Showing posts with label नामांतर आंदोलन. Show all posts
Showing posts with label नामांतर आंदोलन. Show all posts

Monday, September 21, 2020

नामांतर आंदोलनाचे दिवस - प्रा. हरी नरके



आज २२ सप्टेंबर. बरोबर ३८ वर्षांपुर्वी याच दिवशी माझी ठाणे सेंट्रल जेलमधून सुटका झाली होती. नामांतर आंदोलन सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे मला अटक झाली होती. सुमारे महिनाभर तुरूंगात राहिल्यानंतर २२ सप्टेंबर १९८२ ला रात्री १२ वाजता माझी सुटका झाली. हे आहे ठाण्याच्या तुरूंग अधिकार्‍यांच्या सहीशिक्क्याचे मुंबई-पुणे प्रवासाचे एसटीच्या लाल डब्याचे तिकीट.त्यावेळी मुंबई सेंट्रल -पुणे प्रवासभाडे २४ रूपये होते.

माझा जन्म १ जून १९६३ रोजी निरक्षर शेतमजूर वडील आणि मोलकरीण आईच्या पोटी झोपडपट्टीत झाला. आमच्या झोपडपट्टीतली मुलं पुणे महानगर पालिकेच्या शाळेत जायची. आमच्या झोपडीत मात्र शिक्षणाची कोणतीही परंपरा नव्हती. माझ्या आईच्या एका मैत्रिणीने आईला सारखी भुनभून लावली म्हणून आईनं मला शाळेत घातलं. या शांतामावशीमुळे मी शिकू शकलो. आई म्हणायची, "त्या शांताचा एक नातेवाईक हाये बाबासायब म्हणून. त्यो तिला म्हणतो, समद्या पोरास्नी साळंत घाला. आता शिकुन काय बालिस्टर होणारे का? नुसते वाया जायचे आइतखाऊ धंदे. पन जाऊ दे, ती म्हनते तर. नायतरी इकडं ते कबरस्तानातलं काम झालं की काय करणारे त्यो दिवसभर?  

कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या पारश्यांच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत होतो. तेव्हा मला महिन्याला पाच रुपये पगार मिळायचा. कबरस्थान नावाला", आहे खरी ती बागच. अतिशय सुंदर, शांत, टवटवीत. पुणे मनपाच्या मुंढव्याच्या शाळेत जून १९६९ पासून मी जाऊ लागलो. मी १९७९ साली एस.एस.सी. झाल्यावर  टेल्कोच्या होस्टेलमध्ये राहायला गेल्याने मला कबरस्तानातली नोकरी सोडावी लागली. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा महिन्याचा पगार होता साठ रूपये. 

माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. 

मला कांबळेगुरूजी नावाचे शिक्षक होते. त्यांच्या घरात मी बाबासाहेबांचा फोटो बघितला. या बाबासाहेबांमुळेच आपल्याला शांतामावशीच्या सांगण्यावरून आईने शाळेत घातले म्हणून मी माझ्या झोपडीत त्यांचा फोटो लावला. तेव्हा मी चौथीत होतो. आमच्या झोपडीत देवादिकांचे खंडीभर फोटो होते. बाबासाहेब आणि पुढे महात्मा फुले यांचे फोटो आले नी लवकरच देवादिकांच्या फोटोंना बाहेरचा रस्ता धरावा लागला.

जून १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफ.टि.ए. म्हणून टेल्कोत शिकायला गेलो. मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात १९७९ ते १९८१ अशी २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. याकाळात मी फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. 

१९८० साली गुजरातमध्ये राखीव जागाविरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या " दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, राजेंद्र, सुनंदन, वर्षा, वंदना, अनंत, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही विद्यार्थी दर्पणचं काम करायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर "अभिरूप न्यायालय" नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही सर्वजण त्या त्या शाळेतले प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने या नाटकाने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. त्याचकाळात आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर चर्चा, वादविवाद, भाषणं करायचो. कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. 

आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. टेल्कोतील आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. 

१९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्या बाजूने बोललो. आम्ही अगदी पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती या झोपडपट्टीत राहात होतो. 

तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा "किर्लोस्कर" मासिकात लिहिलेले होते. 

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. तेव्हा औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात सवर्णांकडून भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी विद्यापीठ नामांतर आंदोलन फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित होते. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळल्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा-देशाचा बनला. त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये मी सहभागी होऊ लागलो. लॉन्गमार्चमध्येही मी सामील झालो होतो. माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली. त्यामागे एसेम जोशी, डॉ. बाबा आढाव, डॉ. नीलम गोर्‍हे आदींची प्रेरणा होती.

निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली. 

त्यामुळेच लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. 

१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. 

तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने, माझे बरेच तुरूंग बघून झाले.)

बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि बोलभांड, वाचाळ. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी   तुरुंगात ठेवले. हे दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक शिक्षणाचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर ह्या मुंबईच्या ग्रुपशी माझी दोस्ती झाली.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी ज्यांचा आधीच उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षि, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.

या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. 

१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.

कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. 

तुरूंगांत मला  माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ-जन्माने नाही, तर बाय चॉईस-विचाराने, बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.

ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.

तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना-क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.

त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. 

जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला "बावन्नपत्ती" म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबाएव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.

दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

नामांतरातल्या तुरुंगवासामुळे प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे असे माझे मत बनले. तुरूंगातल्या शिक्षणाला कुमार सप्तर्षी "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा असा अनुभव घ्यायला हवा. जगण्याकडे बघण्याची आणि जगण्याचीही इयत्ताच त्यानं बदलून जाते. गरजा एकदम कमी होऊन जातात. मानापमानाच्या, इगोच्या वायफळ जगातून तुमची सुटका होते. खरा भारत आणि भारतीय माणसं यांचं उघढंवाघढं दर्शन होतं. जेलमध्ये जातानाचे तुम्ही आणि बाहेर पडणारे तुम्ही यात जमीन अस्मानाचं अंतर पडतं.

- प्रा. हरी नरके


संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२

सोबत- तुरूंग अधिकारी, ठाणे मध्यवर्ती कारागृह, यांच्या सही शिक्क्याचे प्रवासासाठी मुंबई-पुणे एस.टी.साठीचे प्रमाणपत्र

पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.


Tuesday, July 14, 2020

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)









माझ्या घरात महात्मा फुले व बाबासाहेबांचे फोटो मी इयत्ता चौथीत होतो तेव्हापासून लावलेले आहेत.


मी इयत्ता सहावीत असताना काढलेला फोटो. हातातले घड्याळ फोटो स्टूडीओतले असून, अंगठा तुटलेली प्लॅस्टीकची चप्पल माझीच आहे. जुन्या बाजारातून बारा आण्याला घेतलेली.सर्वात महत्वाचे हातातले पुस्तक- माझे सर्वाधिक आवडते पुस्तक "महात्मा फुले : समग्र वाड्मय"


इथून मी सुरूवात केली. नरकेवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे येथील १९८० च्या काळातील माझं घर आणि गोठा-



मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला टेल्कोतून मंत्रालयात वि.का.अ. म्हणुन घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मी सम्पादित केलेला अंक-



नामांतर आंदोलनातल्या तुरूंगवासाबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या हस्ते सत्कार


ओबीसीत जाऊन काम करा असा मला अनाहूत सल्ला देणार्‍या "मित्रांसाठी खास", हे माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे.


जेव्हा दोनचार सरंजामदार तथाकथित डावे मला रा. स्व. संघाचा हस्तक म्हणुन हिनवत होते, वाळव्यात मला रितसर निमंत्रित करून त्यांच्याच स्टेजवर बोलू देत नव्हते, बाबरी विध्वंसनाला उत्तर म्हणुन तेव्हा मी भाई वैद्य आणि विलास वाघ यांच्यासमवेत सम्पादित केलेला ग्रंथ- धर्मनिरपेक्षता




श्री.छगन भुजबळ, प्रा.ना.स.फरांदे, श्री. मुकुंदराव ठकोजी पाटील, डी.के. माळी  आणि इतर नेत्यांसोबत १९९०



माझा जन्म निरक्षर शेतमजूर-मोलकरीण आईवडीलांच्या पोटी झोपडपट्टीत झाला. कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत पुणे मनपाच्या मुंढवा शाळेत शिकलो. माझा पहिल्या महिन्याचा पगार होता रुपये पाच. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा दरमहा पगार होता साठ रूपये. माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. त्यामुळेच इतक्या लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली.


मार्च १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफटिए म्हणून टेल्कोत शिकायला गेलो आणि फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. म्हणता म्हणता याला  ४० वर्षे कधी झाली कळलंच नाही. मी " डीकास्ट"  झालोय, जातीबाहेर पडलोय अशाच गोड समजुतीत मी होतो. सामाजिक कामात तुम्ही तुमची जात विसरून गेलात तरी काही "ज्ञानीजन" तुम्हाला तुमची जात विसरू देत नाहीत. ते तोंडाने "जातीनिर्मुलनाची" भाषा करीत पुन्हापुन्हा तुम्हाला तुमच्या जाती-धर्मात ढकलायचा प्रयत्न करीत असतात.


हे लोक मूठभरच असतात. आहेत. त्यांना आपण अपवादात्मक लोक समजू शकतो. ते सर्वच जाती-धर्मात आहेत. एकुण समाजाचा विचार केला तर असे लोक एका लाखामागे एखाददुसरासुद्धा भरणार नाहीत. उरलेला सारा समाज माझ्यावर नितांत प्रेम करतो. जिवाला जीव देतो. त्यामुळे या हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या अपवादात्मक लोकांचा राग मी समजून घेऊ शकतो. त्या माझ्या मित्रांचे तीन बारकुलेसे गट पडतात.

१. जे लोक तरूणतुर्क, अगदी नवे आहेत, ते अलिकडेच सोशल मिडीयात आलेले आहेत. त्यांनी माझे फारसे काहीच वाचलेले/ऎकलेले नाही. त्यांनी मी संपादित केलेले बाबासाहेबांचे रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचे खंड १७ ते २२ बघितलेलेही नाहीत. जे खुद्द बाबासाहेबांचेही वाचत नाहीत त्यांनी माझी इतर पुस्तकं वाचली असण्याची सुतराम शक्यता नाही. एकुण ते मला ओळखतच नाहीत.

२. ज्यांनी मला अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना बोलावलं, पण मी त्यांना एकदाही वेळ देऊ शकलो नाही म्हणून ते माझ्यावर नाराज आहेत. गेली ४० वर्षे, वर्षाकाठी मला ५५० ते ६०० निमंत्रणं येतात. त्यातली वेळेअभावी ९० टक्के निमंत्रण मी स्विकारू शकत नाही. मी वर्षाकाठी अवघी ५० ते ५२ निमंत्रणं स्विकारू शकतो. उरलेले नाराज होतात. त्याला माझा नाईलाज आहे.

३. जे लोक मला स्पर्धक समजतात, याला कार्यक्रमला बोलावू नका, आम्हाला बोलवा, असं समाजाला सांगसांगून ते दमलेत. पण समाज त्यांचं ऎकतच नाही. त्यामुळे ते समाजावर संतापून आहेत. माझ्यावर डुख धरून आहेत. असो.

ही सारी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली दु:खी माणसं आहेत. चिडखोर माणसांसारखीच ती वागतात ह्यात आश्चर्यकारक असं काहीही नाही. शिवाय कशीही वागली तरी ती सारीच माझी भावंडं असल्याने मला त्यांचा राग नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, दोस्तहो, आपण सोबत प्रवासाला सुरूवात केली होती, तुम्ही मागे पडलात हा माझा दोष नाही. तुमचे अपयश हा माझा गुन्हा नाही. तुमची म्हैस भाकड आहे म्हणून माझ्या दुभत्या म्हशीला शिव्या देऊन काय साध्य होणार? तुम्हाला परीक्षेत कधीही सेकंड क्लाससुद्धा मिळवता आला नाही म्हणून तुम्ही माझ्या सुवर्णपदकांवर जळता हे मला माहित आहे. तुमचा माझ्यावरचा जळफळाट मी अगदीच समजू शकतो. पण, मत्सराने प्रगती होत नाही, उलट मन आणि शरीर अधिक रोगट बनत जाते. मला तुमच्याबद्दल अपार कणव आहे. करूणा-मैत्रीभाव आहे. लवकर बरे व्हा भावंडांनो. Get Well Soon..


मी सम्यक सम्बुद्धांच्या मध्यम मार्गाचा प्रवासी आहे. आज जरी ते माझा रागराग करीत असले तरी उद्या तेही माझ्यावर प्रेम करतील असा मला विश्वास आहे. अनित्यता सिद्धांतावर माझा विश्वास आहे. मी माझ्याबाजूने त्यांच्यावर प्रेमच करतो.


माझं पहिलं पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक बाळ गांगल यांच्यावर होतं. त्यांच्या महात्मा फुल्यांवरील गलिच्छ टिकेचा २२५ संदर्भांसह सप्रमाण प्रतिवाद करणारं ते पुस्तक आहे. १९८९ च्या मार्चमध्ये ते पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते चंद्रपूरला प्रकाशित झालं. तेव्हा मी टेल्कोची रात्रपाळी करून विद्यापीठात एम.फिल. करीत होतो. त्यावेळी माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, नामवंत आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ, उषाताई वाघ, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पु.लं.च्या भाषणाची जादू अशी की पुस्तकाच्या ५०० प्रती या कार्यक्रमातच संपल्या. महिनाभरात तीन हजार प्रतींची आवृत्ती संपली. पुस्तकाला अनेक नामवंत पुरस्कार मिळाले. अनेक मान्यवरांनी त्या पुस्तकावर लिहिले. त्यावर्षीचे ते सर्वाधिक लोकप्रिय व विद्वतमान्य पुस्तक ठरले.


तेव्हापासून आजवर सातत्याने मी संघाचं पोलखोल करणारं सर्वाधिक लेखन केलेलं आहे. अगदी परवा १४ एप्रिल २०२० ला जेव्हा रा.स्व.संघाने बाबासाहेब आमचेच असा दावा केला तेव्हासुद्धा दि प्रिंटमध्ये मी २ लेख लिहून संघाला उत्तर दिलंय. एप्रिल ते मे २०२० मध्ये मी संघाविरूद्ध सुमारे २५ लेख लिहिलेत. आणि संघाच्या बाबतीत संपुर्ण निष्क्रीय असलेले माझे काही मित्र मी संघाचा असल्याची आवई उठवतायत. सामान्य माणसं त्यांच्यावर कसा विश्वास ठेवतील? मग त्यांचा अधिकाधिक चडफडाट, तिळपापड होतो.


मी संघाचा असतो तर वर मोदींचे आणि खाली फडण२० यांचे  सरकार असताना त्यांनी मला
" १. महात्मा फुले ग्रंथ समिती,
२. राज्य मागासवर्ग आयोग,
३. महात्मा फुले अध्यासन,
४. बालभारती,
५. मराठी भाषा सल्लागार समिती,
६. अभिजात मराठी समिती,
या सर्वच शासकीय आस्थापनांवरून काढून का टाकलं असतं?


मी त्यांचा असतो तर उलट मला प्रमोशन, पदोन्नती मिळायला हवी होती.


आणि त्यांचं सरकार असताना मी त्यांचे " दि टाइम्स ऑफ इंडीया, डि.एन.ए, लोकसत्ता, म.टा. लोकमत, सकाळ, पुढारी, बेळगाव त.भा, दिव्य मराठी, आय.बी.एन.लोकमत, ए.बी.पी.माझा, झी २४ तास, दिव्य मराठी, साम टिव्हीवर तसेच माझ्या फेसबुक, ट्विटर, ब्लॉगवर अनेकवार वाभाडे काढले असते का?
तेव्हा तुम्ही कुठे होतात राजेहो? ऎन लढाईच्या वेळी जे कायम झोपी गेलेले असतात, होते, त्यांना जनता आणि जाणते मोजत नसतात.


मी महात्मा फुले समता परिषदेचा संस्थापक सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी आहे. १९९२ पासून अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून श्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लक्षावधी ओबीसींच्या अनंत चळवळी केल्या. " ओबीसी बजेट,"  "ओबीसी जनगणना" असे प्रश्न आम्ही देशपातळीवर प्रथमच ऎरणीवर आणले. त्यावर सर्वथरात रान उठवले. ओबीसी जनगणनेवरचं माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे. माझ्या ओबीसी आरक्षण विषयक एका पुस्तकाचे प्रकाशक कॉ. गोविंद पानसरे होते, तर दुसर्‍याचे मकरंद सावे. माझी अनेक पुस्तकं मुंबईला कम्युनिस्टांच्या कॉ. भुपेश गुप्ता भवनमध्ये छापली गेलेली आहेत.


महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही ओबीसींचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेत. आजही नियमितपणे घेत असतो. मुंबई, अमरावती, नागपूर, दिल्ली, पाटना, जयपूर, गोवा, हैद्राबाद, हजारीबाग अशा कितीतरी ओबीसी मेळाव्यांना ५ - ५ लाख इतर मागासवर्गीय बांधव उपस्थित होते. ओबीसी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही गेल्या २५ वर्षात शंभराहून अधिक शिबिरं घेतलेली आहेत. माझे काही मित्र  "तुम्ही ओबीसीत का काम करीत नाही? तिकडे जा, आमच्याकडे येऊ नका." असा सल्ला मला देत असतात. त्यांच्या या मौलिक सल्ल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली तर त्यांना ओबीसींच्या प्रबोधनाशी संबंधित माझे किमान २०० लेख ब्लॉगवर दिसतील. इंग्रजी पेपर " दि हिंदू " पासून मराठी, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये माझे ओबीसीविषयक लेखन प्रकाशित होत असते. झालेले आहे. माझा ब्लॉग वाचणारांची संख्या आज आठ लाख इतकी आहे.


ओबीसींच्या प्रबोधनावर मी जितके लिहिलेय, लिहितोय, बोललोय, बोलतोय त्यापेक्षा जास्त काम या मित्रांनी केलेले असणार! असे मी समजतो. तेव्हा त्यांचा प्रत्येक सल्ला मला शिरसावंद्य मानयलाच हवा! माझ्या मित्रांनो, तुमचा हा सल्ला मी नक्कीच अंमलात आणीन.


१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.
कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. बाळकृष्ण रेणके युक्रांदमधला माझा जुना सहकारी. त्याची पथारी माझ्या दुसर्‍या बाजूला. हरी नरके नंतर रेणक्यांचा जावई झाला. ठाणे तुरूंगामध्ये हरीने सासरा आगाऊ बुक केला. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. ते या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगं आहे.


तुरूंगांत मला ३ आठवड्यात माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ/जन्माने नाही तर बाय चॉईस बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.


कोणाला हे उद्धटपणाचे वाटले तरी हरकत नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यात मी ओबीसी, भटके, विमुक्त, अनु. जाती, जमाती, बहुजनांवर जितकी भाषणं केलीत तितकी करणारा माझ्या पिढीतला दुसरा माणूस मला माहित नाही.


ज्या मूठभरांना माझ्याबद्दल तीव्र नफरत, विरोधीभक्ती आहे, माझा वर्षानुवर्षे द्वेश वाटत आलेला आहे, त्यांनी लाखो सामान्य लोक आणि तळमळीचे कार्यकर्ते माझ्यावर का जिवापाड प्रेम करतात, मला पुन्हापुन्हा भाषणाला का बोलावतात? माझी भाषणं का ऎकतात याचा शोध घ्यावा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आपोआप मिळून जातील.


ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या होत्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.
तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना/क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.
त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. इतकी वर्षे उलटली तरी आजही त्या भेटी ताज्या टवटवीत आहेत.


मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. हे भारी आहे ना?


जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला बावन्नपत्ती म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबा एव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.


दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची.


जेलच्या खूप भन्नाट आठवणी आहेत. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे  माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. आणि तसाच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे. म्हणून तर कुमार सप्तर्षी त्या दिवसांना "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा अनुभव घेणे मस्ट आहे.


१९६३ मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या, ज्यांनी ज्यांनी नामांतर आंदोलनात प्रदीर्घ तुरूंगवास भोगलेला आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपण कोणत्या जेलमध्ये होतात, त्याबद्दल लिहावे, म्हणजे त्यातून समविचारी मित्रमैत्रिणींची नवी/जुनी यादी तयार होऊ शकेल.

(भाग - २ रा समाप्त. क्रमश:)


- प्रा. हरी नरके,

१४/७/२०२०

संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२


पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी पदवीचे शिक्षण घेत असताना ३ वर्षात आंतर राज्य, आंतर विद्यापीठीय पातळीवरील १३३ वादविवाद-वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. देशाचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना-



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी रेग्युलर बी.ए. केलं. पुणे विद्यापीठात पहिला आलो. तेव्हा राज्यपाल न्या. एस. के. देसाई यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि २५ पुरस्कार स्विकारताना- (१६/१०/१९८७)


सामाजिक-सांस्कृतिक कार्याबद्दलचा राज्यव्यापी महानगर पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी यांच्या हस्ते स्विकारताना, शेजारी गो.रा.खैरनार व इतर मान्यवर


रतन टाटा यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार स्विकारताना, शेजारी जे. ई. तळौलीकर

Tuesday, July 7, 2020

नामांतर आंदोलनातले वयाच्या विशीच्या आतले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके

१९७८ साली मी इयत्ता नववीत शिकत होतो. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा निर्णय पुलोद शासनाने घेतला. या निर्णयाला विरोध  करण्यासाठी मराठवाड्यात भीषण जाळपोळ आणि हिंसाचार केला गेला. त्यापुर्वी ती मागणी फक्त मराठवाड्यापुरती मर्यादित होती. पण सवर्णांनी बौद्ध आणि अनुसुचित जातींची घरंदारं जाळण्यामुळे हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचा/देशाचा बनला. मी त्यानंतर प्रत्येक नामांतरवादी मोर्च्यांमध्ये सहभागी होऊ लागलो. लॉन्ग मार्च मध्येही मी सामील होतो. तेव्हापासून माझी नामांतर आंदोलनाशी पक्की नाळ जुळली.

त्यापुर्वी महाराष्ट्रात शिक्षकांचा ५४ दिवसांचा राज्यव्यापी संप झाला होता. तेव्हा मी " पुणे दर्शन" हा २०० पृष्ठांचा प्रबंध लिहित होतो. पुढे १९८० साली गुजरातमध्ये राखीव जागा विरोधी हिंसाचार झाला. त्यावेळी पुण्यातल्या आमच्या " दर्पण ग्रुपतर्फे" आम्ही राखीव जागांच्या बाजूने समाजप्रबोधनासाठी पुणे शहराच्या चौकाचौकात पोस्टर प्रदर्शनं आयोजित केली होती. मंदार, सचिन, श्रुती, संतोष, सुनंदन, वर्षा, वंदना, शैलजा, नितीन, पट्या असे आम्ही दर्पणचं काम करायचो. मंदार आमचा नेता होता. आम्ही त्यावेळी पुणे शहरातील नामवंत शाळांमध्ये चालणारे गैरप्रकार यावर अभिरूप न्यायालय नावाचा नाट्यप्रयोग सादर केला होता. आम्ही सर्वजण पुण्यातल्या आघाडीच्य शाळांमध्ये शिकलेलो होतो. आम्ही प्रत्येकजण त्या त्या शाळेत प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी असल्याने शाळांच्या व्यवस्थापनांची फार मोठी गोची झाली होती. आम्ही बलुतं, उपरा या दलित आत्मचरित्रांवर/फुले-आंबेडकरांच्या पुस्तकांवर वादविवाद/ चर्चा करायचो.

तेव्हा आम्ही दर्पणच्या मुलामुलींनी नव्या पेठेतील मनपाची शाळा दत्तक घेतलेली होती. तिथल्या झोपडपट्टीतील गरीब मुलामुलींसाठी मोफत कोचिंग क्लास चालवायचो. आमच्या सदिच्छा शिक्षण संस्थेतर्फे गरिब, गरजु, मागासवर्गीय मुलामुलींना वह्या, पुस्तके, इतर शालेय साहित्य आम्ही मोफत पुरवायचो. सनातनी पुणेरी मंडळी राखीव जागांना कडवट विरोध करायची. टिपीकल पुणेकर विरोधात असूनही आमच्या "आरक्षणवादी पोस्टर प्रदर्शना" ला चौकाचौकात तुफान गर्दी जमायची.


कडाक्याच्या चर्चा व्हायच्या. १९८० साली मी पुणे आकाशवाणी आणि मुंबई दूरदर्शनवर पहिल्यांदा राखीव जागांच्य बाजूने बोललो. आम्ही अधिक पेटून आरक्षण समर्थनपर पथनाट्याचे कार्यक्रम करायचो. "भटक्याविमुक्तांचा एल्गार येत आहे" हे पुस्तक मी स्वखर्चाने प्रकाशित केलं तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. त्या काळात मी लिहिलेले लेख साधना, घोषणा, स्त्री, किर्लोस्कर, मनोहर व इतर अनेक नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. जाणत्यांना ते आजही बघता येतील. मी तेव्हा हडपसरच्या जवळ साडेसतरा नळीला भटक्यांच्या दांगट वस्ती नामक झोपडपट्टीत राहात होतो. तिथल्या शाळेत न जाणार्‍या मुलांसाठी मी बालवाडी चालवायचो. त्या कामावर प्रसिद्ध लेखक ह.मो.मराठे यांनी तेव्हा किर्लोस्कर मासिकात लिहिलेले होते. इतक्या लहान वयात एव्हढे उद्योग आम्ही कसे करीत असू याचेच आज मला नवल वाटते.


१९८२ साली माझं वय जेमतेम १९ वर्षांचं होतं. मुंबईत झालेल्या नामांतर सत्याग्रहात मी पुण्याहून जाऊन सहभागी झालो होतो. ह्या नामांतर सत्याग्रहाचे नेतृत्व डॉ. माईसाहेब आंबेडकर, एस.एम. जोशी, कॉ. शरद पाटील, डॉ. बाबा आढाव, रामदास आठवले, प्रा. अरूण कांबळे आदींनी केलं होतं. आम्हाला अटक करून कोर्टात न नेता थेट ठाण्याच्या तुरूंगात नेण्यात आलं. ठाण्याचा तुरूंग तसेच मुंबईतले सगळे तुरूंग भरल्यावर मग काहींना येरवडा, नाशिक, कोल्हापूर, औरंगबाद अशा दुसर्‍या तुरूंगांमध्येही पाठवण्यात आले. आम्हाला मात्र ठाण्यात ठेवण्यात आलं. पहिल्याच दिवशी या सत्याग्रहात १६००० लोकांना अटक झालेली होती. तुरूंगात जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. ( त्यानंतर तुरूंगात भाषणं करण्याची अनेक निमंत्रणे आल्याने माझे बरेच तुरूंग बघून झाले.)


बॅ. बाबासाहेब भोसले तेव्हा मुख्यमंत्री होते. अजिबात जनाधार नसलेले, दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या कृपेने मुख्यमंत्री झालेले. काहीसे विक्षिप्त आणि वकीली बाण्याचे. त्यांनी आम्हाला धडा शिकवण्यासाठी २२ दिवस तुरुंगात ठेवले. हे २२ दिवस माझ्या आयुष्यातील सर्वाधिक श्रीमंतीचे दिवस ठरले. त्याच आंदोलनात निखिल वागळे, कपिल पाटील, सुनिल तांबे, नितीन वैद्य, प्रतिमा जोशी, सविता कुडतरकर, ज्योती नारकर हा मुंबईचा ग्रुप माझा दोस्त झाला.

मी या सत्याग्रहातला वयाने सर्वात लहान सत्याग्रही होतो. त्यामुळे मला नेत्यांसाठी राखीव असलेल्या बराकीत ठेवण्यात आले होते. त्या बराकीत मी लेखाच्या सुरूवातीला ज्यांचा उल्लेख केलाय त्या नेत्यांशिवाय डॉ. कुमार सप्तर्षि, अंकुश भालेकर, बाबूराव बागूल, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गजानन खातू, दिनकर साक्रीकर, लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. विजय मोरे, बापूराव नाईक आणि आणखी सुमारे ८० नेते होते.


या सर्वांचा २४ तास सहवास. दररोज झोपेचे ४/५ तास सोडले तर उरलेले १९/२० तास सतत चर्चा, वादविवाद, चळवळीची गाणी, नेत्यांची भाषणे, परिसंवाद. अतिशय सकस, समृद्ध, श्रीमंत आयुष्य. होय माझी बरीचशी सामाजिक जडणघडण त्या तुरुंगवासातच झाली. (भाग - १ ला, क्रमश:)



- प्रा. हरी नरके,
७/७/२०२०

संदर्भासाठी पाह- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१







Tuesday, September 18, 2018

नामांतर आंदोलन-

काल हैदराबाद मुक्ती लढ्याचा स्मृतीदिन झाला. त्यानिमित्ताने सन्मित्र सुनिल तांबे यांनी टाकलेल्या पोस्टवरील चर्चेत मी व्यक्त केलेली प्रतिक्रिया-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामुळे सुनिलची आणि माझी पहिली भेट आणि पुढे मैत्री  झाली.

१. नामांतराची मागणी करणारा पहिला ठराव १९७४ चा होता. तो औरंगाबादच्या श्री. मच्छिंद्र वाहूळ यांचा होता. तेव्हा वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे नामांतराची मागणी मराठवाडेतरांची होती, पुण्यामुंबईकडची ही मागणी होती हा आक्षेप निराधार होता. आहे. नामांतर लढ्यात हजारो मराठवाडाकर तुरूंगात आलेले होते. श्री. अंकुश भालेकर, Ankush Bhalekar, प्रा.एच.एम.देसरडा, श्री. बापूराव नाईक, श्री.सुभाष लोमटे, श्री. शांताराम पंदेरे, असे कितीतरी अग्रभागी होते. मी स्वत: हे प्रत्यक्ष बघितलेले आहे. आम्ही सारे तुरूंगाच्या एकाच बराकीत होतो.

नामांतर आंदोलनाची चाळीशी आणि नामांतराची पंचविशी उलटल्यानंतरही काही " बोलत्या/लिहित्या लोकांना " विद्यापीठाचे हे नामांतर मान्य नसल्यानेच ह्या लंगड्या सबबी पुढं केल्या जात असाव्यात. "नाजूक पैलू" वगैरे असतेच तर नांदेडच्या प्रस्तावित "स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा" विद्यापीठातील "मराठवाडा" शब्दालाही श्रॉफ-भालेरावांनी विरोध केला असता.

२. मराठवाडा हे प्रदेशवाचक नाव कायमच राहणार होते. त्यात बदल करायचा नव्हता. दैनिक मराठवाडा, मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा कृषी विद्यापीठ, अशी नावात मराठवाडा हा शब्द असलेली असंख्य उदाहरणं होती. त्यातही बदल करायचा प्रश्न नव्हता.

३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाल्याने मराठवाड्याची अस्मिता कशी काय नष्ट होत होती? समजा श्रॉफ-भालेरावांचा नामांतरविरोध वैचारिक होता तर हजारोंची घरं जाळणं, अनेकांच्या क्रूर हत्या करणं, दलित वस्त्या बेचिराख करणं, हे सारे मराठवाडा शब्दाची/अस्मितेची उंची वाढवणारे होते का? ह्या अत्याचाराच्या निषेधात सारा महाराष्ट्र एकवटला. त्यात पुणे-मुंबईकरही होते. तर त्यांनाच मागणी करणारे म्हणून रंगवले जायला लागले. ह्या इतिहासलेखणातल्या नेहमीच्या क्लुप्त्या आहेत.


नामांतर ठराव विद्यापीठाच्या सिनेटने मंजूर करून सरकारकडे पाठवला होता. विधीमंडळाने तो एकमताने २७ जुलै १९७८ रोजी संमत केला. त्या दिवसापासून हजारो निरपराध दलितांवर अत्याचार करणार्‍या गुंडावरच्या सर्व केसेस श्री. गोविंदभाई श्रॉफ यांनी सरकारला मागे घ्यायला लावल्या. यावरून ते नेमके कोणाच्या पाठीशी होते? याबाबत अधिक बोललेच पाहिजे काय?


श्री. गोविंदभाई श्रॉफ यांचा राज्य सरकारने पहिलीपासून इंग्रजी शिकवायलाही विरोध होता. "गोविंदभाई, तुम्ही, इंग्रजीला विरोध करता मग तुमच्या कुटुंबातली मुलं इंग्रजी माध्यामात कशी घालता? तुमच्या संस्थेत पहिलीपासून इंग्रजी कसं शिकवता?" असं मी त्यांना औरंगाबादच्या एका सभेत समोरासमोर थेट विचारलं होतं. ते उत्तर देऊ शकले नाहीत. तर अशी होती त्यांची तत्वनिष्ठा वगैरे!


४. श्रॉफ-भालेरावांच्या आडनावाच्या शिळ्या कढीला आणखी किती काळ उत आणायचा ? अनेक बाबतीत श्रॉफ-भालेराव महान होतेच. पण म्हणून त्यांची सगळी मतं आम्ही निमूटपणे मान्य करायची काय?

- प्रा. हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८