प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या काळात नमाज लाऊड स्पिकरवरून पढली जायची काय? गणपती, नवरात्र आदीतले डीजे गैरच. पण नमाजचे भोंगेही अनावश्यकच. तुमचा धर्म हा तुमचा घरगुती मामला आहे. तो रस्त्यावर आणायची गरज नाही. राज्यघटनेने विवेकाचे आणि धर्माचे स्वातंत्र्य दिलेले आहे. दुसर्‍याच्या विवेकबुद्धीवर जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही.


एका शासकीय प्रशिक्षण संस्थेत माझ्या एका उच्चपदस्थ मित्राने मुस्लीम समाजाचे आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, निवारा, कुटुंब नियोजन आणि सच्चर कमिटीचा अहवाल यावर सर्वदूर प्रबोधन करण्यासाठी २०० कार्यक्रमांचे आयोजन केले. त्याला मुस्लीम समाजातील हजारो स्त्रिया व तरूणांनी  प्रतिसाद दिला. त्यातल्या एका कार्यक्रमाला मंत्रालयातले एक अतिवरिष्ठ मुस्लीम अधिकारी उपस्थित होते. ते वक्त्यांचे आभार मानताना म्हणाले, "कुराणात सगळे काही सांगितलेले आहे. या कार्यक्रमाची गरजच नाही. सामाजिक- शैक्षणिक प्रबोधन हे कुराणाच्या विरोधात आहे. बंद करा हा कार्यक्रम."

आम्ही ज्यांनी ज्यांनी या २०० कार्यक्रमांच्या आयोजनात पदरमोड केलेली होती, त्यांना सर्वांना समारोप कार्यक्रमात बोलू दिले गेले नाही. कारण देण्यात आले, आम्हाला नॉन मुस्लीम चालत नाहीत.

अशाच प्रकारचे उपक्रम ख्रिश्चन, शिख, जैन, बौद्ध यांच्यासाठीही आयोजित केलेले होते. त्यातल्या एका कार्यक्रमाला एक अतिवरिष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू उपस्थित होते. त्यांनी भारतीय संत साहित्यावर पीएच.डी. केलेली होती. एका नॉन ख्रिश्चन वक्त्यांचे अभ्यासपूर्ण भाषण त्यांना फार आवडले. त्यांनी त्यांच्या समाजाच्या एका मोठ्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले. मात्र ऎनवेळी तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता हे सांगा असे ते वक्त्यांना म्हणाले. वक्ता म्हणाला, "मी भारतीय संविधान मानतो. जात-धर्म हे माझ्यासाठी दुय्यम आहेत. ते मी कोणालाच सांगत नाही. पाळतही नाही. तुम्ही मला दिलेल्या विषयाशी त्यांचा काहीच संबंध नाही." तर धर्मगुरू म्हणाले, "मला आमच्या सर्वोच्च धर्मगुरूंकडून तुमच्या नावाला संमती घेताना तुमचा जात -धर्म सांगावे लागेल."

धर्मगुरूंनी अगदी ऎनवेळी निमंत्रण रद्द केले.

अगदी प्रेषित महंमद पैगंबरांच्या आधीपासून अफगाणिस्थानात असलेली Bamiyan बामियानची जागतिक वारसा हा दर्जा असलेली विशालकाय बुद्ध मुर्ती तालिबानी अतिरेक्यांनी २००१ मध्ये तोडली. हा पिसाटपणा निषेधार्हच होता.
मलाला युसुफझई या मुलीने तिच्या पुस्तकात स्पष्ट लिहिलेय की मी आधी स्वात खोर्‍यातली मुलगी आहे आणि नंतर मुस्लीम आहे.

मुस्लीम समाजातल्या या कट्टर पंथियांच्या वागण्यामुळेच त्याची प्रतिक्रिया म्हणून सामान्य हिंदूही दुरावत गेला आणि आजची सनातनी हिंदूंची चलती वाढली. त्याविरूद्ध आम्ही संघर्ष करीत असताना तुम्ही मुस्लीम समाजातले प्रागतिक लोक तुमच्यातल्या सनातन्यांविरूद्ध बोलणार की मौन धारण करणार?
-प्रा.हरी नरके, २६ सप्टेंबर, २०१८

Sunday, August 26, 2018

सामाजिक क्षेत्रातील बुवाबाजी - प्रा.हरी नरके






राजकारणी नेते ढोंगी असतात यात आता वाद घालण्यासारखे काही राहिलेले नाही. मात्र शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे, अल्पसंख्यकत्वाचा दावा करणारे लोक जेव्हा दुटप्पीपणाने वागायला लागतात तेव्हा खंत वाटते. जो माणूस स्वत: सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपल्या सर्व महाविद्यलयांमधले अनु.जाती, जमाती, ओबीसी, [धार्मिक अल्पसंख्यांकासह] आणि विजाभजचे आरक्षण रद्द करवून घेतो तोच आता आम्हाला इतर महाविद्यालयात आरक्षण द्या असेही म्हणतो, हा दुटप्पीपणा नाही काय?

पुण्याचे पी.ए. इनामदार हे मुस्लीम समाजातले बडे प्रस्थ. आधुनिक संस्थानिकच. मूळचे बिल्डर आणि बॅंकर. बडे व्यावसायिक. आता शिक्षण सम्राटही. कॉंग्रेसच्या सत्तेच्या काळात सदैव सत्तेच्या वळचणीला राहिलेले चतुर राजकारणी. दावा मात्र समाजसेवक असल्याचा. देखावा मुस्लीमांचे मसिहा असल्याचा.

मुंबईच्या अंजुमल खैरूल इस्लाम या संस्थेने पुण्यात १९७० साली पूना कॉलेज सुरू केले. प्रचंड मोठा आझम कॅंपस उभा केला. सध्या इनामदारसाहेब ह्या कॅंपसचे सर्वेसर्वा आहेत. २९ वैद्यकीय आणि व्यावसायिक महाविद्यालयांचे ते निर्माते आहेत. हे लोक श्रीमंतांच्या मुलामुलींकडून दाबून फी/देणग्या घेतात.
तरिही त्यांनी आपली इमेज दलित-बहुजनांचे त्राते असल्याची निर्माण केलीय. अलिगड मुस्लीम विद्यापीठापासून सर्वांचे ते आश्रयदाते असतात.

काल त्यांनी पुण्यात आरक्षणावर गोलमेज परिषद घेतली. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवेसाहेबही उपस्थित असल्याचे बातम्यांमध्ये वाचले.
आम्हाला आरक्षण द्या अन्यथा राज्यात शांतता राहणार नाही असा इशारा या परिषदेत देण्यात आला.

याच जनाब पी.ए. इनामदारसाहेबांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन अल्पसंख्याकांच्या खाजगी शिक्षण संस्थांमधले आरक्षण १२ आगष्ट २००५ रोजी रद्द करवून घेतलेले आहे. अनु. जाती, जमाती, ओबीसींचे तिथले आरक्षण बंद करायला लावणारा हा माणूसच जेव्हा आम्हाला आरक्षण द्या नाहीतर... असे धमकावयाला लागतो तेव्हा करमणूक होते. गंमत वाटते. यातल्या ओबीसी आरक्षणात असंख्य गरिब मुस्लीम बलुतेदार-अलुतेदार जातीही [अजलफ आणि अर्जल मुस्लीम] आहेत. त्यांचेही आरक्षण इनामदारांनी बंद करायला लावले.

या सर्व अल्पसंख्याक शिक्षण संस्था गरिब अल्पसंख्याकांना प्रवेश देत नाहीत, त्या फक्त पैसे कमावण्याचे उद्योग असल्याची वस्तुस्थिती खुद्द न्या. राजेंद्र सच्चर यांनी मुस्लीम समाजाबद्दलच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. [ पाहा- http://www.minorityaffairs.gov.in/reports/sachar-committee-report]

भारतीय राज्यघटनेच्या कलम २९ उपकलम १ अन्वये अल्पसंख्यकांना त्यांची धर्मावर आधारित संस्कृती, भाषा, लिपी यांचे जतन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.

तर या अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापनशास्त्र वा तत्सम महाविद्यालयांमध्ये वेगळे असे धर्मावर आधारलेले अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापनशास्त्र
विषयक शिक्षण दिले जाते काय?

म्हणजे मुस्लीम इंजिनियरिंग, जैन वैद्यकशास्त्र, पारशी व्यवस्थापनशास्त्र हे प्रचलित भारतीय शिक्षणापेक्षा वेगळे असते किंवा कसे?

अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापनशास्त्र यात धर्माचा काय संबंध?
समजा तसे नसेल तर मग अल्पसंख्याक अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापनशास्त्र विषयक महाविद्यालयांना सामाजिक न्यायातून का वगळायचे?
....................

केसचा संदर्भ पाहा-https://indiankanoon.org/doc/1390531/,Supreme Court of India,P.A. Inamdar & Ors vs State Of Maharashtra & Ors on 12 August, 2005
Author: R Lahoti, Bench: Cji R.C. Kumar, G.P. Mathur, Tarun Chatterjee, P.K. Balasubramanyan, CASE NO.: Appeal (civil)  5041 of 2005
PETITIONER: P.A. Inamdar & Ors.,RESPONDENT: State of Maharashtra & Ors.,DATE OF JUDGMENT: 12/08/2005, BENCH:
CJI R.C. LAHOTI Y.K. SABHARWAL D.M. DHARMADHIKARI ARUN KUMAR,G.P. MATHUR,TARUN CHATTERJEE & P.K. BALASUBRAMANYAN

-प्रा.हरी नरके

Tuesday, August 14, 2018

कारगिल हिरो जाकीर हुसेन नाईक-

" अल्ला हो अकबर " या मेजर अजितसिंगच्या पहिल्या आरोळीला सर्व भारतीय सैनिकांनी प्रतिसाद दिला. "अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर," च्या निनादाने कारगिलचा सारा परिसर दणाणून गेला होता. ग्रेनेडिअरचे जवान आपल्या संगिनी काढून पाकीस्तानी सैनिकांवर तुटून पडले होते. शत्रूवर प्राणघाती वार करून त्यांचा खातमा करण्यात ते गढले असतानाच 1/11 जी. आर. ची गुरखा कंपनीही या मोर्चाजवळ पोहोचली होती.

"आयो गुरखाली," चे पडसाद "अल्ला हो अकबर" मध्ये मिसळून गेले.

भारताचा जो टायगर हिल पाकच्या ताब्यात गेलेला होता तो पॉइंट 5250 कब्ज्यात घेऊन पहाट फुटायच्या आत भारतीय सैन्याने कारगीलची हरलेली लढाई जिंकलेली होती.

पराभवाचे यशात रूपांतर घडवून आणण्यात येथे मुख्यत्वेकरून दोन घटक कारणीभूत झाले. पहिला दुर्दम्य आशावाद. भारतीय जवान जाकीर हुसेन नाईक हे त्याचे प्रातिनिधिक रूप. दुसरा म्हणजे युद्धशास्त्रातला पहिल्या दहा मुलतत्वांपैकी एक असलेला नियम "विस्मय" ["सरप्राईज"] चा परिणामकारक वापर.

प्रतिकूल परिस्थितीत बुद्धीच्या जोरावर पाक सैनिकांना आचंबित करणारा हा देशभक्त भारतीय जवान होता जाकीर हुसेन नाईक.

22 ग्रेनेडिअरची भारतीय कंपनी संपूर्णपणे मुसलमान जवानांची होती. त्यांचे नेते होते मेजर अजितसिंग. किर्र अंधारात रात्री नऊ वाजता भारताने पाकवर चढाई केली. प्राण पणाला लावून शत्रूशी लढणारे दहा भारतीय जवान दोन तासात शहीद झाले होते. अठरा गंभीररित्या जखमी झालेले होते. काहीतर जबर जखमी झालेले होते. भारताचा संपुर्ण पराभव झालेला होता.

तथापि या पराभवाने न खचता मेजर अजितसिंगांनी टॅक्टीकल माघार घेतली होती. डोंगराच्या एका कड्याखाली त्यांनी आसरा घेतला. जखमी सैनिकांवर औषधोपचार चालू होते. 27 वर्षे वयाचा एक तरणाबांड जखमी जवान सरपटत त्यांच्याजवळ आला.
" साब, आपकी अनुमती हो तो और एक कोशीश करते हैं. खुदा रहमतगार हैं. आलातालाकी दुवा होगी तो हमारी जरूर फतेह होगी."

मेजर अजितसिंग यांच्या गंभीर जखमा ठणकत होत्या. ते थकलेले होते. पुन्हा हल्ला करण्याच्या मनस्थितीत ते अजिबात नव्हते.

पण जाकीरची आयडिया डोकेबाज होती. गनिमी कावा.
रिस्क घ्यायला हरकत नव्हती. बिनबोभाट, गनिमी काव्याने पाकवर अचानक हल्ला करायचा. शत्रूला चकित करून सोडायचे. त्याला काही कळायच्या आत शत्रू खतम करायचा.

"साब, मै ऎसे वापस इंडीया नही जाऊंगा. करेंगे या मरेंगे. जितकरही अपने मुल्कमें जायेंगे साब. नही तो यही मर मिटॆंगे मेजरसाब."

जाकीर हुसेन निर्वाणीचं बोलत - सांगत होता.

रात्रीचे दोन वाजलेले होते. फार विचार करायला वेळ नव्हता. पहाट झाली असती, झुंजूमुंजू झालं असतं नी पाक सैनिकांना अजितसिंगची कंपनी दिसली असती. गोळीबारात, तोफगोळ्यांच्या मार्‍यात सगळेच ठार झले असते.

रेडीओ सेटवरून त्यांनी 1/11 जी. आर. कंपनीच्या कमांडरला आपली योजना सांकेतिक भाषेत सांगितली. "आम्ही पुढे जातोय, मागे या."
यापेक्षा जास्त बोलण्यात धोका होता. गौप्यस्फोट झाला असता. शत्रू जागा झाला असता. पुन्हा पराभव पदरी पडला असता. भारत पुन्हा हरला असता.
भरभर हुकुम सुटू लागले. आदेशाबरहुकुम जवानांनी कुच केली. सर्वात पुढे होता जाकीर हुसेन नाईक.

पाक सैनिक गाफिल होते. विजयाची पार्टी करीत होते. त्यांची जित झालेली होती.
इतक्यात कुणीतरी येत असल्याची त्यांना चाहूल लागली.
पाकीस्तानी कमांडरने अंदाज बांधला आपलीच कुमत येत असणार! रसद रात्रीच येत असे. भारतीय जवानांना आपलेच समजून पाक जवानांनी चक्क त्यांचा हात धरून वर उचलून घेतले होते.

"अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर," च्या निनादाने पाक छावणीचा परिसर दणाणून गेलेला होता. संपुर्ण छावणी आता भारताच्या ताब्यात आलेली होती.

आणि भारताने कारगिल
युद्ध जिंकलेले होते. या विजयाच्या शिलेदाराला, ह्या सच्चा मुसलमान असलेल्या जवान जाकीर हुसेन नाईकला देशभक्त म्हणायचे की नाही?
तुम्हाला काय वाटतं?

[ पाहा- डोमेल ते कारगिल, लेखक मेजर जनरल [नि.] शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन, पुणे, चौथी आवृत्ती, 2013, पृ. 244/45 ]

-प्रा.हरी नरके

Sunday, August 12, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम स्त्रियांचे मानवी अधिकार -



हिंदू कोड बिलाला ज्यांनी प्राणपणाने विरोध केला त्यांचेच वंशज आज समान नागरी कायदा
झाला पाहिजे म्हणून चढा सूर लावतात. यांच्या सनातनी पुर्वजांनी जर हिंदू कोड बिलाला इतका विरोध केला नसता तर 1952 पर्यंत सर्व धर्मियांसाठीची एकरूप नागरी संहिता मंजूरही झाली असती.
................
हिंदू स्त्रियांना सर्व प्रकारचे मानवी अधिकार मिळावेत यासाठी हिंदू कोड बिल आणि राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सर्वपरिचित आहे.
ते देशाचे कायदामंत्री असताना हिंदू कोड बिल मंजूर व्हावे म्हणून त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. पंतप्रधान पं. नेहरूही त्यांच्यासोबत होते. 1952 च्या सार्वत्रिक निवडणूका जवळ आलेल्या असताना सनातन्यांनी उचल खाल्ली. मोर्चे, आंदोलने, सभा, संमेलने, परिषदा यांच्याद्वारे विरोधी आवाज निर्माण करून कायदामंत्री आणि सरकारला घेरण्याचे डावपेच आखले जायला लागले.

राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद आणि इतर अनेक काँग्रेस नेते सनातन्यांच्या मागे असल्याने पं. नेहरू कच खाऊ लागले. बिल पास होत नाही असे बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संतापले. निराश झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मात्र 27 सप्टेंबर 1951 रोजी देशाच्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हिंदू स्त्रियांना अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी मंत्रीपदाला लाथ मारली.

नेहरूंनी तुकड्या तुकड्याने हे बिल मंजूर करण्याची रणनिती आखली. पुढे 1956 पर्यंत हे काम चालू राहिले.

हिंदू कोड बिल मंजूर झाले की दुसरा टप्पा असणार होता "एकरूप नागरी संहिता."  हिंदू कोड बिलाला ज्यांनी प्राणपणाने विरोध केला त्यांचेच वंशज आज समान नागरी कायदा
झाला पाहिजे म्हणून चढा सूर लावतात. यांच्या सनातनी पुर्वजांनी जर हिंदू कोड बिलाला इतका विरोध केला नसता तर 1952 पर्यंत सर्व धर्मियांसाठीची एकरूप नागरी संहिता मंजूरही झाली असती.

इस्लामने 1400 वर्षांपुर्वी स्त्रियांना अनेक महत्वपुर्ण अधिकार दिलेले आहेत.

अर्थातच अरबस्थानातला आजूबाजूचा समाज टोळ्यांचा आणि सरंजामी असल्याने त्या काळाला अनुसरून काही बंधनंही घालण्यात आली.

ती आज झुगारली पाहिजेत असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते. प्रामुख्याने चार शादीया, जुबानी तलाक, बुरखा पद्धती यावर त्यांनी टिका केलेली आहे. मुस्लीम स्त्रियांना शिक्षण आणि सर्व मानवी अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी मांडणी केली.

1400 वर्षांपुर्वी सर्वच धर्मांनी कमी अधिक बंधनं स्त्रियांवर घातलेली होती. ती आता अनावश्यक आहेत असं सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री आणि पुरूष समान असल्याने चार बायका करण्याची धार्मिक परवानगी रद्द केली जावी अशी भुमिका मांडली. हदीस [शरियत] कायद्यातही काही काळानुरूप बदल करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.

लग्नाच्या बाबतीत एक पुरूष आणि चार स्त्रिया, साक्षीदार म्हणून एक पुरूष चालेल पण स्त्रिया मात्र दोन हव्यात आदी तरतुदी आता बदलायला हव्यात असं ते म्हणाले.

हे मी मुंबईतल्या टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होतो.

या परिषदेला देशविदेशातून अनेक मुस्लीम महिला आलेल्या होत्या. दिल्लीहून मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या एक बड्या पदाधिकारी महिला त्या परिषदेला आलेल्या होत्या. बाई नबाब घराण्यातल्या होत्या. कोट्याधीश नी कॉन्वेंटमध्ये शिकलेल्या होत्या. सुपर स्पेशालिटी डॉक्टर होत्या.

त्या प्रचंड चिडल्या आणि एक पुरूष =4 स्त्रिया, एक पुरूष = 2 स्त्री साक्षीदार, हे कसं बरोबरच आहे ते मला ओरडून सांगायला लागल्या.

त्या म्हणाल्या, "पुरूषांची लैंगिक भूक स्त्रियांच्या तुलनेत चारपट जास्त असते." त्या पुढं असंही म्हणाल्या की, “ पुरूषांच्या तुलनेत स्त्रीकडे स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता अर्धीच असते. त्यामुळे ह्या तरतुदी आजही बरोबरच आहेत.”

त्या फर्ड्या अमेरिकन इंग्लीशमध्ये तारे तोडत होत्या. त्यांनी उधळलेली काही मुक्ताफळे तर थोर वगैरेच होती. त्या डाफरत मला म्हणाल्या,”तुम्ही पुरूष असल्याने बायकांची लैंगिक भूक पुरूषांच्या पावपटच असते हे तुम्हाला कळणार नाही. बायकांची बुद्धी अर्धीच असते हे तुम्हाला माहित नाही.

मी सुपर स्पेशालिटी डॉक्टर आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राने हे सिद्ध केलेले आहे. मी बाई असल्याने सांगतेय ते मान्य करा. गुमान ऎका.”

मी, संयोजक राज्याच्या अप्पर मुख्य सचिव थेकेकरामॅडम आणि प्रा.डॉ. रझिया पटेल दिग्मूढ होऊन ऎकत-बघत बसलो. उच्च शिक्षितांची बुवाबाजी सर्वच धर्मात असते तर!

एकवेळ निरक्षरांना बदलता येईल, सुधारता येईल, पण या कोट्याधिश, उच्च शिक्षित गुलामांना बदलणं फार अवघड!
-प्रा.हरी नरके

समान नागरी कायदा हे प्रत्येक समस्येवरचं रामबाण औषध आहे काय?






शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, आरक्षण, सामाजिक न्याय, संविधान कोणत्याही विषयावर पोस्ट टाकली की एका पगारी सेनेतले काही टोळभैरव तात्काळ प्रतिक्रिया देतात.
"एव्हढं वाचायला आम्हाला वेळ नाय. समान नागरी करा. फुल अ‍ॅंड फायनल."
या झुंडीतल्या सुडक्यांना "समान नागरी कायदा" या तीन शब्दांचा अर्थही नीट माहित नाही. त्यांची डोकी बधीर करणार्‍या भिकारबुद्धीने त्यांना काहीबाही पढवलेले असते.

त्यांना वाटते, " विद्यमान आरक्षण पद्धतीला विरोध म्हणजे समान नागरी कायदा."

मुळात भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 44 मध्ये हा विषय आलेला आहे.
घटनाकारांनी पुढीलप्रमाणे शब्दरचना केलेली आहे.

"The State shall endeavour to secure for the citizens a uniform civil code throughout the territory of India."
"नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहिल."
गेल्या 70 वर्षात त्यादिशेने प्रामाणिक प्रयत्न झाले का? नाही.
या कामात आजवर अक्षम्य हलगर्जीपणा झालेला आहे हे खरेच आहे.

मात्र यात आवर्जून लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे इंग्रजीत "uniform" तर मराठीत "एकरूप " हा शब्द घटनाकारांनी वापरलेला आहे.
माध्यमांमध्ये सर्रास "समान = Common" हे चुकीचे शब्द वापरले जातात.

समान आणि एकरूप यात खूप फरक आहे.

उदा. पुर्वी वाड्यांमध्ये कॉमन नळ असे. कॉमन संडास असे. त्याचा अर्थ एकच वस्तू सगळे सामायिकरित्या वापरीत असत.
आजसुद्धा अनेक कार्यालयांमध्ये, व्यावसायिक वापराच्या इमारतींमध्ये पुरूषांसाठी एक कॉमन स्वच्छतागृह तर स्त्रियांसाठी दुसरे कॉमन स्वच्छतागृह असते.

सैनिक, पोलीस, ड्रायव्हर, कंडक्टर, शालेय विद्यार्थी आदींना युनिफॉर्म असतो. युनिफॉर्म याचा अर्थ सगळेजण एकच वस्तू वापरीत नाहीत तर प्रत्येकजण आपल्या आपल्या मापाचा ड्रेस घालतो. त्यांचा सर्वांचा रंग, साधारण आकारमान आदी एकसारखे असतात. मात्र ते वेगवेगळे असतात.

"समान नागरी कायदा" याचा अर्थ एकच कायदा सर्वांना लागू असेल.

तर "एकरूप नागरी संहिता" म्हणजे देशात एकसारख्या पण वेगवेगळ्या नागरी कायद्यांच्या संहिता / व्यवस्था असतील.

आपल्या देशात आज क्रिमिनल प्रोसिजर कोड - गुन्हेविषयक कायदे सर्वांना एकच आहेत.

नागरी कायद्यांमध्ये मात्र थोडा फरक आहे. मुख्यत: लग्न, घटस्फोट आणि दत्तक या तीन नागरी गोष्टींबाबतचे कायदे धर्मनिहाय वेगवेगळे आहेत.

जगातील 222 देशांमध्ये बारा धर्मांचे लोक राहतात. भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव देश असाय की जिथे 12 च्या 12 धर्मांचे लोक राहतात. ही विविधता इतर देशांमध्ये नसल्याने त्यांच्यासमोर ही समस्या नाही.

हिंदू 80% तर इतर धर्माचे लोक 20% आहेत. इंडोनेशियानंतरची सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या भारतीय आहे. आजच्या भारतीय मुस्लीमातले 99% लोक धर्मांतरीत आहेत. ते बाहेरून आलेले नाहीत. मुस्लीम धर्माला जाती मान्य नाहीत. परंतु मुस्लीम समाजात जाती आहेत. हिंदूंप्रमाणेच तिकडॆही 4 सामाजिक गट आहेत. त्यात बाहेरून आलेले मोगल,पठाण, सय्यद, नबब हे स्वत:ला कुलीन, उच्च समजतात.ते अश्रफ - अ- आहेत. जे हिंदूंमधल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांमधून धर्मांतरीत झाले तेही स्वत:ला अश्रफ -ब- समजतात. ते सुमारे 2% आहेत.
जे इथल्या बलुतेदार, अलुतेदारांमधून मुस्लीम झाले ते "अजलफ" आहेत नी जे अनु.जाती, जमातीतून मुस्लीम झाले ते "अर्जल" आहेत. या दोघांची लोकसंख्या 97% आहे. मात्र मुस्लीम समाजाचे बहुतेक सगळे नेते [ सर्वपक्षीय नेते ] अश्रफ अ किंवा ब मधले आहेत. त्यांना हे नेतृत्व स्वत:च्या हातात ठेवण्यासाठी मुस्लीमांनी कायम कडवे राहायला हवेय. त्यामुळे दोन्ही धर्मातले कडवे-सनातनी लोक मागून हातमिळवणी केलेले असतात.
त्यांना भ्रामक प्रश्नांवर लोकांना झुंजवायचे असते. खरे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कुटुंब नियोजन, गरीबी, स्त्री-पुरूष समता यवर ते बोलतच नाहीत.
बरं हे हिंदूतर लोक कालपरवा इथे आलेले नाहीत. इस्लामला मानणारे 1400 वर्षांपुर्वी भारतात आलेत. ख्रिश्चन धर्माचे लोक 2000 वर्षांपुर्वी तर पारशी 1200 वर्षांपुर्वी इथे आलेत. नंतरही येत राहिलेत. यातल्या काहींनी तर इथे शतकानुशतके राज्यंही केलीयत.

पहिल्यंदा लबाडी केली ती इंग्रजांनी. त्यांनी भारतीय इतिहासाचे वर्गीकरण करताना हिंदू पिरियड, मुस्लीम पिरियड असे केल्यानंतर तिसरा कालखंड मात्र ब्रिटीश पिरियड असा नोंदवला.
तो ख्रिश्चन पिरियड का नाही?

भारतीय संस्कृती ही गंगाजमुना तहजीब आहे. सुफी संगिताचा सर्वांवर प्रभाव आहे. खाद्यपदार्थ, बांधकाम शैली, भाषा, कला अशा कित्येक गोष्टी एकसारख्या/एकरूप आहेत. गावच्या पिराच्या जत्रा हिंदू करतात तर मुस्लीमही ग्रामदेवतेला मानतात.

हिंदुमुस्लीम दंगली, फाळणीच्या जखमांनी, सांडल्या गेलेल्या रक्ताने, अतिरेकी कारवायांनी मानसिक पातळीवर खूप कटूता आली. ते सतत वाढती राहील अशी व्यवस्था दोन्ही धर्मातल्या सनातन्यांनी केली.
आजही तिला खतपाणी घालणारे अतिरेकी पाकीस्थानच्या दुष्टाव्यामुळे सातत्याने कार्यरत असतात. त्यामुळे सामाजिक दरी वाढतच जाते. काही फुटीरतावादी नतद्रष्ट संघटना ह्याच उद्योगाच्या आधारे मोठ्या झाल्यात. द्वेषाच्या वखारी चालवणारे हे राजकीय व्यापारी. सांस्कृतिक ठेकेदार.

गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य होते. त्यांनी तिथे एकरूप नागरी संहिता लागू केलेली आहे.

उर्वरित भारतातही ती लवकरात लवकरात यायला हवी. पण तिच्यासाठी लोकशिक्षण, प्रबोधन करायला हवे. बळजोरी हा मार्ग नव्हे.
मुख्य म्हणजे ते करताना बहुसंख्यांकांच्या धर्माचे कायदे सर्वांवर लादणे हा मार्ग नव्हे.
स्त्रियांच्या नजरेने न्याय कायदे बनवणे हा मार्ग आहे.
हिंदू सनातनी बोलताना काय म्हणतात? "त्यांना चारचार बायका करायची परवानगी, पण आम्हाला मात्र....." याचा अर्थ त्यांना तो हिंदू पुरूषांवरचा अन्याय वाटतो. मुळात तो मुस्लीम स्त्रीवरचा अन्याय आहे. मुस्लीमांना कुटुंब नियोजनाला प्रवृत करण्याऎवजी हिंदू बुवाबाज हिंदूंनी जास्त मुलं जन्माला घालावीत असं सांगतात. का तर जास्त मुलं म्हणजे जास्त मागासलेपणा. जास्त मागासलेपणा म्हणजे सनातन्यांची मागासांवर जास्त पकड. समाजाचे ,देशाचे भले गेले खड्यात, त्यांना आपली पकड मजबूत करायचीय. देश नी समाज गेला खड्ड्यात. जास्त मुलं जन्माला घाला हे सांगणारे नतद्रष्ट लोक देशद्रोहीच आहेत.

तर एकरूप नागरी संहितेचा आणि आरक्षणाचा काडीमात्र संबंध नाही.
-प्रा.हरी नरके